Thursday, December 20, 2018

'गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या'
मला अचानक माझ्या शाळेत मी बहुधा सातवीत असतांना शिकविलेली 'गाई पाण्यावर काय म्हणून आल्या' ही 'नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' यांची कविता आठवली. अत्यंत अप्रतिमपणे शिकविलेली ही कविता माझ्या आजही लक्षात आहे.
बापाचे दारिद्य मुलांच्या उर्मी, अपेक्षा कशा मारून टाकत असतांत मात्र ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या पण खोट्या उपायाने आपल्या बापास कसे हृदय पिळवटून टाकणारे समाधान देत असतांत. वाचा ---------------
गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.
तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'
पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !
नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !
तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरि हा प्रलय महाभारी !
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
नये वदतां, अनुभवी जाणती ते !
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !
"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
(ही पोस्ट नांवासहीत ‘शेअर’ करण्यास हरकत नाही)

३०. ६. २०१८
साधारणत: १९७८-७९ साल असावे ! जळगांवला ‘कृषक भवन’ला निसर्गकवी श्री. ना. धों. महानोर यांची सायंकाळी ‘काव्यसंध्या’ हा कार्यक्रम सुरू होता. शहरातील रसिक श्रोते, तसेच श्रोते आणि स्त्रीपुरूष त्या कार्यक्रमात उपस्थित होते. आमच्यासारखी महाविद्यालयात शिकणारी रिकामी मुले पण उत्साहाने आणि कुतूहलाने तिथं उपस्थित होती.
श्री. ना. धों. महानोर यांचा आणि जळगांवचा तसा जुना ऋणानुबंध ! ते जळगांवी शिकले. त्यानंतर पण आमच्या ‘नूतन मराठा कॉलेजला’ ते बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप आले. मात्र त्यावेळी जास्त उत्सुकता होती ती यासाठी की सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. दिग्दर्शक होते श्री. जब्बार पटेल ! आणि इतर कलाकारांसोबत खान्देशकन्या कै. स्मिता पाटील या त्यांत होत्या. बहुसंख्य मंडळी ही नाट्यक्ष्त्रातील ! आणि गीतकार होते, श्री. ना. धों. महानोर ! याचा त्यावेळी बऱ्यापैकी गाजावाजा झालेला होता. त्यामुळे श्री. ना. धों. महानोर यांच्या या कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी होती.
या वेळी आपणांस, हा चित्रपट कसा घडला वगैरे ऐकायला मिळेल, ही खात्री होती. या अशा आणि संगीताच्या कार्यक्रमाला, मला जरी अगदी पुढे जायला मिळाले, तर मी अगदी पहिल्या रांगेत देखील जावून बसतो. त्यांत मला या कार्यक्रमांतील फार समजते किंवा समजणार असते, यापेक्षा कार्यक्रम नीट पहाता व ऐकता येतो, हा मुख्य भाग असतो. या कार्यक्रमांत पण जवळपास दुसऱ्या वा तिसऱ्या रांगेत होतो. माझ्या जवळच कै. भैया उपासनी होते, मनापासून दाद देत ! त्यावेळी त्यांचा माझा परिचय असा नव्हता.
त्यांची काव्याची गाडी ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील अनुभवांवर आलीच ! मग त्यांत त्यांनी उपयोगात आणलेले विविध गीतप्रकार म्हणून दाखवले किंबहुना गाऊन दाखवले, अगदी खड्या आवाजात !
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीताची कल्पना, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं येतंय या आभाल’ म्हणजे काय ? ‘वही’ हा गीतप्रकार यांत कसा व का वापरला ?
खूप छान व संस्मरणीय संध्याकाळ ठरली ती ! त्यांची गीते सुंदरच ! आपल्या भागातील माणूस मोठा झाला आणि मुख्य म्हणजे तो आपण बघीतला, तो आपल्याला ऐकायला मिळाला, हे समाधान खूप मोठे असते. ते समाधान मला त्या वेळी मिळाले आणि ‘जैत रे जैत’ यांवर बक्षीसांची व पुरस्कारांचा वर्षाव व्हावा असे, अगदी मनापासून वाटले. यांत खरोखर मोठीच माणसे होती, त्या क्षेत्रातील ! गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काही नव्याने सांगावे असे काही नव्हते. नवीन मंडळी होती, ती म्हणजे गीतकार श्री. ना. धों. महानोर आणि अभिनेत्री स्मिता पाटील ! त्यांना भरपूर लाभ होईल, असे वाटायचे !
त्याच वेळी ‘देवकीनंदन गोपाला’ या नांवाचा चित्रपट मराठी चित्रसृष्टीतील दादा समजले जाणारे, ‘राजदत्त’ हे दिग्दर्शीत करीत होते. कथा होती ‘संत गाडगेबाबा’ या महात्म्यावर ! त्यांची भूमिका करणार होते, साक्षात ‘नटसम्राट’ या भूमिकेचे शिवधनुष्य ज्यांनी सर्वप्रथम उचलले, ते डॉ. श्रीराम लागू ! ‘पिजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेने, ते चित्रपटसृष्टीतील अभिनयांत पण ‘मास्तर’ आहेत, हे त्यांनी दाखवून दिले होते.
चित्रपटांला संगीत होते कै. राम कदम यांचे ! ‘पिंजरा’ या चित्रपटांनेच नाही, तर त्या पूर्वी पण त्यांच्या संगीतातील सामर्थ्याची सर्वांनी अनुभूती घेतली होती. आणि गीतकार होत, आधुनिक वाल्मिकी मानले गेलेले, कै. गजानन दिगंबर माडगूळकर यांचे ! त्यांतील एक गीत तर गाणार होते, साक्षात पं. भीमसेन जोशी हे ! योग जुळून यावा तो तरी किती ? कपीलाषष्ठी बहुतेक याच वर्षी असावी.
या दोन्ही चित्रपटांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. मात्र दुर्दैवाचा घाला आला तो आधुनिक वाल्मिकी, ग. दि. माडगूळकर यांच्यावर ! भगवान रामचंद्राने त्यांना दि. १४ डिंसेबर. १९७७ रोजी आपलीच रामकथा ऐकायला स्वर्गात आपल्याकडे बोलावून घेतले.
‘जैत रे जैत’ हा चित्रपट मला बघता आला नाही. त्याची गाणी तुफान गाजत होती, म्हटलं गीतकार म्हणून श्री. ना. धों. महानोर सर्वमान्य व राजमान्य होणार !
मी ‘देवकीनंदन गोपाला’ हा चित्रपट बघीतला. चित्रा टॉकीजला ही तुफान गर्दी ! त्यांत ही गदीमांची दुर्दैवी बातमी ऐकल्यावर मात्र ह्रदय हळवे झाले. पुन्हा ही अशी गीते आता लिहीणार कोण ? तो शब्दप्रभू तर आपल्यातून निघून गेला ! आपण काय देवू शकतो, त्या शब्दप्रभूला ? शेवटचा निरोप आणि खरोखर शेवटचाच पुरस्कार ‘ ! मला आठवते त्या वर्षी सर्वोत्तम गीतकार पुरस्कार मिळाला होता, कै. गजानन दिगंबर माडगूळकर यांना !
आज ‘विठ्ठलाचे पायी थरारली वीट’ हा त्या आधुनिक वाल्मिकीचा अभंग ऐकत होतो, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात ! त्याला अभंगाएवढेच वजन प्राप्त झाले आहे. बैठकीतील शेवटी गाण्याच्या संकेत असलेल्या ‘भैरवी’ या रागातील ! संत गाडगेबाबांची महायात्रा निघालेली आहे, आणि मागून पंडीतजींचे भैरवीचे सूर ऐकू येताहेत. गीत लिहीणारा पण आपल्यात नाही, ही जाणीव चित्रपटगृहातून बाहेर पडतांना दु:खी करून टाकत होती. आज ऐकत होतो, ऐकतांना सरसर मन मागे गेलं !
विठ्ठलाचे पायी थरारली वीट
राऊळींची घाट निदादली
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यांत
तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी
संत माळेतील मळी शेवटला
आज ओघळला एकाएकी

८. ७. २०१८
काही अपवाद वगळता, ‘आपल्या नोकरीवर टाच येवू शकते’, हे जाणवलं तरच सरकारी नोकर काम करतात किंवा / आणि तरी ‘दिल्याघेतल्याशिवाय’ काम करत नाही. सर्वसामान्य जनतेला तर ‘दिल्याघेतल्यावरच’ आणि असे करणाऱ्याचाच विश्वास वाटतो. आपले काम बिनापेशाने सरकारी ठिकाणी होईल हा विश्वास आजपावेतोच्या अनुभवावरून, सरकारी कर्मचाऱ्यांनी गमावला आहे. अर्थात ‘यथा राजा तथा प्रजा’ यानुसार जसे सरकार तसे कर्मचारी ! मात्र इथं जी अडचण आहे ती ही, की सरकार पाच वर्षांत बदलतां येते मात्र त्यांनी नेमलेले कर्मचारी हे बहुतांशपणे ते निवृत्त होईपावेतो, सरकारला व जनतेला सहन करावे लागतात. प्रशासनिक कायदे वगैरे त्यांच्या ठिकाणावर असतात, ते शक्यतोवर आपली जागी स्थिर असतात आपली जागा सोडत नाही. त्यांना वाचवणारी मंडळी तर तयारच असतांत, त्यांचा कार्यभाग बिनबोभाट साधायचा असेल, तर ही आणि अशी मंडळी, त्यांच्यादृष्टीने हिताची असतात. यांना घरी जावे लागणे, हे त्यांचे वैयक्तिक नुकसान असते.
जी काही वरील अपवाद असलेली ‘स्वच्छ मंडळी’ आहेत, त्यांना ही अधिकार असलेली, विविध भल्याबुऱ्या मार्गांचा उपयोग करून, अशा ठिकाणी पाठवतात, की तिथं त्यांना कोणाचंही, कसलंही काम पडू नये आणि त्यांना सरळ, स्वच्छ राहिल्याचा पश्चात्ताप व्हावा.
विरोधी पक्ष म्हणजे, जो उघडपणे दिसतो तो तर असतोच पण जो दिसत नाही, तो पण असतो. तुमचे मित्र वाटतात पण ते शत्रू, विरोधक असतात. यांना नीतीमूल्यांचा विचार न करता, मुख्यमंत्र्यांना म्हणजे सरकारला बदनाम करायचे आहे, कारणं असंख्य असतील, त्यांत एक कारण आजच्या मुख्यमंत्री यांची ‘जात’ देखील आहे. हा अनुभव त्यातल्या त्यात चांगले काम करणाऱ्या बहुसंख्यांना येतो. कारण आपली जातीय भावना दिवसेंदिवस अत्यंत खालच्या आणि नीचतम पातळीवर जात आहे.
आणि स्वत:च्या स्वार्थाचा जर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने विचार केला तर ‘काम केले किंवा न केले तरी वेतन मिळणारच असते’, मग काम करण्यांत वेळ का वाया घालवा ? त्या वेळेत अन्य दोन ‘वेगळी’ कामं होवू शकतात. मग कठीण परिस्थितीत निदान काही काम करावेच लागले तर दोन पैसे तरी गाठीला असावे, हा सूज्ञ विचार आहे.
सरकारे येतात आणि जातात, नोकरशाही कायम असते. बहुमत ज्यांचे असेल तेच निवडून येतात. भरपूर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे का, काहीही न करता प्राप्ती होत रहावी, हे अपेक्षित असणाऱ्यांची संख्या जास्त आहे, हे सर्वज्ञात आहे. सरकारला या अशाच लोकांचा पाठिंबा असतो; काम करणारे तर बिचारे इकडे लक्ष न देता काम करत असतात.
खाजगी क्षेत्रात कर्मचारी कामावर नेमतांना त्याची पार्श्वभूमी बघीतली जाते, त्या शिवाय नेमणूक केली जात नाही. कित्येक खाजगी व्यवसाय असे आहेत, की कोणाचा तरी संदर्भ असल्याशिवाय तिथं काम मिळत नाही, आणि जबाबदारीचे तर नाहीच नाही. कारण त्यांना त्यांच्या व्यवसायात काम करणारी माणसं हवी असतात, काम करणाऱ्या माणसांमुळे व्यवसाय वाढतो. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असतो, म्हणून हे असे हुशार असले तरी निरोद्योगी नको असतात. मात्र कमी हुशार असले तरी प्रामाणिकपणे काम करणारे, उद्योगी लोक हवे असतात.
या सर्व तुलनेत आपण सरकारी कर्मचारी कसे निवडतो पहा, त्याला त्याचे काम येते किंवा नाही, तो प्रामाणिकपणे त्याचे काम करेल किंवा नाही, यांकडे कोणाचे तरी लक्ष असते का ? —— परिणाम तर आपण पहातोच आहे. त्यांवरील उपाय कठोरपणे अंमलात आणण्याची कोणाची पण, सरकारी किंवा विरोधकांची, मानसिक तयारी आहे का ? राज्य ‘पेशव्यांचे’ असो का अजून कोणाचे असो, जे देशात इतर राज्यांत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळे नियम वापरणाऱ्या आपल्यासारख्या ढोंगी लोकांना ते मान्य आहे का ? कायद्याची काळजी करू नका, आजचे कायदे पण त्यासाठी पुरेसे आहेत !
आज Praveen Bardapurkar यांची मुख्यमंत्री यांच्यावरची पोस्ट वाचली आणि Ramesh Zawar यांची प्रतिक्रिया वाचली, म्हणून !

