Thursday, December 31, 2015

नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प - सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ

आज 'ग्रेगोरिअन कॅलेंडर'प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस ! लहानपणापासून ३१ डिसेंबर म्हणजे वर्ष संपले आणि १ जानेवारी म्हणजे नवीन वर्ष लागले ही आपल्या मनातील आंतरिक भावना असते. जसजसे 'वर्ष'म्हणजे काय, शास्त्रीय वर्ष कोणते वगैरेअलिकडे समजू लागले तसे, ३१ डिसेंबरचा उत्साह कमीकमी होत गेला, मात्र तो आजही पूर्ण गेलेला आहे असे म्हणता येत नाही. आज, आता जे काही लिहावेसे वाटले त्याचा उद्देश हा नाही. 

३१ डिसेंबर आला म्हणजे आपण काय ठरविले होते यापेक्षा आपण काय केले नाही हे जास्त आठवते आणि मग पुढील वर्षापासून म्हणजे १ जानेवारी पासून ते करण्याचा आपण संकल्प सोडतो. तो संकल्प कितपत पूर्ण होतो हे आपणांस या वर्षाच्या शेवटी पुन्हा समजतेच, मग पुन्हा संकल्प आणि पुन्हा ३१ डिसेंबर ! हे चक्र अगदी जगत्गुरू शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी, जठरे शयनं ! भज गोविन्दम भज गोविन्दम भज गोविन्दम मूढमते !!' जरी नसले तरी मला यामधील एक साधर्म्य जाणवले आहे त्यासाठी आज लिहायला आवर्जून बसत आहे. 

माणसाच्या अंगी त्याच्या निर्मितीच्या वेळी खरच कोणते गुणावगुण होते हा संशोधनाचा विषय आहे, अजूनही त्याबाबत नक्की सांगता येत नाही. काहीना अवगुण पूर्वीपासूनच होते असे वाटते तर काहींना गुण होते हे वाटते तर काही मध्यममार्गी म्हणजे गुणावगुण दोन्ही होते असे मानणारे आहेत. पण आपण प्रत्येक वेळी आपली कृती, संकल्प आणि विचार बघितले तर आपण नेहमीच काहीतरी चांगलेच करण्याचा संकल्प करतो, तो कितपत सिद्धीस जातो हा भाग वेगळा ! मात्र संकल्प हा नेहमी चांगलेच करण्याचा असतो असे अनुभवावरून तरी दिसते, आपल्यापैकी असे कोणीही ठरविल्याचे ऐकिवात देखील नाही, की एखाद्याने वर्षभर फक्त 'चौर्यकर्म' करायचे ठरविले, एखादीने आपल्या सुनेशी 'वर्षभर भांडायचे' ठरविले, विद्यार्थ्याने 'काही झाले तरी मी वर्षभर अभ्यास न करता या वर्षी नापासच होऊन दाखवतो' असा निश्चय केला असे काही दिसत नाही; जरी प्रत्यक्षात कृती तसली असली तरी ! त्या कृतीला मग त्या व्यक्तीचा स्वभावधर्म म्हणता येईल मात्र संकल्प म्हणता येणार नाही. थोडक्यांत ही आपली छोटीशी कृती देखील 'माणूस हा मुळांत चांगलाच विचार करणारा आहे' याला पुष्टी देतो. हीच आपणा सर्वांसाठी अजूनही समाधानाची गोष्ट आहे. हे विचार जर आपण सर्वांनी खरोखरच मनापासून पुढे नेण्याचे ठरविले तर बरेचसे चांगलेच होवू शकेल, अशी आशा करायला काहींच हरकत नाही.    

तेंव्हा कोणतेही का होईना पण नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्प करावा, सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहे, फक्त आपली प्रामाणिक, मनापासून इच्छा दिसली पाहिजे आणि त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे. 

माझ्यापुरता बोलायचे झाले तर ------ मी आता अवांतर गप्पांसाठी येथे जात असलेला वेळ हा आपल्या जवळील कायद्याचे ज्ञान (जेवढे काही थोडेफार आहे त्यातील) आपणा सर्वांसाठी, माझ्या विचाराने आणि सोयीप्रमाणे, उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, माझे नियमित कामकाज करत असतांना ज्या गोष्टी लक्षात येतांत त्यांचेही यानिमित्ताने टिपण केले जाईल. हे सर्व विषय स्वतंत्रपणे आणि वेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. यातील विषय बहुतांशपणे इंग्रजीत मांडणार आहे. या विषयांच्या प्राथमिकतेचे, प्राधान्याचे स्वरूप हे माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून ठरविणार आहे. येथे जरी सार्वजनिक महत्वाचे विषय घेणार असलो, तरी वैयक्तिकपणे येत असलेल्या अडीअडचणींचा विचार अवश्य होईल, तो सार्वजनिकदृष्ट्या महत्वाचा असेल तर नक्कीच ! आणि जरी वैयक्तिक असला तरी वैयक्तिकपणे विचार करण्यास कोणतीच अडचण नाही. यासाठी आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे सहकार्य अपेक्षित आहेच. 

Tuesday, October 13, 2015

आज नवरात्रोत्सव प्रारंभ




आज नवरात्रोत्सव प्रारंभ होतोय ! अश्विन शुध्द प्रतिपदा, शके १९३७ म्हणजे १३ ऑक्टोबर, २०१५ !

स्त्रीशक्तीच्या विविध रूपातील अविष्काराची पूजा, तिच्या सृजनशक्तीची पूजा, तिच्या मातृत्वाच्या मंगल सामर्थ्याची पूजा ! तिच्या विनाशकारी शक्तीची आराधना !

आमच्या रक्तांत देवीचे स्वरूप इतके भिनले आहे, आम्ही तिच्या या स्वरूपांत इतके एकरूप झालेलो आहे की आमच्या देशाला, भारताला देखील, आम्ही भारतमातेच्या, दुर्गेच्या रूपांत पाहतो, यापेक्षा या 'दुर्गेचे' कोणते वेगळे रूप असू शकणार आहे ? 

आपण सर्वांना ती दुर्गा, चंडिका सुखी, समृध्द करो ! देशाला सुखशांती देवो, हीच प्रार्थना !    




। अथ सप्तश्लोकी दुर्गा ।

शिव उवाच
देवि त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी ।

कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं ब्रूहि यत्नतः ॥

देव्युवाच
शृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् ।
मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ॥

ॐ अस्य श्रीदुर्गासप्तश्लोकीस्तोत्रमहामन्त्रस्य नारायण ऋषिः ।
अनुष्टुभादीनि छन्दांसि । श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यो देवताः ।
श्रीदूर्गाप्रीत्यर्थं सप्तश्लोकी दुर्गापाठे विनियोगः ॥

ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा ।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥ १॥

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः
        स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या
        सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥ २॥

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ३॥

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ४॥

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥ ५॥

रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥ ६॥

सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरि विनाशनम् ॥ ७॥

        ॥ इति दुर्गासप्तश्लोकी सम्पूर्णा ॥


Wednesday, September 16, 2015

भाद्रपद शुध्द तृतीया ! - 'हरतालिका'


आज भाद्रपद शुध्द तृतीया ! यादिवशी आपण म्हणजे विशेषतः महिला 'हरतालिका' साजरी करतात. कोणी काही म्हणो अथवा कसाही उलटसुलट अर्थ काढो, पण आपल्या संस्कृतीतील दोन सणांनी किंबहुना व्रतांनी समस्त महिलांनी आम्हा पुरुष जातीला कायमचे, जन्मोजन्मीचे उपकृत करून ठेवलेले आहे - ती दोन व्रते म्हणजे आजचे - 'हरतालिका' आणि जेष्ठ शुध्द पौर्णिमेला असणारे 'वटसावित्री'चे व्रत !  

भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या म्हणजे हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकराला आपल्या तपश्चर्येने पती म्हणून मिळविले होते त्यावेळी त्याची संपत्ती, ऐश्वर्य पाहिले नव्हते ! तसेच जेष्ठ शुध्द पौर्णिमेला 'सती सावित्रीने' आपल्या पतीचे, सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमराजाकडून त्याला संतुष्ट करून परत मिळविले होते सोबत यमराजाने प्रसन्न होवून तिला 'इच्छित वर' दिले होते. आपल्या संस्कृतीतील या दोन स्त्रिया या समस्त पुरुषजातीला खरोखरच कायमच्या ललामभूत आहेत, यांत शंका नाही.    

भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या म्हणजे गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिलावर्ग  करतात. मनासारखा पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका हे व्रत मनोभावे करतांत जे देवी पार्वतीने 'भगवान शंकर' आपणांस पती म्हणून मिळावे यासाठी केले. काही कुमारिका, सुवासिनी हे व्रत अतिशय कडक करतात. त्यादिवशी उपवास करतांत, काहीही खात-पीत नाही फारतर फलाहार करतांत. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतरही करतात कारण एकदा घेतलेले भोळ्या शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते या भावनेने हे व्रत आजन्म करतात.

त्यामागची पौराणिक कथा अशी - राजाधिराज हिमालय, राजा हिमवान याची देवी पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. ती उपवर झाल्यावर तिच्या पित्याला तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी स्वाभाविक काळजी लागली. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले असता, म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने यापूर्वीच मनोमन भगवान शंकराला पती म्हणून वरले होते. मात्र तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.` देवी पार्वतीने आपल्या मैत्रिणींसह अरण्याचा रस्ता धरला, अरण्यांत तिने घोर तपश्‍चर्या केली.

नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने पाने खाणेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या घनघोर तपश्‍चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांनी तिला वर मागायला सांगितले. "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत राजा हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.

आपल्या इच्छित पतीची, भगवान  शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या कडक तपश्‍चर्येने केली, म्हणून त्यामागील परंपरेने चालत आलेल्या श्रध्देने आपणांस मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. व्रताचे विधी कोणते हे येथे महत्वाचे नाही तर त्यामागील अकृत्रिम, निर्लेप, पराकोटीची भावना महत्वाची आहे. या तिच्या अलौकिक त्यागाने, कर्तृत्वाने ती भगवान शंकराच्यापुढे झाकोळली तर नाहीच पण उलट समाजात त्यामुळे  'उमा-महेश्वरा'चा जोडा हा देवी पार्वतीला यथार्थ प्राधान्य शब्द परिचित झाला तर भगवान शंकराला 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून ओळखू लागले.

Thursday, August 20, 2015

ओवी, श्लोक, आर्या आणि अभंग


आज सकाळी गप्पा मारता मारता सहजच विषय निघाला तो जुन्या काळातील प्रसिध्द मराठी कवींचा ! अर्थात त्यावेळी बहुतांश काव्य हे निवृत्तीपर, पौराणिक विषयावर, अध्यात्मिक अशा स्वरूपाचे असे. काव्यप्रकार आणि ते समर्थपणे हाताळणारे कवी कोणते असा विचार मनांत आला तेंव्हा - १. ओवी, २. श्लोक, ३. आर्या आणि ४. अभंग हे काव्य प्रकार प्रामुख्याने डोळ्यासमोर आले. या प्रत्येक प्रकारांत एकेका कवीचे नांव घेतले जाते. 

