Tuesday, February 13, 2018

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

बऱ्याच वर्षांपूर्वी जळगांवला वल्लभदास वालजी वाचनालयांत सुप्रसिद्ध गीतकार कै. जगदीश खेबुडकर यांचा कार्यक्रम होता. मी त्यावेळी असांच सुटीनिमीत्ताने जळगांवी गेला होतो. त्या वाचनालयांत तत्कालीन मंडळी खूप छान कार्यक्रम ठेवत, कार्यक्रम ठेवण्यासारखी माणसं पण विपुल होती त्यावेळी, आजच्या तुलनेने !
त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध घटना, अनुभव व नंतर चित्रपट क्षेत्रांत अनुभवांस आलेल्या गमतीजमती सांगीतल्या ! त्यांची एक त्यांना न विसरतां येणारी आठवण आणि त्यावेळी त्यांना स्फुरलेली पहिली कविता ऐकवली. सन १९४८ च्या वेळी त्यांना म. गांधी यांच्या त्या मृत्युतून निर्माण झालेल्या, केल्या गेलेल्या प्रसंगांचे चटके बसले होते. त्यांचे घरदार जाळले गेले. ते पहात पहात स्फुरलेली त्यांची ही कविता ! त्याची पहिली ओळ मी विसरू म्हटले तरी विसरतां येत नाही.
‘मानवते तू अनाथ झालीस, मानवते तू विधवा झालीस’ आपले कवी, गीतकार म्हणून आठवणी ते सांगत होते.
नंतर एक सांगीतली - कै. बाबूजी उपाख्य सुधीर फडके हे सव्यसाची संगीतकार व गायक होते.
त्यांना तुम्ही गायला सांगा, ते गीतातील गीतकाराच्या भावना आपल्या स्पष्ट व शुद्ध शब्दोच्चाराशी तडजोड न करता, अगदी सुंदर व्यक्त करीत. चित्रपटात काय प्रसंग असू शकेल, नायक कोणत्या भावनेने गीत गात असेल याचा अंदाज येवू शके; इतके समर्थ गायन त्यांचे होते.
त्यांच्यातला संगीतकार तर अगदी अफलातूनच ! गीताला चाल लावायला त्यांना किती वेळ लागेल ? ते कितीही वेळांत आणि कुठेही चाल लावू शकत. काही वेळा त्यांना अगोदरच एखादी सुंदर चाल सुचलेली असे मग ते गीतकाराला चाल ऐकवत. डाव्या हाताने हार्मोनियमचा भाता थोडा ओढून हवा आंत ओढून घेतल्यावर, हार्मोनियमच्या त्या काळ्यापांढऱ्या पट्टयातून, त्याच्या उजव्या हाताच्या बोटांतून, हो अगदी बोटांतूनच वाटत, जे रंगीबेरंगी, अमृतमय स्वर यायचे, ते त्यांना जाणवायचे, दिसायचे ! आपल्याला दाखवायला, त्यांची दिशा दाखवायला तो हवेत थोडा उंचावला जायचा डावा हातच ! डोक्यातील रचना आवडली की तालात हलायची ती मान !
कै. जगदीश खेबुडकर सांगत होते - त्यांना त्यावेळी चाल सुचलेली होती, यमन रागातील ! त्यांनी गाऊन दाखवली.
‘डाडा डडाडा, डाडा डडाडा, डाडडाड डाड डडाडाडडाडा’ ते म्हणाले, ‘नायक आपले प्रेम, प्रीत व्यक्त करतोय. नायिकेला पण हे समजतंय आणि ती पण त्याच्या साद घालण्यास प्रतिसाद देतेय ! हे बघ शब्दांची ओढाताण, तोडमोड व्हायला नको.
म्हटलं - तुमचं, ‘डाडा’ हे तर काय समजणार कोणाला ?
ते म्हणाले - मग यांत शब्द भरा. मी प्रसंग सांगीतला आहे. त्यांची भावना सांगीतली आहे. मी आणि आशा भोसले गाणार आहे. ‘धाकटी बहीण’ या चित्रपटात !
ते म्हणाले - परमेश्वर पण काय माणसं जन्माला घालतो एकेक ! त्याला प्रत्यक्ष येता येत नाही म्हणून ! ही माणसं त्याचीच एकेक गुण घेऊन येतात. सर्व संबंधीत मंडळी बसलेली होतीच, गप्पाटप्पा करत !
ते म्हणाले - मग, मलाच काही सुचेना लवकर. थोड्या वेळाने मला काही शब्द सुचले, त्याच चालीवर ! यमन कल्याण रागातील भाव दाखवणारे, चित्रपटातील नायक-नायिकेची भावना व्यक्त करणारे, त्या प्रसंगाला साजेसे ! मग ही कविता, हे गीत जन्माला आलं ! ते पहिले कडवे, धृवपद होते -
‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना
आज सकाळी जळगांवी जाताजाता औरंगाबाद आकाशवाणीवर मराठी चित्रपटगीते या कार्यक्रमांत हे सुंदर गीत लागले होते. गाडीत ऐकत होतो. एखादा प्रसंग, घटना, बोलणे, गीत आपल्याला कोणत्या आठवणींत गुंतवून टाकेल, त्यातून आपल्याला काय आठवेल, सांगता येत नाही.
आता आपणा सर्वांसाठी -
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा
चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

21.1.2018

https://www.youtube.com/watch?v=793SssOcPBk&feature=share

No comments:

Post a Comment