१४. ७. २०१८
मला एक जुनी आठवण आली. जळगांवच्या ‘लोकहितवादी मंडळ’ या संस्थेची !
मी महाविद्यालयांत असतांनाचा काळ, सन १९७८-८५ पावेतो. जळगांवला काही मंडळी ‘लोकहितवादी मंडळ’ हे व्याख्यानमाला आणि ‘राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा’ आयोजित करत, अत्यंत समर्थपणे ! व्यवस्थापन अतिशय नीटनेटके ! या ‘लोकहितवादी मंडळात’ कै. श्रीकृष्ण जळूकर, श्री. गजाननराव पन्नालाल जोशी, ॲड. वसंतराव वाणी ही मंडळी माझ्या परिचयाची ! त्यांत फारसा परिचय नसलेले पण सर्वांना माहिती असलेले गोडबोले टेलर, ‘गोरसधाम’ ही जळगांवातील प्रसिद्ध खानावळ चालवणारे श्री. वाणी हे पण होते. यांच्या व्याख्यानाला मी जळगांवी असलो तर नक्की जायचो.
त्या राज्यस्तरीय महाविदयालयीन वादविवाद स्पर्धेत पण मी महाविद्यालयांत असतांना भाग घेतला, बक्षीसही मिळाले. त्यानंतर वकिल झालो. माझे व्यवसायातील वरिष्ठ ॲड. वसंतराव वाणी हे आमच्या गांवचे, रावेरचे ! यांच्या आग्रहाखातर त्या स्पर्धेचे परिक्षक म्हणून पण काम बघीतले. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभाध्यक्ष श्री. अरूणभाई गुजराथी होते. त्यावेळी कै. श्रीकृष्ण जळूकर यांनी परिक्षकांचा परिचय करून देतांना, ‘एकेकाळचे बक्षीसपात्र स्पर्धक म्हणून येथे आलेले आज परिक्षक आहेत.’ ऐकतांना बरं वाटलं !
ही मंडळी व्याख्यानमाला आयोजित करत, त्यांत खूप छान वक्ते बोलावत. एकदा गंगाधर गाडगीळ यांना बोलावले होते. विषय भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी होता. गंगाधर गाडगीळ हे जसे ख्यातनाम लेखक होते, विनोदी साहित्य त्यांनी लिहीले होते. नवकथेचे स्वरूप बदलविणारे कथाकार होते, तसेच ते नामवंत अर्थतज्ञ देखील होते. बऱ्याच जणांना त्यांची ही ओळख म्हणावी तितकी नाही.
त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरूवातच छान केली.
माझा तसा देवावर विश्वास नाही, कारण मी अजून देखील देवाला बघीतले नाही. माझी देवाला बघण्याची इच्छा पण नाही. वाटेल त्या इच्छा काहीवेळा आत्मघाती असतांत. देवाच्या घरी गेले की गेलेला पुन्हा परत येत नाही, हे लहानपणीच माहिती आहे. मी त्यामुळे तो खरंच आहे की नाही, याची खात्री करायला देवाकडे जाणार पण नाही. तरी देखील मला वाटते की जगांत देव आहे, निदान भारतात तर नक्कीच आहे. कारण अर्थशास्त्राच्या नियमाच्या बहुतांश विपरीत गोष्टी असतांना, सरकारचे अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने चमत्कारिक धोरण असतांना, प्रगतीच्या व विकासाच्या विरूद्ध असे अर्थशास्त्रदृष्ट्या निर्णय घेतले जात असतांना देखील भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत आहे, हे देव असल्याशिवाय शक्यच नाही ! अजून काय पुरावा हवा, देव असल्याचा ?
श्रोत्यांमधून जबरदस्त दाद मिळाली नसती तरच नवल !
(Ramesh Zawar यांच्या दुसरीकडील एका प्रतिक्रियेने हे आठवले)

१४. ७. २०१८
मी इकडे, औरंगाबादला रहायल्या आल्यानंतर, स्वाभाविकच मला मराठवाड्यातील बऱ्याच धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आला. मात्र मराठवाड्याशी नाळ जुळलेलं, पण सध्या मराठवाड्यात नसलेली पण काही गांवे आहेत. त्यांत मला फारसे माहिती नसलेलं ठिकाण होतं, ‘बासर’ ! महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश म्हणजे आताच्या तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचे हे गांव ! गांव तसे छोटे आहे. महाराष्ट्रातील शेवटचे मोठे गांव म्हणजे धर्माबाद, यापासून साधारणत: पंधरा किलोमीटरवर हे असेल. ‘बासर’ हे गांव आताच्या तेलंगणा राज्यात आहे.
मी यापूर्वी एकदा कामानिमीत्त तिथं गेलो होतो, मात्र तरी मुलाला मुद्दाम सोबत घेवून गेलो, दर्शन व्हावे यासाठी ! या आठवड्यात पुन्हा जाण्याचा योग आला. मला ठिकाण आवडलं ! तिथं ज्ञान सरस्वतीचे मंदीर आहे. आपल्या समर्थ, शक्तीशाली बनायचे असेल, तर पहिले ज्ञानसाधना करावयास हवी. ज्ञानानेच लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. हे सर्व जरी असले तरी परमेश्वराचा आशीर्वाद तिथं हवाच !
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।
सरस्वतीची मंदीरे भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत, असं मानतात. एक म्हणजे जम्मू काश्मिर येथे आणि हे दुसरे तेलंगणातील ‘बासर’ येथे ! हे मंदीर अत्यंत प्राचीन असून, गोदावरी आणि मांगीरा नदीसंगमावर आहे. सरस्वती ही विद्येची देवता, ज्ञानाची देवता ! जिथं वेद व्यासांनी तपश्चर्या केली, त्या जागेवर हे मंदीर आहे. यांच जागेत वेद व्यासांनी देवी सरस्वती, देवी काली आणि देवी लक्ष्मी यांच्या वाळूच्या मूर्त्या केल्यात. सध्याचे हे मंदीर चालुक्य काळात बांधले गेल्याचे मानतात. पंचमी आणि नवरात्रीचा उत्सव येथे मोठा असतो. मंदीर आणि परिसर मोठा आहे.
या भागांत बहुसंख्य जण आपल्या लहान मुलामुलीला शाळेत घालण्यापूर्वी ‘बासरला’ घेवून जातात, तिथं पाटी-पेन्सील घेवून देवी सरस्वतीची पूजा करतात, याला ‘अक्षर अभ्यासम्’ म्हणतात. इथं माकडं बऱ्यापैकी आहेत.
आपल्या बहिणाबाई सरस्वतीचे हे ऋण तिला आई समजून मानतात.
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनच्या, मनी
किती गुपितं पेरली
या रविवारी पहाटे पाच वाजता मला लॉजवर जाग आली, ती सरस्वतीच्या प्रार्थनेने ! मंदीरात पूजा सुरू झाली होती. त्यातील श्लोक समजायला अवघड नव्हते, लहानपणापासून ऐकत आलो होतो.
या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रा वृता |
या वीणा वरदण्ड मंडित करा, या श्वेत पद्मासना ||
या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभृतिभि: देवै: सदा वन्दिता |
सा माम् पातु सरस्वति भगवति निःशेष जाड्यापहा ||

१८. ७. २०१८
माझे तमाम, असलेले किंवा नसलेले, फेसबुक मित्र आणि मैत्रिणींसाठी जाहीर निवेदन -
सध्या फेसबुकवर ‘आपल्या पोस्टांना’ येथे भरपूर ‘लाईक, कॉमेंन्टस् मिळावेत किंवा त्या शेअर’ व्हाव्यात, यासाठी एकमेकांच्या पोस्ट चोऱ्यांचे प्रमाण, फार वाढल्याचे कानी येत आहे. यामुळे अन्यायग्रस्तांचे मनांत जबरदस्त असंतोष खदखदत असल्याची पण तक्रार आहे.
काहींच्या तक्रारी या वारंवार येत असून त्यांत समाजात विनाकारण असंतोष पसरवावा, अशी पण भावना असल्याची आम्हास जबरदस्त शंका आहे. अर्थात यामुळे काहींना आनंदाच्याउकळ्या फुटत असल्याचे देखील ऐकीवात आहे. पण ही समाजविघातक बाब, आपल्या नेहमीच्या पहाण्यातील व पारंपरिक असल्याने, तसेच त्यामुळे दुर्लक्षित करण्यायोग्य असल्याने येथे विचारार्ह नाही.
सबब एकंदरीत साकल्याने विचार करता, या परिस्थितीत एकमेकांच्या होत असणाऱ्या पोस्ट चोऱ्या हुडकून काढणे आणि त्या चोऱ्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी योग्य, सक्षम व्यक्तींकडून योग्य त्या अटींवर निविदा मागविण्यात येत आहेत.
अटी -
१. संबंधीताचा किंवा संबंधितेचा फेसबुकवर बऱ्यापैकी मुक्काम हवा. हा मुक्काम त्याच्या, तिच्या कामाचा भाग समजण्यात येईल. स्वत: पोस्ट टाकण्यास लागणारा वेळ यांतून वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
२. त्याने किंवा तिने फक्त स्वत:च्याच पोस्टकडे लक्ष न देता इतरांच्या पण पोस्टकडे लक्ष द्यावयास हवे, किंबहुना सार्वजनिक जबाबदारी आणि बांधीलकी याची जाणीव ठेवून आपल्या पोस्टकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण इतरांच्या पोस्ट काळजीपूर्वक बघावयास हव्यात.
३. या कामी अगोदरच सेलिब्रिटी मानल्या गेलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल, कारण त्यांची चौफेर नजर असते हा समज असतो. वस्तुत: त्यांच्यावर पण चौफेर नजर असते, याचा उपयोग त्यांच्या चौर्यकर्मास आपोआप प्रतिबंध बसतो.
४. संबंधिताने हा आपला किंवा तो परका, असा आपपर भाव न ठेवता चोऱ्या रोखण्यासाठी लक्ष ठेवावयास हवे. एकवेळ आपल्या गटाकडे कमी लक्ष ठेवले तरी चालेल, पण विरोधी गटाकडे कटाक्षाने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावयास हवे.
५. यापासून कोणालाही कसलाही आर्थिक लाभ घेता येणार नाही, कारण हे ‘स्वेच्छा चौकीदाराचे’ काम आहे. यामुळे यांस ‘संरक्षक’ असे संबोधण्यात येईल. त्याने / तिने हे काम थांबविल्यावर पण ‘संरक्षक’ हे आपल्या नांवापूर्वी, त्याच्या या सेवेची मान्यता म्हणून वापरतां येईल.
विशेष - ‘विचारांची चोरी’ ही संकल्पना ‘चोरी’ या संज्ञेत येत नाही, याची नोंद घ्यावी. शब्दश: साम्य असेल तर विचार करण्यात येईल.
निविदा अर्ज मोफत उपलब्ध आहेत. सविस्तर अटींसाठी मूळ अर्जच आणि त्यातील अटी ग्राह्य मानले जातील.
निविदा सुरू होत आहेत - आषाढ शुद्ध ११, आषाढी एकादशी या शुभ दिवशी
निविदा बंद होतील - आषाढ शुद्ध १५, आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरू पौर्णिमा या दिवशी
निविदा उघडण्याची दिनांक मागाहून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
त्वरा करा ! सुरक्षित व्हा आणि एकमेकांना सुरक्षित करा !!

