Tuesday, December 26, 2017

चारा घोटाळा

चारा घोटाळा

आज श्री. प्रविण बर्दापूरकर यांनी चारा घोटाळा प्रकरणाबद्दल छान लेख लिहीला आहे. तो वाचल्यावर मनांत आलेले थोडक्यात दिले. ——-
न्यायालयासमोर ज्यावेळी तपासाची सर्व कागदपत्रे आणि पुरावा उपलब्ध असतो, त्याचवेळी न्यायाधीश कोणीही असो, विशेष फरक पडत नाही. सर्वांना अपेक्षित असाच निर्णय येतो. कारण वर्तमानपत्र किंवा विविध मार्गांनी येणाऱ्या बातम्या आणि उपलब्ध पुरावा यांत फार फरक असतो. न्यायालयांत पुरावा मान्य होतो, बातम्या नाही. अलिकडे येणाऱ्या बातम्या या जनहिताचा विषय असेल तर दखल घेण्यापुरत्या महत्त्वाच्या असतात.
दुसरी बाब म्हणजे न्यायालयाचा निर्णय जेव्हा येतो त्यावेळी निर्णयावर टीका होते. असा निर्णय का आला, यांस कारणे कोणती, असा निर्णय येण्यास कोणकोण व कायकाय जबाबदार आहे यांचा विचार अपवादानेच कोणी करतात. असा निर्णय का लागला हे निकालपत्र वाचल्यावरच समजू शकते, ते पण त्यांतील खाचाखोचा माहिती असतील तरच, अन्यथा नाही. त्यामुळे ही आरडाओरड ही वृथा ठरते.
तिसरी बाब म्हणजे शासनाने ठरवले आणि त्यांस समर्थपणे अंमलबजावणी करणारे कर्मचारी मिळाले तर अगदी अपवादात्मक परिस्थितीत गुन्हेगार सुटू शकतील, असे आज देखील कायदे आहेत. शासन किंवा कर्मचारी यापैकी एकाचा जरी तसा सत्यशोधनाचा विचार असेल, तरी शक्य आहे; पण अडचणी वाढतात, त्रास होतो. प्रश्न आहे शासन किंवा कर्मचारी यापैकी कोण ठरवतो याचा !
चौथी बाब म्हणजे न्यायव्यवस्था ! या सर्व मंडळींनी जर व्यवस्थित काम केले तर चित्र स्पष्ट असते, त्यांवर निर्णय द्यायला अडचण तुलनेने कमी असते. मात्र तसे नसेल तर मात्र आकाशातील त्यांच ढगांमधून प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसतात, तशी न्यायालयांची अवस्था होते. न्यायालय चालवणारी पण माणसेच आहे, एवढं लक्षात ठेवले तरी पुरे !

२४. १२. २०१७

नाते सांभाळले, अन -------------!

नाते सांभाळले, अन -------------!

पूर्वीच्या काळी, साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी, शेतकरी कुटुंबातील पाचसहा भाऊ आणि त्यांची मुलेबाळे, तीनचार बहिणी आणि या सर्वांचे आईवडील एकत्र रहायचे, अगदी एका ठिकाणी, हे काही नवीन नव्हते ! हा घरातीलच मोठा कबीला, तेवढाच मोठा गोतावळा आणि शेजारपाजार ! ती मंडळीपण नातलगांसारखीच ! घरांतील मंडळींना सर्वाना स्वतःच शेतासाठी कष्ट करावे लागत. मजूर कोण आणि मालक कोण ? म्हटले तर सर्वच मजूर आणि मालक ! कारण सर्वानाच तर शेतांत राबायचे आहे, तेंव्हाच तर पोटाला जरा पोटभर खायला मिळणार. सर्वजण एकत्र रहात असले की प्रत्येकाच्या सुखात जसे वाटे पडायचे तसेच दुःखात पण दुःखीतांस आधार मिळायचा, त्याला सांभाळून घेतले जायचे. पूर्वी नेहमीच खेडेगावांत दिसत असलेली अशी उदाहरणे, आता कमी झालेली आहेत पण तरीही अजूनही थोडी का होईना पण आजही दिसतात, दिवसेंदिवस कमी होत चाललीय हे खरंय. प्रत्येकाला स्वतःची पडलेली आहे असे म्हणा का प्रत्येक स्वार्थी झाला आहे असे म्हणा का आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी या फक्त बोलायच्या कल्पना राहीलेल्या आहेत, अंमलात आणायच्या नाही अशी समजूत झाली आहे कुणास ठाऊक ?

घटना साधारणतः १९६१ सालातील, शेतकऱ्याचा अशाच गजबजलेल्या घरातील ! चारपांच भावंडातील मोठा भाऊ देवाला प्रिय झाला आणि एकत्र कुटुंबाची जबाबदारी ही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्या नंतरच्या भावाकडे आली. मोठया भावाचा एकच मुलगा आणि त्याची आई अगोदरच त्याला सोडून गेली होती. घरांतील आईबापाविना हा पोरगा सांभाळला तो त्याच्या काकाने आणि काकूने ! त्यांनापण मुलेबाळे होतीच पण फक्त एकच मुलगी ! घरात भांड्याला भांडे लागायचे पण मुलाच्या काकाने आपल्या कर्तव्यांत कधी कसूर केली नाही. या भाऊबहीणीच्या नात्यांत काही कधी चुलतपणा डोकावला नाही आणि नातं सख्खच राहिलं ! यथावकाश मुलाचे लग्न झाले, घरी सुनबाईची पावलं लक्ष्मीची पावलं बनून आली. काकाला एका जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. इतर भावांना त्यांची मिळकतीतील हिस्से दिलेले होतेच ! पण या आईबापाविना असलेल्या पोराला सांभाळता सांभाळता हे काका त्याच्यातच केंव्हा राहू लागले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. इतके हे काकापुतणे एक विचाराचे झाले होते. त्यानंतर मुलीचे लग्न झाले आणि मुलगी तिच्या घरी सासरी गेली. मुलीच्या लग्नात या भावाने कसली उणीव पडू दिली नाही. 

यापूर्वीच काकाने त्याच्या हिश्यातील काही जमिनी, घरे विकली; थोडी जमीन आणि एकदोन घरे राहीली होती. या पुतण्याचाही हिस्सा याच्याजवळच होता. काका-पुतणे असे वेगळे नातेच माहीत नव्हते. काका कुटुंबाच्या कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आणि सर्व जबाबदारी पुतण्याने सांभाळली. काकाला वेगळे रहाण्याची काही आवश्यकताच नव्हती आणि तसा विचारही कोणाच्या मनांत नव्हता. आईबापाविना असलेल्या या पोराला काकाने स्वतःचा पोरगाच समजून मोठे केले आणि मग हा पुतण्या, काकाला आपला बाप म्हणूनच सांभाळू लागला. त्याचे दुखणे-खुपणे, जेवण-खाण, उठ-बस हे सर्व पुतण्या, त्याची पत्नी पहायची. मुलगीपण कधी अधूनमधून बापाला पहायला म्हणजे भेट घ्यायला यायची आणि त्यांची उस्तवार जावईबापूंच्या पाहुणचारासहीत हा पुतण्या आणि त्याची पत्नी बघायची. काकाला समाधान वाटायचे, आपल्या पश्चात आपल्या मुलीची काही काळजी नाही. म्हातारा मनाशीच खूष व्हायचा आणि देवाचे आभार मानायचा. 'माझ्यानंतर तुझेच आहे सगळे, तूच पाहतो आहे आता कधीचे. आता माझा काही भरवसा नाही. काय कुठे नांव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज वगैरे द्यायचे असतील तर दे, माझे अंगठे घे, मी द्यायला तयार आहे'. म्हातारा काका समाधानाने म्हणायचा. 'शेतीबाडी आणि घरंदारं काय कुठे पळून जाताहेत का. मीच तर पाहतोय सर्व आणि तू काही अजून जात नाही वर, पोराचे लगन पहायचे आहे अजून !' पुतण्या काकाची समजूत काढायचा. असे करता करता अर्जफाटे झालेच नाही, शेतीबाडी आणि घरदार म्हाताऱ्याचेच नांवाने राहीले आणि कोणतीही वाट न पहाता देवाने शेवटी एकदा या काकाला आपल्याकडे बोलावून घेतले. सन १९९२ च्या दरम्यानची ही गोष्ट ! या पुतण्याने काकाचे सर्व अंत्यसंस्कार आपल्या बापाप्रमाणे केले आणि आपले पितृऋण फेडले. त्याला लहानपणीच गेलेला आपला बाप तरी कुठे आठवत होता? मुलीला बापाचे समजले, मुलगी आली, चार दिवस राहीली, बापाचे जाण्याने झालेले दुःख हलके केले आणि निघून गेली. मुलगापण आपल्या कामाला लागला.

