Tuesday, December 23, 2014

मनातील इच्छा

मित्रांनो, मला गेल्या अनेक वर्षांत माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने माणुसकीचे, धडाडीचे - लढाऊ वृत्तीचे, लबाडीचे - फसवणुकीचे, उदारतेचे आणि हो, पराभवाचे, हताशपणाचे वगैरे असंख्य अनुभव आले, ते मी शब्दबद्ध करावे, याचे एक पुस्तक होईल, असा मला माझा महाविद्यालयीन मित्र श्री हिंगोणेकर नेहमी म्हणतो. तो आता शिक्षणाधिकारी आहे आणि विशेष म्हणजे मुळातून तो 'कवी' आहे, 'अरे लोकांना समजले पहिजे, आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी आहेत, ते जीवनाशी लढत असतात आणि परिस्थितीला टक्कर देत असतात - कोणत्याही साधनसामुग्रीशिवाय, फक्त 'त्याच्या न्यायावर म्हणजे समाज्याच्या न्यायबुद्धीवर' विश्वास ठेवून, हा विश्वास टिकला पाहिजे तरच समाज टिकेल. आपल्याला समाज टिकवायचा आहे.' त्याचे नेहमीचे म्हणणे. माझी मुलगी तर नेहमी म्हणते 'बाबा, तुम्ही 'तापीचे पाणी' या नावाने लिहाच ! (तिने आचार्य अत्र्यांचे 'कऱ्हेचे पाणी' हे वाचलेले नाही म्हणूनच ती ही असे बोलण्याची हिम्मत करीत आहे)
माझी सर्वात मोठी अडचण म्हणजे 'वेळेची', हे लिहायचे म्हणजे वेळ द्यावा लागणार. थोड्याफार फरकाने परिचितही हेच सांगत असतात - अर्थात माझी इच्छा नाही असे नाही, माझी पण इच्छा आहे, पण मला माझा व्यवसाय तर करायला हवा - पोटासाठी ! आता न्यायालयास 'हिवाळी सुटीचे' वेध लागलेले, थोडी सवड काढता येत आहे, पण सुटीतीलही कामे खूप आहेत कारण ती निवांतपणे आणि काळजीपूर्वक करावी लागतात - त्याचा विषय खूप गुंतागुंतीचा आणि वेळ घेणारा असतो. बघूया, काय शक्य होते ते. तुम्हा सर्वांची काय इच्छा आहे हे देखील फारच महत्वाचे आहे कारण आपली प्रत्यक्ष भेट जरी झालेली नसली, होत नसली तरी तुम्ही सर्वजण हजारोंच्या संख्येने माझ्यासोबत नेहमीच असतात ही मला जाणीव असते. 

No comments:

Post a Comment