Sunday, December 21, 2014

न्यायालयातील काही आठवणी - १

माझ्या वकिलीच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला मानवी स्वभावाचे बरेच नमुने पाहायला मिळाले; मग त्यात माणूस किती उदार होऊ शकतो, क्रूर होवू शकतो, स्वार्थी बनतो, घरातील लोकांवर विश्वास ठेवून कसे मुर्खासारखे वागतो मग पश्चाताप करतो कि ज्याचा क्वचितच उपयोग होतो वगैरे. मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याच्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावरील होणारा अन्याय काही प्रमाणात दूर करता येतो का याचा प्रयत्न करायचो. परमेश्वर मला बहुतेक वेळा साथ देत असे आणि हो अगदी आजही देतो. मला तर खूप वेळा वाटते की - 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया' याचा प्रत्यय देण्यासाठी असे अनुभव मला येत असावेत. असो. आज मला साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वीची घटना आठवली, ती नावांचा उल्लेख टाळून सांगतो                              
            ********************************************************
आपल्या समाजात स्त्रियांना किती स्थान आहे हे आपणास माहीतच आहे, ही घटना घडलेली आहे साधारणतः १९५७ - ६० दरम्यानची. एका कुटुंबात २ / ३ मुले होती, मोठा मुलगा शेती करायचा आणि घरातील सर्व व्यवहार पाहायचा. शेती कोरडीची होती, त्यातून काय उत्पन्न येणार आणि महत्वाचे म्हणजे त्या जमिनीचा हा कूळ होता. त्यावेळच्या परिस्थितीने हा त्या शेतीचा मालक बनला, त्याचे पीकपेरे सदरी नाव देखील लागले. त्याचे लग्न नुकतेच झाले होते आणि त्याला एक मुलगी देखील झाली होती, असे एकंदरीत ठीक चालले होते. मात्र त्याचे किंवा त्याच्या पत्नीचे दुर्दैव येथेच संपले नव्हते तर ते त्याच्या मुलीलाही भोगावे लागणार होते, हे भविष्य होते. मोठ्या मुलाचे निधन झाले, कुळ कायद्याने तो मालक झाला होताच, मात्र त्याच्या मृत्युनंतर परिस्थिती बदलली. मोठ्या मुलाच्या पत्नीला तात्काळ तिच्या मुलीसाहित माहेरी पाठविण्यात आले, 'हो, मुलगी म्हणजे वंशाचा दिवा थोडीच असतो? तिच्या पालन पोषणावर खर्च करणे यासारखा मूर्खपणा आणि आतबट्ट्याचा व्यवहार कोणता आणि ते देखील तिचे वडील वारले असतांना? म्हणजे अशांची रवानगी वेड्याच्या दवाखान्यातच व्हावयास हवी. त्या मोठ्या मुलाच्या पत्नीस आणि मुलीस विनाविलंब तिच्या सासरच्यांनी माहेरी पाठवून दिले, ती आणि तिची मुलगी माहेरी राहू लागली, त्यांचे पालन पोषण आणि सर्व जबाबदारी माहेरच्यांनी घेणे स्वाभाविक होते, त्यांनी ती जबाबदरी पार पाडली आणि मुलीचे, म्हणजे त्या मोठ्या मुलाच्या मुलीचे लग्नही लावून दिले, खर्चही माहेरच्या लोकांनीच केला, सासरचे लोक कदाचित लग्नाला हजर असतील.
दरम्यानच्या काळात सासरच्या लोकांनी कुळ कायद्यातील तरतुदींचा यथास्थित वापर करून मालकीचा दाखला मिळविला आणि हुशारीने नोंदी देखील इतर भावांच्या नावाने करून घेतल्या आणि मोठ्या मुलाचे, त्याच्या पत्नीचे आणि त्याच्या मुलीचे नाव सर्व दप्तरावरून अगदी नाहीसे करून टाकले आणि निवांतपणे शेताचे उत्पन्न घेवू लागले, सून आणि नातीचा काही संबंध असण्याचा प्रश्नच नव्हता, जणू काही हा मोठा मुलगा अस्तित्वातच नव्हता तेंव्हा त्याची पत्नी आणि मुलगी यांचा विचार तर फारच दूरची गोष्ट.
मोठ्या मुलाच्या मुलीचे लग्न झाले, जावाई समजूतदार होता, शिकलेला होता मात्र त्याची सासू म्हणजे मोठ्या मुलाची पत्नी ही निरक्षर होती. तिला आयुष्यभर माहेरी रहावे लागले याचे तर दुःख होतेच, मात्र त्यापेक्षा जास्त दुःख होते ते 'आपल्या नवऱ्याने घरासाठी एवढे केले, शेती मिळवली मात्र आपल्याला माहेरी राहावे लागले आणि सोबत मुलीलाही राहावे लागले.' जावई सासूची समजूत घालायचा, पण त्या मातेच्या मनातला सल काही केल्या जात नव्हता. सासरच्या लोकांनी ते शेत विकावयास काढल्याचे तिला समजले, मग मात्र तिला राहवले नाही. तिने 'वकिलाकडे घेवून चल' म्हणून घोषाच धरला. तिचा जावई तिला माझ्याकडे घेवून आला.

