Tuesday, November 14, 2017

आईची माया आणि शिस्त

आईची माया आणि शिस्त 

सुमारे तीसेक वर्षांपूर्वीची ऐकलेली गोष्ट ! नेमकी कोणाच्या बाबतीत घडली होती, ते नांव आठवत नाही. मात्र घडली होती आणि त्यावेळी समाजात खूप गाजली होती.
मुलीचे लग्न होते, मुलगी सासरी येते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घरातील जवळपास कोणत्याही कामाला हात लावत नाही. सांगीतलेच तर केल्यासारखे करायची, पण त्यांत दम नसायचा ! नव्या नवरीचे सुरूवातीचे दिवस संपतात. पाहुणे मंडळी निघून जाते. घरी दोघेच रहातात.
तो तिला विचारतो - मी गेल्या काही दिवसांपासून बघतोय आणि मला सांगीतले पण की ‘तुझ्या बायकोला काही कामांची सवय दिसत नाही. सांभाळ बाबा !’
ती - मला आवडत नाही आणि मी करणार पण नाही.
तो काही बोलत नाही. विषय तिथेच संपतो. एखादा आठवडा जातो तर तिची आई येते. तिला आनंद वाटतो.
दुसऱ्या दिवसापासून ती बघत असलेला आईचा अवतार तिला नवीन असतो. सकाळी वेळेवर उठून झाडलोट झालीच पाहीजे. चहापाणी त्यानंतर ! नंतर आंघोळ वेळेवर करून स्वयंपाक केला गेलाच पाहीजे. तिला येत नसल्याने तिची आई तिथे बसून सांगायची, पण तिलाच करायला लावायची. स्वयंपाक होत नाही तर धुणे भांडी करून घ्यायला सांगायची. तिला रिकामी बसू देई ना आणि मग हे होईपर्यंत तिला कडाडून भूक लागलेली असे. दोन्ही गप्पा मारत पोटभर जेवत. त्याचवेळी तिला थोडी पूर्वीची आई दिसे. असा साधारण पंधरवाडा गेला.
नंतर तिला स्वत:हून जाग यायला लागली. काम काय करायचे हे दिसायला लागले. ती काम करायला लागली. आई पहात असे. मदत क्वचितच करी ! पुढचा पंधरवाडा गेला. अजूनच सफाई आली कामात. आता आई तिच्याकडे कमी लक्ष देई पण लक्ष असे. पुढचा पंधरवाडा असा गेला. नंतरचा पंधरवाडा तर आई अंथरूणातून उठतच नसे. उठली तरी, थोडेफार बघून पुन्हा आराम ! हे आठवडाभर चाललं मग नंतरच्या आठवड्यात तर तिचे पोटच दुखतंय असं सांगे. हा पदार्थ कर, तो कर, पथ्याचं कर हे सांगून वेगवेगळे आजारी असतांनाचे पदार्थ करायला लागत. शेवटी जवळपास दोन महिने झाले आणि आई एके दिवशी सकाळी उठली. तिच्या जावायाला तिच्यासमोर म्हणाली - विद्यार्थी माझ्या दृष्टीने पास आहे. मी घरी निघते. घर उघड्यावर टाकून आले आहे.
तिला म्हणजे मुलीला हे समजेना, की हे काय ? मग आईने सांगीतले, ‘जावाईबापूंचे पत्र आले. विद्यार्थ्याला शिकवले नाही. त्याचे शिक्षण पूर्ण करा. इथं येवून शिकवले तरी चालेल. मला कल्पना आली, हे तुझ्याबद्दलच आहे. मी तडक निघाले. पोरीच्या संसारात गैरसमज निर्माण होण्याच्या आंत मिटवा, नाहीतर पुढच्या गंभीर समस्या होतील. तुझे जास्त लाड आम्हीच केले, तुला काही कामांची सवय लावली नाही, त्याचे हे परिणाम ! सुखी, शांत व समाधानी संसाराचा मार्ग चांगल्या पाककौशल्यातून व गृहीणीपद सांभाळण्यातून जातो हे लक्षात ठेव. नंतर आपल्या हातातून पहिले आपली माणसं जातात व संसार परका होतो.’ मुलीला रडू आवरेना. आई थोपटत सांगत होती. ‘माणसं चांगली म्हणून चांगल्या भाषेत सांगीतलं, नाहीतर भलतंसलतं काही झालं असतं तर गोष्टी वाढत जातात. अहंकार आडवा येतो व संसाराचा विचका होतो.
कालपासून मला दोन-तीन जुन्या मित्रासारख्या संबंधीतांचे फोन आले. मुलीकडून व मुलाकडून ! वेगवेगळ्या व्यक्ती आणि कुटुंबांतून ! घटना पण वेगळ्या, दोघांनाही घटस्फोट हवा होता. लग्नाला जेमतेम दोनेक वर्ष झाली होती. समाज कुठे चाललाय ? मी काय सांगायचे ते त्यांचा संसार मोडणार नाही असे सांगीतले. त्यावेळी ही जुनी घटना एकदम आठवली.

No comments:

Post a Comment