वर्ष-दीडवर्ष झाले, दरम्यान बहिणीचे कान कोणी फुकले कोणांस ठावूक पण तिने कसलासा निर्धार केला. आणि एका दिवशी त्या भावाला या बहिणीची तालुका कोर्टामार्फत नोटीस आली ! बहिणीने भावाविरुद्ध दावा केला होता, वर्ष होते १९९३ ! आपल्या बापाची सर्व मिळकत आपल्याला मिळावी कारण आपण त्याचे एकमेव वारस आहोत म्हणून ! लहानपणापासून सख्खे-चुलत माहित नसलेली ही भावंडं, सख्ख्या भावाबहिणीप्रमाणे एकत्र राहीलेले हे भाऊ बहीण आता मिळकतीसाठी कोर्टांत उभे होते.  नेमका हक्क कोणाचा यांवरून वाद सुरु होणार होता, नव्हे सुरु झाला होता. बहिणीला जसे सांगणारे होते तसे भावाला देखील सांगणारे होते. कायदा भलेही थोडा बहिणीच्या बाजूने असेल पण समाज, समाजाचा पाठींबा भावाच्या बाजूने होता. भावाने त्याच्या लहानपणापासून काकाने स्वतःच्या मुलाप्रमाणे कसे सांभाळले हे सांगीतले, त्याचप्रमाणे आपणही काकासोबत वडिलांप्रमाणेच कसा व्यवहार केला हे सांगीतले. या बहिणीच्या लग्नात कायकाय केले हे सांगीतले. काकाला काय केले नाही अगदी सर्व केले हे सांगीतले. काका कित्येक वेळा 'शेतीबाडी, घरे नांवावर करून घे' हे सांगत असतांना देखील मी तसे केले नाही कारण माझ्या मनांत पाप नव्हते, हे सांगीतले. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा हिस्सापण काकाजवळच होता हे देखील सांगीतले. दोन्ही बाजूने भरपूर कागदपत्रे रंगली, साक्षीपुरावे झालेत. नात्यांबद्दल वाद नव्हताच ! कायदा सरळ होता. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातील तरतुदीनुसार मुलीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळाला. सन २००५ मध्ये दाव्याचा निकाल बहिणीच्या बाजूने लागला. भावाला, समाजाला आणि नातेवाईकांना जरा वाईट वाटले. बहिणीच्या बाजूने निकाल लागला असल्याने त्यांचेकडील मंडळी खूष होती. भावाने तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयांत दाद मागीतली. वरील जिल्हा न्यायालयाने देखील बहिणीची बाजू उचलून धरत तालुका न्यायालयालाच निकाल सन २०११ मध्ये कायम केला. भावाला वाईट जसे वाटले तसा संतापही आला. 'काकाचे मी केले ते मिळकत मिळण्यासाठी नाही हे नक्की ! पण मग त्यावेळी ही बहीण काय करत होती ? फक्त मिळकत हवी, जबाबदाऱ्या नकोत.' मनांतल्या मनांत भाऊ पुटपुटू लागला. ही अवस्था बहिणीच्या हितचिंतकांना समजल्यावर त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

हे दोन्ही निकाल अनुभवल्यावर भावाला वाईट वाटले. समाजाच्या विचार काहीही न मानता, न्यायालये कसे निकाल देतात आणि कायदापण कसा आहे हे समजतच नाही, भावाचा जीव गत काळातील घटना आठवून तीळतीळ तुटत होता. भावाने शेवटी जिद्द धरली आणि जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नामदार उच्च न्यायालयांत दाद मागण्याचे ठरविले. तो माझ्याकडे आला, संतापलेल्या मनाने पण निराश भावनेने ! 'जवळची माणसे इतकी बदलतात ? पैसा इतका मोठा आहे ? नातीगोती पैशासमोर सर्व खोटी ? हिच्या बापाचे कसलीही अपेक्षा न धरता आयुष्यभर करणारा मी, त्यावेळी ही कुठे गेली होती? ' त्याचा संताप आपल्या समाजाच्या विचारसरणीला साजेसा होता. त्याने सांगीतलेल्या घटनेवरून आणि घडलेल्या परिस्थितीवरून कायकाय करता येईल याचा विचार केला. खालील न्यायालयांत काय लिहावयाचे, सांगावयाचे अथवा पुरावा देण्याचे राहून गेलेले आहे हे पाहीले. जुन्या आणि नवीन हिंदू कायद्याचा विचार करून नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखल केले.

त्यापूर्वी पक्षकाराला बहिणीला काहीतरी द्यावे लागेल याची स्पष्ट कल्पना दिली. नवराबायकोचे भांडण, भाऊबंदकीचे भांडण, कायमच्या शेजाऱ्याचे भांडण वगैरे केसेस असतील तर मी शक्यतोवर आपसांत होत असेल तर पहातो. संबंध टिकले तर चांगलेच, हे माझे पाहिलेपासूनचे धोरण आहे. त्याने काही वेळा आर्थिक नुकसान होते पण मानसिक फायदा होतो. आजकाल मानसिक फायद्याला कोणी विचारात नाही, पण मला बरे वाटते आणि मी ते करतो. मी त्याला म्हटले 'हे बघ, आजपर्यंत जर तुम्ही बहीणभावाने एकमेकांबद्दल दुजाभाव बाळगला नसेल तर अजूनही काही वेळ गेलेली नाही, गावांत नातेवाईकांसोबत, संबंधितांसोबत बैठक घ्या. हे सर्व सांगा. याचे परिणाम सांगा. आपल्याला समाजातच रहायचे आहे, तुमचे मन स्वच्छ ठेवा. मनांत पाप येऊ देऊ नका आणि जुन्या उखाळ्यापाखाळ्या काढू नका. काहीतरी मार्ग निघेल.' पक्षकार थोडा मनातून हलला. 'पहातो.' म्हणून त्याच्या गावी गेला.

दोन्ही खालील न्यायालये विरुद्ध असल्यावर नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखलसुद्धा करून घेणे किती अवघड असते आणि त्याची नोटीस काढणे किती कठीण असते, हे यातील जाणकारांनाच माहीती आहे. न्यायालयासमोर हे अपील निघाले. मी युक्तीवाद केला. न्यायालय माझ्या बाजूने जवळपास नव्हतेच मात्र जुना हिंदू कायदा, नवीन हिंदू कायदा, मुलगा आणि त्याचे धर्मशास्त्राप्रमाणे प्रकार, घडलेली घटना आणि त्याचा काळ, याचा निकालावर होणारा संभाव्य परिणाम आणि याबद्दलची पूर्वीची निकालपत्रे वगैरे सांगीतल्यावर न्यायालय थोडे हलले. शेवटी अशा घटना झाल्या तर समाजातील अशा परिस्थितीत अडचणीतील म्हाताऱ्या माणसांसाठी कसा निर्णय घेतला जाईल, हे सांगीतल्यावर थोडे गांभीर्य आले. मात्र तरीही परिस्थिती कठीणच होती. न्यायालयाने 'आपसांत करण्यास तयार आहे का ?' हे विचारल्यावर 'आम्ही सुरुवातीपासूनच तयार आहोत, पण समजावून सांगणारे नाहीत किंवा अडथळे आणणारे आहेत.' हे सांगीतल्यावर 'पुढील दिनांकास बहिणीला हजर ठेवा' असे कोर्टाने सांगीतले. ही बातमी त्या बहिणीपर्यंत गेलेलीच होती.

याने सर्व नातेवाईकांना ही घटना सांगीतली, बैठक बसली. सर्वांची चर्चा सुरु झाल्यावर, 'संबंध पैशासाठी बिघडू देऊ नका. तुझ्या बापाचे तू सासरी गेल्यावर यानेच केले मग त्याचे काय ? तुला जर बहीण असती आणि ती अडचणीत असती तर काय केले असते ? वगैरे दोन्ही बाजूने भरपूर चर्चा झाली. वातावरण निवळले. कोर्टाचा निरोप त्याने बैठकीत सांगीतला. बहीण पुढील तारखेस उच्च न्यायालयांत आली. तिने एक मुदत मागून, वकील लावले. न्यायालयाने एक मुदत दिली. माझे त्याच्या बहिणीशी बोलणे तिच्या वकिलांसमोर झाले, मी एकच विचारले, 'बाई, आज कायदा तुमच्या बाजूने आहे. खरे आहे. पण या तुमच्या भावाने तुमच्या वडिलांवर त्याच्या वडिलांप्रमाणे विश्वास ठेवला आणि तो त्याच्याशी मुलाप्रमाणे वागला. हे बरोबर आहे ना ?' बाई काही बोलेना. मी सुरु ठेवले, 'हे पहा, ही अशी नंतर जर तुमच्यावर वेळ आली तर तुमच्या पुतण्याने तुमच्याबद्दल काय करावे? तुमच्याशी कसे वागावे ? तुमची मुलगी त्याच्याशी कशी वागेल ? डोळ्यासमोर या गोष्टी आणा. नीट विचार करा. तुमचे जन्मापासूनचे संबंध आहेत. मी काय परका माणूस ! या न्यायालयाची हद्द फक्त याच कायद्यापुरती आणि येथेच चालते. या न्यायालयाचा एकवेळ हिशोब चुकेल पण तो वर जो या सर्व न्यायाधीशांचा न्यायाधीश बसलेला आहे, त्याचा हिशोब कधी चुकत नाही. तो कोणावर अन्याय करत नाही. तो आपल्या कृत्याचे पुरेपूर माप आपल्या पदरांत टाकतो. इथे जमले नाही तर त्याला केस हातांत घ्यावी लागेल. मग तो विचारणारसुद्धा नाही कोणाला !' आता बाई रडवेली झाली होती. 'साहेब, पैका मोठा वाईट ! मले पैक्याशिवाय कोण आहे. हा इतला खर्च येतो आहे जगायले अन दवापाण्याला, कोण देणार ?' बाई बोलली. मग मी माझ्या पक्षकाराकडे वळलो. 'हिची अडचण काय आहे ते गावी जाऊन पहा. ती दूर करा अन मग मला भेटा.' माझा पक्षकार चाट झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. ''बहिणीची अडचण दूर करणे हे भावाचे काम आणि भावाची मदत करणे हे बहिणीचे काम ! ते करा आणि मग मला भेटा. अनायासे कोर्टाने मुदत दिली आहे.' मी म्हणालो.

ही मंडळी गावांत गेल्यावर ही घटना नातेवाईक मंडळींना सांगीतली, 'आता वेळ दवडू नका. जे ठरले आहे किंवा जे ठरेल ते अमलांत आणा.' असे सांगीतले. भावाच्या ताकदीप्रमाणे आणि बहिणीच्या अडचणीप्रमाणे पैसे देण्याचे ठरले, कारण बहीण शेती करायला येणार नव्हती किंवा तेथे रहायला येणार नव्हती. दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे दिवाळीला, आखाजीला तिने तिचे माहेर समजून यावे आणि भावाने तिच्याशी भावाप्रमाणे व्यवहार करावा, हे ठरले. हे पहायला ती नातेवाईक मंडळी होतीच ! भावाचे आणि बहिणीचे प्रतिज्ञापत्र तहसीलदार यांच्यासमोर झाले ते नामदार उच्च न्यायालयांत दाखल करण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे निकाल करावा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सर्वांचे झाले आणि न्यायालयासमोरील प्रकरण यानुसारच निकालात निघाले. त्यावेळी न्यायाधीशांनी काय ठरले हे विचारल्यावर त्या बहिणीने सर्व व्यवस्थीत सांगीतले. न्यायाधीशांनाही समाधान वाटले.

