Tuesday, June 2, 2015

'सत्यवान आणि सावित्री'

आपल्या भारतांत कमालीची पतीनिष्ठा दाखविणाऱ्या पतिव्रता या 'अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी' मानल्या जातात. पतीला अनुकूल वागणाऱ्या या पतिव्रता ! मात्र 'सावित्री'चे कथानक हे महाभारतातील उपकथानक आहे. महर्षी व्यासांच्या प्रतिभेबद्दल काय सांगावे ? 'जगतात जे काही आहे ते व्यासांनी मांडलेले आहे म्हणजे उष्टे केलेले आहे' असे म्हटले जाते; आणि खरोखर कित्येक कल्पना विचार हे आपण पाहिल्यास त्याची बीजे आपणांस महर्षी व्यासांच्या या अवाढव्य, प्रचंड वाङ्ग्मयात सापडतात; मग कदाचित त्यांचे वाङ्ग्मय वाचले असले अथवा नसले, माहित असले अथवा नसले तरी त्याने फारसा फरक पडत नाही. 

मला ही 'सत्यवान आणि सावित्री' यांची कथा आणि त्यातील भाव थोडा वेगळा वाटतो, येथे मी कथा सांगणार नाही, ती आपणा सर्वांना माहित आहे. नेहमी पतीस अनुकूल असणे, मग त्याचे बरोबर आहे किंवा नाही याचा विचार न करता त्याला साथ देणे, ही बाब वेगळी आहे. मात्र आपण निवडलेल्या जोडीदाराचे भविष्य प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी सांगितल्यावरही, आपल्या निवडलेल्या जोडीदाराला न डावलता, दुसरा जोडीदार न निवडता, त्या जोडीदाराला नंतर सोडून न देता; त्याच्यावर आलेल्या संकटात अगदी दैवी संकटांत देखील खंबीरपणे साथ देवून, आपल्या समयसूचकतेची, बुध्दीची, धीराची, पातिव्रत्याची, नितीमत्तेची परीक्षा देणारी ही, 'धर्मराज यमाच्या' सर्व परीक्षांत उत्तीर्ण होते. त्यास प्रत्यक्ष मरणाच्या दाढेतून सोडवून आणणारी ही 'सावित्री' मला या पांचही पतीव्रतांपेक्षा कांकणभर सरसच वाटते. लौकिकार्थाने जरी सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमधर्माकडून परत आणून त्यास जिवंत केले असले तरी आपल्या या अलौकिक कर्तृत्वाने सावित्री या जगतात अजरामर झालेली आहे.

 या निमित्ताने अजून एक बाब ठळकपणे सांगाविशी वाटते की आपल्या चित्रपट सृष्टीचे जनक 'दादासाहेब फाळके' यांनी सन १९१४ मध्ये 'सत्यवान सावित्री' या नांवाने मूकपट तयार आणि दिग्दर्शित केला होता, हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. त्यानंतरही विविध भाषांमध्ये या कथेवर चित्रपट निघाले आहेत. यातून समाजावर या कथामृताचा असलेला प्रभाव दिसतो. पतीसाठी पर्यायाने कौटुंबिक सहजीवनासाठी प्रत्यक्ष पतीचे प्राण हे त्यास मृत करणाऱ्या यमराजाकडून परत आणणे ही अजिबात सामान्य गोष्ट नाही, हे आमच्या स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आहे, हे या कथेने ठळकपणे दाखवून दिलेले आहे आणि हे चिरंतन मूल्य आपल्या संस्कृतीस देणारी सावित्री ही आपल्या समाजाची सांस्कृतिक प्रतिनिधी आहे, समाजाचा भक्कम आधार आहे.

रामायण, महाभारत प्रत्यक्षात झाले किंवा नाही ? त्यामुळे समाजात धार्मिक तेढ वाढते का ? त्यातून सर्वधर्मभावास, सहिष्णु वृत्तीस हानी पोहचते का ? वगैरे निरोद्योगी प्रश्न निर्माण करून आणि अनावश्यक कर्मकांडाकडे दुर्लक्ष केले आणि आपण आपल्या संस्कृतीतील अशी चांगली तत्वे घेतली तर ती निश्तितच आपल्या सुवर्ण-युगाची नांदी ठरेल.   

(सोबत महान चित्रकार 'राजा रविवर्मा' याची या विषयावरचे चित्र देत आहे.) 

No comments:

Post a Comment