Tuesday, February 13, 2018

'कुटुंब कर्ता' हा कायमच रहाणार आहे

एकत्र कुटुंबातील कर्त्याला काही वेळा मोठ्या कठीण प्रसंगास तोंड द्यावे लागते. कर्ता जर कमविता बाप किंवा आजोबा असेल तर ठीक आहे, त्याच्यापासून थोडा लाभ असतो. नाईलाजाने सोबत रहावे लागते. अलिकडे वृद्धाश्रम सुरु झाल्यापासून, ती पण अडचण होत आहे, मग ही मंडळी सरळ वृद्धाश्रमातच रवाना होतात. मात्र काही वेळा यांनी कर्तेपणाची झूल उतरविल्यावर, त्याला मार्गदर्शक म्हणूनही बऱ्यापैकी मान असतो, अडीअडचणीच्या वेळी हा मार्गदर्शक मोलाचे, सर्वांच्या हिताचे आणि व्यावहारिक शहाणपणाचे सल्ले देतो, आपल्या अनुभवाच्या जोरावर ! त्याने द्यायला पाहिजे ही अपेक्षापण असते.
कर्त्याची भूमिका मोठ्या भावाकडे असेल तर फारच अडचण असते, आणि काही वेळा तर जाणीवपूर्वक इतरांकडून केली जाते. इतरांना त्याचा मोठेपणा सहन होत नाही, त्याबद्दलचे दुःख कोणाला सांगता पण येत नाही. वयाने, अनुभवाने हा मोठा असल्याने, त्याच्याकडे मोठेपण येतेच. त्यांत त्याचे कर्तृत्व जसे असते, तसेच त्याचा अनुभवाचा मोठेपणापण असतो. काही वेळा त्याला विनाकारण कुटुंबाच्या हितासाठी स्वतःकडे कमीपणा घेऊन, प्रसंगी स्वत:ला नुकसान सोसून, त्याच्या पदाच्या मोठेपणाचा आब राखावा लागतो. त्याला नि:पक्ष रहावे लागते. कारण समाजातील मोठी माणसे ही 'तू तर मोठा होता, तुला तर समजते. सोडून द्यायचे. ते लहानच आहेत आणि रहातील.' असे त्याला सांगतात, त्यांनी सांगायला पण हवे. मात्र हे उपद्रव करणाऱ्याला अभावानेच सांगतात; मग हे साटेलोटे म्हणा का हिंमत नाही म्हणा !
लहान भावांची अडचण, कुटुंबातील व्यक्तींची अडचण ही त्यांनी कुटुंबातील कर्त्याकडेच आणायची असते, ती दूर करण्यासाठी, आणि तोच दूर करतो किंवा करत नाही. अर्थात आपल्याला त्या कुटुंबांत रहायचे असेल तर त्याचे 'कर्ता' म्हणून असलेले अधिकार मानावेच लागतात, इच्छा असो किंवा नसो ! ते जर मानायचे नसतील तर त्यापेक्षा मोठया मार्गदर्शकाकडे जायला पाहीजे. ---------- अर्थांत कुटुंबांत रहायचे असेल तर ! घरातील या गोष्टी, थेट व निष्कारण पारावर सांगून काही उपयोग होत नाही, त्याने तुमच्यासमोर जरी कोणी सहानुभूतीने कोणी बोलले, तरी ते त्याच्या हेतू साध्य करण्यासाठीच बोलण्याची शक्यता जास्त असते. दुसरी म्हणजे तुम्हालाच त्या कुटुंबाची धूळधाण करायची असते, कोणत्याही कारणांसाठी तर मग तो वेगळा विषय ! या सर्वांवर अगदी त्रयस्थाने ‘निःपक्षपणे न्याय द्यायचा' तर मग कर्त्यासोबत तुमचेपण ‘कर्तृत्व व कार्य’ निश्चितच 'सीसीटीव्ही'मार्फत अगदी 'क्ष किरण' वापरून करून पहावे लागते.
अलीकडे मात्र 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वाची' इतकी काही धुळवड उडविली गेली आहे की त्यांत त्या तत्वाचे खरे रूपच दिसेनासे झाले आहे. काहींना अस्पष्ट दिसते, तर काहींना वेगळ्याच आकारांचा भास होतो आणि मग त्यालाच ते 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' मानू लागतात. त्यामुळे कोणाला काही वाटले की थेट पारावरच येऊन बोलायचे हे स्विकारले जाते. पारावर रिकामी मंडळी भरपूर असते आणि असा काही तुम्ही ‘खेळ करून दाखवत’ असाल तर जास्तीची जमतात पण ! अरे, हे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' नाही, तुमचा 'अहंभाव' आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर यापेक्षा दशांगुळे जास्तच आहे, एवढेच नाही.
'कुटुंब कर्ता' हा कायमच रहाणार आहे, कारण तो लोकशाही पद्धतीने निवडला जात नाही किंवा बदलविता येत नाही, त्यासाठी आपल्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची वाटणीच करावी लागते.
------- जाऊ द्या ! 'सर्वांचेच पाय मातीचे' असतात आणि 'अत्युचीपदि थोरही बिघडतो हा बोध आहे खरा' ! तुमचे घर नेस्तनाबूत झाले तर त्यांत हित असणारे पण होते, आहेत आणि असतील; हे लक्षात ठेवले तरी ‘त्या खऱ्या कुटुंबकर्त्याला’ पुरे !

13..2018

No comments:

Post a Comment