परवा पाच हजार मित्र झाल्याने येथील मित्रमर्यादा संपली, आणि मनांत विचार आले.
सुरूवातीला इथं व्यवसायाच्या निमित्ताने, औरंगाबादला, या परक्या ठिकाणी आल्याने गांवची, परिचित मंडळी दुरावतील, या विचाराने सुरू झालेला हा प्रवास ! ती नियमीत भेटत रहावी, त्यांच्याशी गप्पागोष्टी होतील, या उद्देशाने सुरू झालेला इथला प्रवास, हा शालेय काळातील, बालपणांतील मित्र भेटण्यात खरंच रंगला.
नंतर तशी पूर्वपरिचित नसली, तरी आपल्या विचाराची मंडळी परिचित व ओळखीची वाटू लागली, मग ती संपर्कात असावी, म्हणून कुठलाही अहं न ठेवता, मी येथील मैत्रीसाठी नि:शंकपणे विनंत्या पाठवल्या. त्या बहुतेकांनी स्विकारल्यात. अजूनही त्यांत काही दुरावा आला नाही, असे मला तरी वाटते. आपली मंडळी इथं दिसताहेत, म्हणून मला पण विनंत्या आल्यात, मी पण मैत्रीचा हात स्विकारला.
मला असलेली शास्त्रीय संगीताची ओढ, इथं मला खूप मित्र देवून गेली. त्यांचा वावर तसा फारसा इथं नसतो. मात्र त्यांची मैत्री ही इथलं वातावरण संगीतमय बनवून टाकते.
वकीली व्यवसायातील मंडळी, तर सर्व भारतभर आमची मित्रच असते, त्याला इथं अधिकृतपणे ‘फेसबुकीय मान्यता’ मिळाली. त्यांत अजून दृढता आली, मैत्री घट्ट झाली.
मराठीतील साधं, सरळ लिखाण पण किती परिणामकारक ठरू शकते नाही ? क्लिष्ट विषय, हे सोप्या भाषेत दृष्टांताद्वारे आपल्या लिखाणाने सांगणारी मंडळी पण इथं मिळाली. आपल्या पत्रकारितेच्या कौशल्याने साहित्याचा दर्जा असलेली लेखक मंडळी, इथं मिळाली.
राजकारणाच्या वेडापायी कोणाला काहीही संबोधणारी मंडळी इथं दिसली, तसेच वैचारिक भिन्नता असली, तरी ती निखळ मैत्रीच्या आड येवू न देणारी मंडळी पण इथं मिळाली.
काही यापैकी, कोणी काहीही नसले तरी, मित्र म्हणून चांगली माणसं मिळाली. काहींच्या घरी जाण्याचा योग आला, तर काही माझ्याकडे पण भेटायला आलेत. काहींची इच्छा असून पण भेटीचा योग अजून आला नाही.
या सर्व मंडळीच्या संपर्काने, माझी लिखाणाची जुनी उर्मी पुन्हा प्रगट झाली, आणि गांवच्या आठवणी, शालेय आठवणी, व्यवसायातील अनुभव, संगीतातील मला समजलेले स्वर इथं प्रगट व्हायला लागले. काहींना आवडले असतील, काहीना नसतील पण आवडले.
एक मात्र नक्की इथं भरपूर जिव्हाळ्याने किंवा द्वेषाने लिहीलं, बोललं गेलं, तरी त्याचा परिणाम, आपल्या नित्य जीवनावर, या आभासी मैत्रीची व नात्यांचा, करून घ्यायचा नसतो, हे ठरवलं असल्याने, ती पीडा वाटली नाही.
मैत्री व मित्र हा विषय तसा, संपणारा नसतोच ! अजून काही जण माझ्यासोबत मित्र म्हणून येवू इच्छितात, मला पण ते इथं सोबत असावे असे वाटते. त्यामुळे काही नांवे, जी एकापेक्षा अधिक वेळा आली, ती वगळली. काही संस्था वगळल्या, आणि पुन्हा थोडीफार जागा करून घेतली, नव्या मित्रांचे स्वागत करायला !
काहीं चांगल्या मित्रांनी, आपले इथले मित्रसंबंध, आपले खाते बंद करून, सर्वांशीच संपुष्टात आणले. मनांत नाही म्हटले, तरी पाल चुकचुलीच ! त्यांची कारणे आणि अडचणी त्यांनाच माहीत.
—- इच्छा एकच की इथं कोणालाही एकसुरी व कंटाळवाणे वाटू नये. उत्साहाचा रंगबिरंगी झरा इथं निवांतपणे, निरोगी वातावरणांत मुक्तपणे झुळझुळ वहात रहावा.
25.4.2019


No comments:
Post a Comment