२. ७. २०१८
मी मूळचा रावेर, जि. जळगांव जिल्ह्यातील ! रावेर गांवाच्या आयुष्यात घडलेल्या अभिमानास्पद घटनांपैकी आज एक घटना आठवली. कारण होते, नागपूर येथे उच्च न्यायालयात येण्याचे !
आज न्यायालयाच्या कामानिमीत्ताने नागपूरला आलो होतो. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, या इंग्रजांच्या काळातील जुन्या दगडी, भरभक्कम इमारतीत मी उभा होतो. उगाचच तीन-चार कोर्ट हॉलमधे काम नसतांना पण जावून आलो. आणि आठवली ती एक, आमच्याच रावेर वकिल संघात ऐकलेली घटना, कै. ॲड. प्र. ना. चावरे यांनी सांगीतलेली -
तारे कुटुंब हे मूळचे आमच्या रावेर गांवचे. आमचे गांव आजच्या मध्यप्रदेशला जवळचे तसेच विदर्भाला पण जवळचे ! एकमेकांचे नातेगोते इथं विदर्भ, मध्यभारत, मध्यप्रदेशांत भरपूर ! तारे कुटुंबातील एक जण तत्कालीन मध्यप्रांतात आताच्या मध्यप्रदेश उच्चन्यायालयात न्यायाधीश झाले. रावेर सारख्या छोट्या तालुक्याच्या गांवासाठी ही अभिमानाचीच गोष्ट ! गांवातील मंडळींनी सत्कार समारंभ आयोजित केला. समस्त रावेरवासियांसाठी पवित्र आणि ऐतिहासिक असे ठिकाण होते - ‘रामस्वामी मठ’, समस्त ब्रह्मवृंद या जुन्या वास्तूत ! येथे उपस्थित रावेरकर मंडळींनी न्यायमूर्ती तारे यांचा ह्रद्य सत्कार केला. त्या वेळी रावेरवासियांना, दुसऱ्या राज्यांत जावून आपल्या गांवाचे नांव अभिमानाने सांगता येईल असे कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती सत्कारमूर्ती म्हणून मिळाली होती. त्यांच्या सोबतचा तो बंदोबस्त, बरोबर असलेली बडीबडी मंडळी हे सर्व गांववाल्यांना नविनच असणार, याचे स्वाभाविकच अप्रूप वाटणार !
नागपूर ही पूर्वी मध्यभारत या प्रांताची राजधानी होती. या प्रांताचा बराचसा भाग आता मध्यप्रदेशांत आहे, तर काही भाग महाराष्ट्रात आहे. यांचे पूर्वीचे नागपूर येथील उच्चन्यायालय हे आता मुंबई उच्चन्यायालयाचे खंडपीठ आहे. काही घटनांवरून आपण कितीही दूर असलो, तरी गांवची आणि गांवच्या माणसाची आठवण ही माणसाची पाठ सोडत नाही. ना या माणसांना आपण बघीतले असते, ना ही घटना आपल्यासमोर घडलेली असते. आपल्या गांवाची, गांवच्या माणसाची आणि त्याच्या या कर्तृत्वाची आठवण, आपण इतक्या दूरवर गेल्यावर, इतक्या काळानंतर पण का येत असेल बरं ?

३०.७. २०१८

१ ऑगस्ट !

१ ऑगस्ट !
हा दिवस तर मला नेहमीच आठवतो. अगदी शालेय वयापासून, सकाळीच गणवेश घालून जास्तच उत्साहाने शाळेत जाणे होई, कारण या दिवशी अभ्यासाची काळजी नसे. या दिवशी आम्ही आवर्जून ऐकलेली आहेत, ती आमच्या तत्कालीन शिक्षकांची भाषणे ! भाषणे असायची ती 'भारतीय असंतोषाचे जनक' या नांवाने ओळखले जाणाऱ्या एका 'तेला तांबोळ्याच्या पुढाऱ्यावरची' ! मात्र शिक्षकांच्या भाषणांपूर्वी, आम्हाला ऐकावी लागायची, ती माझासारख्याच माझ्या छोट्यामोठ्या मित्रांची भाषणे ! कोणी बोलताबोलता विसरून जायचे, आणि मग हसायचे नाही अशी ताकीद असली तरी हसू यायचेच. आमच्यासारखी मुले भाषण करायची म्हणजे काय, त्या गोष्टीच असायच्या. मग त्यांत काय नसायचे - 'शेंगाच्या टरफलाची गोष्ट' तर नक्कीच असायची, 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच' हे वाक्य असायचे. 'मंडालेच्या तुरुंगातील सहा वर्षाच्या शिक्षेच्या काळात त्यांनी आपल्या असामान्य बुद्धीने लिहीलेला 'गीतारहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र' या ग्रंथसंबंधाने गोष्ट असायची ! आमच्या संस्कृतीबद्दल, अगदी अनादी काळापासून चालत आलेल्या या आमच्या चिरंतन तत्वज्ञानावरील, भगवान श्रीकृष्ण आणि क्षत्रियोत्तम अर्जुन यांच्यातील प्रत्यक्ष युद्धप्रसंग उद्भवला असतांनाचे संवाद, जे अगदी सुलभतेने सांगीतलेल्या 'भगवद्गीता' या असामान्य ग्रंथाच्या रूपाने आपल्यात आहेत, हे पण सांगणे असायचे.
थोडे मोठे झाल्यावर यांच्या वेगळ्या गोष्टी वाचायला आणि ऐकायला मिळाल्या त्यांत - सार्वकालीन आणि सार्वत्रिक पत्रकारांना, विशेषतः अन्याकारक आणि परकीय राज्यकर्त्याच्या काळात,पत्रकारांनी कसे वागावे, हे या पत्रकार म्हणून 'केसरी'सारखे काम केलेल्या पत्रकाराकडे पाहून त्यांचे आदर्श घेण्यासारखे आहेत. या 'नरशार्दूलने' केलेल्या तत्कालीन सरकारविरुद्धच्या 'केसरी'गर्जनेची कथा ऐकू यायची ती - 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' या नांवाने आणि तसेच सरकारला शाब्दीक चाबकाच्या फटक्याने फटकावून काढत 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' ही पण गोष्ट असायची !
त्यांनी आपल्याला राजद्रोह आरोपाखाली सरकारने पकडल्यावर, कैद्याने कसे वागावे हे पण दाखवून दिले. कैद्याचेच वर्तन हे न्यायमूर्तीपेक्षा लक्षांत रहाते. तत्कालीन न्यायमूर्ती डावर यांनी राजद्रोह या गुन्ह्याखाली दिलेल्या सहा वर्षाच्या तुरुंगवासाची आणि १,०००/- रुपये दंडाच्या शिक्षेवर आपल्याला काही सांगायचे आहे का हे 'या आरोपीला' विचारल्यावर -
All that I wish to say is that, in spite of the verdict of the jury, I still maintain that I am innocent. There are higher powers that rule the destinies of men and nations; and I think, it may be the will of Providence that the cause I represent may be benefited more by my suffering than by my pen and tongue.
न्यायमूर्ती पण सुन्न झाले असतील नाही ? ही अशी माणसे कशाने बनली असतील हो ? कुठे बनतात ही अशी माणसे ? कुठल्या मातीने बनली असतील हो ही माणसं ? आपल्या भारतातल्याच मातीची आहेत, हे आपले भाग्य ! आता अलीकडे, अगदी दूरदूर नजर लावली तरी दिसतच नाही, ही अशी माणसं.
काय बदललं आहे आणि कोण बदललं आहे, कोणास ठावूक ? आपणच आपल्यामध्ये डोकावून पहाण्याची गरज आहे आता. आता तर नवनवीन धोरण बनविले जात आहे ते पूर्वींच्या आपल्या आणि आपल्यासारख्यांच्या 'संबोधनांवर' ! त्यामुळे अलीकडे आम्ही तुम्हाला 'लोकमान्य' या नांवाने संबोधण्याऐवजी वेगळ्याच कुचेष्टादर्शक नांवाने संबोधतो आहे, हे अर्थांत सध्या बऱ्याच प्रमाणांत चोरूनलपून आहे, पण आहे; पुढचे काही सांगता येत नाही. तुमच्या गाजलेल्या पगडीचे आम्हाला आता फारसे अप्रूप वाटेनासे झालेलं आहे, ती पण आता आमच्यासाठी टाकावू झालेली आहे. आपले तन-मन-धन आणि सर्वस्व फक्त केवळ आपल्याच ज्ञातीबांधवांसाठी अथवा नातेवाईकांसाठी नाही, तर समाजातील सर्व लहानथोर, अठरापगड जातीतील लोकांसाठी अर्पण करून कष्टांत, हालअपेष्टांत, तुरुंगवासांत दिवस काढावे लागणारे तुम्ही कसले हो नेते ? असे कष्टांत जगावे लागल्यावर पण न डगमगता, तेच कार्य सदोदीत पुढे नेणारे तुम्ही कसले हो 'तेल्यातांबोळ्याचे पुढारी' ? जरा आमच्याकडे आणि आमच्या भावकीकडे पहा, आमच्या अलीकडच्या पुढाऱ्यांकडे पहा ! कसे भराभर प्रगती करतात. त्यासाठीचे नियम आता बदललेले आहेत, आता 'समाजरूपी थंड असलेल्या गोळ्याला आपल्या समाजहितकारक ऊर्जेची उब द्यावी लागत नाही, तर इतरांच्या द्वेषाचे चटके द्यावे लागतात. समाजांत जाळपोळ करावी लागते. समाजांत आपली आणि आपल्या कृत्याची दहशत पसरवावी लागते. क्षणांत एक भूमिका घेतली तर दुसऱ्या क्षणाला त्याच्या विरुद्ध भूमिका घ्यावी लागते, आणि त्याचे समर्थन देखील करावे लागते, त्याला तुम्ही भलेही निर्लज्जपणा म्हणा, पण तुम्हाला विचारतो कोण ? हे सर्व केले, तर आणि तेंव्हाच पुढारी होता येते, कोणाचे पुढारी होता येते, ते विचारू नका, पण पुढारी होता येते.
आज पण १ ऑगस्ट आहे. तुम्ही आम्हाला कायमचे सोडून गेले तो दिवस, १ आॅगस्ट १९२० ! ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक', आज पण मला तुमची आठवण येते ती माझ्या लहानपणाचीच ! काय करू हो, तुमची आणि तुमच्या सारख्यांची चरित्रे आम्हाला आमच्या लहानपणी, जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेंत आणि नंतर पण आमच्या 'गुरव गुरुजींनी, बोरोले गुरुजींनी, पठाण गुरुजींनी, डेरेकर बाईंनी, तिवारी सरांनी वानखेडे सरांनी, कुलकर्णी सरांनी, पाटील सरांनी आणि असंख्य शिक्षकांनी अशी काही शिकविली आहेत, की आजच्या या 'नवीन पुढाऱ्यांचे' हे शिकवणे आमच्या कानातच जात नाही, मनापर्यंत जायची तर गोष्टच सोडा. मला माहीत आहे, माझ्यासारखे तुमच्यासारख्याच शिक्षकांनी शिकविलेले असंख्य विद्यार्थी अजून या समाजांत आहेत, या भारतभूमीत आहेत. ही भूमी अजून उजाड, वैराण, नि:सत्व झालेली नाही आणि तुम्ही शिकविलेले पण इतके तकलादू नव्हते की यांच्यासारख्यांच्या हवेने उडून जाईल. तरी पण माझ्या सारख्याला उगाचच वाटते की आमच्यासारख्यांना अजून पक्के करायला आणि या भडकलेल्या, भटकलेल्या आमच्या भावांना नीट वाटेवर आणण्यासाठी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक', पुन्हा एकदा आमच्यांत या, या भरतभूमीत, जन्म घ्या ! आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दाखवा, योग्य दिशा दाखवा. माझासारखा, तुमच्या कार्याच्या मानाने अति क्षुद्र असलेला, यापेक्षा परमेश्वराजवळ या समाजासाठी मागणार ते काय ? आणि नाही म्हटले तरी तुमचेच 'गीतारहस्य' भगवान श्रीकृष्णाचे अर्जुनाला भगवंताने दिलेले वचन सांगते ना -
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
मला कल्पना आहे, तुम्ही मला सांगणार, 'अर्धवट आणि एखादा श्लोक घेऊ नको, त्यावरून काहीतरी भलतासलता निष्कर्ष काढू नको, सर्व श्लोकांचे साकल्याने वाचन आणि मनन कर. कारण नंतर हे पण आहे -
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् | आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ||
भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेल्या भगवद्गीतेतील, अंध धृतराष्ट्राला सांगीतलेल्या डोळस संजयच्या तोंडच्या श्लोक तर सर्वांना ज्ञात आहे. आपल्यालाच श्रीकृष्ण व्हावे लागेल आणि अर्जुन देखील व्हावे लागेल, तेंव्हा म्हणता येईल -
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।

