Saturday, January 18, 2020

आवाजातील वेदना !

आवाजातील वेदना !
अलिकडे काय होतं, कोणास ठाऊक ? कोणाची एखादी पोस्ट वाचावी, तर ती आपल्या डोक्याला चालना देत, मनातील जुन्या व हळव्या ठिकाणांना हात घालते. काल श्री. जयंत विद्वांस यांनी लिहीलेली, चित्रपटातील दु:खद प्रसंगावरची पोस्ट वाचली, अन् का कुणास ठाऊक मला मराठी नाटक आणि नाट्यप्रसंग आठवायला लागले. आज नाटकांतील काही प्रसंग त्यांना आठवले, त्यांवर ते व्यक्त झाले.
ते वाचले, आणि मला आकाशवाणीवर गाजलेली नभोनाट्य आठवली.
शांता जोग ! आकाशवाणीवर त्यांनी भूमिका केलेले ‘स्पर्श’ नांवाचे नभोनाट्य आहे. महारोग्याच्या भावनांवर, त्यांना महारोग झाला होता असं दाखवलंय ! मी ऐकलंय.
करूणा देव, पूर्वीच्या नीलम प्रभू ! यांची आवाजावर कमालीची हुकूमत ! त्यांचे पण एक नभोनाट्य आहे, ‘त्या तिघी’ नांवाचे ! त्यांत तीन पिढ्यातील तीन स्त्रिया, आजी, आई आणि मुलगी, हेच तीन पात्र होते. या तिन्ही भूमिका त्यांनी केल्या होत्या. आवाजातील बदल ऐकावा त्यांचा ! मी हे पण ऐकलंय !
अजून एक, ‘गॅरंटी’ या नांवाचे, व. पु. काळे यांचे ! यांतील भूमिका बहुतेक विनय आपटे यांनी ! काळीज हलवून टाकणाऱ्या कथानकाला, पाझर फोडणारा आवाज आहे.
‘राऊ’ या नांवाचे अजून एक नभोनाट्य ! थोरल्या बाजीराव पेशव्यांवर आणि मस्तानीवर ! त्यात बाजीरावाचे काम केले होते, प्रसिद्ध नाट्यकलावंत भैय्या उपाख्य गजानन उपासनी यांनी ! बाजीरावापासून मस्तानीला तोडण्याचे जे कारस्थान सुरू असते, ते पाहून वाईट वाटते. अरे, बाजीराव पण माणूस होता. त्याला पण भावना होत्या. भैय्या उपासनींचा आवाज, काय लागला होता. मला आठवायचे कारण, मी चिमाजी अप्पाची भूमिका केली होती.
हे सर्व नभोनाट्य मी काॅलेजला असतांना ऐकले, अनुभवले ! अजून कानांत ऐकू येतात. गवयाचा गायनातील स्वर आणि नटांचा नाटकांतील स्वर काही विशेष फरक नसतो. दोन्ही पण ह्रदयाला हात घालतात, मनाला हात घालतात, रक्तबंबाळ करतात.

26.12.2019

No comments:

Post a Comment