Tuesday, November 14, 2017

आईची माया आणि शिस्त

आईची माया आणि शिस्त 

सुमारे तीसेक वर्षांपूर्वीची ऐकलेली गोष्ट ! नेमकी कोणाच्या बाबतीत घडली होती, ते नांव आठवत नाही. मात्र घडली होती आणि त्यावेळी समाजात खूप गाजली होती.
मुलीचे लग्न होते, मुलगी सासरी येते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घरातील जवळपास कोणत्याही कामाला हात लावत नाही. सांगीतलेच तर केल्यासारखे करायची, पण त्यांत दम नसायचा ! नव्या नवरीचे सुरूवातीचे दिवस संपतात. पाहुणे मंडळी निघून जाते. घरी दोघेच रहातात.
तो तिला विचारतो - मी गेल्या काही दिवसांपासून बघतोय आणि मला सांगीतले पण की ‘तुझ्या बायकोला काही कामांची सवय दिसत नाही. सांभाळ बाबा !’
ती - मला आवडत नाही आणि मी करणार पण नाही.
तो काही बोलत नाही. विषय तिथेच संपतो. एखादा आठवडा जातो तर तिची आई येते. तिला आनंद वाटतो.
दुसऱ्या दिवसापासून ती बघत असलेला आईचा अवतार तिला नवीन असतो. सकाळी वेळेवर उठून झाडलोट झालीच पाहीजे. चहापाणी त्यानंतर ! नंतर आंघोळ वेळेवर करून स्वयंपाक केला गेलाच पाहीजे. तिला येत नसल्याने तिची आई तिथे बसून सांगायची, पण तिलाच करायला लावायची. स्वयंपाक होत नाही तर धुणे भांडी करून घ्यायला सांगायची. तिला रिकामी बसू देई ना आणि मग हे होईपर्यंत तिला कडाडून भूक लागलेली असे. दोन्ही गप्पा मारत पोटभर जेवत. त्याचवेळी तिला थोडी पूर्वीची आई दिसे. असा साधारण पंधरवाडा गेला.
नंतर तिला स्वत:हून जाग यायला लागली. काम काय करायचे हे दिसायला लागले. ती काम करायला लागली. आई पहात असे. मदत क्वचितच करी ! पुढचा पंधरवाडा गेला. अजूनच सफाई आली कामात. आता आई तिच्याकडे कमी लक्ष देई पण लक्ष असे. पुढचा पंधरवाडा असा गेला. नंतरचा पंधरवाडा तर आई अंथरूणातून उठतच नसे. उठली तरी, थोडेफार बघून पुन्हा आराम ! हे आठवडाभर चाललं मग नंतरच्या आठवड्यात तर तिचे पोटच दुखतंय असं सांगे. हा पदार्थ कर, तो कर, पथ्याचं कर हे सांगून वेगवेगळे आजारी असतांनाचे पदार्थ करायला लागत. शेवटी जवळपास दोन महिने झाले आणि आई एके दिवशी सकाळी उठली. तिच्या जावायाला तिच्यासमोर म्हणाली - विद्यार्थी माझ्या दृष्टीने पास आहे. मी घरी निघते. घर उघड्यावर टाकून आले आहे.
तिला म्हणजे मुलीला हे समजेना, की हे काय ? मग आईने सांगीतले, ‘जावाईबापूंचे पत्र आले. विद्यार्थ्याला शिकवले नाही. त्याचे शिक्षण पूर्ण करा. इथं येवून शिकवले तरी चालेल. मला कल्पना आली, हे तुझ्याबद्दलच आहे. मी तडक निघाले. पोरीच्या संसारात गैरसमज निर्माण होण्याच्या आंत मिटवा, नाहीतर पुढच्या गंभीर समस्या होतील. तुझे जास्त लाड आम्हीच केले, तुला काही कामांची सवय लावली नाही, त्याचे हे परिणाम ! सुखी, शांत व समाधानी संसाराचा मार्ग चांगल्या पाककौशल्यातून व गृहीणीपद सांभाळण्यातून जातो हे लक्षात ठेव. नंतर आपल्या हातातून पहिले आपली माणसं जातात व संसार परका होतो.’ मुलीला रडू आवरेना. आई थोपटत सांगत होती. ‘माणसं चांगली म्हणून चांगल्या भाषेत सांगीतलं, नाहीतर भलतंसलतं काही झालं असतं तर गोष्टी वाढत जातात. अहंकार आडवा येतो व संसाराचा विचका होतो.
कालपासून मला दोन-तीन जुन्या मित्रासारख्या संबंधीतांचे फोन आले. मुलीकडून व मुलाकडून ! वेगवेगळ्या व्यक्ती आणि कुटुंबांतून ! घटना पण वेगळ्या, दोघांनाही घटस्फोट हवा होता. लग्नाला जेमतेम दोनेक वर्ष झाली होती. समाज कुठे चाललाय ? मी काय सांगायचे ते त्यांचा संसार मोडणार नाही असे सांगीतले. त्यावेळी ही जुनी घटना एकदम आठवली.

Monday, November 13, 2017

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी !

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी !

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आमचे गांव ! खान्देश म्हणून ओळखला जाणारा भाग हा सातपुड्याला लगतच आहे. काही तालुके किंवा गांव तर इतकी लगत आहेत की सातपुड्यावरून उतरले की त्या तालुक्यांत किंवा गावातच येतो. सातपुड्यांत उगम पावणारी 'तापी नदी',  जिची ओळख 'सूर्यतनया' म्हणजे 'सूर्याची मुलगी' अशी ! तापी नदीच्या पाण्याने खान्देश बऱ्याच प्रमाणांत सुजलाम सुफलाम, समृद्ध केला आहे. अर्थात खान्देशवासीय हे मुळातच कष्टाळू ! कष्टाला फळ केंव्हातरी येणारच ! हा पूर्वी खान्देश या नावाचाच जिल्हा होता. खान्देश म्हटले की त्यांत हल्लीचे महाराष्ट्रातील जळगांव, धुळे आणि नंदुरबार हे पूर्ण जिल्हे आणि नासिक जिल्ह्यातील देखील काही भाग येतो. तसे काटेकोरपणे पाहिले तर खान्देशमधे सध्या मध्यप्रदेशांत असलेला पण खान्देशचा भाग असलेला बुऱ्हाणपूर हा जिल्हा पण येतो. माझा माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातील बेळगांव हा भाग जसा कर्नाटकांत आहे तसाच बुऱ्हाणपूर हा भाग सुद्धा मध्यप्रदेशात आहे, पण यांकडे फारसे आम्हा खान्देशवासियांचे किंवा कोणाचे लक्ष नसावे. पूर्व खान्देश हा नंतर धुळे जिल्हा झाला आणि पश्चिम खान्देश हा जळगाव जिल्हा झाला. धुळे जिल्ह्याचे नंतर पुन्हा विभाजन होवून दोन जिल्हे झाले - धुळे आणि नंदुरबार ! 

