‘परमाणू’ हा चित्रपट
काल ‘परमाणू’ हा चित्रपट बघीतला. सन १९९८ साली झालेल्या ‘पोखरण अणुचाचणी’ या विषयावर आधारलेला. विषय मनाला भावणारा ! या अणुचाचणीच्या वेळी पंतप्रधान होते मा. अटलबिहारी वाजपेयी ! त्यांचे तत्कालीन भाषणाचे अंश चित्रपटात दाखवले, आणि मनाला त्या काळात चित्रपट घेवून गेला. चित्रपटाची कथा, त्यातील प्रसंग व त्यांची मांडणी याच्या सत्यासत्यतेच्या बद्दल लिहीत नाही.
मात्र ‘पोखरण’ येथील अणुचाचणी मग ती माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्या काळातील असो वा अलिकडची मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील असो. या आम्हा भारतवासीयांची मान जगात उंचावणाऱ्या घटना आहेत. आम्हाला समर्थ वीराची शांतता हवी आहे, दुर्बलाची हतबल शांतता नको, हे खंबीरपणे सांगणाऱ्या या दोन अणुचाचण्या आहेत. निसर्गन्याय हा समर्थाला मिळतो, जो जगायला लायक आहे ! दुर्बळाला किंवा समोरच्याच्या चांगुलपणावर, त्याच्या न्याय बुद्धीवर अवलंबून असलेल्याला क्वचितच मिळतो. समोरचा जर स्वार्थी असेल, आणि तो असतोच, तर मग आपण समर्थ बनले पाहीजे. समोरच्याच्या न्याय्यबुद्धीवर आपले अस्तित्व अवलंबून असणे हे धोकेदायकच !
चित्रपट बघायला हवा. विषय सर्वज्ञात आहे, मनाला साद घालणारा आहे. कलाकारांची कामे विषयानुरूप, चांगली आहेत.
६. ६. २०१८

No comments:
Post a Comment