Monday, January 26, 2015

'डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार'

आज दैनिक लोकसत्तामध्ये श्री. रामेश्वर नाईक यांना कै. डॉक्टर अविनाश आचार्य याच्या नांवाने ठेवण्यात आलेला, समाजसेवा क्षेत्रामध्ये नावाजलेला 'डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार' देण्यात येत असलेबद्दल अभिनंदनाची बातमी वाचली, विशेष उल्लेख म्हणून श्री. दिनेश गजाजन जोशी यांचाही उल्लेख आढळला. माझे मन काही जुन्या आठवणीमध्ये गेले. त्या आठवणी या निमित्ताने देणे अजिबात अनुचित होणार नाही कारण एकाच व्यक्तीची कृती, विचार, दिशा वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे अर्थ देतात, प्रोत्साहन देतात आणि त्याची वाटचाल सुलभ करतात. 

सन १९७० च्या आसपासची गोष्ट असेल, मी अगदी तिसऱ्या अथवा दुसऱ्या इयत्तेत असेल, जळगावला सांप्रदायिक दंगा झाला होता, भेटीसाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी देखील तेथे आल्या होत्या, एवढया त्या दंग्याची भीषणता असावी, अर्थात हे समजण्याचे माझे वय नव्हते, पण त्यावेळी प्रथमच मला डॉक्टर अविनाश आचार्य यांचे नांव वारंवार आणि सन्मानाने बरेच जण घेत असलेले आढळले. या नांवाच्या महतीची माहिती झालेला हा माझा पहिला प्रसंग.

त्यानंतर रावेर येथे कै. पुनमचंदशेठ अग्रवाल यांच्या मळ्यात भोईवाड्यात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा' कार्यक्रम होता, दिवस हिवाळ्याचे होते. तेथे शेजारीच रावेरच्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेवड्या तयार करण्याचे काम सुरु होते. त्या कार्यक्रमास कै. डॉक्टर अविनाश आचार्य यांना आवर्जून बोलाविले होते. ज्यांना अगदी म्हातारपणामुळे चालता देखील येत नव्हते, ते आमच्या गावांतील खूप वयस्कर मंडळी देखील त्या कार्यक्रमाला आलेली होती, आपल्या काळातील 'संघाचे अगदी 'स्वातंत्र्यापूर्वीचे' देखील काम करत असलेले स्वयंसेवक आले होते, ते त्यांच्या त्या वेळच्या कार्यक्रमाचे अनुभव सांगत होते, त्यावेळी संघावर असलेल्या बंदीचे त्यांना असलेले अनुभव सांगत होते. त्यांचे अनुभव ऐकल्यावर मला आपल्या केलेल्या कामाचे थिटेपण आजही जाणवते. याची पुष्टी मला मा. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान यांनी आपल्या 'स्वातंत्र्यदिनाच्या' दिवशी विनयाने केलेल्या त्यांच्या भाषणातून मिळाली, 'नरेंद्र मोदी आज जो एवढा उंच दिसत आहे, तो या गेल्या पाच पिढीच्या खांद्यावर उभा आहे म्हणून एवढा उंच दिसत आहे.' 

आम्ही त्यावेळी शालेय शिक्षणच घेत असू, त्यावेळची वेळ मला अजूनही आठवते. साधारणतः हिवाळ्याचा काळ असेल कारण त्यावेळी मळ्याजवळच तयार होत असलेल्या रेवड्या तयार होत होत्या. रावेरच्या रेवड्या प्रसिध्द आहेत, रावेर येथील दत्तजयंतीच्या उत्सवानिमित्ताने जी रथयात्रा निघते त्यावेळी रेवड्यांची उधळण रथावर सर्व भाविक करतात, त्याकाळात गुळाच्या पाकापासून रेवड्या तयार करणे हे बऱ्याच ठिकाणी सूरु असते, तसे ते भोईवाड्यात सुरु होते. 'हं, काय रे काय म्हणतो?' एका स्वयंसेवकाला मा. दादांनी विचारले. 'काय न्हाई, रेवड्याचा कारखाना काय रोजचाच हाय, एक दिवस थोडा येळ कमी देला तरी चालेल, पण म्हनले एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे, आपण जायला पायजे. नंतर रेवड्या थोड्या जास्त वेळ तयार करू.' त्याने उत्तर दिले. संघाबद्दलची तेथील त्या अतिशय सामान्य कुटुंबातील, मजूर परिस्थितीतील, जेमतेम शिक्षण घेत असलेल्यांची ही भावना एकूण मा. दादा त्यावेळी काही बोलले नाही. सर्वजण जेवावयास बसले होते, योगायोगाने मी मा. दादांच्या (कै. डॉक्टर अविनाश आचार्य यांना सर्वजण दादा म्हणत) अगदी समोरच बसलेलो होतो. त्यांची जेवत असतानाही बोलण्याची, सर्वांशी संवाद साधण्याची सवय असावी. जेवणे झाली, नंतर गप्पा सुरु झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले 'हे पहा, आपला कारखाना कायम चालावा अशी आपली मनापासूनची भावना असेल तर मग आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या कारखान्याचा थोडा वेळ आपण आपल्या या संघाला दिला पाहिजे. संघ टिकावा, वाढावा असे जर आपणास वाटत असेल तर मग दैनंदिन शाखा हा 'स्वयंसेवक पुरविण्याचा कारखाना' आहे. स्वयंसेवक भरपूर असल्याशिवाय संघ टिकणार नाही, मला या 'रेवड्या तयार करणाऱ्या कारखानदाराने' उत्तम दृष्टांताने संघ कसा टिकेल आणि टिकवला पाहिजे हे सोप्या भाषेत समजावले. समाज्याच्या ज्या तळागाळात देखील इतका तंतोतंत विचार करणारे संघाचे स्वयंसेवक असतील तर मग संघाचे हे काम खरोखरच समाजाचेच काम आहे, त्याची आपण सर्व जणच काळजी करत आहोत. ते निरंतर वाढणार याची शंका नाही' वातावरण खरोखरच फार उच्च पातळीवर गेले होते, हे अत्यंत छोट्या बाबीतून महत्वाचे तत्व लक्षात आणून देण्याचे त्यांचे कसब आपल्या लक्षात येते.