१. ओवी - ओवी ज्ञानेशाची ! 

संत ज्ञानेश्वर ! ज्ञानेश्वर माउली ! यांच्याबद्दल मराठी जाणणाऱ्याला मी काही सांगावे असे नाही. सन १२७५ ते १२९६ या छोट्याशा काळांत हिमालयाएवढे कार्य करून 'सदेह संजीवन समाधी' घेणारे हे संत ! संन्यासाची पोरे म्हणून समाजाने कोणताही त्रास देणे शिल्लक ठेवले नसतांना संपूर्ण प्राणिमात्रांसाठी परमेश्वराला 'पसायदान' मागणारी ही संत विभूती ! त्याचे वर्णन मी काय करणार ? 

यांनी असंख्य ओव्यांमधून आपले चिरंतन अध्यात्मिक विचार प्रकट केले आहेत. आपणा सर्वांना परिचित असणारे 'पसायदान' -  

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
  
--------------------------------------------------------------------------
२. श्लोक - सुश्लोक वामनाचा ! 

पंडित कवी - वामन पंडित ! सन १६०८ ते १६९५ या काळातील प्रतिभावंत पंडित कवी, भगवद्गीतेवरील ज्या मराठीमधील टीका झालेल्या आहेत त्यांत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली 'भावार्थदीपिका' जी आपण सर्व 'ज्ञानेश्वरी' या नांवाने ओळखतो. दुसरी म्हणजे 'यथार्थदीपिका' जी या 'वामन पंडित' यांनी लिहिली आणि तिसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 'श्रीभगवतगीतारहस्य तथा कर्मयोगशास्त्र' ही होय. संस्कृतचा गाढ व्यासंग असल्याने अलंकार, वृत्त अशा विविध शब्दसामर्थ्याने यांनी साहित्यसेवा केली. यांनी लिहिलेल्या असंख्य सुंदर श्लोकांमुळे 'सुश्लोक वामनाचा', श्लोक म्हटले कि वामन पंडित आठवू लागले. 'यमक अलंकार' हा अतिशय समर्थपणे हाताळल्याने 'यमक्या वामन' म्हणूनही ते परिचित होते. 

त्यांच्या श्लोकाचा एक नमुना -    

वंशी नादनटी, तिला कटितटी खोवूनि पोटी पटी |
कक्षे वामपुटी स्वश्रृंगनिकटी वेताटिही गोमटी।
जेवीं नीर तटी तरू तळवटी, श्रीश्याम देही उटी |
दाटी व्योम घटी सुरा सुखलुटी, घेती जटी धूर्जटी ||

--------------------------------------------------------------------------------

३. आर्या - आर्या मयुरपंतांची ! 

पंडित कवी - मोरेश्वर रामचंद्र पराडकर ! सन १७२९ ते १७९४ या कालखंडातील संस्कृतवर प्रभुत्व असणारे प्रतिभावंत कवी ! मोरोपंत तथा मयुरपंत या नांवाने परिचित असणारे पंडित कवी !  आर्याभारत,  रामायण,  आर्याकेकावली, मंत्रभागवत,  कृष्णविजय, हरिवंश, ब्रह्मोत्तरखंड, केकावली, संशय-रत्नमाला यासारखी साहित्यकृती त्यांचीच ! 'आर्या' आणि 'पृथ्वी' हि वृत्ते त्यांची आवडती, यांत त्यांच्या बऱ्याच परिचित रचना आपणांस माहित आहेत. 

पृथ्वी या वृत्तातील आपणांस परिचित रचना - 
सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो ॥

न निश्चय कधी ढळो; कुजनिवघ्नबाधा टळो;
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरिभमान सारा गळो;
पुन्हा न मन हे मेळो दुिरत आत्मबोधे जळो ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।
कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,
तशि प्रकट हे िनजाश्रितजनां सदा सावरी ॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥

             ----------------

आर्य वृत्तातील ही सुंदर रचना - 

श्रीशंभुच्या प्रसादे झाली त्रिजगी मदालसा मान्या,

बुध हो ! या साध्वीते, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या 

----------------------------------------------------------------------------------------------------

४. अभंग - अभंग तुकयाचा !

संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील संत ! समाजाला भागवतधर्माच्या रस्त्याने भक्तिमार्गाला नेणारे वारकरी संप्रदायाचे थोर अध्यात्मिक पुरुष ! भगवान विष्णूचा अवतार मनाला गेलेला विठ्ठल, त्याच्या भक्तीने ओथंबलेले काव्य हे खरोखरच अभंग ठरले आहेत आणि 'अभंग' म्हणूनच ओळखले जातात. जनमानसांत अत्यंत परिचित असलेल्या रचना संत तुकारामाच्याच ! 

दोन सुंदर अभंगरचना  - 

कन्या सासुर्‍यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी ॥४॥   

           ------------------------------

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरुनियां ॥१॥
चालों वाटे आह्मीं तुझा चि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥२॥
बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥३॥
अवघें जन मज जाले लोकपाळ ।
सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥
तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें ।

जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥५॥

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
 






Sunday, August 16, 2015

श्रावणाचा निसर्ग

कालच श्रावण महिना लागला ! श्रावणाचा निसर्ग फारच आल्हाददायक आणि वेगळा, मनाला भावणारा ! बालकवींची 'श्रावणमासी हर्ष मानसी' ही कविता बालपणापासून आठवणीत राहिलेली आहे. पण यंदाचा पावसाळा समाधान देणारा नाही, पुरेसा नाही; त्यावर आपला काही सध्या इलाज नाही जरी आपण अंतिमतः जबाबदार असलो तरी ! पण काही झाले तरी मनुष्याची आशा काही सुटत नाही. -----------आठवणी रेंगाळत राहतात.

मंगेश पाडगावकरांचे हे सुंदर गीत आणि लता मंगेशकरांचा सुरेल स्वर त्यांत श्रीनिवास खळे यांच्यासारख्यांचे सोपे वाटणारे, कानांस सुरेल वाटणारे पण गायला कठीण असणारे संगीत !

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथेतिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्‍नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

Saturday, August 15, 2015

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
















आपल्या देशवासीयांच्या आणि माताभगिनींच्या पराकोटीच्या त्यागातून, वेदनेतून, कष्टाने इंग्रजांना या देशातून घालवून मिळविलेले १५ ऑगस्ट, १९४७ रोजीचे स्वातंत्र्य ! हा दिवस आपण सर्व आपला 'स्वातंत्र्य-दिन' म्हणून आनंदाने साजरा करतो.   

या आनंदाच्या दिवशी आपल्या वर्तनाने आपण हे कायम स्मरणांत  ठेवले पाहिजे कि 'यांच्या असीम त्यागामुळे आपला आजचा आनंदाचा दिवस दिसतो आहे'. 
सर्वांना 'स्वातंत्र्य-दिनाच्या' मनापासून शुभेच्छा !

कवी कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्ती येथे देणे अनुचित ठरणार नाही.  

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
सरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

Saturday, July 25, 2015

'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'


साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वीची किंवा त्यापेक्षाही पूर्वीची संगीत-सभेची आठवण आहे ! आठवण आहे पुण्यातील !
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक (आपणांस गीतरामायणाने परिचित असलेले स्वर्गीय बाबूजी नाही) आणि त्यांना साथ देणार होते तबलावादक पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज ! पंडितजींचे त्यावेळी समयोचित केलेले छोटेखानी प्रोत्साहनपर आणि त्याचवेळी जिद्द निर्माण करणारे भाषण नाही, वडिलकीच्या भावनेने दिलेली समज !
ते म्हणाले, 'देखो बेटा, मेरे जैसे बुढोके साथ आज तुझे चलना है I देखता हूँ कहाँ तक तू चल सकता है, यदि मेरे साथ चल सका तो मैं समझूँगा, हम आज भी बुढ़ापेमे तुम्हारे साथ चल सकते है I (और हंसते हुए बोले ) हमने नई पिढी ठीक तैयार की और अपनी संगीत की ज्योत नई पीढ़ी के हाथ सुरक्षित है और नहीं चल सका तो सोच लेना लक्ष्य और कितना दूर है I

त्यानंतर जी अविस्मरणीय संगीत-सभा झाली त्याचे वर्णन मी काय करणार ? पं. सामताप्रसाद यांचा तबला नुसता बोलत होता आणि संपूर्ण सभा निःशब्द होऊन ते नाद-ब्रम्ह श्रवण करीत होती. माझी आणि इतरांचीही परिस्थिती 'अनंत हस्ते कमलावराने, घेता किती घेशील दो कराने' या पेक्षा वेगळी नव्हती. आवर्जून येथे सांगण्याची गोष्ट म्हणजे, बालकाला चालणे जसे वडीलधारा शिकवतो, मात्र बालकाला वाटते, आता आपण चालायला लागलो आहे तर किती चालावे आणि नाही, बालक थकत जरी असला तरी वडीलधारा त्याला थकू देत नाही, त्याचा चालण्याचा आत्मविश्वास जागवतो.
पं. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे मला अत्यंत आवडलेले आणि मी कायम लक्षांत ठेवलेले वाक्य म्हणजे - 'मेहनत की आंच पाते पाते कच्ची चीजे भी पक जाती है'
श्री. सुधीर फडके, त्यावेळी नवोदित असलेले सतारवादक, आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
ही घटना आपल्यापैकी काही जणांना आठवतही असेल ! ही आठवण चाळवली ती Champra Deshpande यांच्या उस्ताद अल्लारखा आणि झाकीर हुसेन यांच्या नुकत्याच ऐकलेल्या कार्यक्रमाच्या घटनेने ! धन्यवाद ! ------ आठवण जागवल्याबद्दल !

Thursday, July 16, 2015

सत्याचे दर्शन


बऱ्याच वेळा येथे अमुक का होत नाही, ढमुक का होत नाही, याला जबाबदार कोण, त्यांना सत्तेवरून कडून टाकले पाहिजे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजे, भारतांत आता काही खरे नाही, भारत कचरा-कुंडी झालेला आहे, आरक्षणामुळे गुणवत्ता मारली जाते, अल्पसंख्यांकांना लाडावून ठेवले आहे अथवा अल्पसंख्यांक येथील नागरिक आहेत त्यांच्यांवर अजिबात अन्याय व्हावयांस नको, जातीयता वाढली आहे ती गाडून टाकली पाहिजे अथवा आता हिंदू अन्याय सहन करणार नाही वगैरे स्वरुपाची विधाने वाचावयास मिळतात आणि प्रत्यक्ष ऐकावयास देखील मिळतात. यावर उत्तर काय असावे असा देखील खल सुरु असतो आणि प्रत्येक आपलेच मत अथवा धोरण बरोबर कसे हे देखील पटवून सांगत असतो. याबाबत चर्चा करीत नाही मात्र एक प्रसंग सांगतो, आपणांस काय समजते ते पहा, त्यातून काही उत्तर मिळाले तर सांगा आणि त्यामध्ये या सर्व परिस्थितीबदलाबाबत एखादा उपाय आहे का याचा देखील विचार करा आणि असल्यास त्यानुसार काही जमते का आणि जमल्यास काहीथोडे आचरण करता येते का पहा.