आज आपणांला सांगणार आहे ती गोष्ट खान्देशमधील, अलीकडच्या नंदुरबार जिल्ह्यातील ! सातपुड्यातून उगम पावलेली 'सूर्यतनया' तापी नदीने या भागांतील नागरी जीवनाला जसे समृद्ध केले आहे तसेच पर्वतीय वस्तीला देखील जीवन दिलेले आहे, कारण सातपुड्यांत विविध समाजाचे लोक जसे रहातात तसेच आदिवासी लोक पण बरेच आहेत. नंदुरबार जिल्ह्यांत तर आदिवासी समाजाचे लोक बऱ्याच संख्येने ! भारत सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील बराचसा म्हणण्यापेक्षा बहुसंख्य भाग हा 'अनुसूचित जमाती'साठी म्हणून जाहीर केलेला आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे 'अनुसूचित जमाती' यांची प्रगती व्हावी, त्यांनी प्रगत समाजाबरोबर यावे म्हणून इतर सर्वसामान्य समाजाला उपलब्ध असलेल्या सोयी-सवलतींपेक्षा जास्तीच्या सोयी-सवलती देत असते. त्यांतील भूमिका आणि उद्देश चांगलाच आहे, मात्र या घाईगडबडीत 'दोन्ही घरचा पाहुणा उपाशी' कसा रहातो त्या 'दोन्ही घरच्या पाहुण्याच्या उपासाची' ही कथा !

ही घटना साधारणतः २०१० मधील ! नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका त्यातील एक छोटेसे गांव, तेथील ग्रामपंचायत ! तिची अवस्था 'दोन्ही घरचा पाहुणा उपाशी' अशी झाली होती. त्यांनी काही वर्षे उपासमार सहन केली, शासनाकडून मिळणारे अनुदान मिळत नव्हते. काही वेळा शासनाच्या निर्णयाचा तंतोतंत अर्थ लावण्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अतिउत्साहांत आणि नादांत, ग्रामपंचायतीला किंवा इतर लाभार्थींना बरेच वर्षे उपाशी रहावे लागते. त्यांत ही ग्रामपंचायत पण अडकली, तिला शासनाचे अनुदान काही काळ मिळत नव्हते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बरीचशी गांवे शासनाने 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर केलेली आहेत आणि काही तालुके तर पूर्णपणे अनुसूचित म्हणून आहेत. 

संपूर्ण तालुका, काही गांवे किंवा संपूर्ण जिल्हा हा 'अनुसूचित भाग' म्हणून जाहीर करावा किंवा काही भाग जाहीर करावा हे तेथे 'आदिवासी' म्हणून शासनाने जाहीर केलेला समाज किती प्रमाणांत आहे यावर अवलंबून असते. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हे असे जरी असले तरी तर दहा वर्षांनी 'अनुसूचित भाग' कोणता असावा याचा विचार नव्याने होत नाही. त्यामुळे जो भाग अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी झालेला आहे, तरी तो भाग शासनाच्या दृष्टीने 'अनुसूचित भाग' म्हणूनच असल्याने त्याला अनुसूचित भागात असल्याबद्दल मिळणारे फायदे जास्तीचे मिळतात. जी मंडळी अनुसूचित जमातीत येत नाही त्यांची त्यामुळे बऱ्याच वेळा अडचण होते, त्यांना ना अनुसूचित जमातीचे फायदे मिळतात ना सर्वसाधारण म्हणून विचार केला जातो. सर्वसाधारण समाजाचे समजले गेलेले लोक, गांव किंवा तालुका येथे अनुसूचित जमातीचे लोक बहुसंख्य नसतात, मात्र हे लोक रहात असलेला भाग हा अनुसूचित भागात येत असल्याने त्यांचे अस्तित्व जवळपास झाकोळले जाते. महाराष्ट्रात या संबंधीची सूचना भारत सरकारने The Scheduled Areas (Maharashtra) Order, 1985 यानुसार जाहीर केलेली आहे. याचा हेतू अतिशय चांगला आहे. दुर्लक्षिलेल्या भागाचा, लोकांचा विकास अग्रक्रमाने, विशेष काळजी घेऊन व्हावा हा हेतू ! यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने 'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम' ही विकास योजना जाहीर केली. 

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे या आदिवासी भागातील समाजसेवक ! दिनांक २९ नोव्हेंबर, १८६९ ते २० जानेवारी, १९५१ हा यांचा जीवनकाळ ! त्यांना 'ठक्कर बाप्पा' म्हणूनच बहुसंख्य समाज ओळखायचा. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या 'भारत सेवक समाज' यांचे हे सदस्य होते. त्यांनी सन १९२२ मध्ये 'भील सेवा मंडळ' स्थापन केले. यानंतर ते महात्मा घांदी यांनी स्थापन केलेल्या 'हरिजन सेवक संघाचे' सचिव बनले. त्यांच्या पुढाकाराने सन १९४८ सालांत 'भारतीय आदीमजाती सेवक संघ' स्थापन झाला. भारतीय राज्यघटना' तयार होण्याची प्रक्रिया सुरु होती, त्यावेळी ठक्कर बाप्पा हे भारतातील अत्यंत दुर्गम भागांत जावून तेथील हरिजन आणि आदिवासींच्या परिस्थितीची पहाणी करून ती माहीती घटनाकारांना दिली, त्याचा घटनेतील याबाबत तरतुदी करतांना विचार झाला. त्यानुसार हे यांचे राज्यघटनेत मोठे योगदान आहे. याची जाण ठेवून कृतज्ञतेच्या भावनेने या विकास योजनेचे नांव महाराष्ट्र शासनाने 'ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना' असे ठेवले. 

'ठक्कर बाप्पा योजना' ही आदिवासी बहुल भागासाठी प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्त आहे. ज्या भागात आदिवासी ५०% पेक्षा जास्त आहेत त्यांस 'आदिवासी बहुल भाग' म्हणता येऊ शकते. या योजने प्रमाणे निदान ४०% जरी आदिवासी तेथे रहिवासी करत असले तरी या योजनेचा फायदा मिळू शकतो. हे छोटेसे गांव नंदुरबार जिल्ह्यातील जरी असले तरी 'या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची आदिवासींची लोकसंख्या ही ५०% पेक्षा बरीच कमी आणि ४०% पण नसल्याने आदिवासींसाठी असलेल्या 'ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना' ही देखील त्यांना लागू होत नसल्याचे' संबंधित कार्यालयाने कळविले. लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासींसाठीचे अनुदान येथे मिळणार नाही हे नक्की झाले. 

