Tuesday, October 3, 2017

निष्ठा आणि श्रद्धा !

निष्ठा आणि श्रद्धा !

आज मागच्या रविवारी लिहीता लिहीता अपूर्ण राहिलेल्या कल्याण थाटातील ‘यमन कल्याण’ यांवर काही अजून लिहावे असा विचार होता; पण या आठवड्यांत वकील मित्रांशी असेच बोलणे झाले. विषय निष्कारणच गंभीर झाला, असे वाटले ! कारण यानंतर लोकांनी न्यायालयात यावे का ? ते येतील का ? मी म्हणालो ‘लोकांचे जाऊ द्या, आपली मुलं, ज्यांना इतरत्र खूप चांगली संधी आहे ती, तरी इकडे येण्यास तयार आहे का ? विषय थोडा भावनिक झाला कारण त्यातले गांभीर्य व भीषणता तशीच आहे, इतरांच्या लक्षात आली नाही तरी ! मला काही घटना आठवल्या त्यावेळेस, कारण त्या घटनांशी संबंधीत माणसं त्याच दिवशी कोर्टातच भेटली होती.
—�—�—�— —�—�—�—�- —�—�—�—
मी जळगांवच्या ‘नूतन मराठा कॉलेज’चा विद्यार्थी ! सन १९७९ ते १९८२ पर्यंत येथे होतो. या कॉलेजने मला जगाचे खूप अनुभव दिले, जवळून दर्शन दिले, अगदी माझ्या कमी वयांत व कमी वेळेत ! त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य होते डॉ. के. आर. सोनवणे ! माझ्यावर यांचा खूप लोभ ! नूतन मराठा कॉलेजच्या कोणी माझ्यावर प्रेम केले नाही ? अगदी पिरीयड संपल्यावर घंटा वाजवणाऱ्या शिपायापासून ते आमच्या प्राचार्यांपर्यंत, थेट संस्थेचे त्यावेळचे चेअरमन कै. ॲड. नानासाहेब चौधरी यांनी ! कोणत्याही प्राध्यापकांच्या नांवावर अभ्यासाची कोणतीही व कितीही पुस्तके आणण्याची मला मुभा होती. ना मी त्यांच्यापैकी कोणाच्या नात्यातला ना त्यांच्या जातीतील ! अलिकडे दुर्दैवाने मुद्दाम सांगावे लागते, स्वातंत्र्यानंतर आपण खूप प्रगती केली आहे.
आजपावेतो मला माझ्या इथवरच्या प्रवासात माझ्यावर कसलीही अपेक्षा न करता लोभ करणारी माणसं भेटली, म्हणून मी इथपर्यंत आलो अन्यथा काय झाले असते याचा विचार जरी आज केला, तरी आजही माझ्या जावू द्या, पण इतर माहितगारांच्या अंगावर देखील काटा येतो आणि त्यांची झोप उडते. असो.
परवा मला नुकतेच कोर्टात भेटले होते, श्री. अजय महाडीक ! त्यांचे मोठे भाऊ त्यावेळी नॉन टिचींग स्टॉफमधे होते. बोलणेचालणे तर त्यांच्याशी असायचेच ! कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांत तो शिकत असतांना जे गुण होते किंवा दुर्गुण होते, ते माझ्यामधेही होते. प्राचार्यांनी किंवा वादविवाद मंडळ प्रमुख असलेले श्री. प्रा. रमेश बाऊस्कर यांनी ‘मी एखाद्या वादविवाद किंवा वक्तृत्व किंवा कोणत्याही स्पर्धेसाठी जाऊ का ?’ हे विचारल्यावर कधीही नकार दिलेला नाही. बहुतेक मी व प्रमोद हे कॉलेजतर्फे जायचो, तसेच कोळी व एक शिरसाट म्हणून मुलगी पण होती. आता इतक्या वर्षांत कोण कुठे तर कोण कुठे ! ‘काय जो खर्चबिर्च लागेल तो पोरांना द्या. सॅक्शन वगैरे नंतर पाहू.’ अशी सूचना बहुतेक प्राचार्यांची असावी, आमचे वागणे तसेच होते.
एकदा नोटीस बोर्डावर स्पर्धेची नोटीस लागली. रात्रीच निघायचे होते. प्रा. रमेश बाऊस्कर सरांना सांगीतले. त्यांनी मला नॉन टिचींग स्टॉफला भेट व त्यांचेकडून तसे कॉलेजचे पत्र घेण्यास सांगीतले. तेथे श्री. जयप्रकाश महाडीक होते. मी हे सांगीतल्यावर त्यांनी कॉलेजतर्फे टीम पाठवीत आहेत, भाग घेऊ द्यावा हे पत्र स्पर्धा संयोजकांना देण्यासाठी माझ्याजवळ दिले. प्रश्न आला पैशाचा, जाण्यासाठी पैसे तर लागणार ! प्राचार्य नव्हते, त्यांची मंजूरी लागणार, ती मिळण्याचा प्रश्नच नव्हता ! आम्हा विद्यार्थ्याजवळ कसले आले आहे पैसे ? मी बाहेर गांवाहून येथे शिकायला आलेलो.