माझे एक परिचित, ज्यांना मी साधारणतः दहा वर्षांपासून ओळखतो, आमचा व्यवसाय एकच आहे, नेहमी बोलणेचालणे असते. त्यांचे आणि माझे काम बऱ्याच वेळा सारख्यांच अधिकाऱ्यांबरोबर पडते. प्रसंग आणि अनुभव त्या व्यक्तीबाबत आणि माझ्या परिचीताबाबत आहे. 

अगदी सुरुवातीला दहा वर्षापुर्वी ती एक व्यक्ती अधिकारी नव्हती ज्याबाबत हा प्रसंग आहे, आमच्यासोबतच काम करायची. त्यांचे काम यथातथा, मात्र 'मोठ्या घरातील' समजली जायची ! त्यावेळी माझ्या परिचिताचे त्याच्याशी वागणे अगदी जेवढ्यास तेवढे असे, काम पडल्यास बोलायचे किंबहुना जवळजवळ काहीही नसे त्यामानाने माझे वागणे जास्त जवळिकेचे / आपुलकीचे असे; याबाबत माझे परिचित मला नावेदेखील ठेवीत असत की मी कोणाबरोबरही आपुलकीने बोलतो. 

नंतर काही वर्षांनी बातमी आली, त्या व्यक्तीची निवड मोठ्या अधिकारपदावर होणार आहे आणि आपल्यातंच तो अधिकारी म्हणून येणार आहे, त्याबरोबर माझ्या परिचिताचे त्याच्याशी असलेले वागणे थोडे बदलले, तो आवर्जून त्यांना हसून प्रतिसाद देवू लागला, त्यांच्याशी बोलू लागला, अगदी त्याची त्यावेळी बोलण्याची इच्छा नसली तरी ! त्याचे लक्ष नसेल तर लक्ष वेधून बोलू लागला ! माझे वागणे तसेच होते; पण आता त्या व्यक्तीच्या सभोवती जास्त गराडा दिसू लागला, माझे बोलणे पाहिलेपेक्षा कमी झाले आणि मलाही वेळ मिळेनासा झाला कारण माझेही काम वाढले. ती व्यक्ती यथावकाश अधिकारपदावर गेली, आमचेवर अधिकारी म्हणून आली, आता माझे बोलणे जवळजवळ थांबल्यासारखे झाले, कारण माझे एक पथ्य आहे, ते मी नेहमी पाळतो; ते म्हणजे आपणांस कोणांस मदत करता आली नाही तरी चालेल पण त्याचे आपल्यामुळे नुकसान व्हावयांस नको. त्यामागे आपल्यामुळे कोणी अडचणीत येवू नये ही भावना ! मात्र आमचे परिचित आता त्यांना संधी मिळेल तेंव्हा किंबहुना संधी प्राप्त करून वारंवार भेटावयाचा प्रयत्न करू लागले. आता परिचित त्यांना नेहमी भेटावयाचा प्रयत्न करणे, त्याच्याबाबत गप्पांमध्ये अतिशय चांगले बोलणे, कोणी काही बोललेले थोडेजरी वावगे वाटले तरी बोलणाऱ्यास विरोध करणे असे करू लागले. 

मी एकदा सहज बोललो, 'हा अधिकारी झाल्यावर भलताच आळशी झाला आहे, अपेक्षेप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे काम करीत नाही.' या माझ्या बोलण्यावर माझ्या परिचिताची आणि माझी थोडी बोलाचाली झाली, 'अहो, माणसाने कितीही काम केले तरी कमीच आहे. घाईघाईत काम केले तर न पाहता काम करतो म्हणून बोलतांत आणि नीट समजून, सर्वांचे ऐकून काम केले तर वेळ लागणारच; मग म्हणतांत काम करत नाही. माणसाने वागावे तरी कसे ? काम करणे कठीण झाले आहे. आपल्या अधिकाऱ्यासंबंधाने असे बोलू नये.' असे त्याने मला बजावले. त्याचा हा अवतार मला नवा होता. मला समजेना पूर्वी हा त्याचेशी काहीही न बोलणारा, याचा समर्थक कधीपासून झाला आणि मला त्याचा शत्रू कसा काय समजायला लागला ? 'अहो, मी त्यांना शिव्या वगैरे देत नाही, मी त्याच्या कामासंबंधाने बोलत आहे, हे माझेच नाही तर बहुसंख्यांकांचे मत आहे. त्यांचेबाबत मी वैयक्तिक कुठे बोलत आहे ?' हा माझा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न ! मात्र त्यांना पटला नाही आणि माझा हा परिचित तावातावाने निघून गेला. 

आता त्या अधिकाऱ्यांची निवृत्ती होणार होती, त्या निरोपसमारंभाची वर्गणी कार्यक्रमाची जबाबदारी घेणाऱ्यांनी माझेकडे मागितली, मी दिली. त्या निरोपसमारंभात मला माझे हे परिचित दिसले नाही. दुसऱ्या दिवशी ते भेटल्यावर मी त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले, 'काहो, कालच्या निरोप-समारंभाचे कार्यक्रमांत तुम्ही काही दिसला नाही,' त्यांचे उत्तर, 'मला काम होते, त्यामुळे येवू शकलो नाही, वर्गणीपण देता आली नाही.' त्यांच्याकडे मी पाहिले, 'आणि खरे सांगू का, तुम्ही त्यांचे खरे मित्र ! तुम्ही होते ना ! अशा कार्यक्रमांना येवून, त्यांत पैसे खर्च करण्याव्यतिरिक्त आपणांस काय मिळते ?' 

त्याला उमगलेल्या आणि मला अद्यापही न समजलेल्या या सत्याच्या दर्शनाने मी अवाक झालो.    

Friday, July 10, 2015

ज्योतिष आणि आपण


भविष्य आणि त्याचे विविध प्रकार, जादूटोणा-तंत्रमंत्र वगैरे हे जनमानसांत आजही खूप लोकप्रिय आहेत; आणि हे फक्त आपल्या भारतातच नाही तर सर्व जगतातच दिसून येते ! मग याला कोणी शास्त्र समजो अथवा कोणी भोंदूपणा-अंधश्रद्धा-फसवणूक म्हणो ! एक मात्र नक्की, ज्यावेळी आपली बुध्दी एखाद्या विषयावर चालेनासी होते, आपणांस आपल्या समस्येवर इतरांची मदत घेवूनही उपाय सुचत नाही, त्यावेळी आपणा सर्वांपेक्षा कोणीतरी वेगळी शक्ती यामागे आहे आणि ती या सर्वांचे नियंत्रण करीत असते; ही भावना स्वाभाविकपणे होत असते आणि त्यांत फारसे काही गैर किंवा अनैसर्गिक नाही, जो पावेतो याविषयाचे कुतूहल आहे, माग शोधण्याची इच्छाशक्ती आहे आणि तसा प्रामाणिक प्रयत्न आहे तो पावेतो फारसे काळजीचे कारण नाही कारण यातूनच विविध शोध लागले आहेत, चिंतन झालेले आहे, तत्वज्ञान आणि तत्वज्ञ निर्माण झाले आहेत; थोडक्यात नवनिर्मिती झालेली आहे. मात्र या कुतूहलाचा, विषयाचा माग शोधण्याचा वापर अप्रामाणिकपणे व्हावयास लागतो त्यावेळी धोक्याची घंटा वाजते, ती सर्व समाजासाठी ! 

आज हे मुद्दाम लिहिण्याचे कारण भविष्याबाबत / पत्रिकेतील विविध ग्रहांच्या स्थानाबाबत आणि त्यांच्या जातकाच्या कुंडलीवर / फलादेशावर होणाऱ्या परिणामाबाबत विषय निघाला. मला या विषयाची आवड आहे मात्र व्यवसायाच्या व्यापामुळे एकाग्रता / तपश्चर्या ज्यांत लागते अशी कामे धावपळीमुळे नीट होत नाहीत; म्हणून मग या विषयाकडे फारसे पाहिले जात नाही. गेल्या साधारणतः १५ / २० वर्षांपासून मी याचा बैठक मारून अभ्यास असा केला नाही. हीच बाब माझ्या आवडीच्या 'तबला' या विषयाची ! असो. हे कुतूहल चाळवले आणि निदान ज्यांना यांत काही माहिती हवी आहे त्यांना काही सांगू शकतो का हा विचार आला, आणि लिहिले झाले ! उपयोगी पडले तर घ्या नाही तर विचार करू नका. 

भविष्य संबंधाने माझ्या वाचनांत जी काही पुस्तके आली त्यातील काही निवडक पुस्तके माझ्या संग्रही आहेत, त्याबाबत सांगता येईल - 
१. मुद्राशास्त्र - केदार गोस्वामी - माणसाच्या चेहऱ्यावरून, अंगलक्षणावरून, अवयवावरून भविष्यासंबंधी सांगता येवू शकते. 
२. रेखाशास्त्र - केदार गोस्वामी - आपल्या हातांवरील रेषा, त्यांचे परिणाम, ठळकपणा - अस्पष्टपणा त्यावरील छेद, जाळी, त्यावर असलेली विविध शुभाशुभ चिन्हे
३. Palmistry - Numerology - Astrology by Cheiro - यांत पाश्चात्य लेखकाचे त्यांचे भागांतील या विषयाबाबतचे मत आहे. आपले आणि त्यांचे विचार  या मध्ये खूप अथवा मूळापासून फरक नाही. 
४. हस्त चिन्ह शास्त्र -  केदार गोस्वामी - आपल्या हातावर जी विविध प्रकारची चिन्हे असतात त्यांचे जातकांचे भविष्यावर होणारा परिणाम 
५. हस्त लक्षण शास्त्र - केदार गोस्वामी - हाताची रचना, त्यावरील रेषा, उंचवटे, ग्रहांचे पर्वत, सखल भाग, त्याचा परिणाम- निष्कर्ष 
६. रत्न शास्त्र - केदार गोस्वामी - रत्नांचे विविध प्रकार, प्रत्येक ग्रहांचे रत्न, राशीनुसार वापरावयाची रत्ने, ग्रहांच्या बलानुसार वापरावयाची रत्ने, त्यांचे परिणाम, रत्न लाभणे अथवा न लाभणे म्हणजे काय, रत्न खरे-खोटे कसे ओळखणार 
७. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १ आणि २ - श्री. व. दा. भट - कुंडली म्हणजे काय ? कुंडलीची ओळख, भाव, बारा घरे - त्यांची नांवे, ग्रह स्वरूप आणि कारकत्व, ग्रहांची स्थानाप्रमाणे फले, राशी - राशीस्वामी - त्यांचे गुणधर्म, ग्रहांची दृष्टी आणि त्यांचे परिणाम, एकच ग्रहाच्या दृष्टीचे वेगवेगळ्या राशींवर आणि स्थानांवर होणारे वेगवेगळे परिणाम, नक्षत्रे, भावेश आणि त्यांची स्थानपरत्वे फळ, दशा, अंतर्दशा, विंशोत्तरी दशा, स्पष्ट ग्रह, प्रत्येक ग्रहाचे कारकत्व आणि लग्नस्थानी असल्यास होणारे परिणाम
८. असे ग्रह अशा राशी - श्री. व. दा. भट - प्रत्येक राशी आणि ग्रह यांचे एकमेकांवर होणारे परिणाम 
९. ज्योतिष योग - डॉ. नारायणदत्त श्रीमाली - ग्रह एकत्र आल्यास होणारे विविध शुभाशुभ योग आणि त्यानुसार जातकाचे भविष्य 
१०. गाथा  ग्रहांची - शांडिल्य - हे अतिशय छान पुस्तक आहे. 
११. लाल किताब 
१२. या व्यतिरिक्त नाशिक येथील ज्योतिष विषयक संस्थेने मला आठवते ते पांच  किंवा सहा खंड अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून काढलेले आहेत. ते देखील छान आहेत. 