 मी रावेरला होतो. ही घटना मी नुकताच वकील झालेलो होतो. आमचेकडे श्री. कुलकर्णी म्हणून प्रचारक होते. एकदा त्यांना आणि मलादेखील जळगावला जायचे होते, आम्ही दोन्ही सोबतच सकाळी जळगावला निघालो, तेथे १२ वाजेदरम्यान पोहचलो. मला कोर्टात जायचे होते तर श्री कुलकर्णी यांना डॉक्टर अविनाश आचार्य यांचेकडे संघाचे कामानिमित्त जायचे होते. माझ्या नेहमीच्या पध्दतीनुसार जेवण करून मग कामाला लागायचे, मी श्री. कुलकर्णी यांना म्हटले 'प्रथम आपण जेवण करू, मग तुम्हाला डॉक्टर अविनाश आचार्य यांच्याकडे आणि मला तेथून कोर्टात जाता येईल.' त्यांनी फारशी अनुकुलता दाखवली नाही पण त्याकडे लक्ष न देता आम्ही जेवण केले, तेथून डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या कडे गेलो. तेथे मा. श्रीपती शास्त्री आणि काही मंडळी आलेली होती. डॉक्टर अविनाश आचार्य तेथेच होते, त्यांनी आम्हास बघितले, 'हं, अप्पा चला जेवायला.' म्हणाले. 'जेवण झाले.' श्री. कुलकर्णी, प्रचारक म्हणाले. 'कोठे?', त्यांचा प्रश्न. 'हॉटेलमध्ये',माझे उत्तर. ते क्षणात प. पू.  गोळवलकर गुरुजींच्या फोटोकडे बोट दाखवून आम्हांस म्हणाले 'अहो अप्पा, संघाचे प्रचारक जर हॉटेलमध्ये जेवू लागले, तर हे आम्हाला स्वर्गातून काय म्हणतील? अहो माझे देखील राहिले आहे.' 'ते तयार नव्हते, पण मी आग्रह केला.' मी घडले ते सांगितले. 'अहो, प्रचारकाने वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या घरी जेवले नाही, तर ते प्रत्येक घर संघाशी कसे जोडले जाईल, संपर्क कसा होणार, कार्यकर्त्यास ते घर आणि त्या घरास तो कार्यकर्ता म्हणजे संघ आपला कसा वाटेल? संघासाठी आपण एका माणसाचे तरी जेवण द्यायला पाहिजे. मी तुम्हास सांगायचे का?' ते म्हणाले. माझ्याकडे फारसे नीट उत्तर नव्हते, 'नाही मला घाई होती, कोर्टात जायचे आहे, म्हणून मी म्हणालो.' मी स्पष्टीकरण दिले. 'नाही दादा, वकीलसाहेबांनी  तर त्यांच्या घरी ते असो किंवा नसो, संघ प्रचाराकास हे घर आपले वाटले पाहिजे हे सांगून ठेवले' असल्याचे श्री कुलकर्णी यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि माझी बाजू सावरून धरली. पण हे त्यांचे बोल ऐकल्यावर मा. दादांची, डॉक्टर अविनाश आचार्य यांची उंची आणि संघ कार्यात त्यांच्या असलेल्या योगदानाची मला केवळ कल्पनाच आली नाही, तर त्यांची उंची एवढी का आणि कशी झाली याची देखील कल्पना या एका वाक्याने क्षणांत आली.

घटना पुष्कळ आहेत, त्याचे कर्तृत्व मोठे आहे, ते येथे मी सांगावे याची आवश्यकता नाही, आणीबाणीत आपल्या स्वातंत्र्यासाठी झालेला तुरुंगवास, त्यांच्या पुढाकाराने जळगाव मधील सर्वमान्य झाले 'केशव स्मृती प्रतिष्ठान' त्याच्या माध्यमाने उभ्या राहिलेल्या अनेक मोठ्या संस्था, जळगाव जनता बँक, त्यांचे सहकारी आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव आणि कसलीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रचंड काम आणि ते काम नंतर समर्थपणे सांभाळता यावे यासाठी तयार केलेली माणसे पाहिल्यावर लक्षात येते, अर्थात हे सांगण्याचे येथे प्रयोजन नाही. मात्र या 'डॉक्टर आचार्य अविनाश सेवा पुरस्कार' ही बातमी वाचली आणि हे मागील काही अनुभव आठवले, म्हणून लिहिले झाले.   

No comments:

Post a Comment