मग श्री. महाडीकांनी खिशातून काही पैसे काढले, शेजारचे श्री. देशमुख होते त्यांना ‘पैसे काढण्यास सांगीतले’, अजून दोन-तीन जणांकडून घेऊन तीनेकशे रूपये पूर्ण केले ? ‘महाडीक, पैसे काय मागतोय ?’ हे इतरांनी विचारल्यावर त्यावेळी ते उत्तर व कृती महत्वाची वाटली नाही. पण आज मात्र आजच्या वातावरणांत खु महत्वाची वाटतेय ! ‘अरे, पोरं काय बिनापैशाने जातील ? आपण मंजूरी वगैरे नंतर घेवू ! पोरांना परक्या ठिकाणी अडचण नको ! पैसे द्या पहिले !’ महाडीकांचे उत्तर !
त्यावेळी आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायला परवानगी व पैसे मंजूरीसाठी प्राचार्य नव्हते ! ते नाही म्हणणार नाही ही खात्री होती. पण सन १९८०-८२ सालातील असलेल्या पगारात बसत नसतांना त्या सर्वांनी आमच्या प्रवासखर्चासाठी पैसे का गोळा करावे ? पैसे गोळा करून आम्हाला पाठवावे असे आम्ही नूतन मराठा कॉलेजचे कोण लागत होतो ? या तुटपुंज्या पगारातील माणसांना हे रिकामे उद्योग करायला कोणी सांगीतले होते ? नियमानुसार प्राचार्य नव्हते, ते आम्हाला नियमाप्रमाणे स्वच्छ नकार देवू शकत होते, त्यांनी तसे केले नाही. का केले नाही ?
म्हणून आजही नूतन मराठा कॉलेज हा शब्द आला की माझ्या मनांत यासारख्या असंख्य आठवणी येतात, ह्रदयात रूतल्या आहे त्या ! काढायच्या म्हटले तर ह्रदय रक्तबंबाळ होते !
—�—�—� —�—�— —�—�—� —�—�- —�—�- —�—
मी कदाचित सातवी-आठवीत असेल, सरदार जी. जी. हायस्कूल रावेर येथे शिकत ! सन बहुतेक १९७४-७५ असावे ! डिंसेबर महिन्याचा तिसरा आठवडा ! तिवारी सरांचा पिरीअड होता, इतिहासाचा ! त्यांचा पिरीअड म्हणजे आपण शिक्षण घेतो आहे का गोष्टी ऐकतो आहे, हे पण समजत नसे ! अप्रतिम शिकवणे ! शिकवलेलेले हे अभ्यासक्रमातील आहे का अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहे ? याची काटेकोर तपासणी करणारे पालकपण त्या वेळी नव्हते. जे काही शाळेत शिकवतांय म्हणजे अभ्यासक्रमातीलच आहे, हीच भावना विद्यार्थ्यांची व पालकांची होती.
त्यावेळी अजून एक वाईट प्रथा होती, आजच्या दृष्टीने विचार केला तर, ती म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम खरोखरच शिकविण्याची ! अलिकडे अभ्यासक्रम शिकवून संपला हे जाहीर केले की समजायचे की अभ्यासक्रम शिकवलेला आहे ! तो खरंच प्रत्यक्षात शिकवला आहे किंवा नाही, हे तपासायचे नसते ! कारण त्यातून मनस्ताप व भांडण यापेक्षा वेगळे काही हातांत लागणार नसते.
तर तिवारी सरांचा पिरीअड होता, डिसेंबरचा तिसरा आठवडा होता तो ! आणि हरिभाऊ पाटील, शाळेचा शिपाई डुलतडुलत नोटीस घेऊन वर्गात आला. नोटीस-बुक सरांच्या हातात दिले व खाली ओट्यावर बसला. ही त्याची नेहमीची सवय ! तिवारी सरांनी वर्गाला नोटीस वाचून दाखवली, ती नाताळच्या दहा दिवसांच्या सुटीची नोटीस होती. नोटीस वाचून झाल्याबरोबर ‘हॅंऽऽऽऽऽऽ ! ‘ आणि आम्हा विद्यार्थ्यांचा दप्तर ठोकण्याचा आवाज ! हरिभाऊ पाटील पण ओट्यावर बसून हसत होते. सरांनी नोटीसीवर वहीत सही केली, हरिभाऊजवळ वही दिली. हरिभाऊ नोटीस-वही घेवून दुसऱ्या वर्गात नोटीस घेवून गेला.
