परवापासून पुण्यात आहे. काल मला, मूळचे औरंगाबाद येथील पण सध्या पुण्याचे रहिवासी असलेल्या वडिलधारी मंडळींना भेटायचा योग आला. त्यांना फोन केला, भेटता येईल का, हे विचारल्यावर आणि आम्ही दोघं पुण्यात आलोय, म्हटल्यावर ‘दोघं जेवायलाच या !’ हे निमंत्रण मिळालं ! मात्र ते जमणार नसल्याने, दुपारी भेटायचे नक्की ठरले.
त्यांना म्हणायचं आपलं, माझे फेसबुक मित्र ! पण ते खरंच मानाने, अनुभवाने आणि वयाने वडीलधारी ! वडीलधाऱ्यांकडे गेलं की आमच्यासारख्या लहानग्यांना काहीतरी मिळतंच ! फेसबुक मित्र म्हणून भेटायची कधीची इच्छा होती !
काल भेटलो, श्री. जयंतराव दिवाण, निवृत्त अधिकारी, स्टेट बॅंक आॅफ हैद्राबाद आणि सुप्रसिद्ध लेखिका सौ. वृंदा दिवाण यांना !
त्या उत्साही दांपत्याच्या आमच्याशी झालेल्या गप्पांमधे काय नव्हतं ? बॅंकेचा अधिकारी असला तरी सर्व नियम पाळून सर्वसामान्यांसाठी काय करता येवू शकते ! आपल्या उमेदीच्या काळात नाट्यकलेशी कसे संबंध ठेवून होतो ! औरंगाबाद मधील सर्व मंडळींच्या जुन्या काळातील आठवणी ! संसार करतांना साहित्याची सेवा कशी करता येईल ! गप्पांत जवळपास अडीच-तीन तास कसे निघून गेले समजलेच नाही.
दरम्यान त्यांच्या सुविद्य स्नुषेने आपल्या गृहस्थाश्रमास जागून आणलेले मस्त गरमागरम पोहे ! त्यांच्यापैकी कोणीही चहा पीत नसतांना, आमच्यासाठी मुद्दाम करून आणलेला वाफाळणारा चहा ! त्यांच्या आस्वादासोबत गप्पा होत असतांनाच, त्यांच्या सुनेशी गप्पा मारतांना, ती करत असलेले मनोविकार समुपदेशक म्हणूनचे काम हे, अलिकडच्या पिढीच्या अडचणी व समस्या लक्षात घेता, कसे आवश्यक आणि आव्हानास्पद आहे, याची पण जाणीव झाली.
निघतांना दोघांनीही आम्हांस अमूल्य भेट दिली, ती त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांची ! मात्र त्यांच्या चिरंजीवाची भेट राहून गेली.
अजून सोबतीला होते, दुसरे दोघांचेही फेसबुक मित्र श्री. पुरुषोत्तम गोखले ! भारतीय शास्त्रीय संगीताचे दर्दी आणि गायक ! त्यांनी ‘काटा रूते कुणाला’ हे गीत तब्येतीने, पण कसलीही वाद्यांची साथसंगत नसतांना गायले. त्यांच्या ‘हे बंध रेशमाचे’ या ‘शांता शेळके’ यांनी लिहिलेल्या आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या आणि मूळ नाट्यगीत गायलेल्या, नाट्यगीताने पं. जितेंद्र अभिषेकींची जुनी आठवण चाळवली. काॅंग्रेस भवन जळगांव मधील बैठक आठवली. त्या वेळी तानपुऱ्यावर त्याचे शिष्य श्री. अजित कडकडे हे होते.
21.2.2019
No comments:
Post a Comment