Monday, December 22, 2014

शालेय जीवनातील आठवणी - १

घटना मी सहावीत होतो त्यावेळची आहे. पहिले मराठीचा तास होता त्यावेळी श्री एस आर कुलकर्णी सर यांनी 'संताजीची घोडदौड' ही कविता अतिशय अप्रतिमपणे शिकविली. आम्ही मुले देशभक्तीने अगदी भावविभोर होऊन गेलो होतो. त्यानंतर आमचा इतिहासाचा तास होता. तो शिकवायचे श्री तिवारी सर! यांचे वैशिष्ठ्य म्हणजे हे कधीही पुस्तक वर्गात आणत नसत आणि पुस्तकाशिवायच शिकवीत; अगदी अप्रतिमपणे पण त्यात विनोदाचा शिडकावा देखील असायचा. श्री तिवारी सर आले. त्यांना आमच्या वर्गातील वेगळे वातावरण लक्षात आले. त्यांनी तास कोणता होता हे विचारले आम्ही मराठीचा होता हे सांगीतले. काय शिकवले हे सांगितले, कवितेचे नाव आणि टिपणे फळ्यावर दिसताच होती. त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी 'संभाजी महाराजांच्या' मृत्युपश्चात महाराष्ट्राची कशी अवस्था झाली आणि त्या काळात अगदी समर्थपणे 'धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे' यांनी स्वराज्याची राखण कशी केली हे आमच्या इतिहासाच्या तासात सांगीतले, अगदी त्यांच्या भाषेत. आम्हा मुलांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडे झालेली होती, आम्ही या जगात राहिलेलेच नव्हतो, तो काळ आमच्या समोर आमच्या दोन्ही शिक्षकांनी अगदी जिवंत उभा केला होता आणि आम्ही तो काळ, त्या काळात वावरत होतो. तास संपल्याची घंटा झाली आणि श्री तिवारी सरांनी आम्हाला आपल्या विनोदी शैलीत भानावर आणले - 'हं, मुकीमबुवांचे किर्तन संपले, पण प्रसाद मिळणार नाही. आपला 'संभाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्र' हा धडा झाला', आम्हाला तर काही शिकवले हे जाणवतच नव्हते, आम्ही त्या काळातून बाहेरच यायला तयार नव्हतो. मित्रांनो, अशातऱ्हेने शिकवल्यावर परीक्षेत आम्ही उत्तरे घटना डोळ्यासमोर ठेवूनच लिहायचो, अर्थात मार्क्स उत्तम मिळणारच असायचे.

ती कविता आपणास येथे देण्याचा मोह मात्र मला आवरता येत नाही - कविता 'श्री दु. आ. तिवारी यांची होती, ते कवि जळगावचेच.

संताजींची घोडदौड

तळहाती शिर घेवूनीया दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेना ना नानाही मोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला सोडविता नाही सुटली.
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून.
परते सर सेनापतीची घोडदौड संताजीची ||  ||

मिरजेवर पातशाहीची शहाजणे वाजत होती
हाणील्या तायांवर टापा फाडून टाकिली पुरती
मारिली टाच तेथून घेतला पन्हाळा हाती
तो कळले त्या विराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची || २ ||

झुल्फिकारखां लढवय्या कातरली झुल्फे त्याची
धूळधाण केली तेथे किती अमीर उमरावांची
उसळली तेथुनी मांड मग त्या कर्दन काळाची
जिंजीचा धुरळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो शत्रू नेत्राला
गेली हां हां म्हणतांची घोडदौड संताजीची || ३ ||

वाजल्या कुठे जरी टापा धुराळ्याची दिसली छापा
छावणीत गोंधळ व्हावा “ संताजी आया ! आया ! ”
शस्त्राची शुद्धी नाही धडापती ढाला घ्याया
रक़्तने शरीरे लाल
झोपेने डोळे लाल
जीवाचे होती हाल
शत्रूला ऐशी जाची घोडदौड संताजीची || ४ ||

गिर सपा वाहे ‘ धो धो ’ प्रतीसारील त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘ सो सो ’ रति रोधतील त्याला कोण ?
हिमशैल खंड कोसळता रीतीरोधील त्याला कोण ?
होता जो गंगथडीला
आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
करी दैना परसेनेची घोडदौड संताजीची || ५ ||

पुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग
सोडी न ह्यांचे अंग भाला बरचीचा संग
औरंगाचा नवरंग उतरला जाहला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्र घेई
अंग न धरेला लावी
भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची || ६ ||

संचरले होते न कळे तुरुंगास हि कैसे स्फुरण
उफळावा बघती वेगे रिकविती ठेविती चरण
जणू त्यांसहि ठावे होते युद्धी “ जय कि मरण ”
शत्रूचे पढता वेढे
पाण्याचे भरता ओढे
अडती न उधळती घोडे
चालली अशी शर्थीची घोडदौड संताजीची || ७ ||

नेमाने रसद लुटाची ‘ नेमाजी शिंदे ’ यांनी
सापडती हय गज तितुके न्यावे ‘ हैबतरावानी ’
वाटोळे सर्व करावे ‘ आटोळे ’ सरदारांनी
‘ खाड खाड उठवा टापा ’
झेपांवर घालिती झेपा
गोटावर पडला छापा
आलीच म्हणती काळाचा घोडदौड संताजीची || ८ ||

चढत्या घोड्या निशी गेला बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणात ओळी नि पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना बेजरब रीसालेदार
वेगवान उडवीत वाजी
तोंडावर लढतो गाजी
धावून येई संताजी
पळती मोघल बघताची घोडदौड संताजीची || ९ ||

नावाचा होता ‘ संत ’ जातीचा होता शूर !
शीलाचा होता साधू संग्रामी होता धीर !
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता रण कंदनि होता होता क्रूर !
दुर्गति ति संभाजीची
दैना रामराजाची
अंतरी सर्वदा जाची
उसळे रणशार्दुलाची घोडदौड संताजीची || १० ||

मर्दानी लढवय्यानी केलेल्या मर्दुमकीची
मर्दानी गीते गातां मर्दानी चालीवरची
फडफडे डफावर थाप मर्दानी शाहिराची
देशाच्या आपत्काली
शर्तीची युद्धे झाली
गा शाहिरा ! या काली
ऐकूदे विजयश्रीची घोडदौड संताजीची || ११ ||

No comments:

Post a Comment