Friday, May 22, 2015

फक्त छोटी गोष्ट लक्षात ठेवा

या अगोदरच्या सरकारांनी समाजासाठी खूपच भरभरून कार्य करून आपणांस भरपूर प्रगतीने कृतकृत्य केलेले आहे, असा साधारतः सध्याच्या काही लोकांचा रोख आहे, त्यामुळे मनस्थिती निष्कारण द्विधा होत असते. हे एक उत्तम आहे की 'भारताच्या प्रत्येक नागरिकांस आपल्या राज्यघटनेने आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे', त्याचा ते वापर करीत आहे. यांत कोणासही काहीही वावगे वाटण्याचे कारण नाही. त्यांनी आपले मत व्यक्त केले, तो त्यांचा अधिकार होता आणि आहे. ते त्यांचे मत खरेच आहे, असे मानण्याचे अजिबात कारण नाही; कारण आपले मत व्यक्त करतांना ते खरेच असले पाहिजे असे त्यांचेवर बंधन 'निदान राज्य घटनेचे नाही', हं, कदाचित हा राज्यघटनेतील कर्तव्याचा भाग येईल, अथवा होवू शकतो. मात्र नागरिकाने अथवा सरकारने कर्तव्य पाळण्याचे कायद्याने बंधन नाही, तसा प्रयत्न केल्याचे दाखविले किंवा प्रयत्न करत आहोत अशी दिशाभूल केली तरी चालू शकते, आजपावेतो यापेक्षा काही वेगळे झाले आहे का ? थोडक्यात आपण आपल्या कर्तव्याबाबत आपण कितीही स्खलनशील असले तरी चालू शकते, अगदी 'राज्यघटनेला' देखील चालू शकते, मात्र हक्कांबाबत आपण अतिशय जागरूकतेने रहावयास हवे आणि बघा आपल्या घटनेची देखील हीच अपेक्षा दिसते; कारण आजपावेतो तर असाच अर्थ काढला गेलेला दिसतो, त्यात आज पावेतो कोणासही काहीही वावगे वाटलेले दिसत नाही, आपणांस तेच अभिप्रेत दिसते. यांत अडचणीचे, नुकसान होईल असे अजिबात नाही तर हा दोन्ही बाजूने अतिशय फायद्याचा व्यवहार आहे.

आता एवढा गदारोळ सुरु झाला आहे तर आपणा कोणांस अशी तर शंका आली नाही ना, की सध्याचे सरकार 'कर्तव्ये पाळणे बंधनकारक आणि हक्क मात्र पर्यायी' असे काही चमत्कारिक करेल आणि ते निष्कारण आपल्याला अडचणीचे ठरून बसेल, हं तसे असेल अथवा तशी आपणांस शंका जरी येत असेल तर 'विषाची परीक्षा अजिबात पाहू नये' हे आपले धोरण अतिशय बरोबर, सूज्ञपणाचे आणि आपल्या पूर्वीच्या धोरणाशी सुसंगत असेच आहे, कारण 'हक्कांबाबतचे रक्षण करून ते निरंतर, आयुष्यभर उपभोगत राहणे आणि त्यासोबतच आपल्या कर्तव्यांकडे निरंतर काणाडोळा करणे, आयुष्यभर टाळाटाळ करत राहणे आणि तसेच इतरांनाही करणेस भाग पाडणे, त्यावर वादविवाद, शब्दच्छल करीत राहणे' हेच आपले धोरण असल्यास त्यांत काही बाधा येणार आहे का, अथवा तशी आपणांस शंका  येत आहे का ? हं, तसे असेल तर मग, आपले आकांडतांडव कदाचित बरोबर असू शकेल, पण काळजी करण्यासारखे तरीही नाही, कारण 'राज्य घटनेची चौकट बदलेल' असे कोणतेही कायदे, नियम कोणीही केले तर ते 'राज्यघटनेची चौकट' बदलवून टाकत आहे या कारणाने आपली न्यायालये ते 'घटनाबाह्य' आहेत असे ठरवू शकतात आणि तसे ठरवून मागण्यासाठी आपणास 'न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा घटनादत्त अधिकार आहे, तो कोणासही काढून घेत येत नाही' यांतही काही गोंधळ होईल अशीतर आपणांस शंका आलेली नाही ना ?

