Wednesday, June 13, 2018

वाजंत्रीवाला



वाजंत्रीवाला 
आज सकाळी, पं. कुमार गंधर्वांचा ‘रामकली’ ऐकला. ‘जा जा जाजा रे जा’ ही चीज ! सुंदर, प्रसन्न वाटत होते. तो स्वराला चिपकून चालणारा ढाल्या स्वरातला तबला आणि हळूवारपणे स्वरांच्या मुलायम लाटा आणणारी हार्मोनिअम ! —— आणि स्वरांच्या बांधणीत साक्षात ‘रामकली’चे दर्शन घडवणारे पंडीतजी ! सकाळचे राग ऐकायला खूपच छान वाटतात, मग ‘भैरव’ असो वा ‘रामकली’ किंवा ‘ललत’ ! आपले शरीर विश्रांती घेवून ताजेतवाने झाले असते आणि या ताज्यातवान्या शरीरांत असलेले मन त्या वेळी उत्साही व प्रसन्न असते. या सकाळी गायल्या जाणाऱ्या रागांच्या स्वरांच्या शिंपडण्याने मन तर अजूनच टवटवीत होते.
असं काही ऐकलं की मग लग्नातली आठवण येते. सनईवाले गुरव आता जवळपास लग्नातून लुप्त झाले आहे. लग्न म्हटले की मंगलवाद्य म्हणून सनई हवीच ! आता तर हा विचार लुप्त झाला की काय असे वाटायला लागले आहे. आता लग्नात ऐकायला मिळतो तो भयाण आवाजातला, ह्रदयाचा थरकाप उडवणारा व कान बधीर करणारा ‘डीजे’ आणि सोबत डोळ्यापुढे निळेपिवळे लालजांभळे हिरवेपांढरे लाईट वेगावेगात नाचवत, डोळ्यांना अंधाऱ्या आणणारी लाईटिंग ! हिंमत होत नाही, लग्नाच्या मिरवणुकीत जाण्याची ! त्या नवरदेवाची बिचाऱ्याची काय अवस्था होत असेल देव जाणे ? संभाव्य विवाहसुखाची स्वप्ने रंगवीत असल्याने तो वेगळ्याच जगात गेला असल्याने, त्याला हे स्वत:ला जाणवत नसावे आणि बाकीच्यांची अवस्था पण लक्षात येत नसावी. मिरवणूक जेथून जाईल, त्या भागातील घरे पण दणाणून सोडली जातात या आवाजाने ! घरातील मंडळी, आजारी लोक, अभ्यास करणारी मुले तर अगदी घायकुतीला आली असतात. केव्हा एकदाची ही मिरवणूक टळते एकदाची ! मिरवणुकीची वा नवरदेवाची उत्सुकता, हा तर विषय पण डोक्यात नसतो. असो. कालाय तस्मै नम: ।
मग जुन्या हजर राहिलेल्या लग्नातील आठवणी जाग्या होतात. लग्नाला जायचे तर आदल्या दिवशी तरी जावे लागे. सामान कार्यालयात नेण्यापासून किंवा गल्लीत लग्नाचा मंडप ठोकण्यापासून तरी हजर रहावे लागे. अशावेळी त्या लग्नात सनईवादक जरा बरा आहे असे आदल्या दिवशी 'सीमंतपूजनास' वाटले, की मग जरा अंदाज घेवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला 'रामकली' वा 'भैरव' वाजवायला सांगावा. त्याच्या खुललेल्या मनाने वाजवलेली त्यावेळची सनई लगेच लक्षात येते आपल्या ! आपला सकाळच्या थोड्या उजेडातील चेहरा लक्षात ठेवत, मग हा दुपारच्या वेळी माझ्याकडे पहात 'सारंग' वा 'मुलतानी' वाजवतो. आणि सायंकाळी लेकीला सासरी जायच्या वेळी वरात निघाली, तर हमखास 'मारवा' ! आपण आपले निघण्यासाठी सामान उचलले, हे त्याच्या लक्षात आले की हा मूकपणे हात जोडून निरोप देतो.
'हे राग वाजव' असे सांगणारे तरी कोण आहे हो ? वाजंत्री वाजवा हेच सर्वजण सांगतात'. तो न बोलता सांगतो.

९. ४. २०१८

No comments:

Post a Comment