त्या ग्रामपंचायतीने निदान आपल्याला सर्वसाधारण विकास योजनेचे तरी अनुदान मिळेल या भावनेने तसा शासनाकडेच पण दुसऱ्या संबंधीत विभागांत अर्ज केला. तिने जिथे अर्ज केला त्या शासनाच्याच दुसऱ्या विभागाने लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्र हे नंदुरबार जिल्ह्यातील गांव असल्याने, आणि नंदुरबार जिल्हा हा 'अनुसूचित क्षेत्रातील' असलेमुळे सर्वसाधारण क्षेत्राचे नियम येथे लागणार नाहीत ही शासकीय कर्मचाऱ्यांची भावना मनांत ठेवून त्याप्रमाणे सर्वसाधारण क्षेत्रासाठी असलेल्या विकास योजनेचे अनुदान या ग्रामपंचायतीला मिळणार नाही' हे गृहीत धरून तसे कळविले. 

यामुळे दोन्ही वेगवेगळ्या शासनाच्या विभागाकडून या ग्रामपंचायतीला कळविले गेले. आदिवासी विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी या ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या कारणाने नाकारले तर सर्वसाधारण विकास अनुदान जेथे मिळते त्या विभागाने हे क्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील धरल्याने यांना सर्वसाधारण क्षेत्रासाठी असलेले अनुदान नाकारले. ग्रामपंचायतीला दोन्हीकडूनही नकारघंटा ऐकायला मिळाली - दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहू लागला. सदस्य वेगवेगळ्या पुढाऱ्यांना हाती धरून थकले. त्यांना एकदा वाटायचे आपली ग्रामपंचायत ही विरोधी पक्षाची आहे म्हणून ही वागणूक आहे, त्यावेळी ती 'भारतीय जनता पक्षाची' मानली जायची. काहींनी 'सत्ताधारी कांग्रेसच्या पुढाऱ्यांना पकडल्याशिवाय अनुदान मिळणार नाही' हे ठासून सांगीतले. लोकाग्रहास्तव सदस्यांनी तो पण प्रयोग केला, पण तो पण फसला ! अनुदान मिळेना, नुसतेच हेलपाटे आणि पायपीट ! 

'यांना कायद्याचा धडा शिकवला पाहीजे. अरे, कोणी तरी, काही तरी तर द्या ! हा काय प्रकार आहे ? आमची ग्रामपंचायत काय पाकिस्थानातील आहे काय ? हा पण नाही म्हणतो आणि तो पण नाही म्हणतो ?' सदस्य एकमेकांना म्हणू लागले आणि गावांतील लोक त्यांच्या फजितीकडे बघून 'फिदीफिदी' हंसत - 'मग काय पाटीलबुवा, कोण अनुदान देतेय ? सरकार तर विकासाच्या योजनांवर योजना जाहीर करतेय ! आणि तुम्ही इतकी मातब्बर शिकलेली मंडळी असल्यावर काही नाही ! हे काहीतरीच !' सदस्याला म्हणत, त्यांच्या तावडीतून कोणी सुटत नसे. 'बिनपाण्याची' ग्रामीण भागातील लोक फारच सफाईने करतात, पुन्हा 'आम्ही काय बुवा, अडाणी मानसं  ! असे म्हणून नामानिराळे होतात.

ही सर्व मंडळी माझ्याकडे आली, कोर्टात जायचे जायचे या उद्देशाने ! त्यांचे पुढारी म्हणजे त्या ग्रामपंचायतीचे उप सरपंच पाटील ! ही मंडळी इतकी फिरलेली असल्याने आणि पुन्हा राजकारणात मुरलेली असल्याने त्यांच्याकडे बहुतेक सर्व मला लागणारी कागदपत्रे होती. मी त्यांनी आणलेली कागतपत्रे  बघतो आणि 'काय झाले' हे तोंडी पण विचारून घेतो. घटना तोंडी व्यवस्थित सांगता आली तर मग कागदपत्रे लवकर पाहून होतात. त्यांनी त्यांची कथा पहिले ऐकविली. मला आश्चर्य वाटले. 'कसे शक्य आहे ?' मी म्हटल्यावर त्यांनी आणलेली कागदपत्रे दाखविली. ती बघीतली. मग मला पण गंमत वाटली. त्यांचे खरे होते. गोंधळ असतो शासनाच्या दोन विभागांत, पण येथे त्यामुळे ग्रामपंचायतीला उपाशी राहण्याची वेळ आली होती. कोणत्याही योजनेचा फायदा मिळत नव्हता, पुढेही मिळणार नव्हता. सर्व कागदपत्रे पाहून, घडलेली घटना संगतवार लिहून नामदार उच्च न्यायालयात ते दाखल करण्यासाठी याचिका तयार केली. त्यांचे शपथपत्र तयार केले आणि याचिका उच्च न्यायालयांत दाखल केली. न्यायालयाने शासनाला नोटीस काढली आणि याबद्दल माहिती घेवून शपथपत्र सादर करण्यास सांगीतले. 

शासनाने आपले म्हणणे सादर केले. त्यांत सांगीतले हे गाव सन १९८५ च्या जाहीर केलेल्या राजपत्रानुसार आणि सन १९९० मधील ठरावानुसार 'अनुसूचित क्षेत्रात' येते. याबद्दल काही तक्रार असेल तर त्यांना दुसरा मार्ग उपलब्ध आहे. त्यांनी त्यांची तक्रार शासनाकडे मांडावी, थेट न्यायालयांत येण्याची काही गरज नाही. यांची याचिका रद्द करावी. यांवर मी न्यायाधीशांना याचिकेत दाखल असलेले आणि शासनानेच आम्ही आदिवासी क्षेत्रांत येत असल्याने सर्वसाधारण क्षेत्राचे अनुदान मिळणार नाही हे एक शासनाच्याच विभागाचे पत्र दाखविले. आणि पुन्हा दुसऱ्या विभागाचे याच्याच विरुद्ध असलेले दुसरे पत्र दाखविले की ज्यांत म्हटले होते - आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्या ही ४०% पेक्षा कमी असल्याने ही ग्रामपंचायत आदिवासी क्षेत्रात येत नाही त्यामुळे 'ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम' हा या ग्रामपंचायतीला लागू होत नाही' हे पण शासनानेच दुसरे पत्र दाखविले. 
'आम्ही शासनाच्या दृष्टीने कोण आहे ? हे तरी सांगा. ' असे न्यायालयाला सांगीतले.  
'नाही, पण यांना हे शासनाकडे मांडता येईल.' सरकारी वकिलांना याचिका निकालात निघावी असे वाटत होते तर 'हा घोळ इथेच संपला पाहीजे' असे माझे मत होते. माझी अडचण लक्षांत घेऊन मग न्यायमूर्तीच म्हणाले - 'त्यांचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही एकतर 'आदिवासी आहे' हे म्हणा किंवा 'आदिवासी नाही' हे म्हणा. तुम्ही दोन्ही म्हणताहेत. हे कसे चालेल ? त्यांना कोणाचेही का होईना पण विकासासाठी अनुदान तर मिळाले पाहीजे. त्यांत हे तांत्रिक कारण आणण्याची त्यांना काही आवश्यकता वाटत नाही.  
सरकारी वकिलांनी शासनाच्या भूमिकेसाठी मुदत मागून घेतली. न्यायालयाने 'याबद्दल स्पष्ट सूचना घ्या' हे सांगीतले आणि पुढची तारीख दिली. 
पुढच्या तारखेला काम निघाल्यावर, काही सुरु होण्याचे आंत सरकारी वकील म्हणाले यांना शासनाकडे तक्रार मांडता येते. याचिका निकालात काढावी. मला पुन्हा 'आम्ही आदिवासी आहोत का नाही हे एकदा सांगा. म्हणजे सोपे होईल. गेली काही वर्षे आम्ही शासनाच्या दृष्टीने कोण आहे हेच समाजात नाही' हे सांगावे लागले. न्यायालयाच्या मग घटना लक्षांत आली, त्यांना हसू आले. त्यांनी दोन्ही बाजूचे ऐकून शेवटी निर्णय दिला. सरकारने या कामी सरपंच, उपसरपंच किंवा त्या खेड्यातील कोणीही जबाबदार व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि अंतिम आदेश सहा महिन्यांत द्यावा. शासनाच्या धोरणाचे सक्त पालन करून त्यांना योग्य ते अनुदान देण्यांत यावे.

