Saturday, March 16, 2019

कुठं बाहेगांवी, जरा आडवळणाला म्हणजे, जिकडं नेहमी जाणं जमणार नाही तिकडं गेलं, की त्या भागांत आवर्जून जाण्यासारखं काय आहे, हे मी लक्षात ठेवलेलं असतं. आपलं ठरलेले काम झालं, की मग पुढचा टप्पा येतो, तो या भागांत आपल्याला भेटायला हवं असे कोण आहे ? बऱ्याच वेळा जमत नाही, तर काही वेळा जमतं ! जमत नाही, कारण आपलं जमून उपयोग नसतो, तर समोरच्याला वेळ हवा.
असाच मागील महिन्यात गुजरात, सौराष्ट्रात जाण्याचा योग आला. बडोद्याला जाणं, तर आवश्यक होतं. बडोदा दर्शनासोबत, अजून एका व्यक्तीला भेटायचे ठरवले होते, नितीन हातवळणे ! मूळचा भुसावळचा, पण काही वर्षे शिक्षण रावेरला सरदार जी. जी. हायस्कूल येथे झालं ! तसा माझ्या पुढील वर्गात, म्हणजे दोन वर्षे पुढे !
तसं माझं अधूनमधून फोनवर बोलणं होते. बडोद्याला गेल्यावर आवर्जून मी फोन केला. कमी वेळेत कसंतरी भेटीचं गणित जमवलं ! सकाळी सर्वांचे आटोपेपर्यंत वेळ होता. जिथं आम्ही थांबलो होतो, तिथेच त्यांना बोलावले. गप्पा सुरू झाल्या. मधलं निदान चाळीस वर्षांचे, सन १९७७ ते २०१८, हे अंतर क्षणात संपलं आणि गप्पा रंगल्या ! काही आठवणींवर रेंगाळावसं वाटलं, काही व्यक्ती गेल्याच्या आठवणी क्लेशदायक होत्या ! बघताबघता आलेला पहिला चहा संपला. दुसरा चहा पण संपला ! जवळपास दीडतास गप्पांत उडाला !
त्या गप्पांत काय नव्हतं ? त्यांच्या रावेरच्या आठवणी इतक्या दूर गेल्यावर पण ताज्या होत्या. आपली शाळा, भाजी मार्केट, पाराचा गणपती, रामस्वामी मठ, थड्यावरील मारोती, लंगडा मारोती, बैठकवरील बारा गाड्या सगळं आठवत होतं ! दीक्षित सर, जोशी सर, एस् आर कुलकर्णी सर, वानखेडे सर, तांबे बाई, पितळे बाई सर्व लक्षात होते. विटवेकर, आठवले, भागवत, देशमुख, पासे, रावेरकर, प्रचंड, गिनोत्रा, अग्रवाल अगदी सर्वांचे फोटो असल्यासारखे वर्णन सुरू होते !
शेवटी जमलं तर संध्याकाळीही भेटू, हे आश्वासन देवून भेट संपली. संध्याकाळी जमणं कठीणच होतं. बघू, पुन्हा केव्हा योग येतो ते !

3.2.2019

No comments:

Post a Comment