Sunday, October 20, 2019

थोर गुरुपरंपरा असणारा - मातंग समाज !


थोर गुरुपरंपरा असणारा - मातंग समाज !
 सकल जगताला आपल्या भगवद्गीतेतील तत्वज्ञानाने दिपवून टाकणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण ? हा प्रश्न आपल्यापैकी कोणाला पडत नसेल. त्यावेळी गुरुगृही जायचे, ते गुरुची ज्ञानसाधना किती आहे हे पाहून, हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. उज्जैनी वनात एक सांदीपनि नावाचे मातंग ऋषी परिवारासह राहत असत, चार वेद ग्रहण केलेले,पचविलेले, अहंकारविरहित असे हे ऋषी. अरण्यात शिन्दीची झाडावरील पनाळ्या ते आपल्या मंत्र उपचाराने झाडावर न  चढता तोडत असत, त्यामुळे त्यांचे नाव  शिंदी पाल पडले होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम तसेच त्यांचा मित्र सुदामा यांना सांदिपनी ऋषीकडून अनुग्रह प्राप्त झाला आहे, ते त्यांचे गुरु आहेत ही भावना !  श्रीकृष्ण,बलराम ,सुदामा हे सांदीपनी ऋषीकडे आश्रमात चौसष्ट दिवस होते . या काळात त्यांनी सर्व विद्या आपल्या गुरूंकडून अवगत केल्या. 'तुला रे भगवंता काय शिकवायचे ?' असे म्हणणारे सांदिपनी ऋषी, हे आपले गुरुचे कर्तव्य मात्र चोख बजावत होते. शिवशक्तीच्या दहावा अवतार पैकी नववा अवतार, शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला . मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवताची वरदायिनी  आहे. मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजीले जाते . दक्षिण भारतात मातंगीस  मांगम्मा असेही म्हणतात .तिरुपति ,बालाजी ,चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत . आंध्र ,गुजरात ,तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत. महालक्ष्मी तुळजापुरची देवी ही मातांगाचीच आई आहे, ही भावना आहे.
आपल्या कोणाच्याही मनांत जातींबद्दलच्या श्रेष्ठत्वाबद्दल अथवा कनिष्ठतेबद्दल प्रश्न निर्माण झाले, किंवा केले गेले, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, 'परमेश्वराने कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणून जन्माला घातले नाही. जो तो आपल्या कर्माने 'श्रेष्ठ अथवा कनिष्ठ' होतो आणि ठरतो. आपल्याला श्रेष्ठ व्हायचे का कनिष्ठ व्हायचे, हे आपण आपलेच ठरवावे आणि त्याप्रमाणे आपले कर्म करावे.' आपले वाडवडील चिरंतन सत्य सांगून गेले आहेत की, ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये. सुरुवातील अत्यंत छोटी, क्षुद्र वाटणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते, त्यावेळी तिचे पूर्वीचे, जन्मजात असलेले लघु रूप आपल्याला विसरावे लागते, ते तिच्या कर्तृत्वाने ! आपल्या समाजाचा एक भाग असलेला, प्राचीन गुरुकुलाची परंपरा असलेला, हा मातंग समाज, या अवस्थेत का, कसा आणि कोणामुळे, कोणत्या चुकीमुळे आला, याचा विचार केवळ त्याच समाजाने नाही, तर आपण सर्वानीच करायला हवा. ती करणे समजली, म्हणजे आपल्या कर्तृत्वाला पायबंद कशामुळे बसू शकतो, आपली प्रगतीची घसरण का होते हे आपल्याला समजू शकेल, त्यावर उपाययोजना करता येईल. समाजाची जशी गरज असते, त्यानुसार समाज ती गरज भागवत असतो. बारा बलुतेदार आणि बारा अलुतेदार, हा त्याचाच परिपाक ! समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी, जी विविध कर्तव्ये तत्कालीन समाजधुरीणांनी नेमून दिली, त्यांच्या व्यवसायावरून व कर्तव्यावरून, ही गेल्या काही काळांत दिसत असलेली जातीव्यवस्था निर्माण झाली. आज याचे पूर्वीइतके स्वरूप उरले नाही, हे आपल्या शिक्षणाने, समजुतीने !
गावाचे रक्षण करणाऱ्या जमातीतील जी मंडळी होती, त्यातील हा 'मातंग समाज' ! हिंदू धर्मातील मूळचा रांगडा, आक्रमक, प्रामाणिक असलेला हा समाज, गावचा संरक्षणकर्ता होता. गावाचे संरक्षण करायचे तर स्वाभाविकपणे, गावांत शिरण्याच्या वाटेवर यांचा पहारा तथा वस्ती असायची. यांच्यातील परंपरेने आलेला हा गुण शिवाजी महाराजांनी ओळखला, म्हणून त्यांच्या काळांत त्यांनी काही ठिकाणी गडांचे, घरांचे, चौक्यांचे पहारे ताठ किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, ही या समाजाकडे सोपविली होती. महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या शिलेदाराची घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या, मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले, बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळांत, इंग्रजांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या लोकांना, समाजाला वैयक्तिकपणे अथवा सामूहिकपणे कोणत्यातरी मार्गाने त्रास देण्याची योजना केली होती. त्यांत त्यांनी रामोशी, मातंग अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरविले, त्यांना गावातून तडीपार केले, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, तेंव्हा या समाजातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधांत गांवागांवातून संघर्ष केला, या समाजातील उस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतीकारकांना आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. अनेक शूरवीर या तालमीतून तयार झाले होते. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे यांच्याच तालमीतले !