एवढे सर्व झाल्यावर पुन्हा यांच्या शासनाकडे फेऱ्या झाल्याच, काम काही होईना ! नाईलाजाने मग शासनाविरुद्ध म्हणजे संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करावी लागली. त्यांतील आदेश झाल्यावरही शासनाचे, अधिकाऱ्यांचे औदासिन्य पाहिल्यावर न्यायालयाने त्यांना अवमान याचिकेत नोटीस काढली. त्याला शासनाने उत्तर दिले आणि ही अवमान याचिका चौकशीला येण्याचे अगोदरच, न्यायालयाच्या आदेशाची त्या वर्षाच्या अनुदानाची बऱ्यापैकी रक्कम देऊन पूर्तता केली आणि पुढे पण नियमितपणे अनुदान देत राहू असे न्यायालयाला विनंतीपूर्वक सांगीतले. शासनातर्फे सांगितलेले विधान न्यायालयाने स्विकारले आणि अवमान याचिका निकालात काढली. या उपर जर याचिका कर्त्यांची काही तक्रार असेल तर त्याला याचिकेत दाद मागता येईल अशी परवानगी दिली. 'साहेब, गांवात आम्हाला पाहून फिदीफिदी हसणारे, आता तोंड पडून गप्प आहेत,' हे मला सांगायला त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पाटील विसरले नाही.               

शासनाच्या एका विभागाचा दुसऱ्याशी ताळमेळ नसणे आणि त्यातून परस्पर विरोधी निर्णय घेतले जाणे, हे सर्वसामान्य जनतेला काही नवीन नाही. त्यांत जनतेला बऱ्याच वेळा हाल पण सोसावे लागतात. त्याने डगमगून न जाता पुढे चालत राहावयास हवे. कारण धीर न सोडता त्याचा शेवटपर्यंत जर खरोखर मनापासून पाठपुरावा केला, वेळप्रसंगी न्यायालयाचा आधार घ्यावा लागला तरी घेतला तर कायदा हा मदतीलाच आहे, हे स्पष्ट होते.

(ही आठवण लोकमत जळगांव' मध्ये संक्षिप्त स्वरूपांत दि. ४ आणि ११ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती.)

http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_JLLK_20171104_8_4&arted=Jalgaon%20Main&width=412px

http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/2017-11-11/8#Article/LOK_JLLK_20171111_8_4/317px












     

Friday, November 10, 2017

काल पाहीले मी स्वप्न गडे

काल पाहीले मी स्वप्न गडे
भारतीय संगीताचा हा महासागर ! त्यातील भागसंगीत म्हणून ओळखला जाणारा एक भाग ! या भागातील, भावसंगीतातील दीपस्तंभ असलेले मंगेशकर कुटुंब आणि त्यातील ही भावंड म्हणजे त्यावरील वेगवेगळे दीप ! कोणता महत्वाचा आणि कोणता चांगला, काय सांगणार ? सर्वच दीप प्रकाश देणारे, मार्ग दर्शविणारे व उजळविणार !
काल संध्याकाळी जळगांवहून येतांना अचानक एक गीत आठवले, मनांत गुणगुणू लागलो. योगेश्वर अभ्यंकर यांचे हे गीत ! अत्यंत सोप्या शब्दात आपल्या भावना, स्वप्नांत पाहिलेल्या प्रसंगातील अपेक्षा, व्यक्त करणारी तरूणी ! प्रत्यक्ष गाण्यास कठीण, पण ऐकतांना गायला अत्यंत सोपे आहे असे वाटेल, असे संगीत देणारे श्रीनिवास खळे ! आणि आवाजाला कसलीही मर्यादा नसलेली किंवा जिचा आवाज कसलीही मर्यादा मानत नाही, असे स्वरांची जन्मजात आणि अमर्याद देणगी मिळालेली गायिका, मंगेशकर कुटुंबातील एक दीप - आशा भोसले !
गौड सारंग हा राग ! नांवाप्रमाणेच कानाला गोड वाटणारा, ह्रदयाला साद घालणारा ! कल्याण थाटातील ! सर्व स्वर यांत उपयोगात आणतात. दोन्ही मध्यमांचा अप्रतिम उपयोग आणि वापर ! विशिष्ट स्वर म्हणजे गंधार वादी व धैवत संवादी यांचा जो सुरेख वापर केला जातो त्याने आपल्याला गौड सारंग पटकन ओळखता येतो.
काल पाहीले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली ग आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी ही हसले हसली आशा
काल पाहीले मी स्वप्न गडे
भाग्यवतीचे भाग्य उजळले
कोणीतरी ग मला चिडविले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे
इवली जिवणी इवले डोळे
भुरूभुरू उडती केसही कुरळे
रूणुझुणू रूणुझुणू वाजती वाळे
स्वप्नी ऐकते तो नाद गडे

https://www.youtube.com/watch?v=SzdWZ1c4s3o&feature=share

हे माझे काम नाही ----- तरी मी करणार !

हे माझे काम नाही ----- तरी मी करणार !