सरतेशेवटी मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला की भविष्य बदलवू शकतो अथवा नाही या तपशीलांत जाण्यापेक्षा आपणांस जर संकटाची चाहूल लागणार असेल तर आपल्यास आपल्या सुरक्षिततेसाठी उपाय करता येतांत, येणारे संकट जाणवत नाही. डॉक्टरच्या इंजेक्शनच्या सुईपेक्षा शरीरांत अचानक घुसणारी सुई आपणांस जास्त हादरविते, वेदना देते. यावर यापेक्षा जास्त लिहीत नाही.   

Saturday, July 4, 2015

'नुकसानीपेक्षा कमी लाभ नेहमीच चालवून घ्यावा लागतो' ?

नुकतेच श्री. एकनाथ खडसे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य -'मदरसे या शाळा नाहीत' हे विधान केले. त्यावरून गदारोळ माजत आहे. त्यांनी निदान आपला १९७७ मधील शाळांसंबंधी असलेली कायद्यातील व्याख्या फक्त सांगितली. या स्वरुपाची व्याख्या ही या पूर्वीच्या कायद्यामध्ये देखील सांगितली आहे, त्यांत नवीन काहीही नाही; याचीही सर्वांना कल्पना असेल किंवा त्या सर्वांनी यांचा अभ्यास करून स्वतःला हे माहिती करून घ्यावे आणि आपले 'बकध्यान' सोडावे.

'कायद्याचे / नितीमूल्यांचे काटेकोरपणे पालन करावयाचे जाहीर करा' अशी कोणी मागणी केली अथवा तसे कोणी जाहिर केल्याने आणि विशेषतः बऱ्याच काटेकोरपणे पालन करावयाचे जाहिर केल्यास; त्यांत खूप जणांना खूप अडचणी निर्माण होतांत आणि त्यांचा सुखनैव चाललेला 'अव्यापारेषु व्यापार' धोक्यांत येतो.

ही बाब जर ---- आरक्षणासंबंधाने अथवा त्यांचेवर परिणाम करणारी होवू शकेल (प्रत्यक्षात असे नसले तरी ) अशी जाहिरात करता येईल अशा स्वरुपाची असेल / समाजातील गरिबांना अथवा कमी उत्पन्न असणाऱ्या किंवा जाहीर केलेल्या मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सोयी-सवलती (प्रत्यक्षांत जरी काढल्या जाणार नाहीत तरी) काढल्या जात आहेत असा समज निर्माण करता येईल असे वातावरण करणाऱ्या असतील / अल्पसंख्यांकांना (येथे मुस्लीम समजले जाते पण तसा उल्लेख केला जात नाही) असणाऱ्या अधिकारांना किंबहुना त्यांच्या आजपावेतोच्या कृतीकडे दुर्लक्ष होत जाणाऱ्या बाबींकडे आता दुर्लक्ष केले जाणार नाही' वगैरे ------------ अशा स्वरूपाची कोणीही विधाने केली तरी ती विधाने ही समाजविरोधी / त्यांच्या हक्कांविरोधी / समाजांत फूट पाडणारी / बेकायदेशीर आहेत असे रान जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक उठविले जाते.

येथे बहुमताच्या जोरावर दडपशाहीने 'असे कायद्याप्रमाणे वागू नये' हे देखील सांगीतले जाते, 'बहुजनांचे न ऐकल्यांस काय होईल' हे उच्चरवाने सांगितले जाते, अगदी 'रस्त्यावर उतरू, परिणामांना तयार रहा !' ही धमकीची भाषा देखील बोलली जाते. धमकीची भाषा लोकशाहीत चालते, किंवा फक्त लोकशाहीतच चालते. मग संबंधित राजकीय पक्षांना मग त्यांत त्यांचे / त्यांच्या पक्षाचे 'भविष्यातील राजकीय नुकसान' दिसते (देशाचे / समाजाचे नाही), आणि मग इतके झाल्यावर त्यांची जरी इच्छा असली तरी मग दुर्दैवाने समाजाच्या खऱ्या अर्थाने हिताची असलेली ही बाब अमलांत आणली जात नाही. गेली कित्येक वर्षे हेच सुरु आहे; आपल्याला त्याची लाज वाटत नाही तर सवय झाली आहे. 

अशा असंख्य बाबी आहेत की आजही आपण कायद्याविरुद्ध / नितीमुल्यांविरुद्ध वागत असतो, माहित असूनही वागत असतो आणि त्यांत काही सुधारणा / बदल करावा असे 'आपल्या ढोंगी पुढाऱ्यांना अजिबात वाटत नाही, कारण त्यांना जे समाजाच्या अडाणीपणामुळे पुढारीपण मिळालेले असते ते धोक्यांत येवू शकते आणि ते पुढारीपण, त्यातून मिळणारे लाभ गमविण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते. सर्वसामान्य जनतेबाबत काय बोलावे - 'मुकी बिचारी कुणीही हाका !' कारण एकदा का जनतेने त्यांना निवडणुकींत निवडून दिले की त्या निवडलेल्या उमेदवारांनीच काही आत्मघातकी निर्णय घेवून पुन्हा निवडणुका लादल्या तरच जनतेला उमेदवार बदलविण्याचा पर्याय उपलब्ध असतो अन्यथा नाही. मात्र 'जनता पक्षाच्या' सन १९७९ नंतर हा प्रयोग करण्याचे धारिष्ट्य कोणी केलेले नाही; काहीही झाले तरी सत्ता शक्यतो सोडवायची नाही असाच प्रत्येक राजकीय पक्षाचा कल असतो. अलीकडे दिल्लीतील निवडणुकीत 'आप पक्षाने' तो प्रयोग केल्याचे जनतेला आवडले नाही आणि त्यांनी यासाठी 'भारतीय जनता पक्षाला' आणि 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला (इंदिरा )' यांना जबाबदार धरून पार लोळविले आहे. 

माझी राजकीय विचारधारा ही 'या संस्कृतीशी प्रामाणिक असणाऱ्या पक्षाशी' आहे; कारण आपली संस्कृती ही विचाराने अत्यंत सहिष्णू किंबहुना एवढ्या सहिष्णुतेची आवश्यकता नाही कारण यामुळे कदाचित आपले अस्तित्वच धोक्यांत येवू शकते आणि याबाबतीत तडजोड शक्य नाही; हा आणि असे वर्तन आत्मघातकीपणा आणि मूर्खपणाचे आहे हे माझे स्वतःचे प्रामाणिक मत आहे. याची खातरजमा आपण कोणीही जगांत इतर ठिकाणी तेथे 'अल्पसंख्यांक' असलेल्यांवर काय परिस्थिती येते आणि आपल्या भारतांत 'अल्पसंख्यांकांचे' कसे लाड अगदी तत्वांना बाजूला सारून, 'भारतीय राज्यघटना' दुर्लक्षित करून कसे चाललेले आहेत हे देखील आपण पाहतोच आहे. त्यामुळे 'भारतीय संस्कृती' मानणारा पक्षच आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि अशी शंका इतरांच्याही मनांत नाही, नसते मात्र 'राजकीय लाभासाठी' ते त्यांना गैरसोयीचे असल्याने त्यांना जाहिरपणे तसे बोलता येत नाही. 

सर्वधर्मसमभाव ही भावना आपणांस कोणी शिकविण्याची आवश्यकता नाही, ती आपल्यांत उपजत, जन्मजात आहे. 'राजकीय पक्ष' आणि 'प्रामाणिकपणा' यांची जोडी लावावयाचे म्हटले तर ती अलिकडील कोणत्याही पक्षाचे वर्तनानुसार फारसी जुळणारी नाही हे कोणाच्याही लक्षांत येईल. तथापि 'आपल्या संस्कृतीशी' उघडपणे बांधील असल्याचे सध्या 'भारतीय जनता पक्ष', 'शिवसेना' हे आहेत हे कोणाच्याही लक्षांत येईल; म्हणून मला मी या पक्षाशी बांधील असल्याचे वाटत आहे इतकेच मात्र तसे नाही ! माझा कोणताही आवडता अथवा नावडता पक्ष नाही. साधारणतः १९८० चे दरम्यानची घटना असावी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो.  तत्कालीन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांनी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकींत 'कॉंग्रेसला' मदत करा अशा आशयाचे विधान केल्याचे मला आठवते. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' आणि 'कॉंग्रेस' याबाबत, त्यांच्या संबंधाबाबत मी काही कोणांसही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही; अगदी केंव्हाचेही 'कॉंग्रेसचे' वर्तन पाहिले तर ते सदोदीत 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' विरुद्धच राहिले आहे, अगदी बंदी आणण्याइतपत आणि आणीबाणीच्या कालखंडात पाहिले तर त्यांच्या स्वयंसेवकांना तुरुंगात घालण्याइतपत ! आणि असे असतांना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वोच्च नेतृत्व' असे विधान करते याचा आपण सर्वांनी आजही अर्थ लावला पाहिजे. तो कोणी लावत नाही म्हणून हा वैचारिक गोंधळ होत असतो. आपल्याशी ही विचारधारा एकदा स्पष्ट झाली की मग सर्व पक्षांबाबत काही वेगळे वाटेनासे होते आणि त्याचा संबंध 'आपल्या संस्कृतीशी आपोआपच जोडला जातो' आणि मनांत शंका राहत नाही. 

