Sunday, January 18, 2015

'अति सर्वत्र वर्जयेत' - न्यायालयातील आठवणी - ४

'अति सर्वत्र वर्जयेत' - न्यायालयातील आठवणी - ४

माणसाच्या लबाडीची, लोभीपणाची आणि ती लबाडी, लोभीपणा आपल्यावर विपरीतपणे शेकते आहे, त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे आणि हे पाहिले, की मग कसलाही विधिनिषेध, न ठेवता 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यं त्यजति पंडितः' या उक्तीचा ढोंगीपणे वापर करून, तात्काळ माघार घेवून पुन्हा आपलाच लोभीपणा सिध्द करणारी एक घटना आठवली.
घटना साधारणपणे सन १९८७ मधील आहे. आपल्या 'हिंदु कायद्यावर', पण त्यातील विषय लक्षात घेता, जुन्या हिंदू धर्मशास्त्रावर आधारलेली आहे. एक श्रीमंत गृहस्थ होते, त्यास मुलगा नव्हता, तर दोन मुलीच होत्या. मुलींचे विवाह त्याने आपल्या हातानेच करून दिलेले होते, आणि मुली सासरी संपन्न घराण्यात नांदत होत्या. दोन्ही मुलींचे विवाह झाल्यावर, स्वाभाविकपणे हे गृहस्थ आपल्या भावावर जास्त अवलंबून राहू लागले, आणि त्याची प्रत्यक्षात देखभाल ही, त्याचा पुतण्या करू लागला, यात कसलेही वावगे नव्हते. या गृहस्थाचा भाऊ देखील श्रीमंत होता, आणि त्याला आपल्या भावाच्या पैशाची काहीही गरज नव्हती. तो आपल्या भावाचे एक कर्तव्य म्हणून करत होता, त्यात त्यातून काही लाभ व्हावा ही फारशी अपेक्षा नव्हती. एके दिवशी हे गृहस्थ वयोमानानुसार त्यांचा देह सोडता झाले, अनंतात विलीन झाले. त्यांचे सर्व अंत्यविधी, क्रियाकर्म हे त्याच्याच पुतण्याने केले, त्यावेळी या गृहस्थाच्या दोन्ही मुली हजर होत्या. हे सर्व बिनबोभाट झाले, येथपर्यंत सर्व ठीक होते, मात्र त्यानंतर या मुलींच्या हावरटपणाची, लबाडीची आणि सर्व एकट्या आपल्यालाच मिळावे यासाठी डाव-प्रतिडाव सुरु झाले, आणि त्याचे पर्यवसान शेवटी न्यायालयात, त्यांच्या वडिलांच्या मिळकतीसंबंधाने दावा दाखल करून, एकमेकांच्या विरुध्द मनाईहुकुम मागणेत झाले. येथे ही घटना सुरु झाली.
दोन्ही मुलींना त्यांच्या काकाने समजून सांगितले 'भांडू नका, मला याचा लोभ नाही, हे सर्व तुमचेच आहे. माझा भाऊ तर गेला, होता तोवर मी त्याला सांभाळला, ते माझे कर्तव्यच होते, पण त्याच्या पश्चात तुमचे भांडणे बरोबर नाही.' हे त्यांना सांगितले, त्यांच्या नवऱ्याला सांगितले, त्यांनी संभावितपणे 'ही त्यांची माहेरची बाब आहे, आम्ही यात पडणार नाही' हे सांगितले, पण यातून त्यांचा लोभीपणा दिसत होता. मुलींच्या सासरची वडीलधारी माणसे बोलाविली, त्यांना 'हे दावे-फाटे करणे चांगले नाही, तुम्ही तुमच्या सुनांना समजवा, आणि हे दावे काढून टाका. याचा अजिबात चांगला परिणाम होणार नाही, मात्र दोन्ही बहिणीत तेढ वाढेल. वडील गेल्याबरोबर बहिणी भांडत आहे, आणि त्यांचा काका काय करीत आहे, हे गावातील लोक मला विचारीत आहे. माझे ऎका, आणि आपसात काहीतरी कमीजास्त करून संपवून टाका.' पण फारसा फरक पडला नाही, मात्र मुलीनी काकाला सुनावले, की 'संपत्ती आमच्या वडिलांची आहे, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही, आम्हाला निष्कारण तत्वज्ञान सांगू नका, तुम्ही तुमच्या घरात लक्ष द्या. तुमचा येथे बोलण्याचा संबंधच कुठे येतो?' हे ऐकल्यावर काका चकित झाला. 