Saturday, March 16, 2019

गेल्या शनिवारी, प्रसिद्ध पत्रकार, लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर लिखीत ‘डायरी’ व ‘क्लोज अप’ आणि त्यांनी संपादन केलेले ‘माध्यमातील ती’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होता, महात्मा गांधी मिशन औरंगाबाद येथील ‘व्ही. शांताराम सभागृह’ येथे ! या सभागृहात जाण्याचा प्रथमच योग आला. सभागृह छान !
श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्तविक करून, आपले मनोगत व्यक्त केले. ‘आपल्याला लिहीण्याशिवाय काही जमत नसल्याने, लिहीत गेलो’ ही त्यांची भावना ! ‘पण चांगलं लिहीत असल्याने जास्त लिहीता आलं’ ही आपली भावना. त्यानंतर पुस्तक प्रकाशन झालं. सूत्रसंचालन श्री. उमरीकर यांनी केले.
या समारंभाचे अध्यक्ष, प्रसिद्ध समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांनी आपल्या भाषणात, या अशा पुस्तकांचे सामाजिक इतिहासातील महत्व असल्याने, या लिखाणाचे महत्व आहे, हे आवर्जून सांगीतले. आपल्या लिखाणांत मूल्यात्मक भूमिका घेवून तटस्थपणे राजकीय लिखाण करणारे अलिकडे दुर्मिळ झाले आहेत. वर्तमानपत्र व पत्रकारिता, हे सत्ता मिळविण्याच्या मार्गातील एक सोपान समजला जात असल्याने, स्वाभाविकच त्याचा वापर हा सत्ताकेंद्र म्हणून होवू लागला. वापर होवू लागल्यावर स्वार्थासाठी गैरवापर होणे, त्यांत भ्रष्टाचार होणे हे ओघाने येतेच, याचे चित्रण प्रांजळ आहे, म्हणून या अशा लिखाणाला मूल्य आहे. त्याचे या दृष्टीने मूल्यमापन करणे आवश्यक आहे. श्री. बर्दापूरकर यांच्या लिखाणाबद्दल बोलतांना, यांच्यात पत्रकारांत नसलेला गुण आहे, तो म्हणजे अहंकार नसणे ! ही बाब खरंच दुर्मिळ ! अशी काही दुर्मिळ बाब, गुण आपल्याजवळ असले, की याचे फायदे स्वाभाविकच आपल्या लिखाणाला मिळतांत, आपल्या या अशा लिखाणात आपले व्यक्तिमत्व उमटते. लेखकाचे दर्शन घ्यायचे, तर ते त्याच्या लालित्यपूर्ण लिखाणातून ! त्याने कथाकार असावं, माणसातलं माणूसपण शोधावं. ही पुस्तके वाचल्यावर एक होतं, आपल्याला जे राजकारण कळत नाही, ते हे वाचल्यावर तो माणूस व त्याचं राजकारण समजायला लागते. बोलण्याच्या ओघात नितीन गडकरींबद्दल उल्लेख झाला, असे दुवे कळायला लागतात.
महात्मा गांधी मिशन औरंगाबाद यांचे सचिव, श्री. अंकुशराव कदम यांनी ‘तीन ग्रंथ छापून घेणे, ते पण सौ.च्या हस्ते हे उल्लेखनीय आहे’ हे आवर्जून सांगत त्यांना दीर्घायुष्य चिंतले.
उच्च न्यायालय मुंबई याचे माजी न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगांवकर यांनी आपल्या भावना वडीलधाऱ्याप्रमाणे व्यक्त केल्या. ‘पतीने आपण लिहीलेली पुस्तकं पत्नीच्या हस्ते प्रकाशित करावी व प्रेम व्यक्त करावं’ यांतील अबोल प्रेम बोलून जाते. लेखकाचा चांगुलपणा व्यक्त करतांना, त्याला समाजातील व्यंग लक्षात येते. त्यांची भूमिका ही महाभारतातील अर्जुनाची आहे. राजकारणी माणसांतील चांगले गुण दाखवायला हवेत. त्यांचा लौकीक परिचय करताकरता, आईवडिलांचे व्यक्तीचित्र उभं रहातं. दारिद्र्य हे माणसाला खऱ्या रूपात उभं करतं. दरारा वाटावा म्हणून लेखन करतात, असं लेखन करतात. त्यांच्या लिखाणांत ओलावा दिसतो. पत्रकारांना काही कर्तव्य लोकांना माहिती नसतांना पण करावी लागतात. आपल्याला काही नको असतं तेव्हा लिहीलं जातं. हा पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम मित्रांबरोबर प्रसंग साजरे करणे, हा विचारच मोठा वाटतो. तो परिवार खूप मोठा असल्यानेच शक्य असतं. अशी ही माणसं ठिकठिकाणी भेटत गेली. आपले प्रेम सेवेतून प्रगट होतं. प्राण मंगलात आहे.