आपले ज्ञान अद्ययावत रहावे म्हणून वकिलांना कायद्यासंबंधाने विविध उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णय वाचावे लागतात. आवड आणि ज्ञानतृष्णा असेल तर आपल्या भारतीय कायद्यांच्या संबंधीत विषयांवर विविध राष्ट्रांमधील न्यायालयांत, आंतरराष्ट्रीय न्यायालयात काय कल आहे हे पण पाहू शकतो. प्रत्येक निर्णय हा तपशीलवार वाचणे कठीण असते. तो वाचावा लागतो, ते त्या स्वरूपाचे काम न्यायालयासमोर चालवायचे असेल तर ! मात्र आपल्याकडे सारख्या स्वरूपाची कामे असतील तर पूर्वीचे लक्षात असते.
अलिकडे हे संगणक, न्यायालयांची संकेतस्थळं वगैरे असल्याने असे निर्णय उपलब्ध होण्याचा बराचसा त्रास कमी झाला आहे. तरीही येथे वाचणे कठीण जाते म्हणून, किंवा असे वाचण्याची सवय नसल्याने म्हणून विविध प्रसिद्ध होणारी कायदेविषयक नियतकालिके लावावी लागतात. त्यांत अजून एक फायदा असतो की त्या न्यायनिर्णयांत कोणते मुद्दे महत्वाचे चर्चिले गेले आहेत, हे थोडक्यात वर लिहीलेले असते त्याला ‘हेड नोटस्’ म्हणतात. त्याखाली मग खाली पूर्ण निकाल दिलेला असतो. या हेड नोटस् तयार करणारी कायद्यातील तज्ञ मंडळी त्या नियतकालिकांत असतात. यासाठी पूर्ण निकाल काळजीपूर्वक वाचावा लागतो. निर्णयात उल्लेख केलेले सर्व संदर्भ पहावे लागतात. हे वेळखाऊ व किचकट काम असते. मात्र यामुळे आपल्यास कायद्यातील बारकावे समजतात. या हेड नोटस् जेवढ्या अचूक तेवढे ते नियतकालिक जास्त ‘गुडवील’ असलेले ठरते. हेड नोटस् ही बौद्धीक संपदा आहे. मी पण हे काम केले एका नामवंत कायदेविषयक नियतकालिकांत केले असल्याने याची कल्पना आहे. असे असले तरी न्यायालय ‘हेड नोटस्’ ला निर्णय देतांना महत्व देत नाही तर मूळ न्यायनिर्णयालाच महत्व देते.
पण कागदावर छापलेली नियतकालिक ठेवण्यास जागा खूप लागते. यासाठी या नियतकालिकांनी सीडी स्वरूपात हे द्यायला सुरूवात केली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे ‘वेब एडीशन’ ! आपल्याला दरवर्षी वर्गणी भरून ‘ऑन लाईन’ बघता येईल अशी आवृत्ती काढायला सुरूवात केली. मी सुरूवातीला कागदावर छापलेली नियतकालिके घेत असे, मात्र आता सीडी असलेली काही आणि ‘ऑन लाईन’ असलेली काही अशी नियतकालिके घेतो.
माझेकडे एक ‘ऑन लाईन’ बघता येईल असे नियतकालिक आहे. त्यांत खूप माहिती आहे. त्या प्रतिनिधी श्री. माने ! पोरगेलेसे आहेत, त्यांचा अनुभव ! ते फॉर्मसीचे पदवीधर व एम्. बी. ए. आहेत. पूर्वी औरंगाबाद येथे अधूनमधून यायचे, बहुतेक आल्यावर सायंकाळी घरी यायचे. गप्पा व्हायच्या.
‘इकडे आल्यावर मला वकिलाकडे आल्यासारखे वाटत नाही, कोणा घरच्याकडे आल्यासारखं वाटते.’ एकदा माने म्हणाले.
‘तुम्ही वर्गणी वकिलांकडूनच घेता का घरच्यांकडून पण !’ मी विचारल्यावर ‘अशा गप्पा होतात, म्हणूनच मला असे वाटते.’ माने !
‘माने, तुमची लाईन चुकली का ? तुम्ही फॉर्मसीचे आणि इकडे कायद्याकडे कसे ?’ एकदा त्यांना मी विचारले. चहा पितापिता गप्पा मारतांना.
‘मी एम्. बी. ए. आहे. मला कशाचेही मार्केटींग करता आले पाहिजे.’ त्याचे कोल्हापुरी स्टाईलने उत्तर !
काल शनिवारी, एक केस वाचत होतो. या कायद्यावर विविध निर्णय बघावे म्हणून ती वेब साईट सुरू केली. ती होईना. तेथे पासवर्ड मागत होते. हा माझा नेहमीचा गोंधळ आहे, हे अनुभवाने श्री. मानेंच्या पण लक्षात आले आहे. त्यांना फोन लावला. ते पुण्याला असतात. त्यांना बहुतेक झोपेतून उठावे लागले असावे, असे आवाजावरून मला वाटले.
‘झोपेतून विनाकारण उठवले पहा. पण ८-९ वाजेपर्यंत कसे काय झोपता बुवा !’ मी सहज म्हणालो.
‘तुम्ही लवकर उठता म्हणून सगळे जग उठले असे वाटते तुम्हाला. इतक्या सकाळी कोणालाही फोन करत जाऊ नका, नेहमी सांगते मी.’ हा घरातून आलेला अग्निबाण ! कोणी पाठवला असेल सांगण्याची गरज नाही, अनुभवाची आहे. मी नेहमीप्रमाणे मुकाट राहीलो.
‘सर, नाही उठलोय. सांगा. काय म्हणता ?’ माने !
‘आपले नेहमीचेच !’ माझे उत्तर.
‘तुम्ही असं करा, मग असं करा.’ माने यांच्या सूचना. त्याप्रमाणे केले पण उपयोग झाला नाही, हे सांगीतले.
‘सर, दोन मिनिटे द्या. मी करतो अन् सांगतो.’ माने. दोन मिनीटांत मानेंचा फोन आला. ‘सर, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. मला पण तसेच उत्तर येतेय. मी तुम्हाला SMS करतो, त्या नंबरवर साडेनऊनंतर फोन करा. तुमची अडचण सांगा. तरी झालं नाही तर सांगा. मी व्यवस्था करेन.’ माने म्हणाले.
‘त्या दुसऱ्याकडे कशाला ?’ मी विचारले.
‘मी xxx कंपनी सोडली आहे.’ माने. मी अवाक !
‘केव्हापासून ?’ मी.
‘दोन महिने झाले !’ माने म्हणाले. मला कसेतरी झाले. संबंध नसलेल्याला विनाकारण त्रास ! मी तसे बोललो मानेंना. ‘असू द्या. काही हरकत नाही. मी कंपनीत नाही. पण आपले संबंध कुठे संपलेय !’ माने म्हणाले.
‘सध्या काय चाललंय तुमचं मग ?’ मी विचारले. त्यांनी काही सॉफ्टवेअरबद्दल सांगीतले. मला ते काही फार समजले नाही पण मी म्हणालो, ‘माझ्या काही कामाचे आहे का, ते सांगा.’
‘तुमच्या फार काही कामाचे नाही, थोडे आहे. औरंगाबाद आहे माझ्याकडे, मी येईल घरी. मग सांगेन.’ माने. मानेंचा सरळपणा मला नवीन नव्हता.
‘तुमच्यासाठी मी काही करू शकत असेल तर सांगा. पुण्यात आहे काही मंडळी आपली.’ मी बोललो.
‘नक्कीच सर !’ माने.
विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची शक्ती काम करण्यापेक्षा ‘हे माझे काम नाही. त्याचे आहे किंवा कोणाचे आहे, हे माहिती नाही. असलेल्या कामात शोधशोधून काहीतरी खोड्या वा त्रुटी काढून काम टाळणारी आमची नोकरशाही ! या अशा नोकरशाहीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर श्री. मानेंचा हा अनुभव !