१. ८. २०१८

'अपयश नोकरशाहीचं

आता निवांतपणे 'अपयश नोकरशाहीचं, जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची !' हा Praveen Bardapurkar यांचा लेख वाचला. यावर काही लिहावे की नाही ही थोडी द्विधा परिस्थिती होती, पण लिहीले. आपल्या लिखाणातील शेवटून दुसरा परिच्छेदातच आपण याची कारणमीमांसा केलेली आहे.
आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आणि संस्कृतीनुसार समाजातील वंचीत असलेले सर्व घटक, आर्थिक आणि सामाजिकदृष्टीने डावलले गेलेले सर्व घटक याना आपण समाजाचे घटक म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून मदत केलीच पाहीजे यांत अजिबात शंका नाही, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे. 'सर्वेत्र सुखिनः सन्तु' ही आपलीच उक्ती आहे. मात्र ही मदत करत असतांना, इतर घटकांवर अन्याय होता कामा नये, हे देखील आपल्या राज्यघटनेचे तत्व आहे याचा विसर पडू देऊ नये.
कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे राजकीय उद्दीष्ट सध्या साध्य करावयाचे असेल, तर त्यासाठी त्याची सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला काही त्यानुसार निर्णय घ्यायचे असतील तर, विरोधी पक्षाच्या मताला पूर्वीचा सत्ताधारी किती किंमत द्यायचा, हे त्यांना गेल्या सत्तर वर्षांच्या अनुभवावरून उमजलेले असेलच. दुसरी त्याहून महत्वाची बाब म्हणजे दिवसेंदिवस आपली वागणूक अत्यंत घाणेरड्या अशा जातीयवादाकडे जात आहे, की काही दिवसांनी आपण जर सावरलो नाही, तर आपला कपाळमोक्ष आणि कडेलोट हा ठरलेला आहे. पूर्वी बोलतांना बोलण्यांत जात यायची पण जातीपेक्षा कर्तव्य हे श्रेष्ठ मानले जायचे, कर्तव्य काहीवेळा नाईलाजाने का होईना, पण पार पडले जायचे; आता जातीपुढे सर्वकाही खोटे आहे की काय, अशी परिस्थिती दुर्दैवाने होत चाललेली आहे. तसे व्हावे याला खतपाणी घालणे सुरु आहे. कोणी केवळ एखाद्या जातीत जन्माला आला, म्हणून त्याच्या जातीचे उघडपणे धिंडवडे कसे निघतात, हे आपल्याला मी किंवा कोणीही सांगावयास नको. पहिले दबक्या आवाजात जातीचा उल्लेख असावयाचा, नाही असे नाही कारण आपण बोलतो हे चुकीचे आहे याची कल्पना मनातून असावयाची, आता उच्चरवात, उघडपणे जातीचा उल्लेल्ख होतो, त्या मागची भावना आपल्याला वाचता येते, अनुभवता येते; कारण आता अलीकडच्या राजकारणांत जातच सर्वव्यापी झालेली आहे, यांत काही गैर वाटेनासे झालेले आहे. आपल्याला काही मिळेल किंवा नाही, हे जर जातीवरूनच ठरणार असेल तर 'जात' ही दिवसेंदिवस भक्कम होणार आणि त्याचे परिणाम भोगावे लागणार, हे निश्चितच आहे. दुर्दैव हे की विविध जातीतून आलेले तथाकथीत नेते, हे यालाच खतपाणी घालत आहे, विशेषतः पूर्वीचे सत्ताधारी ! कारण सत्तेचा मिळणारा फायदा, हा त्यांना आता मिळेनासा झालेला आहे. दुर्दैव असे की 'काट्याने काटा काढावा लागतो' किंवा 'लोह लोहाला कापते' यानुसार सध्याचे सत्ताधारीपण काही प्रमाणांत तसेच नाईलाजाने काही वेळा वागत आहे, नव्हे तर त्यांना तसे वागणे आवश्यक झालेले आहे, ही माझी भावना झालेली आहे. तसे वागले नाही, तर पूर्वीचे सत्ताधारी हे जनसामान्यांना भडकावण्यासाठी भल्याबुऱ्या नव्हे बुऱ्याच मार्गाचा अवलंब करून, देशाचे आणि समाजाचे वाटोळे करण्यासाठी कंबर कसून तयारीत आहे, नव्हे त्यांचे त्या दृष्टीने काम सुरु आहे. यांत समाधानाची बाब अशी, की अजूनही बहुसंख्य जनता या वाटोळे करणाऱ्या स्वार्थी नेत्यांच्या बाजूने नाही, जरी ती दिसत नसली, तरी त्यांची भरभक्कम गुप्त ताकद ही सर्व समाजामागे उभी आहे, म्हणून निदान मी ऐकलेल्या १९४७ च्या 'फाळणीसारखी' परिस्थिती झालेली नाही आणि होणार नाही, ही अजूनही खात्री वाटते. या आंदोलनाला व अशा विचाराला भरभक्कम आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देणारी माझी अनेक याच समाजाची मित्रमंडळी आहेत. ते समाजाचे खरे हितचिंतक आहेत, विरोधक नाहीत, मात्र अल्प प्रमाणांत आहेत. त्यांना पुढे येऊ दिले जाणार नाही किंवा ते पुढे येणार नाही. याचा गंभीरपणे विचार करण्याची सर्वांना वेळ आलेली आहे.
----------अशा परिस्थितीत आपली बाजू सुरक्षित रहावी, यासाठी पावले टाकणे किती कठीण असेल, याची कोणीही कल्पना करू शकतो. त्यांत केवळ जातीवरून एखाद्याचे वर्तन योग्य व अयोग्य ठरविण्यापर्यंत जर 'अनुभवी आणि शिकलेल्या राजकारणी नेत्यांची' मजल जात असेल, त्यासाठी त्यांना इतर सर्वांची साथ अगदी आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे या भावनेने मिळणार असेल, इथपावेतो याची मजल जात असेल आणि त्याला हस्तेपरहस्ते आतून जर विरोधकांची साथ मिळत असेल, तर नोकरशाही निश्चितच त्यानुरूप वर्तन करणार. हे लक्षांत घेता, आपल्या धोरणाची अंमलबजावणी या नोकरवर्गाच्या माध्यमातून करणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे काम किती कठीण आहे याची कल्पना येऊ शकते.
आज एकाच व्यक्तीची, विविध काळांतील परस्पर विरोधी वचने आणि त्यानुसार वर्तन, यांत कसलेही नावीन्य राहीलेले नाही, तर ती आजच्या राजकारणाची गरज आहे, इथपर्यंत आपण प्रवास केलेला आहे. 'रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई' हे आता संत तुलसीदास जरी आले, तरी आपण त्यांना म्हणू देणार नाही, इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे.
आता सर्वांत शेवटी -- कायद्याच्या कसोटीवर आपले धोरण कसे टिकेल यासाठी काय करावे लागेल किंवा काय करता येईल किंवा काहीही करता येणार नाही, याची कल्पना याला समर्थन देणाऱ्या आजच्या कोणाही समाजधुरीणांनी आणि कायदेतज्ञ यांना नसेल असे म्हणता येईल ? कोणताही निर्णय हा भारतीय राज्यघटनेच्या कसोटीवर टिकावयास हवा नाहीतर तो रद्दबातल होतो, तुमच्याकडे कितीही बहुमत असू द्या. बहुमत असले म्हणजे तुम्हाला बेबंद, घटनेच्या विरुद्ध आणि कोणाच्या मताप्रमाणे निर्णय घेता येत नाही, तर त्याला कायद्याच्याच चौकटीत बसवावे लागते. आपल्याला हवे तसे जर निर्णय घेतले जावयास हवे असे जर वाटत असले, तर मग हे भारतीय राज्यघटनेचे आणि त्यानुसार चालणारे राज्य जावून, हुकूमशाही यावयास हवी. यासाठी नागरिकांचा न्यायालयांत जाण्याचा अधिकार काढून घ्यावयास हवा ! तो पण एकदा काढून घेतल्याचा अनुभव आपल्याला आहे; इतके सर्व आपल्या ज्ञानाने, अनुभवाने माहीत असल्यावर, त्याच्या परिणामांची कल्पना आणि अनुभव असल्यावर पण जर दुरून केवळ गम्मत पाहून, समाजांत आग भडकाविली जात असेल, तर 'मौनं सर्वार्थ साधनं' या उक्तीचे आणि त्यांना काय साध्य करावयाचे आहे, याचे आजच्याएवढे समर्पक उदाहरण दुसरीकडे कुठे मिळणार ?
मित्रांनो, रस्ता लांबचा असू द्या, काट्याकुट्याने भरलेला असू द्या, कष्टसाध्य असू द्या, पण निश्चीत आणि चांगल्या ध्येयाप्रत जाणारा असावा. आपले ध्येय जर भारतमातेचे, आपल्या समाजाचे अंतिम हित साधण्याचे असेल, तर आम्ही सर्व भारतीय, या समाजातील लोक, अजूनही या आगीवरून चालायला मागे पहाणार नाही. भारताची जनता तेवढी सुजाण आणि सूज्ञ नक्कीच आहे.

५. ८. २०१८
काल 'ब्राह्मणांना आरक्षण हवे' या स्वरूपाची पोस्ट वाचण्यात आली.
स्वातंत्र्यापासून विविध जाती-जमातींना देण्यांत आलेल्या आरक्षणामुळे समाजाच्या इतर घटकांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झालेला आहे, याचा अशी मागणी करणाऱ्यांनी, आपला स्वार्थ बाजूला ठेवून आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून, विचार करावा. समाजात द्वेष निर्माण करणारे, समाजाचे विविध घटकांत तुकडे करणारे, परिणामी समाजाची पीछेहाट करणारे हे आरक्षण ब्राह्मणांनी कधीही मागू नये. ब्राह्मण समाज जर स्वतःला समाजाचा दिशा आणि विचार निर्देशक समजत असेल, तर त्याची ही मागणी त्याच्या त्याच्या कर्तव्यापासून, ध्येयापासून आणि उद्दिष्टाच्या त्या रस्त्यापासून पथभ्रष्ट करीत आहे हे दाखवत आहे.त्यामुळे या मृगजळाच्या मागे लागून ब्राह्मणांनी आपले, समाजाचे नुकसान न करता समाजाचे दायित्व समजून आजपावेतो जशी कळ काढली आणि त्रास सहन केला तसा अजून सहन करावा.
परमेश्वर आहे किंवा नाही याबद्दल काही शंका घेतात, पण प्रत्येक माणसाच्या मनातील परमेश्वर हा निश्चितच हे सर्व योग्यायोग्य जाणत असतो, दाखवत नसला आणि उघडपणे कबूल करत नसला तरी ! आपण एखाद्यावर अन्याय केला, आपण आपल्या स्वार्थासाठी कायम असत्याची कास धरली, आपण आपलं कार्यभाग साधून घेण्यासाठी लबाडी केली, खोटेपणा केला हे कबूल करायला फार मोठे धैर्य लागते, हिंमत लागते आणि मन पारदर्शी लागते. ही अशी उपरती, पश्चाताप हा कदाचित माणसाला त्याच्या अंतीम काळांत, यमराजाच्या दरवाजाचे दर्शन झाल्यावर होत असावा.
विषयच निघाला आज तर शासनाने एक करावे - ज्या कोणा होतकरू विद्यार्थ्याला, मग तो कोणत्याही समाजातील असो, शिक्षण घ्यायचे असेल आणि त्याचे शिक्षण केवळ पैशाअभावी होणार नसेल, तर शासनाने त्याचे पालक व्हावे आणि त्याची इच्छा असेल तोवर त्याच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलावी. पैशावाचून तो शिक्षणाला मुकला असे कदापिही व्हायला नको. समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाचे दर्शन द्यायचे असेल, तर होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावयास हवी. विद्यार्थी होतकरू असावा, ढोंगी नसावा. ढोंगी, लबाड, खोटे आणि दुष्ट मंडळींना शिक्षा करायची असते, मदत नाही; हे शासनाने आणि सर्व समाजाने कायम लक्षांत ठेवायचे असते.

