Thursday, December 25, 2014

भारतमातेची रत्ने - 'भारत रत्ने' भाग - 2

मित्रानो, या 'भारत रत्नांमध्ये', म्हणजे 'भारत रत्न' पुरस्कारांमध्ये आज अजून दोन नांवे समाविष्ट झालीत.  पहिले म्हणजे -  आपल्या पारतंत्र्यात १९०९, १९१३, १९१९ आणि १९३२ साली कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले, नंतर 'हिंदू महासभेचे' पुरस्कर्ते झालेले, तसेच 'बनारस हिंदू विद्यापीठाचे' संस्थापक 'पंडित मदन मोहन मालवीय' आणि दुसरे म्हणजे 'मा. अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी' नाव समाविष्ट झाले आहे,  'मा. अटलबिहारी वाजपेयी' यांचा आज वाढदिवस, या निमित्ताने देशाने त्याच्या देशकार्याची आठवणीने पावती दिली हे फार चांगले झाले. ते दिनांक २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियर येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात सौ. कृष्णादेविच्या पोटी जन्माला आले. शिक्षक वडिलांची काव्यवृत्ती घेऊन जन्माला आलेले अटलजी हे 'सरस्वती शिशु मंदिरातून' शिक्षण घेऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण ग्वालियर येथील 'विक्टोरिया कॉलेज' - आताचे ' राणी लक्ष्मीबाई कॉलेज' येथे घेऊन विशेष श्रेणीत इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत पदवीधर झाले. त्यानंतर आपले पदव्युत्तर शिक्षण कानपूरला 'दयानंद अंग्लो कॉलेज' येथे घेतले आणि ते एम ए प्रथम श्रेणीत झाले. 'आर्य समाज्याच्या' युवक कार्यकर्त्यांमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी १९४४ मध्ये जबाबदारी पार पाडली. १९३९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्यावर १९४७ ला प्रचारकाचे काम केले.

त्यांनी सन १९५१ मध्ये 'भारतीय जनसंघ' या राजकीय हिंदुत्ववादी पक्षाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सोबत जबाबदारी सांभाळली.  त्यानंतर ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेसोबत काश्मीर येथे त्यांचे 'आमरण उपोषण' सुरु असताना होते, दुर्दैवाने 'श्यामाप्रसाद मुखर्जी' हे तुरुंगात असताना १९५७ मध्ये वारले. 'मा. अटलजी १९५७ मध्ये लोकसभेत 'बलरामपुर' मतदार संघातून निवडून आले. आपल्या अमोघ वक्तृत्वाची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचेवर पडलेली छाप ही 'पंडित नेहरूंनी' त्यांना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून भविष्यवाणी करती झाली. आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने, कमालीच्या संघटन कौशल्याने ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचेनंतर 'भारतीय जनसंघाचे' नेता झाले. सन १९६८ साली ते 'भारतीय जनसंघाचे' राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यांचे सोबत तेवढेच समर्थ असे नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी होते.

सन १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात ते तुरुंगात होते. जयप्रकाश नारायण यांच्या हाकेला प्रतिसाद देवून सामाजिक बदलासाठी, कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी 'भारतीय जनसंघ' आणि इतर विरोधी पक्षांचा ''जनता पक्ष' बनला. सन १९७७ च्या 'जनता पक्षाच्या' विजयानंतर ते 'पंतप्रधान मोरारजी देसाई' यांच्या मंत्रिमंडळात 'परराष्ट्र मंत्री' झाले आणि त्यांनी 'युनो' मध्ये प्रथमच 'हिंदीत' भाषण केले. 'जनता पक्षाच्या' पतनानंतर सन १९८० मध्ये जुन्या एका विचाराच्या लोकांनी जसे, लाल कृष्ण अडवाणी, भैरो सिंग शेखावत वगैरे, पुन्हा एकत्र येवून 'भारतीय जनता पक्ष' नावाने राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे ते प्रथम अध्यक्ष झाले. मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमिबाबत सर्व देशभर 'विश्व हिंदू परिषदेने' जनजागृती केली. 'भारतीय जनता पक्षाला' ही भूमिका मान्य होती. मुंबई येथे १९९५ मध्ये भरलेल्या 'भारतीय जनता पक्षाच्या' संमेलनात 'लाल कृष्ण अडवाणी' यांनी १९९६ मध्ये येणाऱ्या निवडणुकात विजयी झाल्यावर 'अटलजी' पंतप्रधान होतील हे जाहीर केले, 'भाजप' विजयी झाला.

राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी 'भाजप' हा सर्वात मोटा पक्ष असल्याने त्यास सरकार बनवण्यासाठी पाचारण केले, पण दुर्दैवाने केवळ १३ दिवसात त्यांना त्यांचेकडे बहुमत नसल्याने राजीनामा द्यावा लागला. तोडफोडीचे राजकारण करण्याचे विरुद्ध त्याची भूमिका असल्याने अशारितीने सत्ता टिकवून धरण्यापेक्षा ती सोदलेली केंव्हाही चांगली हि त्यांची प्रामाणिक भूमिका होती. सन १९९६ ते १९९८ या काळात 'संयुक्त आघाडीचे' सरकार होते, मात्र ते न टिकल्याने लोकसभा बरखास्त झाली. सन १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' च्या रूपाने 'अटलजी' पुन्हा पंतप्रधान झाले, ते सरकार १३ महिने टिकले आणि १७ एप्रिल १९९९ रोजी विश्वासदर्शक ठरावासाठी एक मत कमी पडून सरकार गडगडले, त्यावेळी देखील सत्ता टिकवण्यासाठी नैतिकतेचा बळी दिला गेला नाही. विरोधी पक्षांना फक्त सरकार पडावयाचे होते, ते त्यांचे कार्य साध्य झाल्याने आणि सत्ता स्थापणेसाठी त्यांचेकडे देखील बहुमत नव्हते, त्यामुळे पुन्हा लोकसभा विसर्जित झाली, 'अटलजींचे' मंत्रिमंडळ पुढील नवीन व्यवस्थेपर्यंत कार्यवाहक मंत्रिमंडळ म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र जनतेने चूक केली नाही आणि 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' बहुमतात आली, 'मा. अटलबिहारी वाजपेयी' पंतप्रधान झाले, शपथविधी दिनांक १३ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला, या सरकारने २००४ पावेतो नियमितपणे पूर्ण काम पहिले.

त्याच्या कार्कीर्दीतीन महत्वाच्या घटना -
१. मे १९९८ मध्ये पोखरण येथे भूमिगत अणुस्फोट - भारताची अणु विषयक ताकद जगास दिसली
२. लाहोर शिखर परिषद - वाटाघाटीच्या, शांततेच्या मार्गाने जाण्याची नेहमीची भारताची परंपरा आणि निती  जोपासली
३. कारगिल विजय - पाकीस्थानच्या नेहमीच्या त्रासदायक प्रकारावर पुन्हा भारताचा विजय
४. प्रधान मंत्री ग्रामसडक योजना
५. संसदेवर हल्ला
६. आर्थिक सुधारणा
७. गुजराथ दंगे

मित्रांनो, ही त्याच्या कारकिर्दीची जंत्री एवढ्याने संपत नाही, तर ती मला पडलेल्या खालील प्रश्नांनी थोडीफार पूर्ण होवू शकते -
१. 'अजातशत्रू' असलेले व्यक्तिमत्व आता राजकारणात किती राहिलेले आहे?
२. नैतिक मुल्ये राजकारणाच्या चिखलात जपणारे आणि ती कायम टिकून राहावयास हवी असे मनापासून वाटणारे, तसे आचरण करणारे सध्या किती राजकारणी राहिले आहेत?
३. उत्तम बौध्दिक संपदा असूनही आपले सर्व आयुष्य समाजाच्या सेवेसाठी कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता देणारे आणि विशेषतः आपल्या पक्षाची, विचारांची राजकारणात बऱ्याच काळापावेतो  होत असलेली ओढाताण पाहता पक्ष तसेच विचार न बदलविणारे सद्यस्थितीत किती जन मिळतील?
४. धकाधकीच्या जीवनात काव्यवृत्ती टिकवून ठेवणारे कितीसे राहिलेले आहेत?

प्रश्न खूप आहेत, लिहावे किती हा देखील एक प्रश्न आहे. मला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची राष्ट्राबाबतची कल्पना आठवली, ती त्याच्याच शब्दात -
                         'स्वतंत्रतेची ही मूल्ये आम्ही नीट समजून घेतली पाहिजेत. स्वतंत्रता कधीही एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीसमुहाच्या स्वार्थसिद्दीचे साधन बनू शकत नाही. असेल, तो व्यक्तीसमूह कितीही मोठा असेल, अगदी पन्नास कोटींचा असेल; तरीही त्यांचे स्वार्थसाधन हे काही स्वतंत्रतेचे उद्दिष्ट नव्हे. स्वतंत्रतेला स्वार्थासाठी राबविणे म्हणजे तिला तिच्या उच्चासनावरून खाली ओढून तिची धूळधाण करणे होय. स्वार्थसिद्धीचा दृष्टीकोन स्विकारून जर आपण आपले काम करू लागलो तर मग आपल्याला स्वातंत्र्याची खरी अनुभूतीही मिळू शकणार नाही आणि आपण विश्वाची सेवाही करू शकणार नाही. स्वार्थी आणि अहंकारी वृत्तीने जर आपण देशाची कामे करू लागलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. '      
       
आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना 'शतायुषी करणेबाबत परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.

सरतेशेवटी 'मा. अटलजींची' कविता द्यावीशी वाटते -

आओ फिर से दिया जलाएँ

आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वतर्मान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ।

आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

- भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी  

No comments:

Post a Comment