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !




मी त्यावेळी बहुतेक आठवीत असेल ! सरदार जी. जी. हायस्कूल मधे ! दिवाळीची शाळेची सुटी संपली होती. तसे पाहीले तर शाळेत माझी सर्व विषयांत बऱ्यापैकी परिस्थिती होती. वर्गात माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कोणाला नसत. पण इंग्रजी व गणिताची शिकवणी लावावयास हवी, कारण ते विषय कठीण असतात हा त्यावेळचा समज. इंग्रजी ही परकीय भाषा म्हणून कठीण तर गणित हा विषय ‘दांडी उडण्यासाठी’च असतो, अशी ही त्यावेळची वस्तुस्थिती असायची ! माझी गणिताची अजिबात काळजी नव्हती. असलीच तर थोडी अडचण असायची, इंग्रजीची ! अर्थात माझा इंग्रजी हा विषय मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या, सर्वसामान्य विद्यार्थ्याचा जेवढा चांगला असेल किंवा असावयास पाहीजे तितका माझा पण होता. पण जरा जास्त मेहनत घेऊन इंग्रजी चांगले व्हायला हवे, पुढे सर्व विषय हे इंग्रजीत असतात, याची कल्पना होती.

एके दिवशी वडील संध्याकाळी घरी आले अन् मला व माझ्या चुलत भावाला म्हणाले, ‘अरे, तुम्ही उद्यापासून इंग्रजीच्या शिकवणीला जात जा, प्रकाश मुजुमदारांकडे ! मी सांगून आलोय, माझी दोन मुलं पाठवतो म्हणून ! भोईवाड्यात घर आहे.’ मला वाटलं ‘चला, काही जास्तीचे शिकायला मिळेल.’ आईने विचारले, ‘आता दिवाळीनंतर मधेच शिकवणीचे कसे काय डोक्यात आले ? निम्मे वर्ष तर संपलंय !’
‘भोईवाड्यात भेट झाली, लक्ष्मण मुजुमदारांकडे गेलो होतो. त्यांचा पुतण्या होता तिथं, म्हटलं सध्या काय सुरू आहे ? तर म्हणाला ‘सध्या काही नाही, एम्. ए. झालोय, इंग्रजीत ! नोकरीचे बघतोय !’ म्हटलं वाट काय बघायची, शिकवण्या सुरू कर.’ तशा नुकत्याच सुरू केल्या आहेत हे सांगीतल्यावर, ‘माझी दोन मुलं पाठवतो’ म्हणून सांगीतलं. पोरं जातील उद्यापासून ! जाऊ दे.’ दुसऱ्या दिवसापासून मी आणि दत्ता म्हणजे माझा चुलतभाऊ, आम्ही दोघं शिकवणीला जायला लागलो. श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सरांकडे !

भोईवाड्यातील त्यांचे बैठे जुने घर ! आसपास सर्व भोई लोकांची घरे, त्या लोकांच्या घराबाहेरच भट्ट्या लागलेल्या असायच्या ! भट्ट्यांशेजारी काट्याचा मोठा भारा ! हळद लावून काही वेळा डाळ्या व मीठ लावून ओले करून खारे शेंगदाणे वाळत टाकलेल्या, भट्टीखाली काटे सारत कडक जाळावर लोखंडी कढईतील वाळूत तडतडून कढईबाहेर येणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ लाह्या ! त्यांच्या मोठ्या लोखंडी लांब दांड्याच्या झाऱ्यावर झपकन उचलले जाणारे काळे फुटाणे ! शाळेच्या वयांतील हे आसपासचे जाणवलेले वातावरण कितपत अभ्यास करू देईल, हा प्रश्न त्या वेळी कधी डोक्यातही आला नाही, आता येतोय !

दुसरे दिवशी वही व पुस्तक घेऊन गेलो. तो तिथं मला वर्गातील दोन तीन मुले आलेली दिसली. ‘तू पण यायला लागला का ?’ या पहिल्या प्रश्नाला ‘आजपासून’ हे उत्तर दिले. त्यांच्या घरातील पुढच्या खोलीत आम्हाला बसण्यासाठी जाड सतरंजी टाकलेली होती, आम्ही शिकवणीला येणारे सात-आठ जण होते. सर आले. आम्ही सर्व बसलो. सर मध्यभागी बसले, म्हणाले ‘आता आपण पहिले ‘ग्रामर’ शिकणार आहोत. हे व्यवस्थित आले की तुम्हाला इंग्रजीत काही तरी लिहीता येईल. बरोबर कसे लिहावे, लिहीलेले बरोबर आहे का, हे समजेल ! बाकी पुस्तकातील धडे नंतर पाहू.’ पुस्तकातील धड्यांव्यतिरिक्त काही शिकतो आहे यांचे कुतूहल, तर आपला अभ्यास मागे पडेल ही चिंता !

सरांनी एकाची वही घेतली व लिहीले - ‘Tenses’ ! एकूण तीन ‘टेन्स’ आणि त्यांत प्रत्येक ‘टेन्स’ मधे चार प्रकार ! रोज एक ‘काळाचा’ प्रकार, त्याचे उपप्रकार ! मग तपशीलवार सांगणे - याचा वापर केव्हा करायचा, याची क्रियापदे कशी तयार होतात, त्याने अर्थात काय बदल होतो, विशिष्ट अर्थ ध्वनीत करायचा असेल तर वाक्य कसे लिहायचे ! काळ आणि काळांचे विविध प्रकार संपले ! सुरू झाले मग ‘Clauses’ ! त्यांचे प्रकार व उपप्रकार ! रोज घरी जातांना आपण काही तरी शिकतो आहे हे जाणवायचे. शिकवणे आणि बोलणे इंग्रजीत पण बऱ्याच वेळा स्वच्छ मराठीत देखील ! शिकवण्याचे शास्त्रात भाषा कशी शिकवावी या बद्दल काय सांगीतले याची मला कल्पना नाही, पण त्यांनी शिकवलेलं डोक्यात शिरत होतं, मनांत साठत होतं ! शिकवणीला जाऊन दोन-तीन महिने झाले असतील. पुस्तकातील धड्याला विशेष हात लागलेला नव्हता, पण आता वाटायला लागले की आपण आता काहीतरी इंग्रजी लिहू शकू. आपण लिहीलेलं दुसऱ्याला पण समजेल ! आपल्याला जे वाटतंय तेच त्याला पण जाणवेल !