कायद्यानुसार आणि कायद्यांत सांगीतलेला अधिकार, न्याय हा काही वेळा आपल्या समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकारापेक्षा आणि न्यायापेक्षा भिन्न असतो.  समाजातील बहुसंख्य घटकांना अजूनही कायद्यापेक्षा समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकाराचा आणि न्यायाचा पगडा जास्त असतो. समाजाची नैतिकता, नितीमूल्ये ही जर असलेल्या कायद्याच्या विरुद्ध नसतील तर त्यांच्यात एकमेकांत संघर्ष निर्माण होत नाही. अशावेळी समाजातील पुढारीपण प्राप्त झालेल्या घटकांना ही जबाबदारी पार पाडावी लागते आणि समाजातील शांतता टिकवावी लागते.    

(ही घटना संक्षीप्त स्वरूपात 'जळगांव लोकमत' यांत दिनांक १७. १२. २०१७ आणि २४. १२. २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती )







Wednesday, December 20, 2017

गाता गळा अन् शिंपता मळा !

गाता गळा अन् शिंपता मळा !
घराच्याच मागे असणारी आमची जिल्हा परिषदेची ‘मराठी मुलांची शाळा नं. २’ आमच्याच नातेवाईकांच्या घरात भरायची. मला जवळपास शैक्षणिक आयुष्यभर सकाळी शाळा व कॉलेजला जावे लागल्याने सकाळी भल्या पहाटे उठायची सवय आपोआपच लागली. आता शाळा, कॉलेज संपले तरी ती सवय जात नाही आणि जावू पण नये, मला चांगली आहे.
घरातून टण् टण् टण् ऽऽऽ अशी घंटा ऐकू आली की आम्ही शाळेत पळायचो आणि वाजवणारा हातात वाजवण्याचा गज हातात असलेल्या अवस्थेत असतानाच किंवा फारतर त्याच्या जागेवर जाण्याच्या आंत आम्ही तेथे पोहोचलो असायचो. मुले प्रार्थनेला खाली पटांगणात गोळा होत असायची. प्रार्थना शक्यतोवर एक वाणी नांवाचा अन् अजून एक जण म्हणायचा. प्रार्थना होती, साने गुरूजींचे गीत ! — जगाला प्रेम अर्पावे ! फार छान म्हणायचा तो !
एकदा तेथे दोन मुली उभ्या राहिल्या, प्रार्थना म्हणायला ! ‘तायडे गुरूजी आहे ना, शाळा नं. १ मधले, त्यांची मुलगी आहे ही. पाचवीला आहे.’ शेजारचा तिसरीतल्या मला सांगत होता. ‘तुला कसे काय माहीत ?’ माझा स्वाभाविक प्रश्न ! ‘पाराच्या गणपतीजवळ रहातो मी. तेथेच रहातात तायडे गुरूजी, म्हणून !’ त्याचे उत्तर ! त्या दोन मुली प्रार्थनेला उभ्या राहिल्या अन् खणखणीत, स्वच्छ शब्दांच्या उच्चारात प्रार्थना म्हटली.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।
जगी जे हीन अतिपतीत, जगी जे दीन पददलीत
तयां जावून उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
बालपणीच्या कोवळ्या मनांवर हे साने गुरूजींचे करूणेने भरलेले, वेदना व्यक्त करणारे शब्द फार परिणाम करून गेले. प्रार्थना म्हटले की सर्वप्रथम आठवते ती ही माझ्या ‘मराठी शाळा नं. २’ मधील ही प्रार्थना !
जसा मी पाचवीला गेलो, तसे मला ‘सरदार जी. जी. हायस्कूल’ येथे टाकले. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा नुकतीच सुरू झाली होती. मराठी शाळेत जमीनीवर बसणारे आम्ही आता लाकडी बेंचवर बसायला लागलो होतो. वर्षभर सर्व विषय एकच गुरूजी किंवा बाई शिकवणार, हा अनुभव असलेल्या आम्हांस, प्रत्येक विषयाला वेगळे ‘सर’ किंवा मॅडम’ हे विशेषच वाटू लागले होते. शाळा भरल्याची, मधल्या सुटीची, सुटी संपल्याची आणि शाळा सुटल्याची घंटा ऐकण्याची सवय असलेल्या आम्हाला, इथे प्रत्येक तासाला घंटा होते हे पाहून आश्चर्यचा वाटले होते. आणि ती पण, शाळेचा कोणीतरी उत्साही व दांडगट विद्यार्थी पळत जावून कशीतरी चमत्कारिक, वेडीवाकडी घंटा न वाजवता, येथील युनीफॉर्म घातलेला शिपाई वाजवतो, हे बघीतल्यावर तर माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला होता. तास हा साठ मिनीटांचा असतो हे गणित मराठी शाळेत शिकलेलो आम्ही, इथला हायस्कूल मधला तास म्हणजे ‘पिरीयड’ हा पस्तीस मिनीटाचा असतो, हे समजल्यावर अवाक झालो होतो. सगळेच नवीन ! हे सगळे पाहून, आम्हाला निष्कारणच मोठे व श्रीमंत झाल्यासारखे वाटू लागले होते.
आम्हा पाचवीतल्या मुलांना व पाचवीच्या वर्गाला येथे हायस्कूलमधे काही किंमत नसते, हे मला मी सहावीला गेल्यावर समजले. प्रत्येक पिरीअडला पिरीअड संपल्याची घंटा झाली, की कोणीतरी नवीन सर यायचे. ते काही वेळा काहीतरी शिकवायचे तर काही वेळा गप्पा मारायचे, प्रत्येकाला त्याचे नांव, गांव, कोठून आला वगैरे विचारायचे. ‘या वर्षाचे नवीन टाईमटेबल आल्याशिवाय नीट वर्ग भरणार नाही’ हे मला माझ्याच वर्गातल्या ‘अनुभवी’ विद्यार्थ्यांनी सांगीतले.
पूर्वी प्रत्येक वर्गात असे वर्ष दोनवर्षांचे ‘अनुभव’ असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी असायचे, आता तसे अभावानेच आढळतात, असे समजते. अनुभवाची किंमत राहिलेली नाही आता, हेच खरे ! त्यावेळी अभ्यासक्रम कठीण होता का शिकवणारे नीट नव्हते का मुलं अभ्यास करत नव्हते का पालक मुलांना बऱ्यापैकी ‘वाजवत’ असल्याने मुलांचे शिक्षणातील लक्ष उडायचे कोणास ठावूक ? त्यावेळी मार्कस् पण जेमतेम मिळायचे, मुलांचे ध्येय फक्त ‘पास’ होण्याचे असायचे, ते सुध्दा जेमतेम साध्य व्हायचे. आता मात्र फारच प्रगती झालेली दिसतेय. ‘नापास’ झालेले तर कोणी दिसतच नाही म्हणतात. बहुतेकांना डोळे फाटतील इतके मार्कस् आणि काहींना तर शंभर टक्क्यांच्या पण वर मिळतात, असे ऐकले. मी जर आता शाळेत शिकायला असतो, तर मला नाही वाटत माझा काही निभाव लागला असता !
आमच्या शाळेत त्यावेळी आसपासच्या खेड्यांवरून येणाऱ्या विद्यार्थांची पण संख्या बऱ्यापैकी असायची. आसपास म्हणाव्या तितक्या शाळा नव्हत्या आणि ही शाळा म्हणजे नावाजलेली शाळा ! एकेका वर्गाच्या दोन-तीन तुकड्या असायच्या.
रिकाम्या पिरीअडला कोण येईल याचा भरवसा नसायचा. काही वेळा शारिरीक शिक्षणाचे सर यायचे, सरोदे सर किंवा कोल्हे सर ! ते बहुतेक सरळ आम्हाला मैदानावर घेऊन जायचे. सरोदे सरांजवळ बारीक लवलवती अशी हिरवीगार कडुलिंबाची काडी असायची. त्यांना ती काडी सतत लवलवायचा नाद होता. त्यामुळे जवळच्या विद्यार्थ्याला सूंऽसूंऽऽ असा आवाज यायचा. तो आवाज ऐकणे त्यांना आवडायचे का तो आवाज आम्हाला ऐकवायला आवडायचे, देव जाणे ! पण त्यामुळे नंतर सर्व कामे शिस्तीत व्हायची. कोल्हे सर म्हणजे त्यांच्या गळ्याला शिटी असलेली वायर गुंढाळलेली असायची. ती जोरात लागते, असे बऱ्याच अनुभवी विद्यार्थ्यांचे मत होते. सरोदे सर व आम्ही मैदानावर गेल्यावर एकतर कबड्डी किंवा लंगडी खेळायला लावायचे. थोड्या वेळानंतर मग थांबवायचे अन् गप्पा मारायचे आमच्याशी. हिरव्यागार काडीचा सूंऽऽ सूंऽऽ आवाज करणारे हेच, हे आम्ही विसरलेले असायचो. कोल्हे सर मात्र काही वेळा शाळेने बागकामासाठी राखून ठेवलेल्या भागांत न्यायचे व बागकाम करायला लावायचे. काही वेळा मैदानात खेळायला लावायचे. या दोघांच्यातला बहुसंख्य विद्यार्थ्यांना आवडणारा समान गुण म्हणजे हे विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून मैदानावर न्यायचे, हा होय !
पण आम्हा मुलांना आवडायचा तो सैय्यद सरांचा तास ! हे उर्दू शिकवणारे होते. पण यांना पिरीअड तुलनेने कदाचित कमी असावेत, त्यामुळे शाळा नुकतीच उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुरू झाली की शिक्षक नसलेल्या वर्गावर हे बऱ्याच वेळा यायचे. ‘हं, बच्चों ! अब क्या करना ? बोलो ।’ त्यांचे वाक्य ! ‘सर गाणं, सर गाणं !’ सर्वांचा एकच कल्ला व्हायचा. ‘किसको आता है गाना, कौन गानेवाला हैं’ त्यांची विचारणा. मग काही जण ज्याला जे आवडेल व आठवेल ते गायचा. पाचवीत असतांना असेच एकदा एकाला बाहेरून घेऊन आला, त्याला पाहिल्यावर पुन्हा ‘होऽऽऽऽ’ असा गलका ! त्याला म्हणायचा आग्रह सुरू झाला. ‘नफरत करनेवालोंके सिनेमें प्यार भर दूॅं’ हे गाणं त्याने म्हटले, वर्ग स्तब्ध होता. सर पण खूष दिसत होते. खरंच छान म्हटलं ! कोण म्हणून विचारल्यावर ‘संजय बाळापुरे’ हे नांव सांगीतले. नंतरही बऱ्याच वेळा तो अशा पिरीअडला गाणं म्हणायचा, वेगवेगळ्या वर्गातून म्हणायचा ! त्यावेळी अशा गाण्याचा अर्थ समजण्याचे वय नव्हते, पण चांगलं म्हणतोय हे समजायला वयाची आडकाठी नसते. तुम्ही चांगला स्वर लावा, पाळण्यातले बाळ रडायचे थांबते. संगीताचे सामर्थ्य आहे ते.
नंतर आठवीत पुन्हा एक गाणारा मित्र भेटला, राजेंद्र थोरात ! हा अकरावी पर्यंत वर्गात होता. हा तर खरंच छान गायचा. त्यावेळी नुकताच ‘कभी कभी’ हा चित्रपट आला होता. त्यातील गाणी छानच आहेत. तो जेव्हा ‘मैं पल दो पलका शायर हूॅं, पल दो पल मेरी जवानी हैं’ किंवा ‘इक दिन बिक जायेगा माती के मोल, जगमें रह जायेंगे प्यारे तेरे बोल’ किंवा ‘कभी कभी मेरे दिलमें खयाल आता हैं’ वगैरे गाणी म्हणायचा तेव्हा सारा वर्ग स्तब्ध असायचा. मुकेशची गाणी फारच सुंदर म्हणायचा. त्याचा भाऊ रावेरला स्टेट बॅंकेत नोकरीला होता. माझ्या अकरावी नंतर मी जळगांवला शिकायला गेलो अन् त्यानंतर त्याची भेट नाही.
कॉलेजला आल्यावर बारावीपासून वर्गात एक ‘संत’ नांवाचा होता. त्याचा आवाज पण छान ! हा शास्त्रीय संगीतावर आधारलेली व तशी ठळक बैठक असलेली गाणी म्हणायचा ! महंमद रफीची गाणी तर अफलातूनच ! एकदा त्याला असाच घरी घेवून गेलो होतो. त्यावेळी मी तबला शिकत असल्याने घरी तबला होता. कॉलेजचे वय, त्याला हे सांगीतल्यावर तो त्याच्या जवळची वहीच घेऊन घरी आला. मग काय ? तो गाणं म्हणतोय आणि मी तबला वाजवतोय ! आमचे घरमालक शेजारीच रहायचे. त्या मावशीपण येवून बसल्या. मग विचारले, ‘कोण रे तू ?’ त्याने ‘संत’ म्हणून आडनांव सांगीतल्यावर त्या पण विचारांत पडल्या, पण त्यांना नेमके नाते आहे का हे काही आठवलं नाही. त्यांचेपण आडनांव ‘संत’ होते. हा गाणारा मित्र ‘संत’ हा पण कॉलेज संपल्यावर काही भेटला नाही.
संजय बाळापूरे भेटतो एखादे वेळी गांवी गेलो तर ! त्याने संगीत शिकायचा प्रयत्न केला, माझ्या आईकडे यायचा तो शिकायला ! पण तो प्रयत्न तेवढ्यावरच राहिला, फार पुढे गेला नाही. दुसरे दोन मित्र म्हणजे राजेंद्र थोरात व संत यांची तर नंतर भेट पण झाली नाही. यांनी व या सारख्यांनी माझ्या या संगीताच्या रोपावर शिंपण केले, ती आवड तरारली, टवटवीत झाली कायमची ! आता नाही कोमेजणार ! माणूस दुसऱ्या व्यवसायात गेला की पोटापाण्यासाठी आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. काही वेळा दैवाने मिळालेली प्रतिभा ही पोटापाण्यासाठी उपयोगाला अवश्य येते पण काही वेळा ही देणगी फक्त छंद म्हणून राहून जाते. मला संगीताची जन्मजात आवड माझ्या आईमार्फत देणाऱ्या परमेश्वराने माझ्यावर खूप उपकार केलेले आहेत.
निवांतपणी, आपण आवड म्हणून एखाद्या गायकाचे गायन किंवा वादकाचे वादन ऐकत बसावे. पं. भीमसेन जोशींचा तोडी, पं. जितेंद्र अभिषेकींचा व डॉ. वसंतराव देशपांडे यांचा मारवा, पं. कुमार गंधर्व व विदुषी किशोरी आमोणकर यांचा भूप ! पं. डी. व्ही. पलुस्कर यांनी गायलेले काहीही ! पं. रविशंकर यांची सतार, उस्ताद अलीअकबरखाॅं यांची सरोद, पं. किशन महाराज, पं. सामता प्रसाद, उस्ताद थिरकवा यांचा तबला ! काय सांगावे आणि किती सांगावे ? काहीही ऐकायचे ठरवावे आणि त्या नादब्रह्मात आपला शीण, थकवा घालवून ताजेतवाने व्हावे.
कशामुळे कोणत्या आठवणी जाग्या होवून मनांत गर्दी करतील काही सांगता येत नाही. आता सकाळी औरंगाबादहून जळगांवी जातांना नेहमीप्रमाणे गाडीत रेडिओ लावला होता. आकाशवाणी औरंगाबाद लागले होते. काही मराठी आणि त्यानंतर हिंदी चित्रपटातील गाणी लागली होती. कानावर गाणी पडत होती आणि मन थेट माझ्या मराठी शाळेतील प्रार्थना म्हणणाऱ्या मुलांपर्यंत फिरून आले. मनाचा वेग, मनाची गती खरोखर मनच कुंठीत करून टाकणारी असते, अशी कुठेतरी कोणत्या काळात, कोणत्या विचारांत आपल्याला फिरवून आणते, आपले शरीर एकाच ठिकाणी ठेवून !