आपल्या भारतातील बहुसंख्य कायदे हे आपल्या संस्कृतीशी नाळ असलेलेच आहेत, त्यातील तरतुदी या बहुतांश कठीण परिस्थितीत कसे वर्तन असावे हे सांगणारे आहेत आणि कायदा तयार करतांना, मंजूर करतांना या सर्व बाबी पहिल्या जातात कारण कायदा बनविण्याचेही एक शास्त्र आहे त्यानुसारच तो बनवावा लागतो. मात्र अलिकडे गैरसोयीच्या बाबी या जास्त चर्चेत येत नाहीत आणि त्या चर्चेंत आल्या, दुर्दैवाने 'अल्पसंख्यांकांच्या / मागासवर्गीयांच्या / लाभार्थींच्या विरोधांत' ते जात असले, जरी संपूर्ण समाजाचा विचार करता तसे अंतिमतः नसले तरी, आपण आवई उठविण्यास कमी करत नाही, ही आपल्या संस्कृतीशी प्रतारणा आहे, याची देखील आपणांस मनातून जाणीव असते पण आपण ते कबूल करत नाही कारण ते गैरसोयीचे असते, आपल्या वैयक्तिक हिताचे नसते ! 

ज्या बाबतीत काही कायदे नाहीत तेथेही आम्हा भारतीय संस्कृतीशी नाळ सांगणाऱ्या जनतेची तत्वाशी इतकी पक्की बांधीलकी आहे की आमच्याकडून वावगे वर्तन कोणते याचा गोंधळ होत नाही; म्हणून तसा अर्थ लावत आपले वर्तन होते आणि ते सध्याचे काळी जो 'पक्ष' आपल्या संस्कृतीशी जवळीक दाखविणारा आहे, त्याची आपण भलावण करीत आहोत असा समज होतो. मात्र तसे काहीही नसते - 'नुकसानीपेक्षा कमी लाभ नेहमीच चालवून घ्यावा लागतो' हे सर्वमान्य आणि सिध्द झालेले तत्व आहे.     




Tuesday, June 30, 2015

आपण विचार करणार आहात काय ? - 'गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या'




अलीकडे मुलींना समान माना, त्यांच्यावर जन्माचे पूर्वीच त्यांना जगातून नष्ट करण्याचा जो अघोरी, निसर्गाचे विरुध्द, क्रूर आणि मानवतेला कलंक असणारे असे कृत्य करून जो अन्याय केला जातो हा केवळ त्यांच्यावरच अन्याय नाही तर आपण 'निसर्गाचे चक्र' उलटे फिरवण्याचा प्रयत्न करीत असतो. 'निसर्गाचे चक्र' उलटे फिरवण्याचा आपल्या अखंडीत प्रयत्नांस 'केदारनाथचा प्रलय', 'अत्यंत अनियमित झालेले पर्जन्यमान आणि वातावरणातील वाढत जाणारे तापमान', 'पाण्याची निरंतर खोल जाणारी पातळी - त्यामुळे पाण्यासाठी धोक्यात येणारी समाजव्यवस्था', वगैरे आपणांस आलेली फळे आपण पाहत आहोत, त्याला 'यश, प्रगती, विकास' म्हणायचे का ? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे मात्र निश्चित की यांच्या विपरीत परिणामामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे आणि त्याचा परिणाम एकमेकांच्या वर्तनावर होत आहे. या सर्वांमध्ये अजून भर पडत आहे ती 'मुलांचे अवघड होवून बसलेले विवाह कारण मुलींची कमतरता, त्यांचे समाजांत मुलांच्या तुलनेत कमी होत असलेले प्रमाण' !

मला अचानक माझ्या शाळेत मी बहुधा सातवीत असतांना शिकविलेली 'गाई पाण्यावर काय म्हणून आल्या' ही 'नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' यांची कविता आठवली. अत्यंत अप्रतिमपणे शिकविलेली ही कविता माझ्या आजही लक्षात आहे.

बापाचे दारिद्य मुलांच्या उर्मी, अपेक्षा कशा मारून टाकत असतांत मात्र ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या पण खोट्या उपायाने आपल्या बापास कसे हृदय पिळवटून टाकणारे समाधान देत असतांत. वाचा ---------------


गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
नये वदतां, अनुभवी जाणती ते !

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

Monday, June 29, 2015

महाविद्यालयांतील आठवणी -

मी जळगांवच्या 'नूतन मराठा कॉलेज'चा विद्यार्थी ! माझ्या विद्यार्थीदशेत महाविद्यालयाचे प्राचार्य होते, (कै.) डॉ. के. आर. सोनवणे आणि संस्थेचे चेअरमन होते (कै.) नानासाहेब एस. आर. चौधरी, एड्व्होकेट ! महाविद्यालयात त्यावेळी (कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक, (कै.) सेतुमाधवराव पगडी, क्रिकेटमहर्षी (कै.) दि. ब. देवधर, डॉ. गंगाधर पानतावणे, कवी आणि आकाशवाणी अधिकारी श्री. उत्तम कोळगावकर, अभिनेते श्री. अशोक सराफ वगैरे नामवंत व्यक्तींची व्याख्याने मला ऐकावयास मिळाली. 

(कै.) पुरुषोत्तम नागेश उपाख्य पु. ना. ओक यांनी माझ्या आठवणीप्रमाणे तीन दिवस व्याख्यान दिले होते. कोणत्या घटनांमध्ये ऐतिहासिकत्व कसे बघावे, त्यातून आजच्या काळातील आपण काय शिकावे, त्या घटनांचे आज काय महत्व आहे ? कोणत्याही घटनांचा आपण त्रयस्थ वृत्तीने, तत्कालीन परिस्थितीचा विचार करून, त्याची सत्यासत्यता कशी पडताळावी वगैरे ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. आम्हा विद्यार्थ्यांना हे देखील सांगितले होते की याचा उपयोग फक्त इतिहासाची आवड असणाऱ्यांनाच होणार नाही तर तुमच्या जीवनांत एखादी बाब खऱ्याखोट्याच्या कसोटीवर तपासावयाची असेल  तर त्यासाठी हे मार्गदर्शक ठरू शकेल. इतिहास कसा पाहावा - आत्मसात करावा, त्यातून आपण काय घ्यावे, पाल्हाळीक - अनावश्यक बाबी कशा दुर्लक्षित कराव्यात, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले होते. 'ताजमहाल नसून तेजोमहाल' हा त्यांचा विषयही त्यांनी तेथे 'स्लाईडस' सोबत मांडला होता. आम्हां विद्यार्थ्यांना तो आवडला आणि पटलाही होता. त्यांनी आम्हांस जरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही इतिहासाचे विद्यार्थी नसल्याने फारसा मनावर घेतला नाही. मात्र त्यांनी सांगितलेले सत्यासत्य पारखून घेण्याचे मुद्दे हे खरंच कायमच लक्षांत रहाण्यासारखे आहेत. त्यामुळे आजच्या काही 'पोस्टवर' ज्यावेळी अशोभनीय, अर्वाच्य असा त्यांच्या संबंधाने मजकूर येतो त्यावेळी हा त्यांनीच सांगितलेल्या कसोटीवर उतरत नाही.  

(कै.) सेतुमाधवराव पगडी यांच्यासारखा इतिहासाचे मुखोद्गत वर्णन करणारा, विविध भाषा जाणणारा मी प्रत्यक्ष अद्याप ऐकलेला नाही. त्यांचे आमच्या महाविद्यालयांत बहुधा तीन दिवस व्याख्यान होते, नक्की आठवत नाही. 

तेथील 'समता' या नांवाने चालणारे भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळांत मी होतो. त्यावेळी औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना यानिमित्ताने आम्ही बोलाविले होते, त्यांचे आमंत्रण स्विकारल्याचे स्वहस्ताक्षरांतील पत्र आले होते, त्यांचे अक्षर - अप्रतिम, वळणदार ! समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे गिरविलेले ! असो.        

Tuesday, June 16, 2015

सर्व संकटे पार पडून 'सत्य प्राप्त केले पाहिजे'

काल दिनांक १४ जून २०१५ चा 'Tarun Bharat' मधील Pradeep Rasse यांचा Yogesh Shukla यांनी उल्लेखित केलेला 'रिझल्ट' हा लेख वाचला. लेख चांगला आहे, त्यामुळे मलादेखील काही बाबी सुचल्या आणि सांगाव्याशा वाटत आहे. मी औरंगाबाद येथे असतो, जळगावचे वर्तमानपत्र त्यामुळे वाचायला मिळत नाही. त्यावर लगेच प्रतिक्रिया द्यावी असेही वाटत होते. आपण ठरवले आणि त्याप्रमाणे लगेच झाले हे बहुतांशवेळा आपल्या हातात नसते, तसेच झाले, 

संध्याकाळी कोर्टातून आल्यावर पाहतो तो आमच्या शेजारच्यांची मुलगी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेली असल्याने त्यापुढील अभियांत्रिकी वगैरेसाठी आमचेकडे 'Online' तिचे आवेदनपत्र भरत होती, तिला बराच वेळ लागला; इंटरनेट आणि माझ्या मुलीची कृपा ! त्या उत्साहात असलेल्या मुलीला नाराज करून लगेच प्रतिक्रिया देणे जमले नाही, त्यामुळे मी माझे कामही केले नाही. या उद्याच्या पिढीच्या अडचणी खूप आहेत, त्यात आपल्यासारख्यांनी वाढ करणे उचित नाही, करता आली तर मदत करावी, हा माझा स्वभावधर्म मी सांगण्याचे अगोदर परिचितांना माहीत पडतो. (माझ्याकडचे इंटरनेट हे आमच्या ओळखींच्या सर्वाना त्यांचेच असल्यासारखेच वाटते, ते फक्त मी घरी असल्यावर मला वापरायला देतात फक्त लवकर आटपा असे सांगत नाही, ते त्यांच्या डोळ्यांत दिसू शकते. अर्थात त्यावरही माझी काही फारशी तक्रार नसते, पण त्यावर 'त्यांची गरज तुमच्यापेक्षा जास्त असते. तुम्हाला काय तुम्ही पहाटे उठून नेहमीप्रमाणे काम कराल, ते आपल्याकडे पाहते येतात का ? येवू शकत नाही, त्यांचे काम तत्काळ केले नाही तर नुकसान होईल, तुमचे काय होणार आहे ? कोर्टाचे काम ! - माझ्या गृहमंत्र्यांची आदेशवजा प्रतिक्रिया ! यावर मी काहीही बोलत नाही - गेल्या निदान २३ वर्षांचा भरभक्कम अनुभव आहे - काहीही उपयोग न होण्याचा अपवाद कदाचित सुरुवातीच्या काही वर्षांचा असावा, पण ती आठवणही आता धूसर झाल्यासारखी वाटते. असो - 'गेले ते दिन गेले') 

विद्यार्थ्यांची आणि पालकांची अवस्था एकमेकांपेक्षा फारशी वेगळी नसते. ज्यांच्याकडे पैशांच्या थैल्या असतात ते उघडून बसलेलेच असतात आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कसेही करून उघडावी लागते, अन्यथा त्याचा परिणाम त्याच्या मुलांवर, कुटुंबावर, घरातील वातावरणावर आणि सरते शेवटी समाजावर ! आपले वागणे अलिकडे असे होत चाललेले आहे की आपण समाजात राहतो आहे किंवा नाही ही शंका यावी. समाजाच्या सुख-दुःखाशी आपणास फारसे कर्तव्य राहिलेले नाही. एकत्र कुटुंबपध्दती जवळपास मोडीत निघालेली असल्याने सर्वांचा विचार करणे शिल्लक राहिलेले नाही किंबहुना सर्वांचा एकत्रित विचार निरपेक्षपणे करणे आणि नंतर निर्णय घेणे राहिले नसल्याने, स्वार्थ बोकाळल्याने एकत्र कुटुंबपध्दती संपुष्टात आली.  शब्द हे पाळण्यासाठी असतात हे आजकाल फक्त संत तुलसीदासांनाच माहीत असावे असे वाटते. मी तर आता कोणी असे काही बोलले की 'ध्वनी निर्माण होतो' या पलिकडे त्याला महत्व देत नाही; कारण शब्दांचे पालन झाले हे त्यांनी ते पाळल्यावर मानावे, या मताचा मी झालेलो आहे. 