७. ८. २०१८

राग मुलतानी

काही आठवणी आणि व्यक्ती आपल्या मनांत इतक्या काही पक्क्या रुतलेल्या असतात, की कित्येक वर्षानंतर जरी आपल्याला कोणतीही वेगळी घटना दिसली, तरी तो पूर्वीचा प्रसंग आणि त्यावेळचा क्षण अगदी लख्ख आठवतो.
जळगांवमधील, आता ज्याला जुने एस टी स्टॅन्ड म्हणतात त्याच्या शेजारी, काँग्रेसभुवन आहे. जुनी दोन मजली इमारत. तळमजल्यावर मध्यभागी उजवीकडे वाचनालय आहे, तिथे मी फक्त वर्तमानपत्रच बघीतले आहेत. अजूनही काही पुस्तकांची कपाटे आहेत, पण कोणाच्या हातात, कधी त्यातील पुस्तके बघीतली नाहीत. त्याच्या वरच्या मजल्यावर, एक मोठा हॉल आहे. तिथे सुटीत काही कार्यक्रम ऐकावयास मिळायचे. त्या हॉलचे आणि शास्त्रीय संगीताचे काय नाते आहे, ते माहीत नाही; पण बरेचसे खाजगी संगीताचे, संगीत स्पर्धेचे, किंवा संगीतातील विशारदच्या वेळी घेतले जाणारे सभागायन हे मी तिथेच किंवा बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत ऐकलेले आहेत.संगीत सभा किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी ब्राह्मणसभेत फक्त ब्राह्मणांनीच यावे, असे अजिबात नसायचे, उलट त्यांच्या व्यतिरिक्त इतरांचीच संख्या जास्त असायची. त्यांत पण सर्वांना खरोखर आनंद असायचा. असो.
काँग्रेसभुवन येथे एकदा जळगावातीलच एक शिक्षक श्री. उपासनी यांच्या सत्कारानिमित्ताने कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांचे शिष्य श्री. अजित कडकडे आणि बहुतेक श्री. राजा काळे हे त्यावेळी तानपुऱ्यावर होते. पं. अभिषेकींचे गाणे आणि चांगले झाले हे म्हणजे द्विरुक्ती ! खरोखरच अप्रतिम गाणे झाले होते. त्यांचे 'काटा रुते कुणाला' हे नाट्यगीत तर फार रंगले.
जळगावात 'विकास मंडळ' नावाचे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे एक मंडळ आहे. ते संगीताचे कार्यक्रम, स्पर्धा घेत असत. त्यांत पुढाकार म्हणजे कै. विनायकराव पुराणिक, कै. शरदराव धर्माधिकारी, कै. बबनराव भावसार वगैरे मंडळींचा असे आणि त्यांना मार्गदर्शन हे गुरुवर्य कै. गोविंदराव कुलकर्णी यांचे असे. एकदा विकास मंडळ यांनी आयोजिलेल्या स्पर्धेत, मी पण माझ्या महाविद्यालयीन काळांत तबलावादनांत भाग घेतला होता, स्पर्धा दोन दिवस चालली होती. त्यांत आताचे प्रथितयश कलाकार, गायक श्री. हेमंत पेंडसे हे पण होते. मला एकल तबलावादनातील, प्रथम क्रमांक मिळाला होता. आता काही वाजवता येत नाही. त्यापूर्वी एकदा त्यांनीच, 'विकास मंडळ' यांनी युवकांची 'शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा' आयोजित केली होती. त्या दरम्यान जळगावला नुकतेच आकाशवाणीचे केंद्र सुरु झाले होते. आकाशवाणीच्या पण शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा असायच्या. त्यामुळे तयारी होईल या इच्छेने खूप जणांनी भाग घेतला होता. स्पर्धा दोन दिवस चालली होती, हे आठवते. त्यातील एकाला आवडणारा राग म्हणजे - मुलतानी ! तो त्यांनी तयारीने म्हटला होता. तबल्यावर कै. बबनराव भावसार होते. मुलतानी मधील - 'गोकुल वा' हा ख्याल आणि 'सुंदर सुरजन वा साई रे' हा छोटा ख्याल किंवा चीज मला अजूनही आठवते.
मुलतानी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग, तोडी थाटातील ! दिवसाच्या तिसऱ्या प्रहराला म्हटलं जाणारा हा राग संधिप्रकाश काळातील समजला आणि गायला जातो. तोंडी थाटातील असला तरी तोडीसारखा वाटत नाही, मींड प्रधान राग आहे. आपल्या कानाला अत्यंत गोड वाटतो. या रागाची जाती - ओढव संपूर्ण ! याचा वादी हा पंचम तर संवादी षड्ज ! 'नि सा ग म प नि सा, सा नि ध प म ग रे सा' हे याचे आरोह-अवरोह ! यातील कोमल रिषभ, कोमल गांधार आणि तीव्र मध्यम हे वैशिष्ठ्य ! आरोहात रिषभ आणि धैवत घेत नाही, अवरोहांत मात्र सर्व स्वर घेतात. मंद्र निषादापासून सुरु होणारा आरोह घेत पुढे जाणारा गायक हा पहिले तीव्र मध्यम घेतो आणि मग कोमल गांधारावर येतो, हे याचे खास वैशिष्ठय. कोमल रिषभाला षड्जचा कण लावून आणि कोमल गांधारला तीव्र माध्यमाचा कण लावून मींड घेत गावा, अंगावर रोमांच उभे रहातात.
संगीत मानापमान या नाटकातील कै. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे हे नाट्यपद संगीताने सजविले आहे ते कै. गोविदराव टेम्ब्रे यांनी, यांच्या हाताने हार्मोनियम बोलायचा म्हणे ! हे नाट्यगीत 'मुलतानी' रागातील, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजांत -
प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास हो मी तुला
मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद
किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला
हिंदी चित्रपट - 'शबाब' यातील संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलेले आणि उस्ताद अमीरखां यांनी गायलेले 'दया कर हे गिरीधर' हे गीत !
आणि शास्त्रीय संगीतातील सध्याची आघाडीची गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी -

११. ८. २०१८
आज श्रावण महीना सुरू झाला. पण श्रावण महीना म्हणण्यापेक्षा, श्रावणमास म्हटलं की डोळ्यांसमोर हिरवागार निसर्ग येतो, दऱ्याखोरे, झाडंझुडूपं, नद्यानाले येतात. निळं गडद ढग येतात, मधूनच सूर्यकिरण चमकतात. पशुपक्षी येतात.
चिमण्यांची उन्हं पडलेली असतांनाच पाऊस पडला, की लग्न लागतात ही आमची बालवयातील समजूत ! त्यांची लग्नकार्य चातुर्मासात बंद वगैरे नसतात. पशुपक्षांना कसला आलाय चातुर्मास आणि त्यातील व्रतवैकल्य ? ते तर खरं निसर्गसाथी, निसर्गपूजक !
खरं तर श्रावणमास म्हटलं की मला, आमच्या शाळेत शिकलेली निसर्गकवि, बालकवि त्रंबक बापूजी ठोमरे, या आमच्या खानदेशातील कविची ‘श्रावणमासी’ ही कविता आठवते. कित्येक श्रावणमास गेले असतील, बालकविंच्या पश्चात पण त्यांच्या ‘श्रावणमासी’ या कवितेची हिरवीगार, मखमली चादर आपल्या मनांवरून काही हटत नाही, हटणार नाही.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
——————— ————— ———— ——-
श्रावणमास आणि त्यांतील निसर्ग हा तर मनाला नवसंजीवनी देणारा, भुरळ घालणारा आणि एकमेकांना साद घालणारा ! ‘मिलन’ या चित्रपटातील नूतन आणि सुनीलदत्त हे श्रावणाचे गीत गात आहे.

१२. ८. २०१८
आजपावेतो मा. अटलबिहारी वाजपेयी हे नांव या पृथ्वीतलावरील चालत्याबोलत्या व्यक्तीचे होते. एका लेखकाचे, कवि ह्रदयाच्या पत्रकाराचे, तेजस्वी राजकीय कारकीर्द करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचे, समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या मृदू व्यक्तीत्वाचे, प्रसंगी कठोर निर्णय घेणाऱ्या धीरोदात्त पुरूषाचे नांव होते. दशसहस्त्रेषुच काय पण शतसहस्त्रेषु वक्तृत्व प्राप्त असलेल्या सरस्वतीपुत्राची वाणी त्यांच्या मुखातून नवरसांनी आपले रूप घेवून येत असे. आज ते आपल्यात नाही.
त्यांची भूमिका त्यांच्या शब्दांत -
क़दम मिला कर चलना होगा
बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
हास्य-रूदन में, तूफ़ानों में,
अगर असंख्यक बलिदानों में,
उद्यानों में, वीरानों में,
अपमानों में, सम्मानों में,
उन्नत मस्तक, उभरा सीना,
पीड़ाओं में पलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
उजियारे में, अंधकार में,
कल कहार में, बीच धार में,
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
जीवन के शत-शत आकर्षक,
अरमानों को ढलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
सम्मुख फैला अगर ध्येय पथ,
प्रगति चिरंतन कैसा इति अब,
सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ,
असफल, सफल समान मनोरथ,
सब कुछ देकर कुछ न मांगते,
पावस बनकर ढ़लना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
कुछ काँटों से सज्जित जीवन,
प्रखर प्यार से वंचित यौवन,
नीरवता से मुखरित मधुबन,
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
आणि आज तर या प्रसंगी आम्हाला, आमचे संत तुकाराम महाराज आम्हाला आठवतात -
आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
कै. अटलजी, शेवटी आमचे हेच सांगणे - भगवान श्रीकृष्णाची वाणी लक्षात ठेवा, आमच्यासाठी, या तुमच्या समाजपुरूषासाठी, जित्याजागत्या राष्ट्रपुरूषासाठी आणि पुन्हा या आमच्यात, हे वचन लक्षात ठेवून कारण तुमचे काम अजून संपलेले नाही.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भारतीय जनता वाट पहात आहे.