17.12.2017

Saturday, December 16, 2017

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

काल नामदार उच्च न्यायालयात ‘लोकन्यायालय’ होते. थोडा वेळ गेलो होतो. लोकांचा लोभीपणा हा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो, हे काही ठिकाणी दिसले. ‘आपला हक्क व हक्काचे लवकर मिळावे म्हणून आपल्याच हक्कापैकी काही नाईलाजाने सोडून द्यावे लागते’ हे उमजलेले दुर्दैवी पक्षकार दिसले; तर त्याच्या असहायतेचा, दुर्बलतेचा गैरफायदा घेत कसलाही हक्क नसतांना लाभ उपटणारे पण दिसले.
‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडित:’ हे सुभाषित अवगत करून वागणारे दिसले. वेळेवर लोकन्यायालयाने मार्ग दाखवला म्हणून आपसांत मार्ग लवकर निघून समाधानाने जाणारे पण दिसले, मात्र ही संख्या कमी होती.
आटोपून घरी येतो तर बाहेरगांवाहून बरीच कागदपत्रे आणून ठेवलेली दिसली. कागद चाळताचाळता बघीतले, वाईट वाटले व संताप देखील आला. न्यायव्यवस्थेचा दुरूपयोग करून समोरच्याला कसे हैराण करता येते याचे अजून एक उदाहरण मिळाले.
विवाहविच्छेद म्हणजे घटस्फोट झाल्यावर देखील पूर्वीच्या पत्नीने सदर घटस्फोट बेकायदेशीर असल्याचे दर्शवत न्यायालयात खावटी मागणे, त्या दरम्यान तिने दुसरा विवाह करून आपला संसार निर्वेधपणे सुरू ठेवणे, मात्र त्याच वेळी या बिचाऱ्या पूर्वीच्या पतीला, जो सरकारी कर्मचारी आहे त्यांस, दुसरे लग्न करण्यापासून येनकेनप्रकारे रोखणे. त्याच्यावर व त्याच्या सर्व नातेवाईकांवर, अगदी जवळच्या वा दूरच्या, संबंध असलेल्या आणि नसलेल्या सर्वांवर विविध प्रकारच्या काल्पनिक केसेस करणे आणि त्यांनी ‘दाती तृण धरून’ शरण यावे यासाठी ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणे, हे नित्याचे प्रकार झाले आहे.
पूर्वी असाच एक अनुभव आला होता. त्यावेळी हे असे विषय सामोपचाराने मिटावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मला स्त्रीने पैशाच्या लोभामुळे या स्तरावर यावे आणि तिच्या दुर्दैवाने तिला तिच्या वकिलाने पण योग्य, खरा व तिच्या हिताचा सल्ला देवू याचे वाईट वाटले होते. त्यावेळी मुलीकडच्यांनी ऐकले नाही आणि मला ठेवणीतले अस्त्र काढावे लागले. ब्रह्मास्र जसे यशस्वी होवून येते तसा तो उपाय होता, यश आले.
या अशा वृत्तीने व वागण्याने संपूर्ण स्त्री जमात बदनाम होते, तिच्या तक्रारीकडे संशयाने पाहिले जाते. अशा खोट्या तक्रारींचा परिणाम विपरीतपणे खऱ्या तक्रारींवर पण होतो. न्यायशास्त्रातील समाजामन किंवा स्वभाव ही कल्पना लक्षात घेवून आणि मग तक्रार खरी असेल तरी संशयाचा फायदा मिळून गुन्हेगार सुटतात.
अलिकडे आता अशाच स्वरुपाची प्रकरणे वाढत आहेत. कठीण असतात, पक्षकारांना मनस्ताप देणारी असतात पण इलाज नसतो. सत्य टिकले पाहीजे कितीही किंमत देवून !

