Friday, June 22, 2018

सरदार जी. जी. हायस्कूलच्या आठवणी

सरदार जी. जी. हायस्कूलच्या आठवणी 

आम्हाला आमच्या सरदार जी. जी. हायस्कूल या रावेरच्या शाळेत शिकवणारे शिक्षक फारच छान असायचे.
हिंदी शिकवायला तिवारी सर होते. त्यांचा शुद्धलेखनावर इतका काही भर होता की, कोणी काही त्याच्या उत्तरांत, गृहपाठात, निबंधात अशुद्ध लिहीले की ‘ फिरसे लिखो’ हा त्यांचा आवडता शेरा लाल शाईचा शेरा हमखास असायचा. निबंध तर लाल शाईने रंगलेला असायचा. त्यांच्या या कडक तपासणीत काहींना त्यावेळी तिमाहीत चाळीसपैकी अर्धा मार्कसुद्धा मिळालेला आहे. त्यांनी आम्हाला इतिहास पण अप्रतिम शिकवला. इतिहास, त्यांतील महत्त्वाच्या नोंदी व दिनांक, अगदी मुखोद्गत ! शिकवतांना त्यांच्या हातात कधीही पुस्तक नसे. पण शुद्धलेखन ? अहो, काय सांगू, इतिहासाच्या उत्तरपत्रिका तपासतांना पण, त्यांचे शुद्धलेखनाचे फटके आम्ही खाल्लेले आहे.
संस्कृतला डेरेकर आणि पुराणिक सर होते. पुराणिक सर यांचा तर उच्चारसुद्धा अचूक हवे, हा आग्रह ! ‘आपल्याला लिहायचे असेल तर उच्चार आठवून लिहीता येते’ हे त्यांचे म्हणणे. ते खरे होते. संस्कृतमधील सुभाषिते लिहीतांना त्याचे मोल जाणवायचे.
मराठी शिकवण्यास सुरूवातीला एस् आर कुलकर्णी सर (ज्यु) तर नंतर एन् एस् पाटील सर होते, ज्यांनी आमचे व्याकरण चांगले करून घेतले. पितळे बाई पण नंतर होत्या. हे सर्व अत्यंत कडक, गुण देण्याच्या बाबतीत ! त्यांच्याकडून, विशेषत: पितळे बाईंकडून, वर्गात प्रथम क्रमांक येणारा विद्यार्थी देखील, मराठीत पन्नास देखील गुण मिळवू शकत नसे. मला अनुभव आहे. एन् एस् पाटील सरांनी काही निबंधांस दिलेला, ‘Good’ च्या वरचा ‘छान’ हा शेरा आणि पितळे बाईंनी केवळ चार वेळा दिलेले ‘Good’ शेरे मला अजून लक्षात आहे.
शालांत परिक्षेच्या अगोदर होणाऱ्या प्राथमिक परिक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा दहा टक्के गुण तुम्हाला जास्त मिळतील, हे आमचे शिक्षक छातीठोकपणे सांगायचे. तरी त्यावेळी शालांत परिक्षेचा निकाल हा ३०% ते ४०% यांत लागायचा. आता मुलांना मिळणारे गुण पाहून विनाकारण विचित्र वाटते.
Praveen Bardapurkar यांनी मराठीबद्दल लिहिण्यास सुरूवात केली, अन् आमचे हे गुरूवर्य व त्यांचा दरारा आठवला.

१९.६. २०१८

No comments:

Post a Comment