असे तर झाले नाही की आपल्या पूर्वीच्या सरकारने भरभक्कमपणे केलेल्या प्रगतीची सध्याचे सरकार धूळधाण करून टाकेल, अशी आपणांस धास्ती आहे, पण मला वाटत नाही की सध्याचे सरकार इतके कार्यक्षम असेल ! साधी गोष्ट आहे का साधारणतः ६५ वर्षे सतत करत आणलेल्या प्रगतीची (?) विल्हेवाट हे फक्त ५ वर्षांत लावतील ! काय बोलताय, इतकी या सरकारची कार्यक्षमता आहे अशी आपणांस खात्री आहे ? असे असेल, तर मग गेल्या ६५ वर्षांची केलेली प्रगती तशीच कायम राहावी, त्यात अजून भर पडावी असे वाटत असेल तर मग हे सरकार आपणास 'घटनादत्त मार्गाने' घालवावे लागेल, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. हे शक्य नसेल तर आणि त्यासाठी आपली अडाणी जनता आपल्या सोबत नसेल तर, आपण कितीही खोटे-नाटे बोललो तरी ती जनता त्याला दाद देणार नसेल तर ? मोठी समस्या आहे, आपल्यासारख्या 'नीतिमत्तेच्या रक्षकांवर' अशी वेळ यावी, दैवदुर्विलास !

पहा छोटा मार्ग मला सुचला - 'एक तर पांच वर्षे शांततेने न बोलता येथेच थांबा, त्यांना जागे करू नका, म्हणजे ते जास्त आणि भरपूर चुका करतील; मग त्याचा वचपा त्यानंतर येणाऱ्या 'निवडणुकांत' घ्या आणि त्यांचे सरकार पाडा, तुम्ही निवडून या. काय म्हणता, 'निवडणुकाच झाल्या नाही तर ?' तुमची शंका रास्त आहे, अगोदरचा अनुभव आहे - बरोबर 'खाई त्याला खवखवे', '----------च्या मनांत चांदणे', नाही त्यावेळी नाही त्या म्हणी आठवतात. काय म्हणतां - 'तेवढे देखील थांबणे शक्य नाही मग त्वरित देश सोडून दुसऱ्या देशांत निघून जा, खूप देश तुमचे स्वागत करावयास तयार आहेत, अगदी लांबच्या देशांत देखील जाण्याची आवश्यकता नाही, जवळचे देश तुमची वाटच पाहत आहे, तेथे जा, त्यांची मदत घ्या, ते उत्साहाने करतील.  मग त्यासाठी तुम्हाला कदाचित त्यांची विचारसरणी स्विकारावी लागेल; ती काही फार मोठी गोष्ट असल्याचे तुम्हास जाणवणार नाही; उलट तुमच्या येथील विचारसरणीत आणि त्यांच्या तेथील विचारसरणीत तुम्हांस कमालीचे साम्य जाणवेल. तुम्ही मनोमन म्हणाल 'आपण तेथे राहून यापेक्षा काय वेगळे करत होतो ?' बस, त्यांच्या मार्फत येथे परत यायचे, ते सांगतील तसे त्यासाठी कार्य करायचे. तुम्ही येथे राहून जे करतांत तेच करायचे, कार्यात काहीही फरक नाही' आपणांस आपल्या कार्यासाठी 'शुभेच्छा' !

-------------- फक्त छोटी गोष्ट लक्षात ठेवा, 'या जनतेने बाहेरून येणाऱ्यांची थडगी येथे बांधलेली आहे, ते परत जावू शकलेले नाही'. -----------------------ती तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट वाटते का ?     

No comments:

Post a Comment