Monday, January 8, 2018

दंगेधोपे आणि रोजीरोटी

दंगेधोपे आणि रोजीरोटी
सन १९९० च्या दरम्यानची घटना असावी. रस्त्यावरील सायकल पडल्यातून किंवा पाडण्यातूनन झालेल्या किरकोळ, फालतू बाचाबाचीला धार्मिक रंग देण्यात येवून गुन्हा नोंदण्यात आला. मुस्लीम तक्रारदार होते आणि स्वाभाविकच तक्रार हिंदूंविरूद्ध होती. दोनचार जण जखमी झाल्याचे दाखवले होते. सायकलच्या पडण्यातून झालेल्या अपघातात किती लागणार ? काय जखमा होणार ? झाल्या तरी त्या कशा स्वरूपाच्या असणार ? याचा आपण अंदाज करू शकतो. पण ‘हो गई, हो गई’ वगैरे आरड्याओरड्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यासारखे केले गेले असावे.
पोलीसांचे एक बरे असते, असलेल्या वस्तुस्थितीपेक्षा ते पूर्वी राज्यकर्त्यांच्या इच्छेला जास्त महत्व देत असत, तर आता आकांडतांडव करणाऱ्यांना ! राज्यकर्त्यांच्या वर्तुळातील हे आकांडतांडव करणाऱ्यांपैकीच जास्त असतात व ते त्यामुळे महत्वाचे असतात. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने त्यांच्या महत्त्वाच्या मतदारांना दुखावणे हे त्यांच्या हिताचे नसते.
समाजातील कायदा व सुव्यवस्था, समन्यायी धोरण, भारतीय राज्यघटना आणि त्यातील मूलभूत अधिकार, सर्वधर्मसमभाव, सहिष्णु वृत्ती, जातीयवाद वगैरे गप्पा या सार्वजनिक व्यासपीठावरून बोलायलाच चांगल्या असतात. त्या आपण प्रत्येक भारतीय नागरिकाने पाळल्या पाहीजेत ही अपेक्षा, पण तसे बंधन कुठे आहे ? राज्यकर्ते, पुढारी, अधिकारीवर्ग वगैरे तर आपल्या स्वत:ला विशेष समजतो आणि समाजाने पण तसे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे आपण एकदा का राज्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या मतदारांमधे आले की आपल्याला आपोआपच विशेष वागणूक मिळते, हे समजण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज नाही. हे अगदी पूर्वी साक्षरता कमी होती, त्या वेळेपासून ‘महत्त्वाच्या मतदारांना व त्यांच्या पुढाऱ्यांना’ माहिती आहे. आता साक्षरता वाढल्यामुळे ते इतर बिनमहत्वाच्या मतदारांच्या लक्षात येऊ लागले, एवढाच काय तो अलिकडचा बदल ! राज्यकर्त्यांचे ‘महत्वाचे मतदार’ कोण असतात हे सर्वांनाच माहीती असल्याने, ते पुन्हा येथे सांगण्याची जरुरी नाही. त्यांना कायद्याचे संरक्षण देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्यच असते. मात्र या गडबडीत एखादे वेळेस इतरांचे कायदेशीर अधिकार डावलले जातात, एवढीच काय किरकोळ गफलत होते. त्याला काही इलाज नसतो, हे पण आता स्विकारले जात आहे; काही वेळा अपवाद घडतात, नाही असं नाही. असो.
