Wednesday, June 13, 2018

समाजातील बुवाबाजी

समाजातील बुवाबाजी

गेल्या काही दिवसांपासून येथे, वर्तमानपत्रात आसाराम बापूंबद्दल भलेबुरे, उलटसुलट, वेडेवाकडे लिहून आले होते. तसेच विविध समाजातील बुवाबाजीबद्दल देखील जोडीला वाचायला मिळाले. काहींनी यापूर्वीच्या त्यांच्या समाजासाठी, हिंदुधर्मासाठी केलेल्या चांगल्या कामांची भलावण केली. काहींना अजूनही वरिष्ठ न्यायालयांत हा निकाल फिरेल व ते निर्दोष सिद्ध होतील, ही खात्री वाटते. तर काही झाले हे फार चांगले झाले, आमचा भारतीय न्यायसंस्थेवर विश्वास आहे, असे म्हणत अजून काही बुवाबाजी करणाऱ्यांची नांवे सांगीतली. ही नांवे हिंदुधर्मातील व्यक्तींची होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून काहींनी मुस्लीम व ख्रिश्चनांमधे काय चालते, याचे वर्णन केले. थोडक्यात कोणी कमी नाही किंवा कोणी जास्त नाही, फक्त गवगवा मात्र कमी जास्त आहे.
एक लक्षात ठेवले पाहीजे की यांनी जनतेला दिसणारी काही चांगली कामे जर केली, तर समाजाचे पुढारीपण हळूहळू त्यांच्याकडे सरकू लागते. हे पुढारीपण प्राप्त व्हायला सुरूवात झाली की त्यामागून काही उलटसुलट कामे केली जातात. ती किरकोळ असली, त्याने विशेष नुकसान होणार नसेल तर ती धकवली जातात. यांतून हिंमत वाढते आणि अशी कामे ज्यांना धकवली जाणे आवश्यक असते, ही मंडळी सोबत जमा होवू लागतात.
केलेल्या चांगल्या कामाचे जसे बक्षीस मिळते, तसे वाईट कृत्याची शिक्षापण मिळते; मग ती न्यायालयाची असेल वा सामाजिक असेल !
ही बुवाबाजींची विकृत उदाहरणे व विकृती समोर आली तशी यांवर आजपावेतो किती घटना घडलेल्या आहेत, ज्यांवर समाजप्रबोधन व्हावे म्हणून नाटक, एकांकिका लिहील्या गेल्या व चित्रपट निर्माण केले गेले, ते डोळ्यांसमोर आले.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहीलेलं व अत्यंत गाजलेले नाटक ‘तो मी नव्हेच’ हे पुन्हा बघीतलं. सत्य घटनेवर आधारलेल्या या नाटकातील खलनायक हा ‘माधव काझी’ या नांवाचा इसमाने आहे. याची ही कृष्णकृत्ये सन १९५५ ते १९६० च्या दरम्यान घडलेली आहेत. कित्येक मुलींच्या आयुष्याची माती करणारा हा नराधम, कित्येकांना आर्थिक बाबींत फसवणारा हा लोभी माणूस समाजास कसा उपद्रव देणारा आहे व त्याला कशी शिक्षा होते, हे या नाटकांत दिसतेच.
मात्र इतक्या वर्षांनंतरही आपण पुन:पुन: हेच आणि या सारखेच अनुभव घेत रहाणार असू, तर आपल्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे, हे कशाच्या आधारावर म्हणतोय आपण ? शिक्षणामुळे शहाणपणा येतो, समाजऐक्य होते, समाज प्रगती पथावर जातो, विकृती व उपद्रव कमी होवून समजूतदारपणा, न्यायपालनवृत्ती वाढते वगैरे हे अपेक्षित आहे. हे किंवा यापैकी काही जर होणार नसेल तर आपल्या शिक्षणांत, त्यातून मिळणाऱ्या ‘ज्ञानात’ काहीतरी गफलत होत आहे हे नक्की ! ती गफलत दूर करण्याचे उपाय योजायला हवेत.
श्री. Praveen Bardapurkar यांची या विषयांवरची पोस्ट वाचली. पुन्हा ‘तो मी नव्हेच’ हे नाटक बघीतले. परिस्थिती फारशी बदललेली वाटत नाही. हुशारी वाढली तशी लबाडी पण वाढली. एकंदरीत परिस्थिती जैसे थे !

३०.४. २०१८

No comments:

Post a Comment