Thursday, December 25, 2014

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - १

आपल्या भारतमातेने संपूर्ण जगाला खूप काही दिलेले आहे, ज्ञान, आदर्श, पराक्रम, नीतीमूल्ये, राजकारण, किती क्षेत्रे सांगावीत?  आणि आजही देतच आहे. ते विज्ञान क्षेत्रातील वैद्यानिक असतील, वैद्यकीय क्षेत्रातील वैद्य / शल्यकर्मतज्ञ असतील, पुराणकाळात दुष्टांचे निर्दालन करणारे भगवान परशुराम असतील, आदर्शांचे आदर्श असे मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असतील, 'परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे !!' असे भगवान कृष्ण असतील, जगतास शांतीचा संदेश आणि त्याची लोकविलक्षण देणगी देणारे 'भगवान गौतम बुध्द', अहिंसेचे तत्वज्ञान समर्थपणे मांडणारे 'भगवान महावीर' असतील. 

अलिकडच्या ऐतिहासिक काळातील वीरांचा आणि देशप्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असे महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी महाराज असतील, 'धर्मासाठी मरावे, मरोनि अवघ्यांसी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले' ही 'समर्थ रामदासांची' वाणी प्रत्यक्षात आणणारे 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे नांव कोण विसरू शकेल? 'आधी मुळावर घाव घाला, मग फांद्या आपोपाप खाली येतील' हे राजकारणातील पराक्रमाचे सत्य सांगणारे त्या काळातील सर्वश्रेष्ठ सेनापती 'बाजीराव पेशवे' असतील, किती जणांची नावे घेणार?

'माझ्या मराठीची बोली कौतुके, अमृतातेही पैजा जिंके' असे सांगून सर्व जगतास आपल्या पसायदानात 'जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात' अशी परमेश्वराची आळवणी करणारे आणि आपल्या समाजाने ज्यांचा कमालीचा छळ केला असतांना देखील स्वतःसाठी काहीही न मागता सर्व प्रनिमात्रांसाठीच मागणारे 'संत ज्ञानेश्वर' आम्ही विसरू शकतो का? 'जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, देव तेथेचि ओळखावा' हे देवाचे वस्तीचे सोपे ठिकाण सांगणारे 'संत तुकाराम', 'लंगड्या देवाची' आळवणी करणारे आणि गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखी ओतणारे - शूद्र मानल्या गेलेल्या समाजातील घटकाच्या मुलाला कडेवर घेवून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे 'संत एकनाथ', 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा' म्हणून प्रत्यक्ष 'पांडुरंगाची' खरडपट्टी काढणारे 'संत चोखा मेळा असतील, 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' असे निक्षून सांगणारे आणि संपूर्ण भारतभर 'ज्ञानदीप' लावणारे 'संत नामदेव' ! 'मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई रे' म्हणत विषप्राशन करणारी 'संत मीराबाई' असो. मित्रानो, अजून किती नावे आठवणार? 

'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' म्हणून कीर्तनाने समाज जागृती करणारे 'गाडगेबाबा',  महिलांना शिक्षण द्यावे हा हट्ट करणारे 'महात्मा फुले' असोत किंवा त्यासाटी समाजाचे दगड खाणाऱ्या 'सौ. सावित्रीबाई फुले' असोत. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, त्रिखंडात आपली धर्मसंस्कृतीपताका फडकाविणारे 'स्वामी विवेकानंद आणि ज्यांची उडी त्रिखंडात गाजली ते विनायक दामोदर सावरकर असोत.   

समाजातील पददलितांना सर्वांसोबत आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचणारे 'डॉ. भीमराव आंबेडकर' असोत का 'पददलित समजल्या जाणाऱ्या महिलांना नवी दृष्टी आणि दिशा देणारे 'महर्षी धोंडो केशव कर्वे' असोत, स्वतंत्र भारताचे पहिले गवर्नर जनरल 'श्री सी राजगोपालाचारी', भौतिक शास्त्राचे 'नोबेल पारितोषिक' मिळवणारे 'श्री. सी व्ही रामन', थोर तत्वज्ञ 'सर्वपल्ली राधाकृष्णन', 'डॉ. भगवानदास', आपले पहिले पंतप्रधान 'पंडित जवाहरलाल नेहरू', अभियंत्याचे सर्वार्थाने गुरु 'मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या', 'पंडित गोविंदा वल्लभ पंत', 'बिदनचन्द्र रॉय', 'पुरुषोत्तमदास टंडन', आपले पहिले राष्ट्रपती 'डॉ. राजेन्द्रप्रसाद', आपल्या धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे संस्कृत प्रकांड पंडित, 'डॉ. पांडुरंग वामन काणे', 'डॉ. झाकीर हुसेन', १९६५ मध्ये 'पाकिस्थानला' पराभूत करून आपल्या इतिहासातील 'आठवे सोनेरी पान' लिहिणारे आणि आपल्यास 'जय जवान, जय किसान' ही घोषणा देणारे आपले कणखर पंतप्रधान 'लालबहादूर शास्त्री', आम्हा भारतीयांनी १९७१ पाकिस्थानला हरवून 'बांगला देशास' स्वातंत्र्य  देताना आम्ही 'दुर्गामातेच्या' रुपात पाहिलेल्या आमच्या पंतप्रधान 'श्रीमती इंदिरा गांधी', कामगारांसाठी आपले जीवन व्यतीत करणारे राष्ट्रपती 'व्ही व्ही गिरी', नेते 'के कामराज', समाजसेविका 'सेवाव्रती मदर तेरेसा', समाजात विलक्षण कल्पना आणणारे 'भूदान चळवळीचे जनक' 'आचार्य विनोबा भावे', स्वातंत्र्य सैनिक 'सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान', पंतप्रधान 'मोरारार्जी देसाई' व 'राजीव गांधी', स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले कणखर गृहमंत्री 'लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल', स्वातंत्र्यसैनिक आणि आणीबाणी विरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व करणारे 'जय प्रकाश नारायण', भारतीय उद्योगपती 'जे आर डी टाटा', राष्ट्रपती 'मौलाना अब्दुल कलम आझाद', चित्रपटांचे ज्ञानी 'एम जी रामचंद्रन' आणि 'सत्यजित राय', मिसाइल पुरुष, शास्त्रज्ञ आणि आपले राष्ट्रपती 'डॉ. अब्दुल कलाम', स्वातंत्र्य सैनिक 'अरुणा असफ अली'. 'गुलझारीलाल नंदा', 'सी सुब्रम्हन्यम', गायिका 'एम सुब्बलक्ष्मी' आणि गायक पंडित भीमसेन जोशी', संगीतज्ञ सतारवादक पंडित रविशंकर',  किती नवे घ्यावी, ही रत्नांची खाण आहे, संपणार नाही. 

या सगळ्या रत्नांनी आपल्याला जे काही दिले आहे ते आपण विसरू नये आणि आपणही भारतमातेसाठी काहीतरी केले पाहिजे हे लक्षात ठेवून आपली वाटचाल केली, त्यानुसार कृती केली तरी ते खूप होईल.  

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - १ 



No comments:

Post a Comment