Saturday, May 23, 2015

केवढे हे क्रौर्य


आता मी नुकतेच  'Shri. Uday Joshi' यांचे विचार पाहिलेत. मला लहानपणी शिकवण्यात आलेली 'रे. ना. वा. टिळक' यांची 'केवढे हे क्रौर्य' ही कविता आठवली. बहुतेक ही शालेय अभ्यासक्रमात नव्हती; तर ती अशीच माझ्या कै. कुसुमकाकू कडून शिकण्यात आली, ती नेहमी ही कविता गुणगुणायची ! तिला सर्व जण वहिनी म्हणावयाचे - अगदी तिच्या मुलांसहीत, म्हणजे माझ्या भाऊ-बहिणींसहीत आणि नुकतेच बोलता येणाऱ्या चिमुरड्यापासून ते काठी टेकत-टेकत तोंडात दांत नसल्याने बोलता येत नाही अशा म्हातारी मंडळी पर्यंत !

मला अवांतर वाचनाची अतिशय हौस, त्यामुळे मी शाळेचा अभ्यास अजिबात करीत नाही, दिवसभर 'लायब्ररीत' असतो अशी माझ्या सौ. आईची धारणा असायची, ती त्यावरून रागवायची, 'अभ्यास कर' म्हणायची; 'हे सोबत येणार नाही' हे कळकळीने सांगायची. मला हे अजिबात पटत नसे. मी साधारणतः परीक्षा जवळ आली की अभ्यास करावयाचा असतो, या पारंपारिक मताचा होतो. माझी ही सवय आणि दृष्टीकोन महाविद्यालयात देखील फारसा बदलला नाही; कारण पाठोपाठ येणाऱ्या 'वादविवाद स्पर्धा', 'वक्तृत्व स्पर्धा' 'कथाकथन स्पर्धा' इत्यादि मला नेहमी मोह घालत असावयाच्या, तो मला शेवटपर्यंत आवरता आला नाही. त्याने माझा फायदा झाला का तोटा झाला, हे मला अद्यापही इतके वर्षांत समजले नाही आणि आता मी त्याचा नाद सोडून दिलेला आहे. (कदाचित त्याचा निष्कर्ष हा तिच्या मतानुसार येवू शकतो, असेही असेल, असे मला अलीकडे वाटू लागले आहे. असो !) असे असले तरी अवांतर वाचनाने अभ्यासावर परिणाम होतो ही तिची ही समजूत चुकीची असल्याचे मी वारंवार वार्षिक परीक्षेत सिध्द करायचो, तरी देखील तिचा माझ्या बाबतचा हा समज गेलेला आहे असे तिने कधीही म्हटले नाही; त्यावेळी मला राग यायचा, आता येत नाही.

आता माझी मुलगी अवांतर वाचन खूप करत असते, मी तिला 'रिकाम्या गोष्टी वाचू नको, वेळ वाया घालवू नको, हे तुझ्या अजिबात कामास येणार नाही.'  हे वारंवार बजावून समजुतीने सांगत असतो (याला ती 'बाबा, माझ्याशी नेहमी दरडावून बोलतात' असे म्हणते. ) ती अजिबात अभ्यास करत नाही म्हणून भरपूर बोलत असतो आणि ती बहुतांश वेळा माझे बोलणे विनाकारण असते, हे परीक्षेत बऱ्यापैकी गुण मिळवून सिध्द करून देत असते, तरीदेखील माझा 'अवांतर वाचनाने शालेय / महाविद्यालयीन अभ्यास होत नाही' हा नवीन समाज दृढ झालेला आहे. असो.  

या सर्व निमित्ताने मला ती कविता आठवली, ती मुद्दामहून आपणा सर्वांसाठी देत आहे. पृथ्वी आणि वसंततिलका या वृत्तात ही कविता आहे. (अलीकडे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोपा झाला आहे का अभ्यासक्रमच राहिलेला नाही अशी शंका त्यांची पुस्तके पाहून येते. 'कालाय तस्मै नमः' )

केवढे हे क्रौर्य

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- रे. ना.वा.टिळक 

No comments:

Post a Comment