त्यामुळे हिंदूमुस्लीम हा विषय आला की घटना काहीही असो, चूक कोणाची पण असो पोलीसांना मात्र दोन्हीकडील व्यक्तींवर केसेस करणे भाग असते. अर्थात अशावेळी तक्रार करणारे उत्साही तयारच असतात. काही जण तर तक्रार कशी करावी, त्यांत कोणाला व कसे अडकवावे, या प्रसंगाचा फायदा घेऊन आपल्या वैयक्तिक भांडणाचा कसा वचपा काढायचा, याचा फायदा वैयक्तिकपणे आर्थिक व इतर बाबींमधे कसा करता येतो वगैरे साध्य करण्याइतपत तज्ञ असतांत. काहींनी तर यांत इतके कौशल्य मिळवलेले असते की कशी तक्रार केल्याने काय होईल याचे आडाखे पण पक्के बांधून तयार असतात, फक्त दंगल करण्याचीच काय ती खोटी असते. त्यामुळे काही वेळा या सर्व आडाख्यांच्या पूर्ततेसाठी पण नाईलाजाने छोटी-मोठी दंगल व सदृश्य परिस्थिती घडवावी लागते. त्याला काही इलाज नसतो, काय करणार ?
एखाद्यास आपले समाजात, राजकारणात बस्तान बसवून विशिष्ट जागा व स्थान निर्माण करायचे असेल तर याचा पण उपयोग थोडा का असेना पण होवू शकतो. अलिकडे तर बदललेल्या परिस्थितीत याचा मुख्य उपयोग होऊ लागला आहे. तात्पर्य काय तर या सर्व मानसिकतेमुळे वस्तुस्थितीच्या विपरीत केसेस, त्या विषयाशी संबंध नसलेल्या व्यक्तींवर होतात. त्यांना वर्षोगणती न्यायालयांत हेलपाटे मारावे लागतात.
तर मुस्लीम माणसाने पोलीस स्टेशनमधे तक्रार केली, ती साधारणपणे चाळीस लोकांच्या विरूद्ध असावी. त्यांचे चाळीस जामीनदार, त्यांच्या सोबतीला येणारे आणि यांत काय होते याची गंमत पहायची इच्छा असलेले बरेचसे, असे निदान दीडशे लोक कोर्टात असायचे. त्यामुळे अशा दिनांकाचे दिवशी कोर्ट भरगच्च दिसायचे. या दरम्यान काहींचे पूर्वीचे वादविवाद मिटायचे, तर काही वेळा यांतून नवीन पण सुरू व्हायचे. काहीही असले तरी कोर्टाच्या बाहेरील हॉटेलवाल्याचा व्यवसाय मात्र बरा होई.
हे या केसचे न्यायालयातील काम पूर्वी माझेकडे नव्हते. मात्र या होणाऱ्या येरझारांच्या दरम्यान त्यातील एकाला सैन्यात नोकरी मिळाली आणि तो तिकडे हजर झाला. सरकारी नोकरी ! मग त्याच्या वैयक्तिक चारित्र्य, काही केसेस वगैरे संबंधाने चौकशी, संबंधीत विभागाकडून येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलीस स्टेशनला हा रिपोर्ट तर पाठवायचा होता. तो चुकीचा पाठवणे शक्य नव्हते. यांतील नोकरी नुकत्याच लागलेल्यावर रिपोर्ट पाठविण्याचे वेळी केस होती, असे कळविले तर याची नोकरी जाणार हे निश्चित होते.
