Saturday, December 16, 2017

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

लोभीपणा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो

काल नामदार उच्च न्यायालयात ‘लोकन्यायालय’ होते. थोडा वेळ गेलो होतो. लोकांचा लोभीपणा हा मूर्खपणात व त्यानंतर विकृतीत होतो, हे काही ठिकाणी दिसले. ‘आपला हक्क व हक्काचे लवकर मिळावे म्हणून आपल्याच हक्कापैकी काही नाईलाजाने सोडून द्यावे लागते’ हे उमजलेले दुर्दैवी पक्षकार दिसले; तर त्याच्या असहायतेचा, दुर्बलतेचा गैरफायदा घेत कसलाही हक्क नसतांना लाभ उपटणारे पण दिसले.
‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडित:’ हे सुभाषित अवगत करून वागणारे दिसले. वेळेवर लोकन्यायालयाने मार्ग दाखवला म्हणून आपसांत मार्ग लवकर निघून समाधानाने जाणारे पण दिसले, मात्र ही संख्या कमी होती.
आटोपून घरी येतो तर बाहेरगांवाहून बरीच कागदपत्रे आणून ठेवलेली दिसली. कागद चाळताचाळता बघीतले, वाईट वाटले व संताप देखील आला. न्यायव्यवस्थेचा दुरूपयोग करून समोरच्याला कसे हैराण करता येते याचे अजून एक उदाहरण मिळाले.
विवाहविच्छेद म्हणजे घटस्फोट झाल्यावर देखील पूर्वीच्या पत्नीने सदर घटस्फोट बेकायदेशीर असल्याचे दर्शवत न्यायालयात खावटी मागणे, त्या दरम्यान तिने दुसरा विवाह करून आपला संसार निर्वेधपणे सुरू ठेवणे, मात्र त्याच वेळी या बिचाऱ्या पूर्वीच्या पतीला, जो सरकारी कर्मचारी आहे त्यांस, दुसरे लग्न करण्यापासून येनकेनप्रकारे रोखणे. त्याच्यावर व त्याच्या सर्व नातेवाईकांवर, अगदी जवळच्या वा दूरच्या, संबंध असलेल्या आणि नसलेल्या सर्वांवर विविध प्रकारच्या काल्पनिक केसेस करणे आणि त्यांनी ‘दाती तृण धरून’ शरण यावे यासाठी ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणे, हे नित्याचे प्रकार झाले आहे.
पूर्वी असाच एक अनुभव आला होता. त्यावेळी हे असे विषय सामोपचाराने मिटावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मला स्त्रीने पैशाच्या लोभामुळे या स्तरावर यावे आणि तिच्या दुर्दैवाने तिला तिच्या वकिलाने पण योग्य, खरा व तिच्या हिताचा सल्ला देवू याचे वाईट वाटले होते. त्यावेळी मुलीकडच्यांनी ऐकले नाही आणि मला ठेवणीतले अस्त्र काढावे लागले. ब्रह्मास्र जसे यशस्वी होवून येते तसा तो उपाय होता, यश आले.
या अशा वृत्तीने व वागण्याने संपूर्ण स्त्री जमात बदनाम होते, तिच्या तक्रारीकडे संशयाने पाहिले जाते. अशा खोट्या तक्रारींचा परिणाम विपरीतपणे खऱ्या तक्रारींवर पण होतो. न्यायशास्त्रातील समाजामन किंवा स्वभाव ही कल्पना लक्षात घेवून आणि मग तक्रार खरी असेल तरी संशयाचा फायदा मिळून गुन्हेगार सुटतात.
अलिकडे आता अशाच स्वरुपाची प्रकरणे वाढत आहेत. कठीण असतात, पक्षकारांना मनस्ताप देणारी असतात पण इलाज नसतो. सत्य टिकले पाहीजे कितीही किंमत देवून !

१० डिसेंबर २०१७

No comments:

Post a Comment