१६. ८. २०१८


आता या क्षणाला तुम्ही आम्ही काय बोलणार ? कै. गदिमांच्या शब्दांत -
विठ्ठलाचे पायी थरारली वीट । राऊळींची घाट निदादली ।
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यांत । तुका समाधीत चाळवला ।।
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव । निघाला वैष्णव वैकुंठासी ।
संत माळेतील मळी शेवटला । आज ओघळला एकाएकी ।।
आमच्या ऋषिमुनींनी, पूर्वजांनी आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलंय, त्यांवर आता समाधान करून घ्यायचे -
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान् 
न्यन्यानि संयाति नवानि देही।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः।।

१७. ८. २०१८
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही तत्कालीन शासनाची असते. अपेक्षा असते की शासन ही जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडेल.
ही जबाबदारी ज्यावेळी पार पाडायची असते, आणि ज्या खात्यांच्या आधाराने पार पाडायची असते, त्यावेळी ती खाते ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असावयास हवी, त्यांच्याकडे पुरेसे तज्ञ संख्याबळ हवे. त्या विभागाची आणि त्यातील कर्मचाऱ्यांची पण मानसिकता, ही शासन आपली कर्तव्ये पार पाडतांना, आपण जी आणि जशी अपेक्षित करतो, तशीच हवी; म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पण आपली जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडावयास हवी. असे किती कर्मचारी हे आजच्या शासनाच्या विविध खात्यांत काम करतांना आपल्याला दिसतात ? उत्तर सर्वांना माहिती आहे.
आम्हाला सरकारने नोकऱ्या दिल्या पाहिजेत यासाठी आपण सर्व आग्रही असतात, पण ही अशी काम करणारीच माणसं भरती करा, अशी कोणीही मागणी करत नाही. याच्या विपरीत जर कोणी काम करत असेल तर, असे काम करायला प्रवृत्त करणारे तसेच यांतून काही अडचण उद्भवली तर यांना वाचवणारे पण आम्हीच असतो. आम्ही म्हणजे आमचे शासन आणि जनता ! आपण ज्यांना शासन म्हणून समजतो, यांचा जर अभ्यास केला तर भलत्यासलत्याच बाबी पुढे येतात. जनतेबद्दल तर काय बोलणार नागरिकांची कर्तव्ये ही फक्त मराठी सातवी पर्यंत वीस मार्कांसाठीच असतात, त्याचा उपयोग आपल्याला करण्यासाठी नाही, ही बहुसंख्यांची समजूत !
विपरीत काम म्हणजे कायद्याच्या विपरीत काम ! कायद्याच्या विपरीत काम करायला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा यांकडे डोळेझाक केली जात असेल, तर सुव्यवस्था ही बिघडणारच, यांत शंका नाही.
याची तक्रार घेवून जर आपल्यापैकी कोणी न्यायालयांत गेले, तर या व्यवस्थेने मांडलेल्या वस्तुस्थितीवरच निर्णय होणार ! न्यायालयातील न्यायाधीश किंवा वकील हे देव नाहीत. तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत. विरूद्ध पक्षाने केलेल्या चुकीचा, गलथानपणाचा, मग हे जाणूबुजून किंवा अजाणतेपणाने असो, फायदा दुसरी बाजू घेणारच ! याची तक्रार कशासाठी करणार ?
मतितार्थ - कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या शासनाने आपले कर्मचारी नेमतांना, त्यांना रोजगार मिळायला हवा, ही भावना अजिबात न ठेवता, हे कर्मचारी नेमून दिलेले काम जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडेल का, याचा विचार करूनच नेमले पाहिजेत ? हे आपल्याला जमलं, की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुटू लागेल.
Sameer Gaikwad यांची नुकतीच पोलीस व न्यायव्यवस्था याबद्दल पोस्ट वाचली, यावरून !

२२. ८. २०१८
लहानपणी आपली सही करायची भयंकर हौस ! सगळी मोठी मंडळी आपल्या समक्ष कुठेकुठे सह्या करतात, आणि आपण फक्त पहातो. हेवा वाटतो. काही वेळा कारण नसतांना, त्यांची सही लफ्फेदार वाटते, अक्षर वळणदार नसलं तरी ! आपल्याला अशी सही करण्याची संधी येत नव्हती ना म्हणून !
बहुतेक मंडळी सही करायची ती इंग्रजीतच, सर्व मराठी मंडळी इंग्रजीतच सही करतात, हे बघीतल्यावर तर सही करायची तर फक्त इंग्रजीतच करायची असते, हा माझा समज झाला. बरीच वर्षे कायम होता. इंग्रजीतली सही असली, की कसं भारदस्त, शिकलेल्या माणसांसारखे वाटते. नाहीतर उगीच - निशाणी डावा अंगठा उमटवून दस्तूर लावल्यासारखं वाटायचे.
माझी पण सही सुरूवातीला इंग्रजीतच होती. काय करणार ? महाजनो येन गत: स पंथ: । नंतर मराठीत म्हणजे देवनागरीत सुरू केली.
एकदा, कोर्टात बाररूममधे गप्पा सुरू होत्या, न्यायालयाचे कामकाज मराठीत चालावयास हवे, याबद्दल ! बोलताबोलता विषय निघाला, अन् मी म्हणालो, ‘आपल्या सह्या आधी मराठीत करू या, मग पुढच्या गोष्टी !’
‘ज्यांचे अक्षर चांगले, त्यांच्या सह्या चांगल्या दिसतील.’ आमच्यापैकी एकाची शंका !
‘अक्षर कसेही असले तरी काय झाले ? ती आपली सही आहे. मी तर मराठीतच सही करतो.’ मी म्हणालो.
त्याचवेळी कै. ॲड. आर. जी. चौधरी यांचा कारकून श्री. अरूण कुलकर्णी हा त्यांच्या सहीसाठी अर्ज घेवून आला होता, आणि त्यांनी त्यांवर मराठीत सही केली. बोलण्याबोलण्यात मराठीतून, म्हणजे देवनागरीत सही करणारे आम्ही दोघे वकील झालो.
आता तर सुरुवातीची इंग्रजीतील सही आठवत नाही, पण काही ठिकाणी करावी लागते. बदलावी वाटत नाही. असो, एखादी जुनी आठवण !

२२. ८. २०१८
गृहिणी किंवा पत्नीला घरी काहीही किंमत नसणे, हे असं सर्व ठिकाणी नसतं. कामाची, विषयाची आणि अधिकाराची तिथं बऱ्यापैकी विभागणी असते. आपल्या निर्णयांत नवरा ढवळाढवळ करणार नाही, तर निर्णयास समर्थन देईल याचा तिला विश्वास असतो. इतकेच नाही तर, मुलं आणि बाहेरची मंडळी पण घरातील विषयांसंबंधी, त्या गृहिणीला विचारतात आणि सांगतात. अर्थात घरातील गृहिणी याबद्दल आपल्या पतीशी विचारविनीमय अवश्य करते, पण त्याला कल्पना असावी म्हणून फक्त !
हे सर्व तेव्हाच होतं, ज्यावेळी एकमेकांत काही आपपर भाव रहात नाही आणि पत्नीला योग्य निर्णय घेता येवू शकतो, हा अनुभव असतो. आपपर भाव न ठेवता, कुटुंबासाठी योग्य निर्णय घेता येईल, ही क्षमता आणणे हा महिलांचा त्यांच्या कुटुंबातील आणि पर्यायाने समाजातील स्थान उंचावण्याचा मार्ग आहे. ——- बहुतांश ठिकाणी घरातील स्त्री हीच नवीन येणाऱ्या स्त्रीच्या शत्रूचे काम करते.

२८. ८. २०१८

आज श्रावण वद्य अष्टमी, गोकुळ अष्टमी !