त्यांच्या मुलीने, सायलीने तिच्या आईच्या वतीने, सौ. मंगला बर्दापूरकर यांच्यावतीने मनोगत वाचून दाखवले.
सुप्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यांनी कोणालाही वस्तुनिष्ठ चित्रण कितपत शक्य आहे ? असे चित्रण, लिखाण करण्यामागील हेतू काय ? हे सांगतांना, व्यक्तीचित्रण करतांना, त्याचे लेखक व साहित्य म्हणून असलेले अपुरेपण सांगीतले. कोणाला लिखाण करायचे असेल, तर तात्कालिक संकेत टाळून पहाता आलं तर शक्य आहे का ? तर ते कठीण आहे. असं काही लिहायला गेलो, तर बऱ्याच वेळा त्या व्यक्तीचे चारित्र्यभंजन किंवा चारित्र्यपूजन होण्याची शक्यता असते. हे लिखाण राजकीय असल्याने, यांतील संदर्भ बदलले, माणसं नाहीत, म्हणून हे आज ऐतिहासिक आहे.
हे झालं थोडं कृत्रिम पद्धतीने कार्यक्रमाचे वर्णन ! मात्र कित्येक गोष्टी अशा असतात, याचा ठसा एकंदरीत कार्यक्रमातून आपल्या मनांवर उमटतो, प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या मनावर उमटतो. सर्वांच्या मनांत तो सारखाच आणि तितकाच ठळक असेल, असे नाही, वेगळा असू शकतो. श्री. बर्दापूरकर यांनी ‘संपूर्ण कार्यक्रमांत आपण स्वत: व्यासपीठावर असणार नाही, तर आपली पत्नी ही असेल. हा कार्यक्रम तिचा आहे’ ! हे असं जेव्हा सांगीतलं, त्याचवेळी यांतील वेगळपण लक्षात आलं.
खरंच, आपल्या कोणाच्याही प्रगतीच्या उंचावणाऱ्या आलेखाला कितीतरी लोकांचा टेकू असतो, खूप अदृश्य हात हा आपला आलेख उंचावण्याला कारणीभूत ठरलेले असतात. प्रयत्न केला, तर हे हात दिसू शकतात, मात्र ती दृष्टी हवी ! दृष्टी असेल, तर त्या हातांचे उपकार मानण्याची कृतज्ञबुद्धी हवी ! माणुसकी, देवत्व, चांगुलपणा म्हणजे यापेक्षा काय वेगळं आहे.
कोणाचाही या जगांत त्याच्या अस्तित्व निर्माण होण्यापासून संबंध येतो, तो स्त्री शी ! सुरूवातीला ती आईच्या रूपात असते. आपल्या लहानपणापासून आपल्याला वाढवते, ते आपल्याला मोठं करून ! नंतर आपल्या आयुष्यात दुसरी स्त्री येते, ती पत्नीच्या रूपात ! आपल्या संपूर्ण उमेदीचा काळ, कर्तृत्वाने फुलवते ती पत्नी ! आपले कर्तृत्व झळाळून निघावं यासाठी, दिव्यातले तेल व्हावं लागते, ते आईला आणि नंतर पत्नीला ! कित्येक वेळा स्वत:मधील गुणांकडे दुर्लक्ष करत, आपल्यातील कर्तृत्वाला बंदीस्त करत, काही वेळा तर संपवून टाकत ही नारी आपल्या अपत्याच्या व पतीच्या पाठीशी उभी रहाते. आपण उन्हात असलो, तर आपली सावली सर्वांना दिसते. कर्तव्यभावनेने या जेव्हा आपल्यावरील उन्ह झेलत असतात, त्यावेळी ना आपली सावली पडते, ना त्या त्यांची सावली पडू देत ! आपल्या सावलीत, याचे कर्तृत्व झाकोळून गेले तर ? नकोच ते ! परमेश्वराने या स्त्री ला जन्माला घालून, आपल्या सर्वांवर फार उपकार करून ठेवले आहे. आपलं उंचावणारं कर्तृत्व समोर दिसत असतांना पण, सौ. मंगलाताई बर्दापूरकर यांनी त्याला अर्ध्यातच पूर्णविराम दिला ! या पण यांच मांदीयाळीतील !

12.2.2019

No comments:

Post a Comment