आपण विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांकडे लक्ष देण्याऐवजी भविष्यातील त्यास फक्त आर्थिक फायदा देवू शकतील अशा योजना आखत असतो आणि त्याची अंमलबजावणी करायच्या कामाला लागतो. मग फक्त पैसे मिळवून देणारे कोणते शिक्षण आहे तेच बघितले जाते; मग त्या शिक्षणाला आणि पर्यायाने शिक्षणसंस्थांना महत्व येते. अलीकडच्या बहुतांश शिक्षणसंस्था या व्यापार करणारी कार्यालये झालेली आहे, पिढी घडवणारी नाही, त्यांच्या उद्देशांत तसे दाखविले असल्यास, ते शासनाची परवानगी मिळवण्यासाठी दाखवावे लागते म्हणून असते. या धबडक्यात जुन्या-जाणत्या शिक्षणसंस्थांना त्यांच्याशी स्पर्धा करायची असते. मग तुलना सुरु होते - टोलेजंग इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत वाचनालय, त्यासाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी भरपूर शिक्षण-शुल्क घेण्याची संबंधित क्षेत्राकडून परवानगी, त्यासाठी किंवा नियमाप्रमाणे अपेक्षित काही गोष्टी नसल्या तर कराव्या लागणाऱ्या असंख्य खटपटी-लटपटी, मधूनच कर्मचारीवर्ग दाखवत असलेले कायद्याचे  ज्ञान त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर समस्या ! बहुतांश कर्मचाऱ्यांना कर्तव्यापेक्षा असलेल्या हक्कांची जाणीव, त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्दैवी कुचंबना ! या सगळ्यांतून शिक्षण-संस्था चालवावी लागते, विद्यार्थी मिळवावे लागतात, ते दरवर्षी सतत टिकवावे लागतात, 

पैसे मिळवणारेच शिक्षण घ्यायचे या अमलांत आणणाऱ्या आपल्या धोरणामुळे आपण कोणकोणत्या गोष्टींना मुकत चालले आहोत - 
१. पटकन नांव घेण्यासारखे नवीन साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, समाज-मदतनीस तयार होत नाहीत की जे समाजाला नवीन विचार देवू शकतील, मार्गदर्शन करू शकतील, मदत करू शकतील. सर्वांचे वर्तन हे मिळणाऱ्या पैशावर अथवा फायद्यावर अवलंबून असल्याने समाजातील प्रामाणिक वर्ग दुष्प्राप्य होत चालला असून, नवीन तयार होणे जवळपास थांबल्यासारखे झाले आहे. ढोंगी व्यक्तींची संख्या मात्र वाढलेली आहे.  
२. मुलभूत संशोधन व्हावे, त्यातून नवनवीन शोध लागावेत, आपणांस आणि समाजास ज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा राहिलेली नाही. ते महत्वाचे क्षेत्र मागे पडत चाललेले आहे. ज्या थोड्याफार जाणकारांना हे महत्वाचे आहे आपण करावे असे वाटते ते प्रयत्न करतात; त्यांचे प्रयत्न बऱ्याचवेळा विफल होतील असा आर्थिक-बाबींना महत्व देणारा आपला करत असतो. यांत आपले जातीपातीचे राजकारण, त्यांच्या सोयी-सवलती, हजारो वर्षांपासूनचे झालेले अथवा न झालेले - खरेखोटे अन्याय हे देखील परिणाम करत असतात. हे विद्यार्थी जर कमालीचे बुध्दीमान असतील तर ते कंटाळून परदेशाचा रस्ता धरतात आणि नाद सोडतात, किंबहुना अगोदरपासूनच धोरण आखून ठेवतात. ही बाब तर एवढी भीषण आणि गंभीर आहे की आपल्या समाजांत काही दिवसांनी फक्त 'कचरा-कुंड्याच' दिसतील की काय, असे वाटू लागले आहे.
३.   आपले आणि समाजाचे अंतिम हित हे देखील पैशाच्या स्वरुपात मोजले जावू लागलेले आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे प्रामाणिकपणा हा देखील आर्थिक व्यवहारावर मोजला जावू लागला आहे. पैसे नसणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त मतलबासाठी काही वेळ-काही वेळा लक्ष दिल्यासारखे करावे, झाले. याचा अत्यंत वाईट, हृदयास घरे पडणारा अनुभव आपणा सर्वाना आजचे 'राजकीय पक्ष' देत आहेत. पक्षाची विचारधारा, आदर्श, योग्य नेतृत्व, संस्कार, परंपरा इत्यादी बाबी बोलणे म्हणजे ते सुध्दा आपला वेळ वाया घालवणे आहे, असे वाटू लागले आहे.      
४. कर्तव्यपालन ही समोरच्याची जबाबदारी असते, आपण फक्त हक्काचे वाटेकरी आहोत अशी समाजभावना बनत चाललेली आहे. त्यासाठी मग सर्व क्षेत्रांत भेदभाव केला तरी चालतो त्याने आपले काहीही होत नाही असे अनुभव येवू लागले आहेत. विद्यार्थ्यांची कर्तव्ये, पालकांची कर्तव्ये आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण समाज ज्यांना नियंत्रित करतो त्याची, राज्यकर्त्यांची कर्तव्ये याचा विसर पडायला लागला आहे.     

मित्रांनो, असंख्य बाबी आहेत ! मी निराशावादी कधीही नव्हतो मात्र दिवसेंदिवस संकटे वाढत चाललेली आहेत आणि त्यातूनच आपणांस मार्ग काढावयाचा आहे आणि यशोशिखरावर पोहोचवायचे आहे, याचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये. आपले चिरंतन मार्गदर्शक म्हणूनच 'रामायण आणि महाभारत' आहेत. 'सर्व धर्मानपरित्यज्य मामेकं शरणं व्रज' - आपण भगवद्गीतेला शरण जायचे आणि त्यात सांगितलेला कर्मयोग अंमलात आणायचा. म्हणूनच आपण वनवासात असलो तरी ते कर्तव्यबुध्दीने, कष्टाने, सर्व संकटे पार पडून 'सत्य प्राप्त केले पाहिजे'.  

Saturday, June 13, 2015

आज १३ जून ! - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !


आज १३ जून ! ही दिनांक दरवर्षी येते, मात्र सेहेचाळीस वर्षांपूर्वी, १३ जून १९६९ रोजी नियतीने आपल्यातून ज्या माणसाला आपल्यातून ओढून नेले, 'असा माणूस गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुन्हा होईल का नाही ते सांगता येणार नाही' - होय ! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !

अष्टपैलू, धुरंधर, व्यक्तिमत्व ! प्रभावी वक्ते, लेखक आणि 'केशवकुमार' या टोपण नांवाने लिहिणारे उत्तम गीतकार-कवी, विडंबनकार, नट आणि एक काळ जवळजवळ आपल्या एकट्याच्या बळावर रंगभूमी जीवंत ठेवणारे समर्थ नाटककार तसेच संगीत नाटककार, सर्वोत्तम चित्रपट निर्मितीत 'श्यामची आई' सारखा आदर्शवत मराठी चित्रपट निर्माण करून समाजास आणि उगवत्या पिढीस चिरंतन तसेच उपयोगी नीतीमूल्यांची जाणीव करून देवून 'साने गुरुजींचे चरित्र' समाजात तळागाळात नेणारे आणि संपूर्ण भारतात 'पहिले सुवर्णकमळ' मिळवणारे मराठी चित्रपटनिर्माते, धडाडीचे आणि पत्रकारितेचे नवनवीन मापदंड देणारे तसेच नवीन पत्रकारांना प्रोत्साहन देवून शिक्षकाची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडून चांगले पत्रकार-लेखक तयार करणारे आणि 'मराठा' सारखे वर्तमानपत्र चालविणारे उद्योजक !

'------------- यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' असे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अक्षरशः हजारो सभा घेवून जनजागृती करणारे महाराष्ट्र राज्य निर्मितीचे अर्ध्वयू ! ज्यांच्या नांवावर आजही असंख्य खरे-खोटे विनोद खपविले जातात असे विनोदी कथालेखक, कादंबरीकार ! महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे साहित्यिक-राजकारणी ! आमच्या संतांवर प्रेम करणारा आणि वेळप्रसंगी त्यांचे विचार प्रवचनरूपाने समाजासमोर मांडणारा 'प्रवचनकार' ! शिक्षणक्षेत्रात आपल्या प्रतिभेने नवीन यशस्वी प्रयोग करणारा 'शिक्षणतज्ञ - शिक्षक' ! सर्वांत महत्वाचे म्हणजे मराठी मातीवर आणि माणसांवर प्रेम करणारे आणि त्यांच्याशी कृतघ्न नसणारा हा बलदंड मराठी माणूस ! यांच्याबद्दल काय लिहिणार आणि किती लिहिणार ? त्यांच्या एकेका क्षेत्रातील कर्तृत्वाबाबत कोणीही लिहिल्यास त्यावर असंख्य विद्यार्थी 'डॉक्टरेट - Ph. D. ' मिळवतील एवढे त्यांचे कर्तृत्व ! काही काळानंतर 'आचार्य अत्रे' या नावांच्या एकापेक्षा जास्त वक्ती होवून गेल्या असाही समज निर्माण होईल असे आणि एवढे यांचे कर्तृत्व ! असा माणूस मराठी होता आणि महाराष्ट्रांत जन्मला याचा आम्हा प्रत्येकांस अभिमान वाटला पाहिजे ! महाराष्ट्र ही अशा कर्तृत्वसंपन्न पुरुषांची जननी आहे, याचा यथार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि ते वेळोवेळी आपण दाखवून दिले पाहिजे - ही आपली जबाबदारी आहे !