आज श्रावण वद्य अष्टमी, गोकुळ अष्टमी !
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
या आपण दिलेल्या वचनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे संवर्धन करण्यासाठी या भारतवर्षात जन्म घेतला, तो पण तुरूंगात ! कारण करणार काय, प्रत्यक्ष जन्मदाते आईवडील, देवकी आणि वसुदेव, हे तुरूंगात डांबले गेले ते सख्ख्या मामामुळे ! तो मामा पण सर्वसाधारण नव्हता, तर तत्कालीन सत्ताधीश व समर्थ राजा होता. ‘देवकीचा आठवा पुत्र हा तुझा काळ ठरणार आहे’ या भविष्यवाणीने हादरलेला कंस, दुसरे काय करू शकणार ? वसुदेव व देवकीची अपत्ये जन्मताच मारून टाकणे, हे त्यांना तुरूंगात टाकल्यावर तर फारच सोपे होते. पण या विपरीत परिस्थितीत, संकटांना तोंड देत, भगवंतांनी आपले अवतारकार्य, या आपल्या पूर्णावतारात पूर्ण केले.
गोकुळाष्टमी म्हटले की माझ्या अजूनही काही आठवणी जाग्या होतात. आमच्याकडे गोकुळाष्टमी साजरी करायचे, वैशिष्ट्यपूर्ण पूजा असायची. श्रावण महीना असल्याने वातावरण पावसाळी ! आमचे घर काय आणि आसपासची गल्लीतील इतर घरे काय, त्यांच्या जन्माची शंभरी त्यांनी कधीचीच पार केलेली ! भोकरीकर गल्लीत बहुसंख्य भोकरीकर मंडळीच रहात होती. मुळात ही सर्व मातीचीच घरे, मजबूतीसाठी म्हणून वरून चुन्याची टीप मारलेली आणि भरपूर लाकूडकाम असलेली घरे; पण भरभक्कम वाटत ! श्रावणातील पावसाळी वातावरणामुळे घरे ओलसर वाटत, दमटपणा जाणवे ! यावेळी साहजिकच पानेफुले भरपूर असत. या महिन्यांत मंगळागौर, श्रावणी सोमवार, रूद्रावर्तन, पाऊस आला नाही तर महादेवावर अभिषेक आणि संततधार घरत त्याला पाण्यात ठेवणे, जिवतीचे शुक्रवार, राखी पौर्णिमा, राणूबाई काणूबाईचे रोट, नागपंचमी वगैरे भरगच्च कार्यक्रम असे, त्यात ही गोकुळ अष्टमी !
गोकुळ अष्टमीचा जास्त उत्साह असायचा तो माझी सर्वात मोठी काकू, कुसूम काकू हिला ! तिला काकू म्हणून कोणीही हाक मारले नाही, अगदी आम्हीच काय, पण गांवातील कोणीही ‘कुसूम वहिनी’ या नांवाशिवाय तिला कधी हाक मारले नाही. माझी चुलतभावंडे, म्हणजे तिची मुलं पण, तिला ‘वहिनी’ म्हणूनच हाक मारत.
परिस्थितीने आलेल्या अनुभवाने माणसाला ज्ञान मिळते, ते वरवरचे नसते, अनुभव वाईट असेल, तर त्या ज्ञानाचा रंग पक्का असतो. पूर्वी भरपूर गडगंज असलेल्या आमच्या घरातील सर्व मंडळींनी, नंतरच्या आलेल्या दुर्दैवी आघातांनी जे काही असंख्य हालअपेष्टात दिवस काढले असतील, काही वेळा अर्धपोटी वा उपाशीतापाशी दिवस काढले असतील, या अनुभवातून मिळणारे ज्ञान ही मंडळी कधी विसरली नसतील. आमची ही वहिनी, रात्रीअपरात्री कोणी घरी कितीही वाजता आला, तरी त्याला घरांत जर एखादवेळेस अन्न जरी शिल्लक नसेल, तरी टंगळमंगळ करायची नाही; ‘जेवण करून घ्या’ म्हणत स्वयंपाक करून खावू घालायची. मात्र उपाशी निजू द्यायची नाही. आता अपरात्री गेल्यावर जावू द्या, जेवायच्या वेळेवर जरी योगायोगाने गेलो, तरी अनुभव सांगण्यासारखे नसतात.
आमच्या घरी गोकुळाष्टमी करायची म्हणजे त्या दिवशी उपवास असायचा. मुलांना उपवासातून सूट असे. पण उपवास नसला तरी उपवासाचे पदार्थ खाल्लेले चालतात, ही फार मोठी सोय करून ठेवलेली असल्याने, जेवण केल्यावर त्यांच्यासाठी उपवासाचे म्हणून केलेल्या पदार्थावर हात मारता यायचा. जन्माष्टमीला आमचे घरी मातीचे गोकुळ करावे लागायचे. मग त्यासाठी कुठूनकुठून माती आणणे, ती पण शक्यतोवर चिकणमाती आणणे. कारण त्या शिवाय गोकुळ नीट तयार व्हायचे नाही. आमच्या देवघरांत साधारण दीडदोनवीत लांब व रूंद असा मजबूत पितळी चौरंग आहे. त्यांवर हे मातीचे गोकुळ, बहुतेक मधल्या घरात बसून, तयार केले जायचे. त्यावेळी आम्ही घरची मुलं काय आणि बाहेरची मुलं काय, यांत काहीही फरक नसायचा. गल्लीतील सर्व घरातील मुलं, ही प्रत्येकाच्या घरातलीच मुलं असायची. वहिनीच्या चारही बाजूला आम्हा मुलांचा गराडा असायचा. त्यावेळी माझ्या आजीचे सोवळे कडक असले, तरी तेव्हा थोडे बाजूला ठेवले जायचे. एकतर ही सर्व मंडळी म्हणजे बालगोपाळ मंडळी यांना आज काय बोलायचे आणि दुसरे म्हणजे तिचे याबाबतीत जातीपातीचे मूर्खासारखे विचार नव्हते.
‘मातीत खेळू नका’, हे या दिवशी फार काही सांगीतले जात नसे कारण वहिनीच हे माती-चिखलाचे घमेले घेवून बसलेली असे. शेजारी वाडग्यात पाणी, तुरखाटीच्या काड्या, झाडांची वा तुळशीचे पान असलेली काडी वगैरे सामुग्री पण असे ! मग छोट्याछोट्या गायी आणि कृष्णाचे सवंगडी तयार केले जात, ते चौरंगाच्या एका बाजूला ! हे गोकुळ असे, मधे थोडी मोकळे वळण करून त्यात पाणी - ही यमुना नदी ! एका बाजूला वसुदेव-देवकी यांच्या मूर्ती आणि जवळच जरा मोठी माणसाची मूर्ती, म्हणजे तो कंस ! कोपऱ्यात नारदमुनी ! या सर्वांना डोळे हवे, मग ज्वारीचे दाणे त्यांच्या डोळ्यांच्या जागी लावले जात. मध्यभागी हा त्यातल्यात्यात लांब नाग तयार केला जाई, हा कालिया नाग ! त्याच्या शेजारी काही बोटभर लांबीच्या नागाच्या मूर्त्या, या कालियाच्या बायका ! कुठं जंगल दाखवतांना, मातीत झाडांच्या छोट्या काड्या खोचल्या जात व तुळशी वृंदावनात तुळस खोचली जाई. हा असा सर्व जामानिमा होईपर्यंत तो चौरंग जवळपास गच्च भरून गेलेला असे. मध्यभागी जेमतेम आगपेटी एवढीच जागा शिल्लक असे, तिथं मग देवघरातील पितळीचा मोठा लंगडा बाळकृष्ण, उजव्या हातात लाडू घेतलेल्या अवस्थेतील, ठेवला जायचा. हे सर्व तयार झाले की मग हा चौरंग देवघरासमोर ठेवला जायचा.
रात्रीच्या पूजेची तयारी करावी लागायची. आम्हाला मातीत दिवसभर खेळायला मिळते या कारणाशिवाय, अजून गोकुळ अष्टमी आवडण्याचे कारण म्हणजे वेगवेगळे नैवेद्य ! दूधसाखर, दहीसाखर, लोणी व खडीसाखर आणि सुंठवडा ! सुंठवडाच थोडा तिखट लागायचा, पण तो आवडायचा ! पुन्हा दुसऱ्या दिवशी गोपालकाला ! पूजा व्हायची, हळदीकुंकू वगैरे सर्व वाहले जायचे. कृष्णाच्या आरत्या म्हटल्या जायच्या. त्यात माझी आजी ‘आरती कुंजबिहारीकी गिरीधर कृष्णमुरारीकी’ ही मला फारच वेगळी वाटायची.
आरत्या या मराठी किंवा संस्कृतमधेच असतात हा माझा समज ! मराठी आरत्या मला माहिती होत्या. सत्यनारायणाचे पूजेनंतर कै. मधुकर विटवेकर हे संस्कृतमधेच आवर्जून आरती म्हणायचे. त्यांना बऱ्याच संस्कृतमधल्या आरत्या यायच्या. तेव्हा मला मराठी व संस्कृतबद्दल आरत्या आहेत याची जरी शंका नव्हती तरी, आजीने म्हटलेली ही हिंदी आरती मी पहिल्यांदा ऐकली, तेव्हा ‘ही कोणत्या भाषेतील आरती’ म्हणून मी अवाक होवून बघत होतो. सर्व आरत्या संपल्या की मंत्रपुष्पांजली नंतर फुले, अक्षता वाहल्या जात. मग हा वेगवेगळा प्रसाद मिळे.
मग आमच्या गांवातील कृष्णाच्या मंदीरात दर्शनाला जायची तयारी ! गावांतील तीन मंदीरात कृष्णाच्या मूर्त्या होत्या. आमच्या गल्लीच्याच कोपऱ्यावर असलेले कै. नाना बुवा यांचे मुरलीधराचे मंदीर ! कै. नाना बुवा यांचे खरे नांव दिनकर शंकर बुवा पण या नांवाने व्यक्ती नेमकी लक्षात येण्यापेक्षा गोंधळ होण्याचीच जास्त शक्यता ! यांच्या मंदीरात कृष्ण जन्माचा उत्सव असायचा. दुसरे म्हणजे दत्तमंदीर ! हे दत्तमंदीर म्हणून जरी ओळखले जात असले तरी येथे सुंदर अशी मुरलीधराची मूर्ती आहे. मग तिथं पण दर्शनाला जावं लागे. तिसरे मंदीर म्हणजे ‘काट्यांचे मंदीर ! हे पाराच्या गणपतीजवळ होते, सध्या नाही. ही सर्व मंडळी नागपूर येथे असल्याचे समजते. इथं मी आजीबरोबर बऱ्याच वेळी जात असे. तेथील महाराज भागवत पण वाचत.
गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक शाळेला सुटी असे. आज कृष्णाचा जन्म झाला आणि सुटी उद्या का ? हे असले प्रश्न त्यावेळी मनांत येत, पण उत्तर आणि त्या मागचे कारण माहिती नसे. ते समजण्याच्या आंत दुसरा कुठला सण सुटी घेवून येत असे. त्यामुळे सुटीचे कारण किंवा माहिती नसली, तरी आम्हाला मिळणाऱ्या आनंदात काही फरक पडत नसे. आज आपणा सर्वांना या अशा गोष्टींची व त्यांच्या सुटींची उत्तरे आणि कारणे माहिती आहे, पण तितका सुटीचा आनंद आहे का ?

२. ९. २०१८
जळगांवहून औरंगाबादला जातोय. गाडीत कसली सीडी का पेन ड्राईव्ह होता. कोणत्या तरी आॅर्केस्ट्रात गायलेल्या गाण्यांचे रेकॉर्डिंग होते. डोळे मिटून बसलो होतो. रस्ता गाडीत पण सरळ व स्वस्थ बसू देत नव्हता. नदीतील वाहतूक मा. नितीन गडकरी सुरू करतील तेव्हा करतील, पण सध्या रस्यावरूनच नदीतील वाहतुकीचा अनुभव कारमधून घेतो आहे. अशा हिंदकळत हिंदकळत अवस्थेत झोप लागणे शक्य नसते, कितीही थंडगार वाटत असलं तरी ! मिटल्या डोळ्यांनी बसलो असलो, तरी माझ्या कानावर गाणी पडत होती.
अचानक ‘दिल तो हैं दिल’ हे गाणे कानावर पडले. मी डोळे उघडले आणि ऐकू लागलो. स्वर लता मंगेशकर यांचा नव्हता, हे निश्चित ! पण मिटलेल्या डोळ्यांना टक्क उघडण्याचे सामर्थ्य हे लता मंगेशकर यांच्या आपल्या मनांत रूजलेल्या आणि डोक्यात पक्क्या असलेल्या गाण्याच्या चालीत असते. ते गाणं कोणीही म्हणो, आपली उत्स्फूर्त दाद असते, ती गानसम्राज्ञी स्वरलतेला, त्या लता मंगेशकर यांना ! कल्याणजी आनंदजी यांच्या स्वर साजेला !
जुनी गोष्ट आहे. सन १९७८-७९ ची असावी. भुसावळला नातेवाईकांकडे लग्नाला गेलो होते. राममंदीर वॉर्डात लग्न होते. महाविद्यालयात जावू लागलो होतो. चित्रपट पहावेसे वाटायचेच, सर्वांसाठी करमणुकीचे साधन तेवढेच ! भुसावळला सातारा पुलापाशी एक सिनेमा टॉकीज आहे. तिथं लागला होता, ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट ! तिथं लग्नासाठी जमलेल्यांपैकी काहींनी ‘मुकद्दर का सिकंदर’ला जाण्याचे ठरवले. लग्न वगैरे आटोपले. संध्याकाळी सहाचा असेल तो शो ! सोबत कोण होते, हे पण आठवत नाही आता. पण चित्रपटातील ‘सलामें इश्क, मेरी जान’ म्हणणारी रेखा डोळ्यासमोर अजून उभी रहाते. ‘दिल तो हैं दिल’ म्हणत पियानो वाजवणारी राखी आणि टाईपराइटर वरून उठणारा विनोदखन्ना डोळ्यासमोरून हटत नाही. ग्रीलच्या खिडकीतून पहाणारा आणि नंतरच्या काळात महानायक हे बिरूद मिरवणारा अमिताभ बच्चन ! कोण व कसे विसरणार ? दोघांची राखीसोबतची ती स्वप्नदृष्ये ! घाऱ्या तपकिरी डोळ्याची राखी आणि अमिताभ बच्चन ! आसपास पडलेल्या पर्वतातील बर्फात फिरत आहेत, हे एक ! आणि स्वर्गातील दृष्याची आठवण करून देणारे दुसरे हे दृष्य - मजबूत बांध्याचा कै. विनोद खन्ना आणि तीच घाऱ्या तपकिरी रंगाची राखी ! गीत संपता संपता कागद वाचल्यासारखा करून ओठाला लावणारी, दोन्ही गालांस लावणारी राखी, आणि गाणे संपल्यावर मागे दूर येवून उभा असलेला विनोद खन्ना ! काय विसरणार ?
ही अशी काही चित्रे असतात, की ती मनांत अजूनही स्पष्ट असतात. मनावर छापलेली असतात की काय कोण जाणे ? त्यांच्यावर बरीच चित्रे पडलेली असतात ना, त्यामुळे भले त्यांच्याकडे पटकन लक्ष जात नाही काही वेळा, पण असा काही स्वर लागला, की आपण आपल्या कॉम्प्युटरला ‘फाईंड’ ही कमांड दिल्यावर, तो ज्या तडफेने लाखो शब्दांच्या आणि चित्रांच्या गोंगाटातून आपणांस हवे ते सुळकन समोर आणतो. बस, तोच आणि तसेच, हा आपल्या मनाचा कॉम्प्युटर करतो. हे असे स्वर कानावर पडले तर मिटलेले डोळे उघडावयास लावतात, आणि ही आठवण सुळकन डोळ्यांसमोर उभी करतात !
एखादा स्वर कानावर पडल्यावर, सन १९७८-७९ या निदान चाळीस वर्षांपूर्वीचे गाणे आणि मनाच्या खोल कप्प्यातील व डोक्यात रूतलेली ही आठवण जशीच्या तशी डोळ्यांसमोर आणणारे आपले परमेश्वरी संगणक !
आज रात्रभर तरी डोळ्यांसमोरचे राखी, अमिताभ बच्चन आणि कै. विनोद खन्ना हलणार नाहीत. ही आमच्या काळातील मंडळी आपल्या सोबत आमचा तो तरूणपणाचा काळ घेवून जातात, काही वेळा तर विनोद खन्नासारखे आम्हाला कायमचे सोडून जातात. आम्हाला सोडून जाणारी ही, त्यांच्या आठवणी तरी आमच्यासाठी का ठेवून जातात ?