'अरे, मुलींनो तुमच्या बापाला तुम्ही सांभाळले नाही, तर मी सांभाळले, त्यावेळी कुठे गेल्या होत्या तुम्ही?' काकाने अखेरचा प्रयत्न भांडण विकोपास जावू नये म्हणून करून पहिला. मुलींनी टोकदार उत्तर दिले 'आमच्या वडिलांचे पैसे तुम्ही कसे वापरले, हे आम्ही अजूनही विचारीत नाही, हे तुमचे नशीब समजा, आणि आता गप्प बसा.' मुलींचे काका हतबल झाले, त्यांना वाईट वाटले, राग आला, तो अपमानाचा जसा होता, तसाच मुलीना आपण आवरू शकत नाही, या असहायतेचा देखील होता. आता मुलींना कोणताही विरोध राहिला नसल्याने, मुलींचे दाव्याचे कामकाज जोरात सुरूच होते, आणि आता तर त्यात जोर आणि जिद्द वाढलेली होती.
जेंव्हा मुलींच्या काकाच्या हे लक्षात आले, की मुली ऐकण्यात नाहीत, तेंव्हा त्याने अखेरचा मार्ग म्हणून तो माझ्याकडे आला, 'वकीलसाहेब काहीही मार्ग काढा, आणि मुलींना त्यांच्या लोभीपणाचा कायमचा धडा शिकवा.' माझ्यापुढे मोठी समस्या उभी राहिली. मुलीच त्याच्या वडिलांच्या मिळकतीच्या वारस होत्या, आणि त्यांच्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते, हे स्पष्ट दिसत होते, पण हिंमत सोडायची नसते, हे माहीत होते. मग मी विचारले, 'मुलींच्या वडिलांचे अंत्यसंस्कार कोणी केले?', त्या गृहस्थाने लगेच उत्तर दिले 'माझ्या मुलाने.' मी म्हणालो 'मग त्याचे काम पडेल.' त्यांनी उत्तर दिले 'काही हरकत नाही.'
त्या दिवशीपासून मी हिंदु कायदा अगदी तपशीलवारपणे वाचण्यास सुरुवात केली, मला 'हिंदु वारसा कायदा' यात फारसे काही मिळेना, मग 'धर्मशास्त्र' वाचण्याचे ठरवले. डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचे 'History of Dharmashastras' या नावाचे एक अप्रतिम पुस्तक आहे, आणि हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील मानलेले आहे. याचे संक्षिप्तपणे महाराष्ट्र शासनाने 'धर्मशास्त्राचा इतिहास' या नावाने पुस्तक तीन खंडात काढलेले आहे, याचा मला खूप उपयोग झाला. मुलांची कर्तव्ये आणि मुलांचे अधिकार कोणास, केंव्हा प्राप्त होतात, हे विविध स्मृतींचा आधार देवून सांगितलेले होते. त्यात ज्याने पुत्राची कर्तव्ये पार पडलेली असतील, तो देखील पुत्राच्या अधिकारास कायद्याने पात्र ठरतो, असे स्पष्टपणे होते. मला मार्ग सापडला, मी त्या बहिणींच्या दाव्यात, माझा हितसंबंध असल्याने, मला सामील करून घ्यावे म्हणून अर्ज दिला, त्यात सर्व घटना तपशीलवारपणे लिहिल्या. हा एक नवीनच प्रकार होता जो 'धर्मशास्त्रावरील नियमांवर' आधारलेला होता. 