त्यावेळी मी दुसरीत होतो. जळगावहून उन्हाळ्याची सुटी संपली म्हणून माझ्या आजोळहून घरी रावेरला यायला निघालो होतो; गाडीतसुध्दा 'आचार्य अत्रे' गेल्याचीच चर्चा होती. माझ्या बालमनाला हे समजेना सर्वच लोक या कोणत्या माणसाची चर्चा करत आहेत की एवढे दु:ख सर्वांना व्हावे ? प्रवास सुरु होता, मी न राहून गाडीतच माझ्या आईला प्रश्न विचारला, 'शेजारचे अत्रे वारल्याचे एवढे लोकांना कसे काय माहीत झाले ?' हा प्रश्न किती मूर्खपणाचा होता, मात्र त्यापेक्षा किती अज्ञानाचा होता, हे मला आजही जाणवते. मित्रांनो, तिने मला प्रवासांत दिलेले उत्तर माझ्या अजूनही लक्षात आहे, ती म्हणाली 'तू जे समजतो, ते हे अत्रे नाहीत. मात्र हे अत्रे किती मोठे होते हे तुला माहीत होईल, तेंव्हा तू मोठा झालेला असेल.' दुसरीच्या मुलाला जेवढे समजणे शक्य होते ते मला समजले, म्हणजे काहीही समझले नाही, मात्र 'आचार्य अत्रे' हे नांव कायमचे डोक्यात राहीले. 

त्यानंतर मी चौथीत असतांना माझ्या काकांनी, त्यांना आम्ही नानाकाका म्हणत असू ! त्यांनी माझी वाचनाची आवड पाहून माझ्या नांवाने 'राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयात' माझे नांव नोंदवून मला सभासद केले. ग्रंथपाल होते 'सोनू बुलाखी वाणी', हे आम्हा मुलांत अत्यंत कडक म्हणून प्रसिध्द होते ! मला पाहिल्यावर 'याला काय सभासद करतात? काय वाचणार आहे हा ?' या त्यांच्या माझ्याबद्दलच्या प्रतिक्रियेवर माझा त्यांच्या बद्दलच ग्रह अजूनच पक्का झाला' एवढेच नाही तर त्यांना पुस्तकाबाबत काहीही समजत नाही याची भर पडली. मात्र तरीही नानाकाकांनी दरमहा ५० पैसे अशी सहा महिन्यांची एकूण वर्गणी ३ रुपये भरली आणि मी सभासद झालो. (दरमहा ५० पैसे यावर जावू नका - त्यावेळी आमच्या गांवाला झणझणीत मिसळ १५ पैशांला मिळत होती. हिशोब करा - 'एका डॉलरचे किती रुपये होतील' या चालीवर)

त्यानंतर आचार्य अत्र्यांची वाचनालयात असणारी जवळजवळ सर्वच पुस्तके मी वाचली. मग नाटके - 'साष्टांग नमस्कार', 'घराबाहेर', 'भ्रमाचा भोपळा', 'उद्याचा संसार', 'लग्नाची बेडी', 'मोरूची मावशी' आणि 'तो मी नव्हेच' हे वाचण्यासोबतच रंगभूमीवर पहाण्यास मिळाले ! 'मी कसा झालो' 'हशा आणि टाळ्या' त्यांचे 'कऱ्हेचे पाणी' यांचे सर्व खंड वाचले. 'समाधीवरील अश्रू' वाचले. 'मराठी माणसे - मराठी मने' हे त्यांचे पुस्तक आम्हांस, महाविद्यालयात पहिल्या वर्षाला अभ्यासाला होते. असे समृध्द, विचारप्रवर्तक, कसदार साहित्य आपणास वाचावयास मिळाले पाहिजे आणि ते आपण 'कोणत्या जातीच्या माणसाने लिहीले आहे ?' याचा विचार न करता वाचले पाहिजे - अर्थात आपणांस आपली प्रगती व्हावी असे वाटत असेल तरच !

तत्कालीन समाजाचा समर्थपणे मुकाबला करून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 'अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत' सहकार्य करणारा हा जन्माने 'ब्राह्मण माणूस' यांचे भान आपण आजच्या समाजाच्या जातीविषयक अत्यंत प्रदूषित वातावरणांत अवश्य ठेवले पाहिजे आणि अशा कर्तृत्ववान माणसांच्या भूमीत राहणाऱ्या आपण दिवसेंदिवस जाणीवपूर्वक वाढवत नेणारी ही जातीयता आणि ढोंगी सहिष्णुता संपविली पाहिजे - आपल्या, समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी !  आज हे आठवले कारण ती आहे एक माझ्या शालेय जीवनातील, न समजणाऱ्या काळातील पण माझ्या कायमच्या स्मरणांत राहून गेलेली ही १३ जून १९६९ ची आठवण !

आपणासाठी त्यांच्या 'संगीत प्रीतीसंगम' या नाटकातील एक पद -
किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार ?
लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार

लोखंडाचे गुणदोष बघे का परीस
लेकराची कासावीस माहीत आईस !

पाण्यामाजी तूच देवा तारीले पाषाण
ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन !

कठीण तो मायापाश सुटेना कोणास
कपाळीचा टळेनाही कोणा वनवास !

अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत

कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया ?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया !

Tuesday, June 2, 2015

'सत्यवान आणि सावित्री'

आपल्या भारतांत कमालीची पतीनिष्ठा दाखविणाऱ्या पतिव्रता या 'अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी' मानल्या जातात. पतीला अनुकूल वागणाऱ्या या पतिव्रता ! मात्र 'सावित्री'चे कथानक हे महाभारतातील उपकथानक आहे. महर्षी व्यासांच्या प्रतिभेबद्दल काय सांगावे ? 'जगतात जे काही आहे ते व्यासांनी मांडलेले आहे म्हणजे उष्टे केलेले आहे' असे म्हटले जाते; आणि खरोखर कित्येक कल्पना विचार हे आपण पाहिल्यास त्याची बीजे आपणांस महर्षी व्यासांच्या या अवाढव्य, प्रचंड वाङ्ग्मयात सापडतात; मग कदाचित त्यांचे वाङ्ग्मय वाचले असले अथवा नसले, माहित असले अथवा नसले तरी त्याने फारसा फरक पडत नाही. 

मला ही 'सत्यवान आणि सावित्री' यांची कथा आणि त्यातील भाव थोडा वेगळा वाटतो, येथे मी कथा सांगणार नाही, ती आपणा सर्वांना माहित आहे. नेहमी पतीस अनुकूल असणे, मग त्याचे बरोबर आहे किंवा नाही याचा विचार न करता त्याला साथ देणे, ही बाब वेगळी आहे. मात्र आपण निवडलेल्या जोडीदाराचे भविष्य प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी सांगितल्यावरही, आपल्या निवडलेल्या जोडीदाराला न डावलता, दुसरा जोडीदार न निवडता, त्या जोडीदाराला नंतर सोडून न देता; त्याच्यावर आलेल्या संकटात अगदी दैवी संकटांत देखील खंबीरपणे साथ देवून, आपल्या समयसूचकतेची, बुध्दीची, धीराची, पातिव्रत्याची, नितीमत्तेची परीक्षा देणारी ही, 'धर्मराज यमाच्या' सर्व परीक्षांत उत्तीर्ण होते. त्यास प्रत्यक्ष मरणाच्या दाढेतून सोडवून आणणारी ही 'सावित्री' मला या पांचही पतीव्रतांपेक्षा कांकणभर सरसच वाटते. लौकिकार्थाने जरी सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमधर्माकडून परत आणून त्यास जिवंत केले असले तरी आपल्या या अलौकिक कर्तृत्वाने सावित्री या जगतात अजरामर झालेली आहे.

 या निमित्ताने अजून एक बाब ठळकपणे सांगाविशी वाटते की आपल्या चित्रपट सृष्टीचे जनक 'दादासाहेब फाळके' यांनी सन १९१४ मध्ये 'सत्यवान सावित्री' या नांवाने मूकपट तयार आणि दिग्दर्शित केला होता, हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. त्यानंतरही विविध भाषांमध्ये या कथेवर चित्रपट निघाले आहेत. यातून समाजावर या कथामृताचा असलेला प्रभाव दिसतो. पतीसाठी पर्यायाने कौटुंबिक सहजीवनासाठी प्रत्यक्ष पतीचे प्राण हे त्यास मृत करणाऱ्या यमराजाकडून परत आणणे ही अजिबात सामान्य गोष्ट नाही, हे आमच्या स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आहे, हे या कथेने ठळकपणे दाखवून दिलेले आहे आणि हे चिरंतन मूल्य आपल्या संस्कृतीस देणारी सावित्री ही आपल्या समाजाची सांस्कृतिक प्रतिनिधी आहे, समाजाचा भक्कम आधार आहे.

रामायण, महाभारत प्रत्यक्षात झाले किंवा नाही ? त्यामुळे समाजात धार्मिक तेढ वाढते का ? त्यातून सर्वधर्मभावास, सहिष्णु वृत्तीस हानी पोहचते का ? वगैरे निरोद्योगी प्रश्न निर्माण करून आणि अनावश्यक कर्मकांडाकडे दुर्लक्ष केले आणि आपण आपल्या संस्कृतीतील अशी चांगली तत्वे घेतली तर ती निश्तितच आपल्या सुवर्ण-युगाची नांदी ठरेल.   

(सोबत महान चित्रकार 'राजा रविवर्मा' याची या विषयावरचे चित्र देत आहे.) 

Tuesday, May 26, 2015

- आणि तिला संस्कृतने वाचविले !


मित्रांनो, amarujala.com यांत मी एक संस्कृतसंबंधाने बातमी या goo.gl/J2eHSH लिंकवर वाचली. बऱ्याच जणांना यांत अतिशय गंमत वाटली, काहीना हेवा वाटला, काहीना संस्कृत शिकून मुर्खासारखे काय करणार आहे? ती कालबाह्य भाषा आहे; असेही वाटले, काहींना हा 'ब्राह्मणी कावा' वाटला कारण आपल्या 'जातीयवादी मूर्ख लोकांनी सर्व बाबी या जातीजातीत वाटून घेतल्या आहेत; अगदी देवदेवता, महापुरुष सुध्दा ! त्यांच्या मूर्खपणापुढे मती गुंग होते आणि समाजविघातक असलेल्या 'अशा बुद्धीवंतांचे' वाईट वाटते. मित्रांनो, आपली संस्कृती कधीही विचारविन्मुख करणारी नव्हती तर ती नेहमीच विचार प्रवर्तक, नवनवीन विचार देणारी राहिलेली आहे. भारताने या जगतास हे न परतफेड करण्याजोगे उपकार केलेले आहे; जगातून दूर-दूरहून पायपीट करून येथील विद्यापीठात शिक्षण घ्यावयास विद्यार्थी येत असत; शिक्षण घेवून आपल्या देशांत या भारतभूमीच्या ज्ञानसंपन्नतेचे नांव घेवून जात असत, 'भारताच्या ज्ञानसंपन्नतेची ही पताका त्यांच्याही देशांत फडकावीत असत. हे आपणांस अभिमानाचे होते आणि आजही आहे. मात्र नंतर 'ज्ञानशत्रू', असलेल्या असंस्कृत, दुष्ट, क्रूर आणि या संपूर्ण जगताचे ज्ञानशत्रू लुटारूंनी आपल्या भारतभूमीवर आक्रमण केले आणि संपत्ती लुटीसोबतच, अंगावर आजही काटा आणणाऱ्या कृत्यांबरोबरच त्यांनी आमच्या ज्ञानसंपादनाची ही केंद्रे त्यांनी भुईसपाट करून फक्त आमचेच नाही तर संपूर्ण जगताचेच कायमचे नुकसान केलेले आहे. ज्ञानसंपादनास विरोध करणारे हे संपूर्ण जगताचेच शत्रू आहेत आणि अशा प्रवृत्तीच्या कोणासही, 'तो कोण आहे' याचा कसलाही विचार न करता, आपण सर्व समाजाने त्याचा कठोरपणे विरोध करून त्याची अशा तऱ्हेची कृत्ये हाणून पाडली पाहिजेत. तो कितीही सबळ असला आणि त्याला कोणाचाही पाठींबा असला तरी आपणा सर्वांना एकत्रितपणे पाउल उचलल्यास काहींही अशक्य नाही. असो.