२. ९. २०१८
स्वातंत्र्यानंतर काही स्वप्ने आपल्या मनाशी बाळगून, सामाजिक न्याय व्हायला हवा, या मुद्यांवर भर देत काही कायदे आपल्याकडे केले गेलेत. सामाजिक न्याय डोळ्यांसमोर ठेवून केलेले कायदे, म्हणजे एकाला जास्त देणे व दुसऱ्याचे कमी करणे, की ज्या योगे दोघांतील अंतर कमी होईल. विषमता कमी होईल. अर्थात असे कायदे केले गेलेत यांत गैर काही नाही. ती समाजाची मागणी होती, गरज होती, हे बहुसंख्यपणे मांडले गेले.
हे कायदे करतांना, बऱ्याच ठिकाणी कायदामंडळाने काही बाबींकडे थोडे दुर्लक्ष केले. विशेषत: त्याचवेळी मनुष्याची मानसिकता विसरली गेली, त्यामुळे जो काही एक समाजहिताचा हेतू मनांत ठेवून, आदर्शवाद डोळ्यांसमोर ठेवत व दुर्दम्य स्वप्ने उराशी बाळगून, जे कायदे काही तयार केले गेले, त्याची पुरेशी व अपेक्षित परिणामकारकता ना आपल्या दृष्टीस पडली ना अनुभवायला आली.
कोणताही कायदा तयार करतांना, विशेषत: सामाजिक न्याय डोळ्यांसमोर ठेवून जे कायदे केले जातात, त्यांत एक तत्व गृहीत धरले असते, की दोन्हीही बाजू न्यायालयासमोर सत्य व वस्तुस्थिती सांगतील. मात्र हे गृहीत धरलेले तत्व कधीही प्रत्यक्षात उतरत नाही. मग त्या कायद्यास काही अर्थ उरत नाही. त्यातून केवळ समाजात कटुताच निर्माण होत नाही, तर समाजस्वास्थ्य बिघडते. मग पुढचं काम न्यायालयांना करावं लागते, त्या कायद्याचा अर्थ सद्य वस्तुस्थिती लक्षात घेवून आपल्या न्यायालयाला लावावा लागतो. भारतीय राज्यघटनेने हे काम नामदार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे असल्याचे सांगीतलेले आहे.

४. ९. २०१८
संत एकनाथ महाराज यांचे हे भारूड
अशी ही थट्टा ।
भल्याभल्याशी लावीला बट्टा ।।
थट्टा दुर्योधनाने केली ।
पांचाली सभेमाजी आणिली ।
गदाघायें मांडी फोडीली ।
अशी ही थट्टा ।।
थटटा गेली शंभोपासी।
कलंक लावीला चंद्रासी।
भगे पडले इंद्रासी।
बरी नव्हे थट्टा।।
थट्टा रावणाने केली।
नगरी सोन्याची बुडविली।
थट्टा त्याची त्याला भोवली।
बरी नव्हे थट्टा।।
संत एकनाथ महाराजांबद्दल काय आणि इतर कोणत्याही संत मंडळींबद्दल काय बोलणार ? ही थोर ज्ञानी मंडळी, आपल्याला काही चांगलं शिकवायला, पृथ्वीवर आली होती. त्यांनी शिकवलेल्यातून काही जण थोडेफार शिकले, ते भवसागर पार झाले. काही मात्र काहीही शिकले नाही, तसेच गधडे राहीले. काही तर इतके काही दिव्य निघाले, की ते स्वत:लाच त्यांच्यापेक्षा ‘शहाणे’ समजून बिचाऱ्या संत मंडळींचीच अक्कल काढू लागले किंवा त्या संबंधी आपली अक्कल पाजळू लागले.
थट्टा ही शक्यतोवर विनोदाचा शिडकावा करणारी व समर्पक असावी, जीवघेणी नसावी. थट्टेतून समोरच्याला आपली चूक कळली आणि त्याने ती चूक दुरूस्त केली, तर ती थट्टा, मार्गदर्शनाचे काम करते. आपण इतकी पण थट्टा करू नये की आपण व आपले वर्तन नेहमीसाठीच थट्टास्पद म्हणून घेतले जाईल.

७. ९. २०१८
आज आपल्या निसर्गदत्त आवाजाला, अमाप कष्टाची आणि मेहनतीची जोड दिलेल्या आवाजातील असंख्य गीते ज्या गायिकेने गायिली, त्या मराठमोळ्या गायिकेचा, श्रीमती आशा भोसले यांचा आज जन्मदिन ! कितवा जन्मदिन ते मी लिहीणार नाही. अहो, स्वराला का कुठे वय असतं ? का सूर कधी म्हातारा होतो ? आम्हा सर्वांना हा सूर, या स्वरांच्या स्वामिनीकडून प्रत्यक्षांत निरंतर ऐकायला मिळो.
त्यांनी गायलेल्या विविध भाषांतील असंख्य गीतांपैकी, मी विशेषकरून ऐकली ती हिंदी आणि मराठी भाषेतील गीते ! मराठी भाषेतील असंख्य लावण्या त्यांनी आपल्या खास आवाजाने गौण अजरामर केलेल्या आहेत. गीतकाराच्या शब्दांतील भाव, हे ती भाषा देखील ज्याला समजणार नाही त्याला त्यातील भाव आपल्या स्वरातून समजावून देणाऱ्या या श्रीमती आशा भोसले !
ही सुंदर लावणी उतरली आहे ती, गीतकार कै. ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून ! डोलायला लावणारे, कमालीचे संगीत दिले आहे ते कै. राम कदम यांनी ! चित्रपट आहे - 'सांगत्ये ऐका' आणि --------- आधारलेली आहे 'कालिंगडा' रागात !
बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
चुगली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला
माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला
आज अचानक घरी तो आला
पैरण, फेटा नि पाठीस शेमला
फार गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजाऱ्याला
घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा!
वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखाऱ्याला
त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपून खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावानी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला
येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाऊन
मग पुसतील कानां पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई, त्याला बिचाऱ्याला

८. ९. २०१८

पिठोरी अमावास्या

आज श्रावण अमावास्या ! या दिवसाला पिठोरी अमावास्या म्हणतात. हा दिवस आपण पोळा म्हणून साजरा करतो. केवळ शेतकऱ्यांनाच याचे महत्व नाही तर त्याच्या जिवावर जगणाऱ्या तुम्हाआम्हा सर्वांनाच त्याचे महत्व आहे. दिवसेंदिवस शेतातील कामांत यंत्राचा वापर वाढला, स्वाभाविकच बैलांचे महत्व कमी होत गेले. मात्र वर्षभर आपल्यासाठी राबराब राबणाऱ्या, या बैलाची आजच्या दिवशी पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो.
कै. यशवंत दिनकर पेंढरकर म्हणजे कवि यशवंत ! यांचा ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरवाने उल्लेख केला जातो. राजकवी म्हणून मला दोन नांवे माहिती आहेत, पहिले राजकवी भास्कर रामचंद्र तांबे आणि दुसरे हे यशवंत दिनकर पेंढरकर ! आज त्यांची, कवि यशवंत यांची, आठवण येण्याचे कारण म्हणजे, त्यांची ‘सण एक दिन’ या नांवाची कविता !
मी मराठी चौथीत होतो. माझी शाळा म्हणजे नाल्यावर ! आमचे घर आणि शाळा यांच्यामधे माझ्या काकांचे घर ! शाळा सुरू झाल्याची घंटा ऐकू आल्यावर पळतपळत गेलो, तरी शाळेला काही उशीर झाला नसे.
मी चौथीत असतांना, त्या वर्षी आमची पुस्तके बदलली होती. पुस्तके बदलणे हा मुलांना आनंद असतो, कारण नविन पुस्तके मिळायची. पुस्तके बदलली नसली म्हणजे कोणाची असलेली, जुनी पुस्तके पण वापरावी लागायची. त्यांत कोणाला काही वावगे वाटत नसे. नवीन पुस्तके मग एकंदरीत कमीच घेतली जात. शेवटची किंवा अनुक्रमणिकेपर्यंतची पाने नसली, तरी ते पुस्तक वर्षभर धकून जाई. त्याला चांगले मजबूत शिवून ब्राऊन पेपरचे कव्हर घातले की झाले ! वर्षभर त्या पुस्तकाला काही होत नसे.
बाजारात आली होती. पुस्तक दुकानदारांचा तर प्रामाणिक सल्ला होता, की पाठ्यपुस्तके घेण्याऐवजी गाईड घ्या. जसा पुस्तकांचा सेट असतो, तसा त्यांनी सर्व विषयांचे गाईड विकायला ठेवले होते. मराठीचे वेगळं गाईड पण होते. मराठीचे गाईड म्हणजे काय ? हे माझ्या समजण्याच्या पलिकडे होते. तर ‘गाईडमधे चुकीचे लिहीलेले असते’ ही आईची समजूत ! दुकानदार हा गाईड घेतल्याशिवाय पुस्तक देत नव्हता. पुस्तक हवे तर गाईड घेणे ‘कंपल्सरी’ ! शेवटी वडिलांनी दोन मराठीची पाठ्यपुस्तके आणि एक गाईड, असा मार्ग काढला. दोन घेण्याचे कारण म्हणजे, माझा चुलतभाऊ व मी लहानपणापासून एकाच वर्गात ! त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी एकेक मराठीचे पुस्तक !
कोणत्याही वर्गाचे पुस्तक असो, मला नवीन वर्ष सुरू झाले की मराठीचे पुस्तक सर्वप्रथम वाचायला खूप आवडते. हे चौथीचे मराठी पुस्तक हातात पडल्यावर सर्वप्रथम त्यांत ‘समर्थ रामदासांचे अभंग’ होते ! नंतर वेगवेगळे धडे व कविता ! आम्हाला सर्व विषय शिकवायला, वर्षभर एकच शिक्षक असत. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन परवडणारी नव्हती. सणवार तर खूपच पाळले जात. श्रावणी सोमवारी लवकर घरी यायला मिळायचे, सकाळी उपवास असायचा. त्यामुळे जेवण न करता, मुलं शाळेत आलेली असत. श्रावणातला शेवटचा दिवस, म्हणजे पोळा ! हा जोरात साजरा व्हायचा. पोळ्याच्या अगोदर येणारा शुक्रवार, हा ‘पोळ्याचा बाजार’ म्हणून ओळखला जायचा. वर्गात बहुसंख्य मुले ही शेती असलेली होती, त्यामुळे बैलांचे महत्व त्यांना त्या काळांत तरी सांगण्याची अजिबात आवश्यकता नव्हती.
पठाण गुरूजी खूप छान शिकवायचे. त्यांचे शिकवणे हे अगदी हळू आवाजात असे. मग नवीन धडा किंवा कविता वगैरे शिकवायची असेल, तर गुरूजी सर्व मुलांना फळ्याजवळ बोलवत असत. माझी जागा बहुतेक टेबलखाली किंवा खुर्चीजवळ असायची. त्यांचा पांढरा स्वच्छ पायजमा, पांढराच मनिला आणि डोक्यावर पांढरी स्वच्छ गांधी टोपी ! उभट चेहरा, उजळ वर्ण आणि गाल किंचीत आंत गेलेले. अंगकाठी सडपातळ ! लालसर विटकरी रंगांचा चष्मा एकतर डोळ्यांवर किंवा पाकिटांत घालून शर्टाच्या डाव्या खिशात ! खिशाला दोन फाउंटन पेन असायचे, एक निळ्या-काळ्या शाईचा व दुसरा लाल शाईचा ! त्यांचे अक्षर फार वळणदार ! आम्हाला कित्ता पुस्ती कटाक्षाने गिरवायला लावायचे. त्यांचा मुलगा पण माझ्याच वर्गात होता. गुरूजी हे आपल्या हातातील छडी क्षणभर पण दूर ठेवत नसत. मला मात्र कधी तिचा प्रसाद मिळाला नाही.
पोळ्याच्या अगोदर, आमच्या पठाण गुरूजींनी ‘सण एक दिन’ ही कविता शिकवायला घेतली. कविता शिकवून झाली. गुरूजींनी प्रश्न विचारला, ‘या कवितेत तुम्हाला काय समजलं’ ? मी हात वर केला आणि ‘गुरूजी, सर्वात शेवटी सांगीतलेलं आहे. सण एक दिन, बाकी वर्षभर, ओझे मरमर, ओढायचे’ ! गुरूजींच्या हळू आवाजातली शाबासकी आज पण कानांत मोठ्याने ऐकू येते.
आपणा सर्वांसाठी ती कविता -
सण एक दिन
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार
राजा परधान्या, रतन, दिवाण
वजीर, पठाण, तुस्त मस्त
वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलांलागी
डुल-डुलतात, कुणाची वशिंडे
काही बांड खोंडे, अवखळ
कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
हिरवे तांबडे, शोभिवंत
वाजती गळ्यांत, घुंगरांच्या माळा
सण बैलपोळा, ऐसा चाले
झुलींच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले ?
आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर
जरी मिरविती, परि धन्याहाती
वेसणी असती, घट्ट पाहा
जरी झटकली जराशीहि मान
तरी हे वेसण खेचतील
सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मरमर, ओढायाचे !
— यशवंत

९. ९. २०१८