'हिंदु वारसा कायदा, १९५६' मध्ये ज्या तरतुदी नसतील, त्यास पूर्वीचा धर्मशास्त्रावरील हिंदु कायदा लागू होईल, हे स्पष्टपणे होते. याचा मला उपयोग झाला, माझा मुलींच्या दाव्यात मला सामील करून घ्यावे आणि माझे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, हा अर्ज मंजूर झाला. या निर्णयाने त्या बहिणी हादरल्या, त्यांनी वरील न्यायालयात या निर्णयाविरूध्द दाद मागितली, मात्र तेथे देखील न्यायालयाने त्याचे अपील रद्द केले, कारण केवळ पक्षकार म्हणून सामील झाल्याने काही बिघडत नाही, मात्र सर्व पक्षकारांचे अधिकार आणि त्याबाबतचे प्रश्न हे एकाच दाव्यात संपावयास हवेत, हे कायद्याचे तत्व असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बहिणींना आता काही सुचेनासे झाले, आता गावात चर्चा सुरु झाली की 'वडिलांच्या संपत्तीत मुलींचा काय संबंध? त्यात मुलांचाच हिस्सा असतो, आता ज्याने 'क्रियापाणी' केले आहे तो पोरगा नाहीतर कोण?' मुली मग त्यांच्या काकांकडे आल्या, विनवणी करू लागल्या, कारण आता त्यांना अशीदेखील शंका यावयास लागली, की 'अंत्यसंस्कार करणारा हा मुलगा आहे' असे ठरले तर मग वडिलांच्या संपत्तीतून काहीही मिळण्याची शक्यता राहणार नाही, तेंव्हा जे मिळत आहे, ते पदरात पाडून घ्या, जास्त लोभात गेले, तर काय मिळेल, किंवा काहीही मिळणार नाही, हे सांगता येत नाही. त्यांनी काकांची क्षमा मागितली, शेवटी त्यांची काकांच्या म्हणण्याप्रमाणे तडजोड झाली आणि त्यांनी न्यायालयातून आपापले दावे काढून घेतले.
माणसास विनासायास संपत्ती मिळावयास लागली, की ती जास्तीत जास्त कशी मिळवता येईल, याचा माणूस विचार आणि त्यानुसार कृती करू लागतो. त्यात तो इतका वाहवत जातो की त्याच्या केवळ पूर्वीच्या इच्छेचे रुपांतर हावरटपणात, लोभीपणात कसे आणि केंव्हा होते हे त्याचे त्यालाच समजत नाही. मग त्याला मिळणाऱ्या पैशाचा लोभ, हा त्याचेवर अवलंबून असण्याऱ्या सर्वाना होवू लागतो, आणि ते देखील त्याला मग प्रोत्साहन देवू लागतात. याचा परिणाम असा होतो की तो शुध्दीवर येण्याची शक्यता कमीकमी होत जाते, आणि आपण वागतो आहे तेच बरोबर आहे, असे त्याला वाटू लागते. त्यास सुभाषिताचा मुलामा देण्याचे काम, अर्धशिक्षित-लोभी करतच असतात, आणि 'सर्वे गुणः कांचनम आश्रायन्ति' म्हणून त्याचे समाधानच करीत नाही, तर त्याच्या कृतीला एक अधिष्ठान मिळवून देतात. हे सर्व इतके चमत्कारिकपणे घडते, की याचे आपल्या कुटुंबातील संबंधावर, समाजस्वास्थ्यावर काय परिणाम होतील याची फिकीर देखील कोणास नसते. आपले समाधान, ते 'उद्याचे कोणी पहिले आहे? आज आहे तर प्राप्त करा.' ही धारणा बनते, आणि मग या व्यक्ती अशा काही टोकाला जातात, की मग तेथून त्यांना परत फिरणे जवळ जवळ अशक्य होवून बसते. नंतर तडजोड जरी झाली तरी त्यांचे संबंध क्वचितच पूर्ववत होतात, कारण यातून सर्वांचे खरे स्वभाव प्रकट झाले असतात, मग या घटने नंतर त्यांच्याशी कोणीही वागताना त्यांच्या या पूर्वीच्या कृतीच्या अनुभवानेच वागत असतात. हे न्यायिक - सामाजिक विवेचन न्याय देतांना महत्वाचे असते, हे अशी हावरट, लोभी माणसे जरी विसरत असली तरी आपली 'न्यायव्यवस्था' आणि 'समाजव्यवस्था' ते विसरत नाहीत. आपल्याला जे टिकवून ठेवावयाचे आहे ते हे आहे, एवढे लक्षात ठेवले, आणि त्याप्रमाणे आचरण केले की समाजातील समस्या खरोखरच कमी होतील.

No comments:

Post a Comment