व्याकरणाची थोडी प्राथमिक, आवश्यकतेपुरता तयारी झाल्यावर त्यांनी पुस्तकातील धडे शिकवायला घेतले. आम्हाला या प्रत्येक धड्याचे स्वरूप बदललेले वाटत होते. तसे पाहिले तर हे सर्व धडे अगोदर पण वाचले होते, पण त्यांचे हे रूप जाणवले नव्हते. हे आम्हाला नवीन रूप होते. हा शिकलेल्या व्याकरणाचा परिणाम होता, हे इंग्रजीचे नवे स्वरूप दाखवले ते मुजुमदार सरांनी !
‘इंग्रजी वर्तमानपत्र वाचत जा. नाही समजलं तरी वाचत जा. इंग्रजी सुधारेल.’ सर सांगत. ते त्यावेळी आम्ही काही फार मनावर घेतले नाही. आम्ही यांवरच खूष होतो की आपल्याला इंग्रजी समजतंय, आपलं वाटतंय ! इंग्रजीचा परकेपणा थोडा कमी झाला होता. त्या वर्षी समाधानाने इंग्रजीचा पेपर दिला.

आठवी झाली. नववी झाली आणि दहावी आली. मुजुमदार सरांची त्यांच्या विद्यार्थ्यांची बहुतेक ‘शालांत परिक्षेची’ पहिलीच बॅच ! सरांनी शिकवण्यांत यापूर्वी पण कधी हातचे राखून शिकवले नाही, ते आता या शालांत परिक्षेच्या घडीला कृपण होणारच नव्हते, सर्व विद्यार्थ्यांना सढळ हातानेच देणार होते यांत शंकाच नव्हती. परिक्षा आली. आम्ही पेपर दिले. चांगले गेले. शालांत परिक्षेचा निकाल लागला. सन १९७७ च्या शालांत परिक्षेत केंद्रात सर्वप्रथम पण त्यांचाच विद्यार्थी होता - मी ! — आणि इंग्रजीत पण सर्वप्रथम व दुसरा त्यांचाच विद्यार्थी होता - मुकुंद मुजुमदार आणि मी !

निकाल जाहीर झाला त्यावेळी मी आजोळी होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो. तो पावेतो गांवात ही बातमी समजली होती. रावेर सारख्या तालुक्यांतील रावेर गांवात बातमी पसरायला वेळ तो काय लागणार ? सकाळी आल्यावर शाळेत गेलो, गुणपत्रक घेतले. घरी आलो. त्याच दिवशी सकाळीच मुजुमदार सर घरी आले होते - माझे अभिनंदन करायला ! ‘प्रत्यक्ष शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी येऊन अभिनंदन करणे’ विद्यार्थ्याला यापेक्षा मोठे कोणते बक्षीस आहे ? विद्यार्थ्याच्या आईवडिलांना यापेक्षा मोठा आनंद कशात असणार ?

आठवीपासून ते अकरावीपर्यंत मी श्री. मुजुमदार सरांकडेच इंग्रजीची शिकवणी लावली होती. आठवीला जसा मी शिकवणीला जायला लागलो तेव्हा सर दहा रूपये महिन्याला घ्यायचे शिकवणीचे ! मी अकरावीला गेलो तरी सरांचा दहा रूपये महिनाच होता शिकवणीचा ! कधीही चार वर्षांत फी वाढवली नाही, त्यांचे कसे भागत असावे, देव जाणे ? हा प्रश्न आता सुचतोय ! शिकवणी अगदी नियमीत, खाड्याची तर गोष्टच नाही. फक्त सरांना बहुतेक टायफॉईड झाला होता, त्याच वेळी काही दिवस शिकवणी बंद होती.

अजून एक सांगायचे म्हणजे, आमच्या पैकी काही विद्यार्थ्यांनी, बहुतेक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची' इंग्रजीची काही परीक्षा असावी, ती देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सांगीतलेले एक पुस्तक आणि विख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपियर याचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे नाटक होते. शेक्सपियरच्या नाटकात काय महत्वाचे असते, तो का महान नाटककार आहे, हे शिकविले. त्या धंद्यांच्या पात्रातील परिचयासोबतच आपल्या आयुष्यांत पण अशी पात्र अशी पात्र कशी भेटतात हे पण त्यामुळे अनुभवता आले. या दहा रुपये महीना फी घेणाऱ्या आमच्या शिक्षकाने तो संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला, कोणतीही वेगळी फी न घेता. आजच्या प्रत्येक गोष्टीत वेगळा पैसे द्यावा लागतो या 'पंजाबी डिशेश' अनुभवणाऱ्या काळांत आम्ही 'पोटभर जेवणाची थाळी' घेऊन बसलो होतो, त्याचा कोणताही वेगळा चार्ज द्यावा लागला नाही आम्हाला ! या गोष्टी आता कोणाला पटतील नाही पटतील, पण आम्ही अनुभवल्या आहेत !

या दहा रूपये फी असतांनाच्या काळांत पण आर्थिक अडचणी असणारे असायचे. मग नियमीत फी देणे व्हायचे नाही. त्यांना कोणी सांगीतले, ‘सर, वडिलांनी सांगीतले आहे, या महिन्याची फी पुढच्या महिन्यांत देवू. सध्या अडचण आहे.’ तर सर त्याचे ‘सध्या अडचण आहे.’ हे वाक्य म्हणायच्या आंत ‘बरं’ म्हणायचे, त्याच्यावर अविश्वास न दाखवता, काहीही न बोलता. त्या विद्यार्थ्याला जी अडचण त्याच्या घरी असायची ती अडचण तर खरोखर सरांच्या पण घरी असायची ! पण सर कधी ते त्याच्याशी वागण्यात जाणवू देत नसत, आम्हा कोणालाही !

अकरावीनंतर गांव सुटले, शिक्षणासाठी बाहेरगांवी गेलो. कायद्याचे शिक्षण घेतांना माध्यम इंग्रजी असायचे. त्यावेळेस थोडे जाणवायचे मुजुमदार सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ? कायद्याच्या विविध कलमातील मजकूर कसा वाचल्यावर, कुठल्या शब्दावर थांबल्याने काय अर्थ होतो ? आता समजते आहे दहा रूपया महिना घेऊन सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ! मी या बाबतीत भाग्यवान, फार भाग्यवान ! मला केवळ उत्तम शिकवणारेच शिक्षक मिळाले नाही तर मला माझ्या बहुसंख्य शिक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ते अगदी आजही त्यांची भेट झाल्यावर जाणवते.

