रावेरचे न्यायालय म्हणजे तहशीलदार कार्यालयातील काही भागांत सामावलेले ! सरकारच्या सर्व विभागांना स्वतंत्र इमारती मिळणं इतकं सोपं नसायचं पूर्वी ! सरकारकडे साधनसामुग्रीची कमतरता असली, तरी कर्मचाऱ्यांकडे काम करण्याची मानसिकता ही बऱ्यापैकी असल्याने, तुलनेने पुष्कळ चांगलं आणि मन लावून काम केलं जायचं त्यावेळी !
रावेर वकिलसंघाची बाररूम म्हणजे इनमीन दोन चौक्यांची जागा ! एका बाजूला तालुका ट्रेझरीचे आॅफिस तर दुसऱ्या बाजूला फाॅरेस्टचे आॅफिस ! बाजूला सिटी सर्व्हे, त्याच्या बाजूला तुरुंग व त्या समोर पोलीस स्टेशन, त्याच्या शेजारी सब रजिस्ट्रार आणि मग ज्यांची ही इमारत होती, ते तहसीलदार कार्यालय ! अशी सगळी गंमत असायची.
एकदा दुपारी एक जाकिट वगैरे घातलेले, स्वच्छ कपड्यातील, चष्मा लावलेले, साधारण चौकोनी पसरट चेहरा, सावळ्या रंगाचे पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज, असे गृहस्थ आले. सोबत गांवातील काही मंडळी होती. बाररूममधे आल्यावर त्या छोट्याशा जागेत, लगबगीने वकील मंडळी बाजूला सरकली. त्यांना जागा करून दिली. ते बसले, गांवातील मंडळी बहुतेक दरवाज्यातच होती, कारण सर्वांना बसायला मिळेल एवढी बाररूम मोठी नव्हतीच !
‘मी प्रा. फरांदे ! आपल्याकडे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून भेटायला आलोय ! ही अशी सुरूवात प्रा. ना. स. फरांदे यांची !
पदवीधर मतदारसंघ का हवा, त्यांत आपण सर्वांनी मतदान का करायला हवे, समाजातील शिक्षण घेतलेल्या लोकांची जबाबदारी काय वगैरे गप्पा सुरू होत्या. वकिल मंडळींचे समाजासाठी पूर्वीपासून कसे योगदान आहे. त्यांची व आपणा सर्वांचीच जबाबदारी स्वातंत्र्यानंतर कशी वेगळी झाली आणि वाढलेली आहे.
‘मी प्रा. फरांदे ! आपल्याकडे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून भेटायला आलोय ! ही अशी सुरूवात प्रा. ना. स. फरांदे यांची !
पदवीधर मतदारसंघ का हवा, त्यांत आपण सर्वांनी मतदान का करायला हवे, समाजातील शिक्षण घेतलेल्या लोकांची जबाबदारी काय वगैरे गप्पा सुरू होत्या. वकिल मंडळींचे समाजासाठी पूर्वीपासून कसे योगदान आहे. त्यांची व आपणा सर्वांचीच जबाबदारी स्वातंत्र्यानंतर कशी वेगळी झाली आणि वाढलेली आहे.
गप्पांत रमले असतांनाच, लालचंद पाटील यांनी चहा आणला. सर्वांनी चहा घेतला. मग ते सर्वांना नमस्कार करून निघून गेले. नंतर यथावकाश निवडणुक झाली. आम्ही मतदान केले. मी पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्यांदाच केले. ते निवडून आले. विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. लक्षात राहिला, तो त्यांचा साधेपणा, बोलण्यातील साधेपणा आणि सात्विकता, तसेच प्रत्यक्ष न दिसणारी पण वागण्यात जाणवणारी अध्यात्मिक पार्श्वभूमी ! मध्यंतरी ते गेल्याची बातमी आली. साधी माणसं राजकारणातून दिसेनासी होत आहेत.
—— काही नाही, काल आपल्या औरंगाबादचे लोकसभेसाठीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड वकिलमंडळींच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुंबई उच्चन्यायालायच्या औरंगाबाद खंडपीठात आले होते, म्हणून आठवलं !
4.4.2019

No comments:
Post a Comment