Sunday, December 28, 2014

शिक्षकांचा अभ्यासक्रम

शिक्षकांसाठी पांच वर्षांचा अभ्यासक्रम ठेवणार आहे, हेतू हा की शिक्षक चांगले मिळावेत. विचार अतिशय स्तुत्य आणि आजची आपल्या बहुतांश शिक्षकांची शिकवण्याची पध्दत पाहता आवश्यक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामध्ये आजच्या शिक्षकांना कमी लेखणे अथवा त्याच्या कामाबाबत, त्यांनी मिळवलेल्या पात्रतेबाबत असलेले प्रश्नचिन्ह हा अजिबात हेतू नाही मात्र त्याबाबत मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की मी 'जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये' ४ थी पर्यंत होतो, त्यातील काही शिक्षक हे कदाचित त्याकाळचे matric देखील नव्हते, ते होते 'व्ह. फा.' म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा ७ वी नंतर असायची, त्यांचे हे शिक्षण आजच्या मानाने काहीही नसेल कदाचित आजच्या असलेल्या शिक्षकांच्या हव्या असलेल्या पात्रतेच्या दृष्टीने ते अपात्र असतील, आज जर ते शिक्षकांसाठी अर्ज करतील तर त्यांचे अर्जदेखील योग्य म्हणून स्विकारले जाणार नाही आणि त्या पात्रतेवर त्यांना आज शिक्षकांची नोकरी मिळणे तर अशक्य कोटीतील बाब ! इतके असले तरी मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते कि सन १९६७ ते १९७० या काळात आम्हास ज्यांनी शिकवले त्यास आज इतकी वर्षे झाली आहेत मात्र मला आजही पहिलीला असणारे 'बोरोले गुरुजी, दुसरीला असणाऱ्या डेरेकर बाई, तिसरीला असणारे गुरव गुरुजी आणि चौथीला असणारे पठाण गुरुजी' यांनी शिकविलेले धडे आणि धडे शिकवताना ज्या त्यांच्या लकबीसह शिकवले त्यासह आठवतात, आजच्या किती विद्यार्थांना की आज जे कॉलेजमध्ये आहेत त्यांना आपले 'गुरुजी आणि त्यांनी शिकवले धडे' आठवतात?

मित्रानो, शिकवण्याची कायदेशीर असलेल्या पात्रतेपेक्षा त्याची शिकवण्याची इच्छा आणि कळकळ किती आहे हे महत्वाचे आणि विद्यार्थ्यावर कायमचे परिणाम करणारे असते आणि आहे. इंजिनीरिंगला प्रवेश मिळत असतांना, त्या काळातील 'तहसीलदार, डे. कलेक्टर' ही नोकरी मिळत असतांना देखील या व्यक्ती 'शिक्षक' बनल्या होत्या आणि त्यांनी आम्हास हायस्कूल मध्ये शिकवले होते. म्हणूनच हा जो शिक्षकांसाठी पात्रतेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरु करण्याची घोषणा केलेली आहे ही ज्यांची शिक्षक होण्याची खरच इच्छा आहे त्यांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरू शकेल असे वाटते.         

No comments:

Post a Comment