या मुलाचे वडील बिचारे शाळेत शिपाई ! त्यांची ताकद किती असणार आणि धाव तरी कुठवर असणार ? बिचारे आपल्या रोजच्या भजनांत ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ किंवा ‘ऊस डोंगा परि भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ किंवा ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया’ किंवा ‘हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना, कोण करी’ म्हणत रमणारा हा जीव ! दिवसभर शाळेचे काम आणि रात्री देवाचे नांव घेत निद्रेच्या अधीन होणारा, त्या मुलाचा बाप ! बोलता बोलता कुठं तरी बोलला ‘मुलाला नोकरी लागली आहे. पोलीसांचा रिपोर्ट गेला, की काम आटोपले.’ आपले हितचिंतक जसे असतात तसे हितशत्रूपण असतात. हितचिंतकापेक्षा हितशत्रू जास्त दक्ष असतात, आपल्याला नुकसान पोहोचवावे यासाठी ! ‘पोलीस का क्या रिपोर्ट जानेवाला हैं ? जैसा है वैसाही जायेगा । तुम्हारे लडकेकी नोकरीका कोई सच्चा नहीं ।’ एक जण बोलून गेला. हा बिचारा चौकशीसाठी पोलीसस्टेशनला गेला, सोबत गांवातील मंडळी होतीच ! पोलीसस्टेशनामध्ये पण सह्रदयी मंडळी असतात. त्यांनी केसचे कागद बघीतले. त्यांच्या घटना लक्षात आली. पण त्यांची पण मदत करण्याची मर्यादा असते, त्या पलिकडे ते मदत करू शकत नाही. ‘आम्हाला या तारखेपर्यंत रिपोर्ट पाठवायचा आहे. तोपर्यंत काय करायचे असेल ते करा.’ त्यांच्या या सांगण्यावर या मुलाच्या वडिलांकडे काही उत्तर नव्हते. गांवातील मंडळींनीच विचारले, ‘काय व कसे करायचे ?’ यांवर ‘कोर्टाचा आदेश द्या. आम्ही तसे कळवू. मग तुम्हाला अडचण येणार नाही.’ असे उत्तर दिले. ही सर्व मंडळी तेथून निघाली आणि मग चहा प्यायला हॉटेलमध्ये बसली. तेथे असतांना, संबंधीताने चहा पिण्याच्या निमित्ताने हॉटेलात येवून सांगीतले, ‘केस चालवून निकाल घ्या, तुमच्या बाजूने ! केसमधे काही दम नाही, हे माहीती आहे. किंवा तक्रारदाराला केस मागे घ्यायला सांगा, दुसरा मार्ग नाही.’ ही सर्व मंडळी विचारात पडली. शेवटी आपापल्या घरी गेली.
ज्या वकिलांकडे हे काम होते, त्यांना विचारले तर त्यांनी निदान दोनतीन वर्षे तरी काम चालणार नाही, असे काहीसे सांगीतले. यांच्याजवळ तर इतका वेळ नव्हता. आपसात करून केस मागे घ्यावी म्हणून सगळे प्रयत्न झाले. केस संपल्या शिवाय नोकरीचे खरे नाही, हे समजल्यावर तर तक्रार करणाऱ्यांना व ‘जखमी’ झालेले दाखविल्यांना फारच महत्व आले. गांवातील प्रतिष्ठीत, वजनदार मंडळींनी भरपूर प्रयत्न केले. त्या वेळच्या त्याच्या मित्रांची, कार्यकर्त्यांची धावपळ तर विचारू नका. या परिस्थितीचे पोलीसांना पण वाईट वाटत होते.
सत्य कधीही अनाथ नसते तर त्याचे पितृत्व, पालकत्व स्विकारायला परमेश्वर स्वत: येतो, अगदी कोणाच्याही रूपात ! निदान तशी बुद्धी तरी कोणाला देतो आणि कोणीही त्याच्या बाजूने उभा रहातो. अनाथ असते ते असत्य ! एरवी डौलात मिरवणारे, वैभवाच्या झगमगाटात विहार करणारे उघडे पडले की त्यांचे पालकत्व स्विकारायला कोणी नसते, तर उलट त्याला झटकून टाकून, अनौरस असल्याचा देखावा निर्माण केला जातो.
