Saturday, March 16, 2019

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपण म्हणजे आपल्या भारतांस स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकार म्हणून काम करत असलेल्या, स्वतंत्र भारतातील शासनाने, त्यांनी आपल्या देशाप्रती केलेल्या त्यागाची कृतज्ञता म्हणून का होईना, पण भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ द्यायलाच हवा, यांत शंका नाही.
सोबत हे पण लक्षात ठेवावयांस हवे, की त्यांनी देशाप्रती जे कार्य केले, हे देशसेवा म्हणून केले. त्याचा आपणांस कोणी काही मोबदला द्यावा किंवा भविष्यात मोबदला मिळू शकेल, या भावनेने तर त्यांनी अजिबात काम केले नाही. वास्तविक त्या वेळी देशकार्य काही केले, तर आपले सर्वस्व जाईल, आपणांस तत्कालीन इंग्रज सरकार जीवनांतून उठवेल किंवा जीवे मारेल, अशी स्थिती होती.
स्वातंत्र्यवीरांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि स्वातंत्र्यानंतरची कितीतरी सरकारे ही परस्परांच्या विरूद्ध होती, याबद्दल दुमत नाही. ‘असे असले, तरी त्यांनी स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावयास हवा’ हा झाला आदर्शवाद ! याप्रमाणे कोणीही वागले नाही, वागणार नाही ! आजच्या घडीला देखील स्वातंत्र्यवीरांबद्दल कशा पद्धतीने काही मंडळी उघडपणे किंवा त्यांच्या गोटात बोलतात: हे आपणांस माहिती आहे, आपण ऐकले आहे आणि बघीतले आहे.
आज पण ‘स्वातंत्र्यवीरांना भारत रत्न मिळावयास हवे’, हा आवाज उठविणारे बहुसंख्य प्रामाणिकपणे आवाज उठवत आहेत, हे क्षणभर गृहीत धरले तर लगेच सद्य सरकारबद्दल किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबद्दल, त्यांची मते ज्या उमाळ्याने बाहेर येतात, हे पाहून त्यांच्या भावनेबद्दल शंकेची पाल चुकचुकते, की यांना नेमके काय हवे आहे ?
बाकी काही असो, स्वातंत्र्यवीर सावरकर हे अशा कित्येक पुरस्कारांच्या पलिकडे निघून गेले आहे. त्यांचे विचार प्रत्यक्षात आणणारे सरकार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे. वितंडवाद करून त्यांच्या विचारांच्या विपरीत सरकार आणल्यावर किंवा असल्यावर आपणांस आलेले अनुभव नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

26.1.2019

No comments:

Post a Comment