१० डिसेंबर २०१७

Monday, December 4, 2017

एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे

मा. बापूराव मांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार मा. भैयाजी जोशी यांच्या शुभहस्ते आज भुसावळ येथे झाला.




कार्यक्रमाला मा. गुणवंतराव सरोदे, मा. एकनाथराव खडसे, मा. गिरीषभाऊ महाजन आणि मान्यवर मंडळी हजर होती. संघपरिवारातीलच नाही तर विविध विचारसरणीची, विविध स्तरातील, तत्कालीन आणि नवोदीत मंडळी हजर होती. या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित झाली. त्यातील माझा अनुभववजा लेख -
————————- ————————
एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे
आपणांस कदाचित श्री. प्रभाकर मुरलीधर मांडे या नांवाने थोडा परकेपणा वाटू शकतो; मात्र हा परकेपणा 'बापूराव मांडे' हे नांव ऐकले की या नांवाने क्षणांत नाहीसा होतो. तुम्हा आम्हा सर्वांना ते परिचित आहे, ते 'बापूराव मांडे' या नांवाने ! त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हा लिहीण्याचा योग !
आपल्या कोणा विशेष चिरपरिचिताचा असा काही कार्यक्रम असला, की त्यांचे इतके वय असेल यांवर आपला विश्वास बसत नाही लवकर ! काय सांगता, त्यांचे इतके वय आहे ? याचे कारण तत्कालीन आपल्या तो पावेतोच्या अनुभवातील सर्व घटना, दरम्यानचे विविध साजरे केलेले उत्सव, वेळोवेळी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, महत्त्वपूर्ण बैठकी, त्यातील गप्पागोष्टी, विविध आंदोलने वगैरे या सर्व अगदी आपल्याला अलिकडच्या वाटतात. वेळ जणू पुढे गेलेलाच नाही, तेव्हापासून तो थांबलाच आहे असे वाटते. मग लक्षात येते, अरे आपले वय आज किती आहे ? हे आपण लक्षात घेतले की हळूहळू आपण वर्तमानात येतो, आपल्याला आजच्या परिस्थितीचे भान येते; की केवढा मोठा २५-३० वर्षांचा कालखंड पहातापहाता झरकन आपल्या हातातून, डोळ्यांसमोरून निघून जातो.
पूर्वीपासूनच कै. डॉ. नरहर पुरूषोत्तम जोशी यांचे घर म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' जळगांव जिल्ह्यातील रावेरचे कार्यालय समजले जायचे. संघाच्या प्रचारकांचा कायम रहिवास व संघ परिवारातील सर्व मंडळींचे तेथे येणेजाणे, गप्पागोष्टी व बऱ्याच वेळा बैठका ! तिथेच मला ही सर्व मंडळी भेटली. तेथे कोणाकोणाची व माझी भेट झाली ? श्री. भैयाजी जोशी, डॉ. गुणवंतराव सरोदे, श्री. अरूणदादा पाटील, कै. डॉ. अविनाशराव आचार्य, श्री. भार्गवराव सरपोतदार, कै. गोपीनाथ मुंडे, श्री. लालकृष्ण आडवाणी !
त्या काळी मी एल्एल्. बी. चा अभ्यास संपवून १९८५-८६ ला रावेरला आलो नुकताच आलो होतो. अर्थात तो पावेतो मला होता तो रावेर येथील शालेय वयातील संघ हा आम्ही अनुभवला तो आमचे मित्र श्री. भरत अमळकर, श्री. सुनील पाटील यांच्या शाखेवरील उपस्थितीत ! नंतर जळगांव येथील महाविद्यालयीन काळातील विद्यार्थी परिषदेत रमलो ते 'श्री. चंद्रकांतदादा पाटील,'श्री. चंद्रकांत धुळूप' या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या कार्याने व आनंद घेतला तो त्यांच्या सहवासातील 'अभाविप' यांचा अनुभव ! नंतर श्री. शशिकांत घासकडबी होते तिथे विस्तारक म्हणून !
येथे रावेरला आल्यावर अधूनमधून माझ्या भेटीगाठी व्हायच्या त्या तत्कालीन प्रचारक श्री. लालचंद टाटिया, श्री. अप्पा कुलकर्णी, श्री. सौमित्र गोखले, श्री. भाऊराव पाटील वगैरे यांच्या ! यांच्यासोबत वारंवार उल्लेख यायचा तो श्री. बापूराव मांडे यांचा ! हा कालखंड साधारणत: १९८६ ते १९९३ पावेतोचा ! त्यावेळेस अजून एक नांव लक्षात ठेवावे लागेल ते म्हणजे प्रचारक असलेले श्री. विठ्ठलराव नवरे यांचे ! त्यानंतरच्या भेटीगाठी मग बऱ्याच नित्याच्या पण प्रसंगानुरूप व्हायच्यात ! श्री. अनिल वळसंगकर हे नंतर आले, दि. ६ डिसेंबर, १९९२ नंतर !
मलाच लक्षात असलेला नाही तर सर्व जगतालाच लक्षात असलेला विशेषत्वाचा काळ म्हणजे 'विश्व हिंदु परिषदेने' त्यावेळची काढलेली 'गंगामाता भारतमाता यात्रा' आणि 'राम जनमभूमी आंदोलन' ! हा काळ कोण आणि कसा विसरणार ? या अत्यंत महत्त्वाच्या काळात श्री. बापूरावांकडे जबाबदारी होती ती १९९० पर्यंत 'जळगांव जिल्हा कार्यवाह' म्हणून आणि सन १९९१ ते १९९६ या काळात 'विश्व हिंदु परिषदेचे' जिल्हा मंत्री म्हणून ! या काळांत आपल्या समाजाने, समाजातील प्रत्येक गटाने व समाज नेत्याने प्रत्येक माणसाच्या 'राष्ट्रीयत्वाच्या भावनेला' साद घातली. त्यावेळी आपल्या लक्षात आले नाही पण आता लक्षात येते की एवढ्या विपरीत परिस्थितीत, शासनही विरूद्ध असतांना ही माणसं काय काम करून गेली आहेत, काय असेल त्यांच्यात ?
त्यावेळी या रामजन्मभूमी आंदोलनांत कोण नव्हते ? सातपुडा पर्वतात रहाणारे वनवासी होते की ज्यांनी इतकी माणसं आपल्या देशांत आहेत हे कधी आजपर्यंत पाहिलेच नव्हते; एवढेच काय त्यांना ही सगळी माणसे 'आपली माणसं' आहेत हे पण कधी माहिती नव्हते. जी माणसं आजपावेतो आयुष्यभर शेळ्यामेंढ्या घेवून पोटापाण्यासाठी गांवोगांव, रानोंमाळ फिरत होती त्यांनाही समजले की प्रभू रामचंद्र हे आपले आहेत व ही सर्व माणसं आपली आहेत. जसे आपले मठ-मंदीरे सोडून संतमहंत बाहेर पडले; तसेच दूर कुठे रानांवनांत, दऱ्याखोऱ्यात रहाणारी साधू मंडळी बाहेर पडली, ती प्रभू रामचंद्र हा तुमचा पूर्वज आहे हे सांगण्यासाठी !
श्री. बापूराव मांडे यांनी तत्कालीन परिस्थतीत जिल्हाभर वेगवेगळ्या व्यक्तींवर जी जबाबदारी सोपविली होती, त्यातील माझ्यावर पण ही 'रामजन्मभूमी संबंधी' जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी आम्ही म्हणजे २५-३० वर्षांची मुले ! ही त्यांनी सोपविलेली जबाबदारी आम्ही जबाबदारी म्हणून मानत कुठे होतो ? हे तर आपले कर्तव्य आहे, ते आपण करायला पाहिजे. ही अशी मनोभूमिका तयार करणे ही सामान्य बाब नाही. आता या निमित्ताने मागे वळून पहातांना लक्षात येते की ही विविध विचारांची, आचारांची व राजकीय पक्षांची देखील माणसं या माणसाने जिल्हाभर फिरून कशी एकत्र बांधली असतील ? आमच्यासोबत कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा मुलगा नव्हता ? अयोध्येस त्यावेळी जळगांव जिल्ह्यातील संख्या ही लक्षात घेण्याइतपत मोठी होती.
या निमित्ताने आम्ही गांवोगांव जायचो तर गांवातील, घरांघरांतील अन्नपूर्णांनी आम्हाला व आमच्या सोबतच्यांना देखील ममतेने त्यांच्याजवळ जे आहे त्यातून जेवू घालून तृप्त केले. ही सर्व तयारी, ही सर्व काळजी व हे सर्व नियोजन करणे आणि ते यशस्वीपणे पार पाडणे हे सोपे काम नाही. सन १९९६ ते २००६ या काळात त्यांनी परिवाराची जबाबदारी सांभाळली ते 'भारतीय जनता पक्षाचे' कारकत्वाची ! सन २००६ नंतर त्यांचेवर अशी ठरवून कोणती जबाबदारी नाही. मात्र सातपुडा पर्वतात 'हरिपुरा' येथे त्यांनी जे 'गोसेवा केंद्र' सुरू केलेले आहे, ती समाजाप्रती व्यक्त केलेली त्यांची एक श्रद्धाच होय ! त्यापूर्वीपासून गेली पंचवीस वर्षे भुसावळ येथील 'संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची' प्रमुख जबाबदारी ते पार पाडत आहे.
त्यावेळी 'रामजन्मभूमी आंदोलनाचे वेळी' पन्नाशीत असलेल्या या माणसाने त्यावेळी ज्या तडफेने काम केले ते पाहिल्यावर आमचा कसा विश्वास बसणार की श्री. बापूराव मांडे आता पंचाहत्तरीत आले ! माझ्या डोळ्यांसमोर त्याचवेळचे मिळेल त्या वाहनाने फिरणारे श्री. बापूराव येतात ! डोक्याला उन्ह लागू नये म्हणून पांढरा लांब बागायतदार रुमाल बांधून 'राजदूत मोटारसायकल'वर येणारा त्यांचा चेहरा आजही दृष्टीसमोर येतो.
कोणी आजही श्री. बापूरावांना सांगीतले की, 'हे पहा, आता आपल्याला हे काम करायचे आहे, तुमच्याशिवाय कोण करणार ?' तर मला नाही वाटत ते नाही म्हणतील ! --- वयाच्या ऐंशीपंचाऐंशीत प्रत्यक्ष कोंढाणा किल्ल्यावर लढाईला जाणाऱ्या शेलारमामाचे रक्त या माणसांच्या अंगी खेळत असते, तो त्याची पंचाहत्तरी साजरी केली तरी स्वस्थ थोडाच बसणार आहे ?