‘हं, सुटी कधीपासून लागते आहे नाताळची ?’ तिवारी सरांचा प्रश्न ! ‘सर, बावीस डिसेंबर पासून !’ आमच्यातील उत्साही विद्यार्थी ! ‘मग बावीस डिसेंबरपासून ते सुटी संपेपर्यंत रोज सकाळी ८ ते ९ पर्यंत इतिहास व नंतर अर्धा तास हिंदी असे घेतले जाईल. त्यानंतर तुमचे गणिताचे सर आहे ना, त्यांचा तास राहील मग १० ते ११ पर्यंत ! अभ्यास मागे आहे आपला ! पूर्ण करायचा आहे तो ! आता वाजवा बे दप्तर !’ तिवारी सरांचे हे खास बोलणे, आता हा सुटीतील पूर्ण कार्यक्रम ऐकल्यावर कोणाच्या हातात दप्तर वाजवायची आणि घशात 'हॅंऽऽऽऽ' करून ओरडण्याची ताकद होती ?
सन १९७४-७५ सालात प्राथमिक वा माध्यमिक शिक्षकांना मिळणारा पगार लक्षात घेता, सुटीच्या काळात आपल्याला कायदेशीरपणे मिळणारी सुटी बुडवून, त्यांत इतर वैयक्तिक कामे करता येतील पण ती करायची नाहीत ! तर न करता आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास घेवून त्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला पाहीजे, याची जाणीव असणारे शिक्षक होते. ते याच समाजातील होते. याच भारतातील होते ! सूर्यचंद्रावरून वा परक्या देशातून आले नव्हते. ते मग कशाला हा रिकामा उद्योग करत होते ? त्यांना याबद्दल सरकार काही जास्त पगार देणार नव्हते वा संस्था काही वेगळा फायदा देणार नव्हती ! वेळ संपला तर कसातरी अभ्यास पूर्ण करता येणार होता किंवा जाहीर करून द्यायचे आतासारखे - ‘अभ्यासक्रम संपला !’ यांवर कोठेच अपील नसते. —�- पण तसे होत नव्हते कारण त्यांना तसे होवू देणे पटत नव्हते.
म्हणून सरदार जी जी हायस्कूल म्हटल्यावर साठीतलेच काय पण सत्तर-पंचाहत्तरीतले म्हातारे आमच्याशी म्हणजे त्यांच्या तुलनेने आमच्यासारख्या पोरांशी देखील अगदी घरच्यासारखे बोलायला लागतात, अगदी त्यांच्या हातातले महत्वाचे काम बाजूला ठेवून शाळेची आपुलकीने चौकशी करतात ! त्यांना कल्पना असते, आपल्याला ज्यांनी शिकवले ते आता स्वर्गात असतील आणि जर खरोखरच शाळा असतील तर 'ही कसलाही ज्यादा पगार न घेता सुटीत पण आपली घराची कामे सोडून देऊन शिकविणारी आमची शिक्षक मंडळी' तिथे शिकवत असतील ! पण तरी त्यांना साठीतलेच काय पण सत्तर-पंचाहत्तरीतले म्हातारे यांना राहवत नाही, ते विचारतात आणि ते असे विचारणार याची आम्हाला पण कल्पना असते.
—�—�—�—�- —�—�—�—� —�—�—�—� —�—�—�-
मग ही दोन उदाहरणे म्हणा आठवणी म्हणा, पण सांगीतल्यावर; मग आमच्या या वकील मित्रांना विचारले - ही अशी निष्ठा असलेली किती माणसे आपल्या व्यवसायांत आहेत की ज्यामुळे जनतेत आपल्याबद्दल श्रद्धा निर्माण होईल व टिकून वाढेल ? मला कल्पना आहे जुनी उदाहरणे जास्त आहेत नवी मात्र कमी होत आहेत. काही दिवसांनी नमुना म्हणून तरी दाखवायला रहातील का ? हा पण प्रश्नच आहे. मग आपली मुलं कशाला येतील हो इथं ? त्यांना कर्तृत्व दाखवायला अजून दुसरी चांगली क्षेत्रं आहेत.
हा अनुभव प्रत्येक क्षेत्रात येत आहे. जोपर्यंत अशी आपल्या कामाची निष्ठा आपल्या क्षेत्रात दिसणार नाही ना, तो पर्यंत जनतेची आपल्या त्या व्यवसायाबद्दलची श्रद्धा वाढणार नाही तर कमीच होत जाईल ! यांवर चहा पिण्याची वेळ असतांनासुद्धा चहा प्यावासा वाटेना. आम्ही बाररूमकडे वळलो.

दिनांक १ ऑक्टोबर २०१७

No comments:

Post a Comment