तिने सर्व हकीकत सांगितली आणि तिचे एक वाक्य माझ्या कायम हृदयात कोरले गेले, 'भाऊ, अरे माझा बाप होता तर त्याने मला पोसली आणि भर म्हणून की काय माझ्या पोरीलाही पोसली, मी रांडमुंड बाई काय करणार, माझा इलाज नव्हता. मलाही खूप सोसावे लागले, पोरीसाठी मी सोसले. पण आता पोरीने तिच्या सासरी का सोसावे? तिच्या बापाची शेती आहे, ती शेताची मालकीण आहे, माझे आता काय राहिले आहे? पण तिच्या बापाची शेती तिला मिळाली पाहिजे नाहीतर खऱ्यावर कोण विश्वास ठेवणार?' तिचा प्रश्न बिनतोड होता, उत्तर देणे खूप कठीण होते. माझा न्यायावर विश्वास आहे पण वेळ किती लागेल हा प्रश्न होता. मी त्या बाईच्या वतीने दावा दाखल केला. सामनेवाल्यांना नोटीसा लागल्या. मग चर्चा, वावड्या आणि अफवांना ऊत आला. सामनेवाल्याना समजले, तिच्यावर नाही नाही ते आरोप सुरुवातीला झालेत, तिला सुरुवातीला दुःख झाले मग संताप आला. 'सत्याचा वाली परमेश्वर असतो, त्याचा न्याय बरोबर असतो, त्याला अन्याय सहन होत नाही '.

सामनेवाल्याकडून त्यांना निरोप येऊ लागले, कोर्टाचे काही खरे नाही, तुम्हाला कधीही काहीही मिळणार नाही वगैरे. मी धीर देत होतो. मात्र एका दिवशी कोर्टात बसलो असता, त्या बाईचा जावई आला आणि हताशपणे 'ते शेत विकणारच आहे' असे सांगू लागला. माझ्या कारकुनाजवळ मी उभा होतो, तेथे सामनेवाले देखील होते, मला काही त्याची कल्पना नव्हती. मी बोलून गेलो, 'जगात चांगुलपणावरचा विश्वास टिकावयास हवा, तरच जग चालेल. आज नातेसंबंध संपून जातात कि काय अशी परिस्थिती झालेली आहे. असो, आपण आपले काम करत रहावे, फळाची अपेक्षा करू नये 'गीता तेच सांगते'.
दुसरे दिवशी त्या बाईचा जावई मला भेटायला आला आणि माझ्या हातावर पेढे ठेवले, मला समजेना, 'काय झाले?' मी विचारले. 'गावातील लोकांनी फजित केले आणि त्या खरेदी करणाऱ्याला सांगितले, 'शेताची मालकीण वेगळी आहे, ७/१२ च्या उताऱ्यावर जाऊ नको. या गावात शेती करायची असेल तर शेताच्या मालकीणीलाच पैसे द्यावे लागतील', झाले, सामनेवाले १० आणे पैसे द्यायला तयार झाले. आता मलाही जास्त भांडायचे नाही'.

No comments:

Post a Comment