Thursday, June 27, 2019

आताच श्री. प्रविण बर्दापूरकर यांची श्री. राज ठाकरे यांच्यावरची पोस्ट वाचली, काही मुद्दे सांगावेसे वाटले.
१. प्रत्येकाच्या भाषणाला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांमधे होईलच हे सांगता येत नाही, कारण ऐकायला येणारी मंडळी, ही उत्सुकतेने पण ऐकायला येतात. मत देणारी मंडळी मत देतांना, आपला-परका, पैसे देणारा-न देणारा, पैसे खावून काम करणारा-न करणारा, खरा-खोटा वगैरे ठरवून मग मत देतात. (इथं मी, सभेला येणारी मंडळी स्वत:हून येतात, त्यांना कोणी रोजंदार देवून आणत नाही, हे गृहीत धरले आहे.)
२. हा चांगला नाही, याच्याकडे जावू नका, हे जसे सांगीतले जाते, तसे कोणाकडे जावे, हे पण सांगावे लागते. हे जर सांगीतले नाही, तर तुमची भूमिका ही मार्गदर्शकाची नसून, संबंधीत व्यक्तीच्या द्वेषातून निर्माण झालेली आहे, हे समजण्याइतकी भारतातील जनता सूज्ञ व हुशार आहे. समर्थ पर्याय पुढे नसेल तर, केवळ द्वेष केल्याने काहीही साध्य होत नाही.
३. हा नको, तर कोण ? हा विचार पण जनतेने सभेला येण्यापूर्वी केलेला असतो. त्यात काही नवीन पर्याय मिळाला, तर उपयोग होतो, अन्यथा त्यातून फारसे काही साध्य होत नाही. जी मंडळी कुंपणावरची असतात, म्हणजे ज्यांचा विचार निश्चित झालेला, नसतो, त्यांच्यावर थोडाफार परिणाम होऊ शकतो, की जेव्हा तुल्यबळ व सक्षम पर्याय असेल ! इथं असे काहीही दिसत नाही.
४. आपल्याला जे ज्ञान असेल, ते सर्वांना द्यायला हवे, ही भूमिका जर असेल, तर तुम्ही ज्ञानी आहे, हे जनतेने पूर्वी मान्य करायला हवे, तुमची तेवढी विश्वासार्हता हवी. ती जर नसेल, तर या अशा कांगावखोर भाषणाचा विशेष परिणाम होत नाही. उद्या जर मा. मनमोहनसिंग, मा. प्रणव मुखर्जी, मा. अरूण जेटली, मा. सुरेश प्रभू, मा. रविशंकर प्रसाद, मा. अडवाणी वगैरे मंडळी आपल्याशी त्यांच्या क्षेत्रासंबंधी विषयावर बोलायला आली, तर त्यांना ऐकायला, सर्व विचारांची मंडळी येतील, कारण त्यांचे त्या क्षेत्रात योगदान आहे. असं इथं काय आहे, असं सांगता येईल ?
४. एकदा का तुमच्याजवळ सांगण्यासारखे काहीही नसून, केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी हे केले जात आहे, हे समजले की तुमच्या कार्यक्रमाला जनता करमणुकीच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त महत्व देत नाही.
५. विरोधकांचा आवाज दाबला जातोय, हे आपल्या बाबतीत जितके सत्य असते, तितकेच इतरांच्या बाबतीत पण असते.
६. राज्यशकट हाकणे म्हणजे भाषण करण्याइतके सोपे नाही, की उचलली जीभ आली लावली टाळ्याला ! शासनाने घेतलेले निर्णय, कोर्टाने दिलेले आदेशसुद्धा किती व्यवस्थित डावलले जातात, हे आपण वेळोवेळी पहात आलेलो आहे. यासाठी आपल्या विचारसरणीची, पक्षाची मंडळींची मजबूत यंत्रणा हवी, तसेच कामाप्रती श्रद्धा व कर्तव्याची जाण असलेली कर्मचारी यंत्रणा हवी, तरच त्याची, धोरणाची नीट अंमलबजावणी होते. नोकरीवर सरकारी कर्मचारी घेतांनाची, ‘पारदर्शक व्यवस्था’ आठवा, उत्तर मिळेल. आदर्शव्यवस्था आणि वस्तुस्थिती यांत जमीन आणि अस्मान इतके अंतर असते, खरे व खोटे इतके अंतर असते. एरवी चांगली पोपटपंची करणारी मंडळी, स्वत:वर वेळ आली, की कशी विपरीत वागतात, हा अनुभव पूर्वीपासून येत आलेला आहे. ‘त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता ?’ हे विचारावं लागते.
सरतेशेवटी काम करणारा कोण, आणि न करणारा कोण, हे जनता योग्यतऱ्हेने जाणून असते. सर्व काम सरकारने करायला हवे आणि ते पण फुकटात, ते त्याचे कर्तव्यच आहे, हा समज करून देणार असेल, तर ते केवळ चुकीचे नाही तर, अहिताचे आहे. जनतेने आपली जबाबदारी काय आणि सरकारची काय, हे ओळखायला हवे. त्यासाठी आपले कर्तव्य पार पाडून, सरकारला धारेवर धरायला हवे, तर ते यशस्वी होते. आपले कर्तव्य पार पाडणे कठीण असते, सरकारला, मग ते सरकार कोणाचेही असो, सोपे असते; पण चुकीचे असते, अंतीमत: देशाच्या, समाजाच्या अहिताचे असते.
तर सरते शेवटी आपच्याकडे किर्तन असले, की येणारा अनुभव आठवला तो सांगतो. काहींना किर्तनकाराचे किर्तन ऐकावे, दोन चांगले शब्द कानांवर पडतील असे वाटते. ते किर्तनाला जातात. मात्र काहींना किर्तन उधळून लावायचे असते. ते एखाद्या गल्लीतून हाकलत हाकलत, डुकराला किर्तनांतील श्रोत्यांत घुसवतात. गोंधळ होतो थोडावेळ ! मग किर्तन ऐकायला आलेली मंडळी, ही किर्तनांत शिरलेल्या डुकराला तर हाकलतातच पण हा किर्तनात डुक्कर घुसवून कीर्तनाची दाणादाण करणारा कोण आहे, त्याला पण पहातात.
या सरकारचे काम व्यवस्थित चालू आहे, त्याला नीट करू द्या !

19.4.2019

No comments:

Post a Comment