22. 11.2017

आज मार्गशीर्ष शुद्ध ११ ! गीता जयंती !


आज मार्गशीर्ष शुद्ध ११ ! गीता जयंती !
भगवान श्रीकृष्णाने आपल्या सख्याला, शिष्याला म्हणजे अर्जुनाला जे समजावून सांगीतले, ते अगदी जगन्मान्य ठरले, काळाच्या कसोटीवर ! तीच ही भगवदगीता ! यातील हे गीता ध्यान वाचले तरी आपले मन त्या भावनेशी तद्रूप होऊन जाते.
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्येमहाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम्
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥१॥
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥२॥
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये।
ज्ञानमुद्र्याय कृष्णाय गीतामृतदुहे नमः॥३॥
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥ ४॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ ५॥
भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला ।
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥ ६॥
पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा- सम्बोधनाबोधितम् ।
लोके सज्जनषट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल- प्रध्वंसिनः श्रेयसे ॥ ७॥
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ ८॥
यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ॥ ९॥

३०. ११. २०१७

वेगवेगळी राज्ये

वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी न थकता किंवा वेळप्रसंग पाहून कमी-जास्त प्रभावी वातावरण निर्माण करणे, ते जर अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर खरे-खोटे विषय निर्माण करून त्याला भावनिक खतपाणी घालणे, त्यावेळी आपल्यावर मोठे राज्य असल्याने भयंकर अन्याय होतो आहे, याची खरी-खोटी बोंब ठोकणे आणि त्या सर्वांवर एकमेव, खात्रीशीर व भरवशाचा उपाय म्हणजे फक्त वेगवेगळी, छोटीछोटी राज्ये निर्माण करणे हाच होय !
हे म्हणजे आपल्या घरातील कर्तेपण जाणीवपूर्वक नालायक, संधीसाधू आणि पक्षपाती व्यक्तीला द्यायचे, तो घरातील सदस्यांशी पक्षपाताने वागला की त्यांवर उपाय म्हणजे त्याला बदलून टाकणेपर्यंतचा मार्ग, शोधण्याऐवजी घरातील सदस्यांनाच दुसऱ्याच्या स्वाधीन करायचे किंवा वेगळे व्हायला सांगायचे, असे झाले आहे ! 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हे मानणाऱ्यांना हे पटणे शक्य नाही. या विचारांची कर्तृत्ववान माणसें ज्यांना दिसत नसतील तर अशी जबाबदारी देतांना आणि निवडतांना आपली दृष्टी स्वच्छ ठेवा, भरपूर माणसे दिसतील. अगदी अशी आणि हीच दृष्टी ठेवली तर, सध्या असलेली हीच माणसे पण व्यवस्थीत वागतील, अगदी 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हेच डोळ्यांसमोर ठेवून !
स्वतंत्र विदर्भ हवा, आता स्वतंत्र मराठवाडा हवा, मग स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र किंवा कोंकण किंवा पश्चिम महाराष्ट्र का नको ?

२. १२. २०१७

आज मार्गशीर्ष पौर्णिमा ! दत्त जयंती !



आज मार्गशीर्ष पौर्णिमा ! दत्त जयंती !
लहानपणी सायंकाळी देवासमोर विविध स्तोत्रे जी म्हणायचो, त्यांतील गुरुवारच्या दिवशी आवर्जून म्हटले जाणारे हे गुरु दत्तात्रयाचे स्तोत्र ! संस्कृतच्या बहुसंख्य स्तोत्राप्रमाणे अत्यंत प्रभावी करणाऱ्या चालीत म्हणता येणारे स्तोत्र, हे याचे देखील वैशिष्ट्य आहे. मनांत सात्त्विक आणि समर्पणाचा भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य असणारे, हे स्तोत्र ! परमेश्वरापुढे, गुरु दत्तात्रेयापुढे नम्र होवून आपल्यावर कृपादृष्टी व्हावी ही विनंती, प्रार्थना या स्तोत्राचे जनक श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी किती आर्ततेने केली आहे, हे आपल्याला एकदा ते प्रत्यक्ष म्हटल्यावरच येऊ शकेल.
१५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. गुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायातील श्लोक १२० ते १२८ या फक्त आठ श्लोकांचे हे स्तोत्र, आपल्यासाठी देत आहे.
इंदुकोटितेज करुण-सिंधु भक्तवत्सले ।
नंदनात्रिसूनु दत्त, इंदिराक्ष श्रीगुरुम् ।
गंधमाल्याक्षतादि-वृंददेववंदितम् ।
वन्दयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम ॥
मायपाश-अंधकारछायदूरभास्करं ।
आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश-नायकम् ।
सेव्य भक्तवृदं वरद, भूय भूय नमाम्यहं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
चित्तजादिवर्गषट्क-मत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवतसलं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
व्योमरापवायुतेज-भूमिकर्तुमीश्र्रम् ।
कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृ भक्त-कामधेनु श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
पुंडरिक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडदुरितखंडनार्थ दंडधारि श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलिमार्तंडभासिताननम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत, कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद भूय भूय नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्ट ज्ञानवारिधिम् ।
कृष्णावेणितीरवास-पंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्त-तुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥
नारसिंहसरस्वती-नाम अष्टमौक्तिकम् ।
हारकृत शारदेन गंगाधर-आत्मजम् ।
धारणीक-देवदीक्ष गुरुमूर्तितोषितम् ।
परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥
नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत् ।
घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरोग्यादिसंपदम् ।
चारुवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत् ॥

२.१२. २०१७

आरक्षण -------------- पण किती ?

आरक्षण -------------- पण किती ?

'आरक्षण' हा अत्यंत संवेदनशील शब्द बनत चाललेला आहे दिवसेंदिवस ! असलेले आरक्षण मग सामाजिक निकषांवर असेल तर जास्तच ! जे आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत किंवा ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत, त्यांची मानसिकता ज्यांना आरक्षण मिळत आहे त्याच्या विरोधी बनत आहे, बनविली जात आहे. याला काही पर्याय उभा करून सामाजिकदृष्टया असलेले आरक्षण हे संपुष्टात आणण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न किंवा तसे विचार मांडण्याचा प्रयत्न हा नेहमीच होत आलेला आहे. आर्थिकदृष्टया आरक्षण द्यावे ही मागणी पण अलिकडे जोर धरत आहे. सामाजिकदृष्टया समानता यावी म्हणून अजून एक आरक्षण दिले गेलेले आहे, ते म्हणजे राजकीय आरक्षण ! लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे वेळी विविध ठिकाणच्या जागी सामाजिकदृष्टया दुर्लक्षित गेलेल्या जातीजमातींसाठी, गटांसाठी काही जागा राखून ठेवल्या जातात. या जागा सर्वच ठिकाणी असतात, म्हणजे अगदी सोसायट्यांपासून ते लोकसभेच्या जागेपर्यंत !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार या सामाजिक आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. त्यांत वेळोवेळी विविध दुरुस्त्यादेखील तत्कालीन सरकारने केलेल्या आहेत. आरक्षण असावे का नाही ? असल्यास ते कोणत्या प्रकारचे असावे ? आरक्षणाचे किती प्रकार आहेत ? किती वर्षे आरक्षण सुरु ठेवावे किंवा ठेवले पहिजेत ? इतकी वर्षे म्हणजे साधारणतः ६७ वर्षे तरी आरक्षण ठेवलेले आहे, त्यामुळे ज्यांना आरक्षणाचा लाभ आजपावेतो मिळत आलेला आहे त्यांचा पुरेसा विकास झालेला आहे का ? झालेला असल्यास तो कसा समजून येईल ? त्याची समजण्याची काही व्यवस्था आहे का ? पुरेसा विकास जर झाला असेल आणि त्या आरक्षणांमागील हेतू जर साध्य झाला असेल तर हे सध्या मिळणारे आरक्षण बंद करावे का ? आरक्षण हे सामाजिक दृष्टीने खरोखरच ठेवले गेले होते का ? त्याचा सध्याचा वापर हा मूळ उद्देशाप्रमाणेच आहे की त्यांत काही बदल झालेला आहे ? त्याचा समाजस्वास्थ्यावर कसा, ,हणजे चांगला अथवा वाईट, परिणाम होत आहे ? या सर्व बाबी या आजच्या विषयाशी जरी संबंधित असल्या तरी त्या विषयावर आजची घटना नाही. तर ही घटना आहे, सद्य परिस्थितीतील असणारे आरक्षणासंबंधाने नियम आणि धोरण लक्षांत घेऊन कसा गोंधळ होतो, त्यामुळे आरक्षणाच्या बाहेर असलेल्या समाजावर कसा अन्याय होतो. सध्या आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय बनलेला असल्याने, त्यासंबंधाने काही बोलले गेले आणि त्याचा काही वेगळाच अर्थ निघाला किंवा जाणीवपूर्वक काढला गेला तर होणारा संभाव्य त्रास डोळ्यांसमोर जो खऱ्याखोट्या प्रकारे मांडला गेलेला आहे, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, त्यामुळे त्यांवर न्याय्य बाजूसुध्दा मांडण्यास कसे पुढारी लोक, सरकार आणि सर्वसाधारण मनुष्य घाबरत आहे, हे दर्शविणारी ही घटना ! राजकीय लाभासाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी किती ओढाताण आणि घोडेबाजार चालतो हे आपण नित्य पहातो, असे असतांना देखील या बद्दल बऱ्याच काळ कोणी आवाज उठवत नाही. ही  बाब याचे गांभीर्यया अधोरेखीत करते.