कर्नाटकांत शिमोगा शहरापासून जवळपास १० किलोमीटर दूर, तुंग नदीच्या किनारी असलेल्या मुत्तुर या गांवी सर्व गांववासी हे अगदी आपसांत देखील संस्कृत भाषाच पूर्वापारपासून बोलत आलेले आहे. यावरून मला एक अतिशय गमतीदार घटनेची आठवण झाली. 

माझी एक नातेवाईक-मुलगी कॉलेजला जाणारी होती, आता ती अर्थशास्त्रात 'Ph. D.' मिळवती झालेली आहे, मात्र तिच्या महाविद्यालयीन काळातील ही घटना असावी. ती कलाशाखेची - अर्थशास्त्र हा विषय घेतलेला ! संस्कृत हा तिचा आवडता विषय पण, ही आवड तिला तिच्या आईकडून मिळाली, ती संस्कृतची जाणकार, पदवी-द्विपदवीधर ! या मुलीला शालेय अभ्यासक्रमांत जेवढे संस्कृत शिकावयास मिळाले असेल तेवढेच ! ती स्वस्थ बसली नाही, 'संस्कृत भारती'च्या माध्यमातून तिने संस्कृतची इतकी उत्तम तयारी केली की ती संस्कृत सहजपणे, ओघवते आणि संभाषणात बोलू लागली, कोणासही समजण्यासारखे बोलू लागली, तिची ही प्रगती पाहून विविध ठिकाणी 'संस्कृत वर्ग' घेण्याची जबाबदारी 'संस्कृतभारती'ने तिचेवर वेळोवेळी सोपविली, तिने ती समर्थपणे पार पाडली आणि आजही यथाशक्ती पार पाडत आहे. आपणा सर्वांना अभिमानाचा विषय आहे. पण येथे आज हा विषय नाही, एकदा मी तिच्याकडे गेलो होतो, ती घरी नव्हती, थोड्या वेळांत बाहेरून आली आणि एकदम हसू लागली. 'काय झाले ?' मी विचारणा केली, 'गम्मत झाली' असे म्हणत पुंन्हा हसू लागली, तिला बोलता येईना. थोड्यावेळाने जरा सावरल्यावर तिने सांगितले. 

ती कॉलेजला जातांना दुचाकी चालवण्याचा परवाना घाईघाईने घरीच विसरून गेली होती. घाई असल्यावर नेहमी कोणत्याही कारणाने जसा उशीर होतो, त्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम रस्त्याने जातांना रस्त्यावर वाहतूकनियंत्रकाने तिला थांबविले, दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला; तो घरी असल्याने दाखविता येत नव्हता, येणार नव्हता, हे तिला माहीत होते. महाविद्यालयातील मुलगी, तिला एक कल्पना सुचली, सर्व संभाषण संस्कृतमधून करायचे ठरवले, मराठी अजिबात समजत नाही असे धोरण स्विकारले, तिने त्या वाहतूक-नियंत्रकाला संस्कृतमध्ये 'काय म्हणतोस ?' म्हणून विचारले, त्याला समजेना, 'काय म्हणाली' ही पोरगी ? तो बुचकळ्यात पडला, उत्तर दिल्याचा आवाज तर आला पण त्याला काहीच समजले नाही. 'हे पहा पोरी,जास्त गडबड नाही, 'लायसन' दाखव, नाहीतर पावती फाडावी लागेल.' तिने 'तुम्ही काय म्हणत आहे, हे मला समजत नाही, मला समजेल अशा भाषेत बोला' असे संस्कृतमध्ये सांगितले. त्याला काहीच समजले नाही. 'ए पोरी, मला वाटेल ते बोलू नको, चांगल्या-चांगल्यांना सरळ केले आहे. मुकाट्याने 'लायसन' दाखव नाहीतर पैसे भर.' मात्र संभाषण अर्थात एकतर्फी संभाषण हे शांतपणे आणि एकाबाजूने संस्कृतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने मराठीत होत असल्याने 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी' अशी परिस्थिती होती. तिला त्याचे सर्व समजत होते, त्याची मात्र हिच्या उत्तरावर 'फक्त एक आवाज' यापेक्षा जास्त प्रगती नव्हती. असा चमत्कारिक आणि विचित्र अनुभव त्याला त्याच्या आयुष्यांत पहिल्यांदाच येत असावा. कोणाचीही गाडी थांबविल्यावर, कागदपत्रांची मागणी केल्यावर थोड्याच वेळात कागदपत्र दाखविले जायचे आणि ते बरोबर कसे नाहीत, त्यामुळे नियमभंग कसा झालेला आहे, आपणास नियमभंग कसा अजिबात सहन होत नाही, आपणांस नियमाप्रमाणे कसे काम करावे लागते वगैरे सर्व ऐकविल्यावर थोड्यावेळाने समोरच्या समोरच्याच्या खिशातून पैसे बाहेर यायचे नाहीतर तो मोबाईलवरून कोणाला तरी फोन करायचा आणि मग सर्व कागदपत्र बरोबर असल्याचा साक्षात्कार त्याला व्हावयाचा. त्यानंतर 'हे अगोदर का नाही सांगितले?' अशा भरतवाक्याने त्याची सांगता व्हायची. 

येथे आता फारच विचित्र परिस्थिती झालेली होती कारण या दोन्हीपैकी काहीही होत नव्हते, तर काय होत आहे हेच त्याला समजत नव्हते. गर्दी जमायला लागली होती, अर्थात ती आपल्याकडे सर्वात लवकर जमते. त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर, गर्दीतील जनता हसू लागली कारण असे नाटक अथवा अशा 'संस्कृत-मराठी' नाटकाचा हा  अभिनव प्रयोग ज्यातील संभाषण त्या नाटकांतील पात्रांनाच एकमेकांना समजत नाही' हे ते देखील प्रथमच पहात असावे. अर्थात त्यांनाही समजत होते अशातील भाग नाही मात्र हा वाहतूक-नियंत्रक चमत्कारिक पध्दतीने आणि विचित्ररितीने अडचणीत आला आहे, यातच ते सर्व खुषीत होते. तिने एक काळजी मात्र घेतली होती, तिचा स्वर अत्यंत नम्र होता, वडिलधाऱ्या माणसाशी बोलावे असाच होता, पण संभाषण संस्कृतमध्येच, की ज्याचा त्या वाहतूक-नियंत्रकाचा संताप वाढविण्यापेक्षा, हतबलता वाढविण्यापलिकडे दुसरा कोणताही उपयोग नव्हता. यामुळे हळूहळू त्याचा आवाज अजून वाढू लागला, जसा आवाज वाढू लागला तशी गर्दी अजून वाढू लागली, जशी गर्दी अजून वाढू लागली तशी इतरत्र जे निवांतपणे गम्मत पाहत होते त्यांनाही 'हे केंव्हाचे काय सुरु आहे ? एका मुलीशी हा ' Traffic Police' केंव्हाचा काय डोके लावून राहिला आहे ? याचा खुलासा व्हावा म्हणून ते देखील तेथे जमले, गर्दी अजून वाढली कमी होण्याचे नांव नाही. 

गर्दीतील जनता आता गमतीने संभाषणात भाग घेवू लागली, म्हणजे 'वाहतूक-नियंत्रक' आणि 'जनता' असे संभाषण सुरु झाले; कारण सुरुवातीला तिच्याशी त्यांनीही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यावेळी संस्कृतशिवाय कोणतीही भाषा येत नसल्याने, तिचे आणि जनतेचेही संभाषण फार काळ चालू शकले नाही. गर्दीतील जनतेचीही परिस्थिती ही बरीचशी त्या 'वाहतूक-नियंत्रकासारखी' झाली मग त्यांना त्याची अडचण लक्षात आली. 'अहो, काय झाले ?' लोकांनी विचारले, 'पोरगी लायसन दाखवत नाही, अहो आमची काय ड्यूटी-बिटी आहे की नाही ? च्या मारी, तिला काहीबी विचारा, ती काय बोलते ते समजत नाही. बर, पोरगी गरिबावानी बोलते आहे तर आपण केस कशी काय करा ? पोरगी चांगल्या घरची वाटते, तिला त्रास देण्यात आपल्याला काय मजा वाटते काय ? पण हे निष्कारण त्रांगडे झाले, मी काय बोलतो ते तिला समजत नाही अन ती काय बोलते ते मला समजत नाही. साल्या, या भारतामध्ये किती भाषा आहेत कोणांस ठाऊक ? कोन कोणत्या भाषेत बोलेल याचा नेम नाही आणि आम्हाला अशा लोकांशी बोलत ड्युटी करावी लागतेय. दिवस कठीण आलेय. ' वगैरे वगैरे ---

शेवटी काहींच्या लक्षांत आले, ती संस्कृतमध्ये बोलत आहे. मग त्यांनी वाहतूक-नियंत्रकास 'पोरगी संस्कृतमध्ये बोलत आहे.' हे सांगितले. त्यावर त्याचा स्वर थोडा बदलला, 'पोरी, तू शिकलेली दिसते, चांगल्या घरची आहे. तुझ्याजवळ लायसन नाही हे मला माहीत आहे, पोरी, आमचे हे केस विनाकारण पांढरे झालेले नाहीत. पण तू देवाची भाषा बोलते आहे, अगदी मराठीसारखी बोलते आहे, मला कौतुक आहे. आम्ही आमची मराठीपण नीट बोलू शकत नाही आणि तू देवाची भाषा बोलते ! आम्हाला मात्र साहेबांची भाषा हवी आणि तू आपल्या मराठीच्या मायची, तिच्या आजीची भाषा बोलते, शाब्बास ! मी का तुह्यावर केस करणार होतो ? पण पोरी लक्षात ठेव, सर्व दिवस सारखे नसतात, प्रत्येक वेळी माझ्यासारखेच भेटतील असे नाही, तू निष्कारण अडचणीत येशील. येथे गरिबाला मदत करण्यांस कोणी तयार होत नाही, त्याला अडचणीत आणतात. आता जा, यापुढे मात्र गाडी चालवितांना लायसन ठेवत जा, ते दुसऱ्याबी कामांत येते. घाई हलगर्जीपणा कामाचा नाही. जा निवांतपणे कामाला जा !'