शेवटी एकाला वाटले असावे, माझ्याकडे यावे. एके दिवशी हा सगळा घोळका माझ्याकडे ! ही सर्व मंडळी पाहिल्यावर, गांवातील काही विषय असावा हा अंदाज आलाच ! भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, विश्व हिंदू परिषद, संघ, भाजीचे व्यापारी वगैरे ही सर्व मंडळी माझ्याकडे ! ऑफिस बाहेरील चहावाला मोठ्या किटलीभर चहा घेऊन सर्वांना ग्लासमधून देत होता. ‘वकीलसाहेब, हे असे त्रांगडे झाले आहे.’ म्हणत त्यांनी सर्व हकीकत सांगीतली. त्या मुलाच्या वडीलांच्या चेहऱ्यावरील भाव न बोलता समजत होते. ‘तुम्ही वकील लावलेले आहेत, ते पण आपलेच आहे. ते काय म्हणताय, त्याप्रमाणे करा. ते आणि मी वेगळे नाही.’ मी माझी अडचण सांगीतली. त्यांवर सर्वांनी ‘ते पण वकील तेच म्हणाले, भोकरीकर वकील करणार असतील, तर ते आणि मी वेगळे नाही. त्यांनी केले तरी मीच केले असे समजा.’ सांगीतले. ‘मोठे ब्रह्मसंकट टाकले बुवा तुम्ही माझ्यासमोर.’ मी म्हणालो. ‘काही करा, तुम्ही नाही म्हणू नका. हे कोर्टातून मार्गी लावा, नाही तर याची नोकरी जाईल.’ हे ऐकल्यावर मी नाही म्हणणार नव्हतोच याची त्यांना कल्पना होतीच. ‘विश्वास असेल तर मग माझ्या म्हणण्याप्रमाणे करावे लागेल. फाटे फोडायचे नाही.’ मी म्हणालो. त्यांची आपसांत काय बोलणे झाले याची प्रगती ऐकली. विरूद्ध गट तक्रार मागे घेणे कठीण होते, त्यांनी घेतली तर न्यायालयाने ऐकले पाहीजे, ही अडचण होती. सर्वांना कोर्टात यायला सांगीतले. सोबत तक्रार करणाऱ्यांना पण निरोप देण्यास सांगीतले.
कोर्टात ही सर्व मंडळी आली. तक्रारदार आले नाही, ते येणारच नव्हते. लालचंद पाटलांच्या कॅन्टीनमधे बसून चहा पीत असतांना होत असलेली चर्चा त्यांनी ऐकली. त्यांनी चहाचे पैसे घेतले नाही. ‘साहेब, माझ्या पोरासाठी तुम्ही एवढं करताय आणि मी चहासुद्धा पाजणार नाही.’ म्हणाल्यावर काय बोलणार ? सरते शेवटी ‘आपसांत करायला तयार नसतील तर मग आपल्याला एक फौजदारी करावी लागेल. याच्या मागे मेंदू कोणाचा आहे हे तर शोधावे लागेल ना ?’ मी सांगीतले. बारमधे हे ऐकू जाईल असे बोलल्यावर संध्याकाळी तक्रारदार त्यांच्या वकिलाकडे हजर ! ते ‘त्यांच्या वकिलांना’ चहाला घेऊन गेले. मी घरी निघून गेलो.
दुसरे दिवशी, पुन्हा सर्व मंडळी माझ्या ऑफिसवर ! ‘तक्रारदार तयार आहे ना ?’ मी विचारल्यावर होकार आला, आश्चर्याने ! त्यांची पंचायत बसली होती आणि आपसात करून टाका म्हणून ठरले. ‘आता वेळ घालवू नका. सर्व जण कोर्टात लवकरात लवकर केव्हा येतील ते आणा. मी कागद तयार ठेवतो. तीनचार दिवसांत ही गांवातील मंडळी मागे लागली आणि सर्वांना कोर्टात हजर केले. अर्ज देवून केस बोर्डावर घेतली. ही भलीमोठी यादी पाहिल्यावर ‘यांची हजेरी असिस्टंट रजिस्ट्रार ऑफिसमधे घ्या. सर्व असल्यास सर्वात शेवटी माझ्याकडे पाठवा.’ न्यायाधीशांनी सांगीतले. हे सांगीतल्याने ‘आज काही तरी या केसमधे होतेय’ ही बातमी गांवात लागली. मग काय, कोर्ट सुटण्याच्या वेळेस कोर्टात जायला जागा नाही आणि आवारात गर्दी मावेना ! कोर्टातील त्यावेळचे असिस्टंट रजिस्ट्रार श्री. एम्. डी. परदेशी होते. ते कायद्याच्या बाबतीत नेहमीच चौकस असत. त्यांनी मला विचारले, ‘हे होईल कसे ?’ यांवर मी न बोलता, त्यांना न्यायालयात दाखवणार असलेली ॲथॉरिटी दाखवली व शांत रहाण्यास सांगीतले. त्यांनी वाचली, भराभर सर्वांची हजेरी घेतली तोवर साडेचार-पावणेपाच वाजले होते. फाईल न्यायालयात आली. युक्तीवाद सुरू झाला. ‘गावातील वातावरण चांगले रहावे, दोन्ही समाजात शांतता रहावी व सामंजस्य टिकून रहावे यासाठी, आपसांत करण्याचे ठरले आहे.’ मी सांगीतले. न्यायाधीश बहुतेक श्री. शेख होते. ‘सरकारी केस आहे ही, सेक्शन बघीतलेत का ?’ त्यांनी विचारले. यांवर ‘हो, बघीतले. आपसात करता येते. न्यायालयाची परवानगी लागते. ती त्यांनी तक्रारदार व जखमी असलेल्यांची चौकशी करून खात्री करून घेऊन मग द्यावी. सर्व हजर आहेत.’ मी सांगीतले आणि अशाच घटनेत उच्च न्यायालयाने अशा वेळी खालील न्यायालयांनी काय करावयास हवे याचे निर्देश असलेला निर्णय त्यांना दिला. तक्रारदार व जखमी झालेले हे वेगवेगळे अगोदरच उभे ठेवले होते, ऐनवेळेस शोधाशोध नको. एकदा हे हुकले की पुन्हा जमणे कठीणच ! न्यायाधीशांनी तक्रारदार व जखमींना विचारले. त्यांनी तेच सांगीतले, तिखटमीठ लावून ! न्यायाधीशांना हसू आले. त्यांनी निर्णय वाचला. सर्व कागदपत्र वाचले. त्यांच्याच सह्या असलेची विचारून खात्री केली. ‘केस काढून टाकायची का ?’ हे विचारले, यांवर होकारार्थी उत्तर आल्यावर ‘ठीक आहे. केस काढून टाकली.’ असे त्यांना सांगीतले आणि ज्यांच्यावर केस होती त्यांना ‘तुम्हाला या केसमधून सोडून देण्यात आले आहे.’ हे सांगीतले. आम्ही सर्व बाहेर आलो. बाहेरील लोकांना काय झाले नेमके समजत नव्हते. मी बाररूम मधे आलो आणि जो समोर होता, त्याला ‘आपली केस संपली आहे. सर्वांसाठी चहा सांग’ म्हणून सांगीतले. ‘तुम्ही सर्व उद्या भेटा ऑफिसवर !’ हे सांगून जायला सांगीतले.
दुसऱ्या दिवशी सर्व आल्यावर प्रत्येकालाच उत्सुकता की हे कसे काय झाले ? म्हटलं ‘हे जर आम्ही सांगायला लागलो, तर आमचे कसे होईल ?’ खोट्यानाट्या तक्रारीने एकाची आयुष्याची रोजीरोटी जाणार होती. सर्व गांव एक झाल्याने दबाव वाढला आणि सरते शेवटी माझे संत रामदास स्वामींचे ‘ठकासी व्हावे ठक, उध्दटासी उध्दट’ हे ब्रह्मास्त्र कामास आले. ‘तक्रार कोणालाही कोणाच्याही विरूद्ध करता येते, हे लक्षात ठेवा.’ हे बारमधे मी बोललो अन् वातावरण बदलले.
गेल्या आठवडाभरातील ज्या मूर्खासारख्या, डोके भडकविणाऱ्या खोट्यानाट्या घटना पाहिल्या अन् हे आठवलं !

7.1.2018

No comments:

Post a Comment