मी तसा मूळचा पूर्वी खान्देश म्हणून समजल्या जाणाऱ्या भागातील ! वकिलीच्या व्यवसायाने मराठवाड्यातील औरंगाबाद येथे उच्च न्यायालयांत म्हणजे औरंगाबाद खंडपीठात वकिली करण्यास आलो. खान्देश म्हणून ओळखला जाणारा भाग हा सातपुड्याला लगतच आहे. काही तालुके किंवा गांवे तर इतकी त्याच्या लगत आहेत की सातपुड्यावरून उतरले की त्या तालुक्यांत किंवा गावातच येतो. सातपुड्यांत उगम पावणारी नदी म्हणजे 'तापी नदी' !  जिची ओळख 'सूर्यतनया', म्हणजे 'सूर्याची मुलगी' अशी आहे. तापी नदीच्या पाण्याने खान्देश बऱ्याच प्रमाणांत सुजलाम सुफलाम, समृद्ध केला आहे. अर्थात खान्देशवासीय हे तसे मुळातच कष्टाळू आणि शिक्षणाची आवड असलेले ! कष्टाला आणि अभ्यासाला फळ केंव्हातरी येणारच ! पूर्वी हा खान्देश या नावाचाच जिल्हा होता. खान्देश म्हटले की त्यांत हल्लीचे महाराष्ट्रातील जळगांव, धुळे आणि नंदुरबार हे पूर्ण जिल्हे आणि नासिक जिल्ह्यातील देखील काही भाग येतो. तसे अगदी काटेकोरपणे पाहिले तर खान्देशमधे सध्या मध्यप्रदेशांत असलेला, पण पूर्वीच्या खान्देशचाच भाग असलेला बुऱ्हाणपूर हा जिल्हा पण येतो. माझा माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातील बेळगांव हा भाग जसा कर्नाटकांत आहे तसाच बुऱ्हाणपूर हा भाग सुद्धा मध्यप्रदेशात आहे, पण यांकडे फारसे आम्हा खान्देशवासियांचे किंवा कोणाचे लक्ष नसावे. खान्देश या भागाचे दोन जिल्हे झालेत. एक म्हणजे पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश ! पूर्व खान्देश हा नंतर धुळे जिल्हा झाला तर पश्चिम खान्देश हा जळगाव जिल्हा झाला. धुळे जिल्ह्याचे नंतर अलिकडे पुन्हा विभाजन होवून दोन जिल्हे झाले - धुळे आणि नंदुरबार ! 

आज आपणांला सांगणार आहे ती गोष्ट खान्देशमधील, अलीकडच्या नंदुरबार जिल्ह्यातील ! सातपुड्यातून उगम पावलेली 'सूर्यतनया' तापी नदीने या भागांतील नागरी जीवनाला जसे समृद्ध केले आहे तसेच पर्वतीय वस्तीला देखील जीवन दिलेले आहे, कारण सातपुड्यांत विविध समाजाचे लोक जसे रहातात तसेच आदिवासी लोक पण बरेच आहेत. नंदुरबार जिल्ह्यांत तर आदिवासी समाजाचे लोक बऱ्याच संख्येने ! भारत सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील बराचसा म्हणण्यापेक्षा बहुसंख्य भाग हा 'अनुसूचित जमाती'साठी म्हणून जाहीर केलेला आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे 'अनुसूचित जमाती' यांची प्रगती व्हावी, त्यांनी प्रगत समाजाबरोबर यावे म्हणून इतर सर्वसामान्य समाजाला उपलब्ध असलेल्या सोयी-सवलतींपेक्षा जास्तीच्या सोयी-सवलती देत असते. 

संपूर्ण तालुका, काही गांवे किंवा संपूर्ण जिल्हा हा 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर करावा किंवा काही भाग जाहीर करावा हे तेथे 'आदिवासी' म्हणून शासनाने जाहीर केलेला समाज किती प्रमाणांत आहे यावर अवलंबून असते. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हे असे जरी असले तरी तर दहा वर्षांनी 'अनुसूचित भाग' कोणता असावा याचा विचार नव्याने होत नाही. त्यामुळे जो भाग अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी झालेला आहे, तरी तो भाग शासनाच्या दृष्टीने 'अनुसूचित भाग' म्हणूनच असल्याने त्याला अनुसूचित भागात असल्याबद्दल मिळणारे फायदे जास्तीचे मिळतात. जी मंडळी अनुसूचित जमातीत येत नाही त्यांची त्यामुळे बऱ्याच वेळा अडचण होते, त्यांना ना अनुसूचित जमातीचे फायदे मिळतात ना सर्वसाधारण म्हणून विचार केला जातो. सर्वसाधारण समाजाचे समजले गेलेले लोक, गांव किंवा तालुका येथे अनुसूचित जमातीचे लोक बहुसंख्य नसतात, मात्र हे लोक रहात असलेला भाग हा अनुसूचित भागात येत असल्याने त्यांचे अस्तित्व जवळपास झाकोळले जाते. महाराष्ट्रात या संबंधीची सूचना भारत सरकारने The Scheduled Areas (Maharashtra) Order, 1985 यानुसार जाहीर केलेली आहे. याचा हेतू अतिशय चांगला आहे. दुर्लक्षिलेल्या भागाचा, लोकांचा विकास अग्रक्रमाने, विशेष काळजी घेऊन व्हावा हा हेतू !

ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यावर त्यांत उतरणारे उत्सुक पुढारी हे प्रत्येक वॉर्डासाठी फारच काटेकोर असतात. आपल्याला सोयीचा म्हणजे निवडून येण्यास सोपा असा वॉर्ड ते निवडतात. त्याची तयारी ही वरची रचना जेंव्हा होते त्यावेळेपासूनच सुरु होते. नंतर पुन्हा उत्सुक उमेदवार हा कोणत्या समाजातील आहे, तेथे त्यांचा समाज किती आहे, त्यातील कोणी निवडणुकीला उभे तर राहणार नाही ही पण भिती असते. त्यामुळे स्पर्धा वाढते. वेगवेगळे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहीले की अनपेक्षितपणे तिसराच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. हे कोणालाच नको असते. उत्सुक उमेदवाराला राखीव मतदार वॉर्ड, संघ हवा का तो सर्वसाधारण उमेदवार आहे यावर पण गणित अवलंबून असते. काही वेळा सर्वसाधारण उमेदवाराला अत्यंत सोयीच्या असलेल्या वॉर्डाला राखीव वॉर्ड म्हणून घोषित केले जाते किंवा याच्या उलट होते. पुन्हा सर्व गणित बदलते. ग्रामपंचायतीच्या वेळी असलेले उमेदवार हे तुलनेने प्राथमिक समजले जातात. यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीतील उमेदवार हे क्रमाक्रमाने राजकीयदृष्टया महत्वाकांक्षी आणि या विषयातील तज्ञ समजले जातात.

ही घटना साधारण सन २०११ मधील ! अशीच वेळेनुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याच्या बेतात होती. तेथील विविध गट आणि गण यांची रचना झाली. नेहमीची पंचाईत म्हणजे प्रत्येकालाच त्या जागेवर निवडून येवून जनतेची सेवा करायची असते पण जागाच कमी असतात ! त्यातच पुन्हा हवे असलेले सोयीस्कर गट, गण जर आरक्षित झाले तर होणार गोंधळ आणि त्यात होणारे एकमेकांवरचे भलेबुरे डाव-प्रतिडाव मग विचारूच नका ! काही डाव उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तर काही पाडण्यासाठी असतात. या सगळ्यांचे डाव जनता वेगळ्याच प्रकारे हाणून पडत असते हे वेगळेच ! निवडणूक जाहीर होण्याच्या बेतात असल्याने तेथील ग्रामपंचायतीतील सदस्य पाटील यांनी या रचनेच्या संबंधाने तक्रार उपस्थित केली. निवडणुका जाहीर झाल्या की त्या वेळेत घेण्याची काळजी निवडणूक आयोग घेत असतो. त्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर हरकती घेणारे असतातच, त्यांच्या हरकती अपवादात्मक परिस्थितीतच मंजूर होतात, बहुतेक सर्वच रद्द होतात. मग उरते ते उच्च न्यायालय आणि जमले तर सर्वोच्च न्यायालय ! बहुतेक उच्च न्यायालयापर्यंत उत्सुक उमेदवार येतात, त्यांची तक्रार खरी आणि कायद्यात बसणारी असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना न्याय पण मिळतो. या मुळेच न्यायव्यवस्थेचे महत्व टिकून आहे.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संभाव्य निवडणुकीची तयारी सुरु होती. निवडणूक जाहीर झाली, तशी वेगवेगळ्या टप्प्यावर हरकती घेतल्या पण त्या रद्द झाल्या. शेवटी निवडणुकीला उत्सुक असलेले पाटील उच्च न्यायालयांत माझ्याकडे पोहोचले. त्यातील महत्वाचा मुद्दा होता तो तेथील लोकसंख्येचा विचार न करता वॉर्ड केले आणि ते आरक्षित केले. जेथे आदिवासींची संख्या कमी तेथे आरक्षीत आणि जेथे जास्त ते सर्वसाधारण म्हणून जाहीर ! लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व दिलेले नाही. उच्च न्यायालयाने याबाबत ऐकून घेतल्यावर या संबंधीचा निर्णय हा शासनाने ग्यावायचा असल्याने तक्रारकर्त्याला याबद्दल शासनाकडे आणि संबंधित व्यवस्थेकडे दाद मागावी अशी परवानगी दिली. सदर तक्रारींचे निवेदन शासनाला आणि संबंधित व्यवस्थेकडे सहा आठवड्यात द्यावे आणि ते दिल्यावर त्यांनी त्यावर चार महिन्यांत निर्णय घ्यावा. असा आदेश दिला.


