Saturday, January 18, 2020

लग्न ठरवतांना, शक्यतोवर मुलाकडे मुलीकडची मंडळी जातात, कार्यक्रमाला ! पूर्वी पंचक्रोशीतील मुलगी असायची, ओळखीपाळखीतील असायची, कोणाच्यातरी नात्यागोत्यातील पण असायची, अपरिचित किंवा त्रयस्थपणा कमी असायचा, त्यामुळे नवीन नातं लवकर जोडले जायचे. आता वधूवर वेगवेगळ्या गांवातील असतात, बऱ्याच वेळा दूरचे असले, पूर्वपरिचय नसला तर कोणाबद्दल विशेष माहिती नसते. त्यामुळे वधूवरसूचक मंडळे निघालीत. त्यांच्याकडून काहीतरी समजते.
दूरदूरवरून दुसरीकडे जायचे म्हटले, तरी पैसा आणि वेळ खर्च होणारच ! नंतर त्यातून निष्पन्न काय होईल, ते पण अनिश्चितच ! त्यामुळे आपण जागेवरून न हलता, समोरचा पाहुणा फक्त कार्यक्रमापुरताच आपल्याकडे कसा येईल, हे बघीतले जाऊ लागले. ही युक्ती दोन्हीबाजूने होऊ लागली. मुलाकडचे ‘मुलाला वेळ नसून, रजा मिळत नाही. पद्धतीनुसार मुलीला घेऊन या. घर पहाणे होईल.’ अशा स्वरुपाची कारणे सांगायची, आणि मुलीकडे जायला टाळायची. मुलीकडची ‘मुलाकडे कार्यक्रम व्हायची पद्धत जुनी झाली आहे. मुलीला ठिकठिकाणी मिरवायचे ते बरोबर दिसत नाही.’ वगैरे सांगू लागली. इथपर्यंत ठीक होते, पण एकदा जायचे नाही, म्हटल्यावर काहीही कारणे पुढे येऊ लागली.
एकदा शेजाऱ्यांच्या मुलीला स्थळ आले होते. मुलगी खान्देशची, तर स्थळ दूरचे, पाचशे किलोमीटरवरचे ! त्यावेळचे संभाषण कानावर पडले, तसे देतो.
मुलीकडचे - तुम्ही रात्री तेथून बसले, की सकाळी इथं आरामात याल. मुलीला तिकडे घेऊन यायचे, म्हणजे उतरायचे तर तिकडे कोणी नातेवाईक, स्नेही नाही. लाॅजमधे रहायचे, त्यापेक्षा तुम्ही या. तुमचे नातेवाईक, स्नेही तरी आहेत इकडे !
मुलाकडचे - ते ठीक आहे. पण कोणाकडे कशाला जायचे ? इथून तुमचे ठिकाण फार लांब आहे. जमणे कठीण आहे, तुम्हीच या !
मुलीकडचे - पहा बुवा, आम्ही मुलीकडचे आहे, हे ठीक आहे ! पण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, अंतर तर सारखेच ना ?
मुलाकडचे - पण लांब आहे फार !
मुलीकडचे - आम्हाला पण तितकेच लांब आहे.
या अशा संवादातून काय साधते ?

1.1.2020

No comments:

Post a Comment