आपल्या प्रत्येकाच्या या जीवनाच्या वाटचालीत किती लोकांनी आपल्याला मदत केली असते ! कोणी आपल्यासाठी उजेड दाखवत असते, काही वेळा ते दिसतात तर काही वेळा दिसत पण नाही, पण त्यांनी दाखवलेला उजेड आपली वाट प्रकाशमय करतो. चालतांना असंख्य वेळा धडपडलो, खाली पडलो तर उठवून मार्गावर लावणारे भेटतात. भुकेने जीव कासावीस झाल्यावर कळवळून पोट धरून खाली बसलेल्या आपणांस कोणी आपल्या जवळची शिदोरी उघडून, स्वत:च्या घासातील घास काढून देतात, आपल्या पोटाला आधार वाटल्यावर आपण तरतरीत होऊन उठतो व मार्गस्थ होतो. अपयशाच्या गर्तेत काही वेळा पडल्यावर किती वेळ येथे रहावे लागेल याची कल्पना नसतांना, ही देवाने पाठवल्याप्रमाणे माणसं येतात आणि हात धरून आपल्याला बाहेर काढतात; मग कपडे झटकत आपण सावरतो अन् पुढे चालायला लागतो. आपल्या मार्गातील यांचा सहभाग लक्षात घेतला तर आपल्या यशांत कोणाकोणाचा किती सहभाग असतो नाही !

मध्यंतरी मुजुमदार सरांनी बहुतेक प्रकृतीच्या कारणाने, सकाळी सहा-साडेसहापासून ते संध्याकाळपर्यंत असलेल्या शिकवण्या, एकदम बंद केल्या. आता कधीपासूनच सर कोणालाही इंग्रजी शिकवत नाही. अलिकडे तर ज्यांना हे सर्व माहिती नसेल त्यांना ‘सर’ म्हणत असावे ते ‘रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर’ यांचे चेअरमन आहेत म्हणून असावे, असेच वाटत असेल. पण काहीही असो आता रावेरला मुजुमदार सर म्हणजे नेमके कोण हे सांगावे लागत नाही, कोणीही त्यांच्या घरांपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांची ‘माधवाऽऽ’ ही हाक आठवली, अन् सोबत हे सर्व !

तुळशीचे लग्न !

तुळशीचे लग्न !

आजची प्रबोधिनी एकादशी ! कार्तिक शुद्ध एकादशी, प्रबोधिनी एकादशी ! मग स्वाभाविकच उद्या कार्तिक द्वादशी, उद्यापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह मुहूर्त मानतात. भगवान श्रीकृष्ण आणि तुळशीचा विवाह करण्याची आपली ही सांस्कृतिक, धार्मिक परंपरा !
चातुर्मास संपल्याने विवाहेच्छुक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल. काहींचे सुस्कारे व उसासे इथपर्यंत ऐकू येत होते. तुळशीचे लग्न झाले की ते मोकळे !
मी कॉलेजला होतो. शेजारी काही कुटुंबे होती. सर्वच खेळीमेळीने रहात. तुळशीचे लग्न आले. शेजारी कापसे म्हणून कुटुंब होते, उत्साही व हौशी ! बहुतेक विदर्भातले होते. त्यांच्या दारासमोरच मोठमोठ्या तुळशी होत्या, पुरेशी मोकळी जागा होती. त्यांच्या समोरच लग्न मोठ्या जोरात लागले. त्यांना मुलीकडचे म्हणून नांव घेण्याचा आग्रह करू लागले. तुळशीच्या वतीने नांव घ्यायचे, हा आग्रह ! मोठी पंचाईत ! गर्दीला तारतम्य नसते, पण गंमत होती. वातावरण निकोप व मोकळे होते.
प्रसाद घेतला, फराळ झाला. नांव काय घ्यावे हा प्रश्न राहिलाच होता. माझी काकू, आम्ही सर्व जण वहिनी म्हणायचो तिला ! त्या सर्वांत तीच वडिलधारी होती. सर्वच आजी म्हणायचे तिला तिथे ! ती शेवटी म्हणाली, ‘त्यांत काय मोठे घे, तुळशीच्या लग्नाचा उखाणा -
बोर भाजी आवळा । अन् कृष्णदेव सावळा ।
सर्व थक्क झाले क्षणभर ! मग एकदम हास्यकल्लोळ !

कार्तिक शुद्ध ११ ! प्रबोधिनी एकादशी !


आज कार्तिक शुद्ध ११ ! प्रबोधिनी एकादशी !
आषाढी एकादशीला, म्हणजे शयनी एकादशीला सुरु झालेल्या चातुर्मासाची आज कार्तिकी एकादशीला, प्रबोधिनी एकादशीला पूर्तता ! शयनी एकादशीला भगवान विष्णू शयन करतात आणि या प्रबोधिनी एकादशीला उठतात., हा आपला चालत आलेला समज ! आषाढी आणि कार्तिकीचे महत्व मी काय सांगणार ? पांडुरंगाच्या भक्तीने कोणताही जातीभेद डोक्यांत न ठेवता या सर्व वारकऱ्यांना, पंढरीच्या भक्तांना एकत्र जोडले ते आपल्या भक्तीने !
ही संत मंडळी कायकाय म्हणतात ते आजच्या निमित्ताने आपल्या हृदयांत साठवावे -
अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥
(संत ज्ञानेश्वर )
दामाजीचा भाव पाहून श्रीहरी । अनामिक निर्धारी स्वयें जाला
घेऊनिया द्रव्य निघाला श्रीहरी । जोहार जोहार करी पाता शहाते
द्रव्य देउनिया रसीद घेतली । भक्तांची माउली विठाबाई
एका जनार्दनीं भक्तांचिया । धावे पाठोपाठी भक्ताचिया
(संत एकनाथ )
केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिकेमाझारी नाचतसे
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत
कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त
(संत गोराकुंभार)
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा
(संत सांवता माळी)
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने
त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस
जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी
विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण
मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी
ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस
(संत नरहरी सोनार)
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत
(संत सेना न्हावी)
देहीं देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी
रुख्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा
आकार तितका नासे । निराकार विठ्ठल दिसे
ऐसे गुज ठायींचें ठायी । चोख म्हणे लागा पायीं
(संत चोखा मेळा )
'आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ।।
(संत चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई )
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
(संत बहिणाबाई )
नको देवराया अंत पाहू आता । प्राण हा सर्वथा फुटो पाहे
हरिणीचे पदास व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसें त्रिभुवनी । दवे वो जननी विठाबाई
मोकलूनी आस जाहले मी उदास । घेई कान्होपात्रेस हृदयांत
(संत कान्होपात्रा )
आम्ही बळवंताच्या दासी । कोण गर्भवास सोसी
करू यमासी ताडन । अमुचा धनी नारायण
जनी म्हणे हरी । पाप उरो नेदीं उरी
(संत जनाबाई )
भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ।
उधार घ्यारे उधार घ्यारे। अवघे या रे जातीचे ।
येथे पंक्ति भेद नाही। मोठे काही लहान ।
तुका म्हणे माल घ्यावा । मुद्दल भावा जतन ।।
(संत तुकाराम महाराज )
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ||
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
(संत नामदेव )