(पूर्वार्ध)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा थोर साहित्यिक देणारा - मातंग समाज !
आपल्या काही काळापासूनच्या चुकीच्या वागण्याने, तत्कालीन समाजाने अथवा राज्यकर्त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे, जे काही दोष निर्माण झाले होते, त्यामुळे समाजाच्या ऐक्याला धोका पोहोचविणारी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून मार्ग काढण्यासाठी जे विविध मार्ग सुचविले, विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी केली गेली, त्यांत 'सामाजिकदृष्टया, सामाजिक परिस्थितीने जे मागासलेले आहेत, त्यांना सामाजिकदृष्ट्या बरोबरीला आणण्यासाठी विशेष संरक्षण दिले गेले, त्याच्या विविध याद्या बनविल्या गेल्या, त्या याद्यांनाच आपण 'अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जाती' वगैरे म्हणतो. त्यांच्या उत्थानासाठी आपल्या भारताने जी राज्यघटना स्विकारलेली आहे, त्यांत यांचा समावेश करून, समाजन्यायाच्यादृष्टीने विशेष सवलती दिलेल्या आहेत. मातंग हे 'अनुसूचित जातीत' समाविष्ट केलेली जात आहे.
यांचे मूळस्थान नर्मदेच्या खोऱ्यातील असल्याचे मानले जाते, मात्र सध्या बहुसंख्येने महाराष्ट्रात रहिवासी आहेत, तरी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, दीव, दमण, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथेही हे आढळतात. यांचा मूळ व्यवसाय केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे, झाडू बनविणे, बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू, जसे -  परडी, सूप, तसेच शुभप्रसंगी आपल्या घराला बांधावयाची तोरणे बनविणे आणि हलगी वाजविणे तसेच गुरांचे खच्चीकरण, चामडे कमविणे, सुईणीकाम, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा, सोपविलेले काम करणारा, असे यांचे मूळ, पारंपरिक व्यवसाय होते. या शिवाय काळाच्या ओघात हे पारंपरिक व्यवसाय जाऊन त्याचे रूपांतर रोजगारात झाले. आता आपल्या परंपरागत व्यवसायापासून अलिप्त होऊन आपली पारंपरिक शेती करणे, शिक्षण घेऊन विविध उद्योगांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये हा समाज आपले अस्तित्व दाखवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या 'अस्पृश्यताविरोधी चळवळीत' यांनी सहभाग घेतला होता. मातंग हे मांग, माडिगा, महाडिगा या नावाने पण ओळखले जातात. या जातीत १५ पोटजाती मानल्या आहेत, त्या मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे अशा सांगता येतील. भारताच्या प्रगतीत भरीव कार्य करणारे लहुजी वस्ताद साळवे, थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, एकनाथ आवाड, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांची शिष्या मुक्ताबाई साळवे याच समाजातील ! संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेल्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावंकर, शाहीर विठ्ठल उमप, याच समाजातील ! आचार्य हरिकेशी, तीर्थंकर महावीरांचे शिष्य असलेले, दोघे बंधू मुनी चित्त संभूती विजय, यमपाल मातंग हे पण याच समाजातील. मात्र राजकीयदृष्टया म्हणावे तसे नेतृत्व, हे बहुसंख्येने या समाजातून आलेले दिसत नाही.
शासनाने हा समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी, याच्या आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय उत्थानासाठी भरीव कार्य केले आहे, अजूनही करीत आहे. त्यांत साहित्याचार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करून, त्यामार्फत दोरखंड तयार करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, घायपात या वनस्पतींपासूनच्या विविध वस्तू बनविणे, निर्यात करणे यासाठी मदत करणे, उद्योगासाठी आर्थिक मदत आणि कर्ज उपलब्ध करून देणे हि कामे केली जातात.     
मातंग ऋषीचे वंशज मानले जाणारे असल्याने आपल्याला मातंग म्हणवून घेतात. सूर्यचंद्राचे ग्रहण हे राहूकेतूने त्यांना गिळण्याचा प्रयत्न केल्याने होते, ही भावना आणि म्हणून, सूर्यचंद्राला मुक्त करण्यासाठी मातंग समाजाला दानधर्म केला जातो, ही पूर्वीची समाजातील भावना. या समाजातील मुलाचे वडील, हे मुलीच्या वडिलांकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातात. काहीवेळा लग्नात मुलीला मुलाकडून रक्कम द्यायची पद्धत आहे. लग्नांत गहू, तांदूळ एकत्रित बांबूच्या टोपलीत कुटण्याचा विधी असतो. सप्तपदी, आंबापूजन हा विधी लग्नांत असतो. शंकर, विष्णू, खंडोबा, बहिरोबा आदि दैवते असतात. पंढरपूरच्या यात्रेचे विशेष महत्व हे जाणतात.
अलिकडे मात्र आपल्या धर्मातील हे बांधव, मधल्या काळांत पूर्वीच्या चुकीच्या कल्पनांनी काहीसे दूर लोटले गेल्यासारखे झाले होते, ते जवळ आणण्याचा मनापासून, जाणीवपूर्वक आणि अभिनंदनीय प्रयत्न आपण सर्वांकडून होतांना दिसत आहे. याला प्रतिसाद, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, राजकीय पक्ष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याआमच्यासारखे सामान्य लोक देत आहेत.

(उत्तरार्ध)

7.10.2019

Image may contain: 8 people, including Dnyaneshwar Desai Patil and Prashant Kodnikar


Image may contain: 2 people, including Dnyaneshwar Desai Patil

No comments:

Post a Comment