दरम्यानचे काळांत याबद्दल विचार न करता आणि याचिकाकर्त्याच्या तक्रारीला न जुमानता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पंच्यात समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आदेश काढला. गट आणि गण याची रचना, त्यांचे आरक्षण याबद्दल प्रक्रिया पार पाडून निवडणूक कार्यक्रम पुढे सरकत होता. याचिकाकर्त्याला या बद्दलचे आदेश, नियम आणि शासनाचे धोरण हे घटनेच्या आरक्षण धोरणाचे विपरीत आणि इतर तरतुदींच्या विरोधी, घटनाविरोधी असलेबद्दल वेगवेगळ्या याचिका केल्या.

'वकीलसाहेब, आपण शेवटपर्यंत अगदी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत जावू पण याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहीजे. हे अर्धवट काम असे येथे होऊ द्यायचे नाही.' माझे पक्षकार पाटीलांनी मला सांगीतले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आणि शासनाने याचिकाकर्त्याच्या तक्रार निवेदनासाठी थांबणार नाही याची चुणूक निवडणूक प्रक्रियेचा आदेश काढून केली. लगेच त्यावर नवीन याचिका दाखल करून ही सर्व वस्तुस्थिती सांगीतली, गेल्या तीन निवडणूकांची कशी स्थिती होती, ते दाखविले. त्या क्षणाला आमचेकडे महत्वाचे मुद्दे म्हणजे - लोकसंख्येच्या प्रमाणांत सर्वांना जागा मिळालेल्या दिसत नव्हत्या, निवडणूक आयोगाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचे प्रमाण सांभाळले नव्हते. जिल्हा परिषदांमध्ये तर चक्क १००% आरक्षण होते. या बाबी न्यायालयासमोर दाखविल्यावर, प्रथमदर्शनी आमचे म्हणणे योग्य असे असे वाटले आणि मग पहिल्याच दिवशी न्यायालयाने 'यापुढील निवडणुकांचे काम या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून राहील' हा आदेश दिला. येथे आम्ही बरीचशी लढाई जिंकली.      

त्यानंतर न्यायालयाच्या पूर्वीच्या याचिकेतील आदेशाप्रमाणे, याचिकाकर्त्याने मग भारत सरकार आणि त्यांचे संबंधित विभाग, महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे संबंधित विभाग तसेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे पण हे तक्रारींचे निवेदन दिले. या निवेदनांत ग्रामपंचायतीपासून ते नंदुरबार जिल्ह्याविषयी देखील याबाबत तक्रारी होत्या. आमच्या तक्रार निवेदनाकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते, 'आमच्या खात्याचा संबंध नाही' असे आवर्जून ज्यांचा संबंध नाही त्यांचे उत्तर आले. ज्यांचा संबंध आहे ते बहुतेक गप्प होते अपवाद 'भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, दिल्ली' ! तेथील सचिव अत्यंत कार्यदक्ष आणि हुशार दिसले. त्यांनी फोन करून मला वेळ सांगीतली, त्यावेळी काही काम असल्याचे लक्षांत आल्यावर दुसरा फोन करून एक तासाने उशिरा यावे असा निरोप दिला. अलिकडे काम करण्याचा नक्की दिवसही न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये हे त्यांचे वागणे अजूनही माझ्या लक्षांत आहे. मी तेथे गेल्यावर, टेबलवर माझी फाईल उघडलेली होती. त्यांनी माझे म्हणणे नीट एकूण घेतले, ते त्या विभागाचे असल्याने आणि कदाचित पूर्वीच वाचून ठेवलेले असल्याने, काय गोंधळ झालेला आहे हे त्यांचे लगेच लक्षांत आले. युक्तीवाद संपला आणि पुढील दिनांक मिळाली. पुढच्या दिनांकाला मी गेल्यावर त्याने मला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी यापूर्वीच माझा तक्रार अर्ज मान्य केला होता आणि महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारतर्फे त्या संबंधाने आदेश पाठविले होते. त्याची साधी प्रत त्यांनी हसून मला दिली. एक अत्यंत चांगला, अलिकडच्या वागण्याने सरकारी कर्मचाऱ्याचा न अपेक्षिलेला अनुभव ! त्यानंतर या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाकडे चौकशी व्हावयास हवी होती. त्यानुसार एकदा महाराष्ट्र शासनाकडे चौकशी झाली. मात्र माझ्या पक्षकाराचे म्हणणे खरे आहे, ते मान्य केले तर आपल्याला अडचणीचे ठरेल हे लक्षांत आल्यावर मग पुढील तारीख दिली गेली आणि नंतर टोलवाटोलवी सुरु झाली.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची निवडणूक लागली. निवडणूक झाली, निकाल जाहीर झाले. मात्र माझा पक्षकाराचा तक्रार अर्ज अजूनही प्रलंबित होता. त्यांवर भारत सरकारने निर्णय घेतला होता आणि महाराष्ट्र सरकारकडून त्याबद्दल खुलासा, अहवाल मागीतला होता. त्यावर पुढील निर्णय अवलंबून होते. न्यायालयातील याचिका अजूनही प्रलंबित होती. नंतरच्या घडलेल्या घटनांच्या दुरुस्तीचा अर्ज मी याचिकेत केला, तो मंजूर झाला, त्याप्रमाणे याचिकेत दुरुस्ती केली. अंतिम निकालाच्या दृष्टीने भारत सरकारचा निर्णय आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेला आदेश आम्हाला महत्वाचा होता. निवडणूक झाली असल्याने निवडून आलेले उमेदवार आणि शासन निर्धास्त, शांत होते. मात्र आमचा पक्षकार शांत नव्हता.

याचिका चौकशीला आली. नंतर घडलेल्या घटना आणि पहिलाच आदेश मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व हवे ते या निवडणुकीतही मिळालेले नव्हते. पंचायत समितीच्या जागांमधील आरक्षणाचे प्रमाण बरोबर नव्हते. जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जागांवर आरक्षण होते म्हणजे सर्व जागा आरक्षित होत्या. कोणत्याही परिस्थितीत १००% आरक्षण हे चालणार नाही, हे घटनादत्त अधिकार इतरांना होते. या परिस्थितीत याचिका मंजूर करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. सामनेवाले मुदतीवर मुदती मागत होते. शेवटी एकदा मी किती मुदती मागितल्या हाच युक्तीवाद नाईलाजाने केला. न्यायालयाने शासनाला आणि निवडणूक आयोगाला याबद्दल सूचना घ्या अन्यथा अंतीम निर्णय देण्यात येईल असे सांगीतले. त्या दिवशी मी काही थोडे सांगीतले आणि मागील दिनांकास सामनेवाल्यांना सूचना घेण्यास सांगितल्याची आठवण करून दिली . निवडणूक आयोगाचे वकील यांनी न्यायालयांत अगदी स्वच्छ मनाने सांगीतले - याचिकाकर्त्याचे म्हणणे बरोबर आहे. आमची झालेली चूक पुढील निवडणुकीत दुरुस्त करू. मात्र आता हे करणे अवघड आहे. न्यायालयाने ते म्हणणे स्विकारुन याचिका निकालात काढली.

साधारणपणे कोर्टांत जाणारा मूर्ख ठरला पाहीजे असेच धोरण हे सामनेवाल्याचे असते. त्यामुळे सामनेवाला हा नेहमी कालापव्यय करून आपले काम सुरूच ठेवतो. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे हे न्यायाचे महत्वाचे तत्व असल्याने, म्हणणे मांडण्यासाठी बऱ्याच वेळा मुदत दिली जाते. आपण हे न्यायसंस्थेसमोर प्रामाणिक नसल्याने आपल्या 'मनांत एक आणि ओठात एक' असे असते. म्हणणे मांडायला मुदत मागतांना, आपल्याला काहीही अधिकार नाही हे माहित असतांना देखील आपण मुदत  काम मात्र सुरूच ठेवतो. शेवटी एक वेळ अशी येते की मग त्या दाव्याचा किंवा याचिकेचा काहीही उपयोग होत नाही, तिच्यावर निर्णय देणे हे न्यायालयाचा वेळ घालविणे किंवा निरर्थक अभ्यासाची चर्चा हे होऊन बसते. एवढा वेळ आणि पैसा घालवून त्या याचिकाकर्त्याला काहीही मिळत नाही. विनाकारण वेळ आणि पैसे घालविला अशी त्याची भावना होते. त्याचे उदाहरण इतरत्र दिले जाते किंवा दिसते. मग त्याच्या पासून धडा घेत नंतरही कोणी आपल्या हक्करक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावत नाही. यामुळे जे अन्याय करणारे असतात, चुकीचे वागणारे असतात त्यांना मोकळे रान मिळते. ही कल्पना मी नेहमीप्रमाणे पक्षकाराला दिलेली होती. पक्षकाराला वकिलावरील विश्वास आणि धरावा लागणारा धीर हे पक्षकाराला न्याय मिळवून देण्यास मोठीच मदत करतात.

(ही आठवण लोकमत जळगांव' मध्ये संक्षिप्त स्वरूपांत दि. २६ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती.)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171126_6_5&arted=Jalgaon%20Main&width=141px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2017-12-02/4#Article/LOK_JLLK_20171202_4_5/204px