Saturday, August 12, 2017

एक आठवण - पत्रकार मो. ग. तपस्वी यांची

एक आठवण - पत्रकार मो. ग. तपस्वी यांची  

आपल्या बोटांच्या चिमटीत एखादवेळेस काही क्षण आले असे वाटतात अन् पट्कन निसटून जातात, ते क्षण आपल्यासाठी नसतातच आणि नव्हतेच ! खूप उशीरा केव्हातरी, अशी काही घटना घडते अन् मग समजते आपल्याला ! पण तोपर्यंत निष्कारणच आपल्या जीवाची घालमेल सुरू असते, मनस्वास्थ्य बिघडते.
आपल्या विचारांच्या नादात, आपण काही सुंदर येणारे क्षण टाकून दिलेले असतात. काही आपल्याला खुणावत असतात पण आपले लक्षच नसते तिकडे, आपलेच दु:ख कवटाळून बसलेलो असतो आपण; मग ते क्षण येतात, आपल्याला बराच वेळ खुणावतात आणि मग कंटाळून निघून जातात, दुसऱ्यासाठी ! मग पुन्हा आपल्याच लक्षात येते, 'काय करून बसलो आपण ?' पुन्हा विचार, त्रागा, चिडचिड, पश्चाताप आणि मनाला लागलेली कोरणी ! काहींच्या दैनंदिनीत सुरूच असते हे !
काही क्षण खरे तर आपल्यासाठी नसतातच पण आपली मूठ, चिमूट इतकी काही घट्ट आणि पक्की असते की ते क्षण आपल्यापासून जावूच शकत नाही. आपल्याजवळील जुना पत्रव्यवहार, फोटो, पुस्तके, काही वस्तू - भोवरा, गोट्या, भोवऱ्याची जाळी, कॅसेटस्, सर्टिफिकेटस् बघा आपले मन दूर कुठेतरी भूतकाळात फिरून येते. काही वेळा बरं वाटते, तर काही वेळा वेदनादायक होते ! काही वेळा उगीच गंमत वाटते, अरे आपण असेही होतो तर ! मग, 'कोण होतास तू काय झालास तू ?' असे देखील वाटू शकते.
माझ्याकडे गांवी असतांना 'देवगिरी तरूण भारत' यायचा ! 'विवेक' पण यायचा ! काही ठिकाणी, काही विषयांच्या याद्या करायच्या असल्या की काही नांवे गुप्त पण ठरलेली असतात. ती कामाचे वेळी तात्काळ 'फिक्स्ड डिपॉझिट' सारखी प्रकट होतात.
कोणालाही कोणतेही काम करायचे असेल, नव्याने उभारायचे असेल तर हे 'फिक्स्ड डिपॉझिट' कमी व्हायला नको, ते नियमीत वाढायला हवे. 'फिक्स्ड डिपॉझिट' कोणते व 'करंट अकाउंट'चा कोणता बॅलन्स हे पण अलिकडे ओळखायची गरज भासू लागली आहे. बॅंकिंग नियमानुसार दूरदर्शी धोरणे व जास्त काळाच्या योजनांसाठी 'फिक्स्ड डिपॉझिट' हेच कामाचे असतात, 'करंट अकाउंट'चा बॅलन्स कितीही असला तरी कामाचा नसतो.
तर माझेकडे 'देवगिरी तरूण भारत' यायचा. त्यांत 'मा. गो. वैद्य', 'मोरेश्वर उपाख्य मो. ग. तपस्वी', 'मुजफ्फर हुसेन' वगैरेंचे लेख यायचेत ! मला लेख आवडायचे ! ही सर्व केवळ पत्रकारच नाही तर लेखक मंडळी आहेत. यांचे लिखाणांस तात्कालिक बातमी मूल्य जसे आहे तसेच यांतून ते काही निश्चित असा विचार देत असल्याने, त्या लिखाणांस अक्षरमूल्य पण आहे. पत्रकारास ध्येय असावे ते अक्षर वाड•मय निर्माण करण्याचे !
एकदा गांवी 'श्री. मुजफ्फर हुसेन' यांना बोलावले होते, व्याख्यानाला ! व्याख्यान अप्रतिम झाले. व्याख्यान संपल्यावर श्री. दिलीपशेट अग्रवाल यांच्या जुन्या घरी बैठक होती. श्री. कन्हैयाशेट अग्रवाल, डॉ. अनंत अकोले, श्री. जयंत कुलकर्णी, श्री. अशोक शिंदे, श्री. रविंद्र नेमाडे ही उत्साही मंडळी तर होतीच ! पण कै. काका शिंदे, कै. नाना लष्करे, कै. रूपचंद महाजन, कै. डॉ. न. पु. जोशी ही मंडळी 'गांवातील आधार' असलेली मंडळी होतीच ! तुलनेने त्या गप्पांत मीच नविन होतो. गप्पांमधून खंदे पत्रकार समाजातील नेमकी व्यथा कशी मांडतात, ते समजले.
'देवगिरी तरूण भारत' मधे नियमीत स्तंभलेखन करणारे 'मोरेश्वर उपाख्य मो. ग. तपस्वी' हे दिल्लीहून नासिकला आल्याचे समजले. योगायोगाने नासिकला त्या दरम्यान काम होते, त्यांचा पत्ता व दूरध्वनी होताच ! वेळ देखील होता आणि त्यांच्यासाठी मी वेळ काढणारच होतो. भेटीची वेळ घेतली, उन्हाळ्याचे दिवस होते बहुदा ! जळगांवच्या उन्हाळ्यातील उन्हाची सवय असलेला मी नासिकच्या उन्हाला जुमानणार नव्हतोच ! त्यांचे म्हणजे 'मो. ग. तपस्वी' यांचे घर सापडले.
निदान एकदीड तास गप्पा सुरू होत्या. त्यांच्याशी मी काय गप्पा मारणार ? निदान वीसबावीस वर्षांपूर्वीची गोष्ट ! त्यांच्या घरात त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे, पुरस्कार दिसत होती. पुस्तके भरपूर होती, हे माझ्यासाठी उत्तम व प्रसन्न वातावरण निर्माण करायला पुरेसे होते. त्यांच्या पण इकडील जुनी नातीगोती, ओळखी निघाल्याने परकेपणा कमी झाला. त्यावेळी त्यांचे कसलेसे लिखाण सुरू असल्याने तो पण उत्साह बोलण्यात दिसत होता. या माणसांचे बोलणे ऐकत राहिले तरी आपल्याला बरेच काही मिळत रहाते. नंतर त्यांची ग्रंथसंपदा, मराठीतील काही नामवंत कादंबऱ्यांची त्यांनी हिंदीत केलेली भाषांतरे, ज्यात कै. वि. स. खांडेकर यांची 'ययाति' ही कादंबरी होती.
काल त्यांचे १ मे, ९४ चे बहुदा त्यांच्या हस्ताक्षरातील, त्यांचा व्यवस्थितपणा व टापटीप दाखवणारे पत्र सापडले अन् असे कितीतरी क्षण आपले होते हे उगाचच जाणवले.

२ जुलै २०१७

No comments:

Post a Comment