परवा दि. ११ एप्रिल, २०१९ (गुरूवार) रोजी सांस्कृतिक कलामंच, रावेर यांच्या ‘सांज पाडवा संयोजन समितीच्या’ वतीने रावेर, जि. जळगांव येथील संगीत विद्यालय, रावेर याच्या संचालिका श्रीमती निर्मला मोरेश्वर भोकरीकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराचे निमीत्ताने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक, सूरमणी श्री. धनंजय मोरेश्वर जोशी, नांदेड (आकाशवाणी व दूरदर्शन मान्यताप्राप्त ‘ए ग्रेड’ कलाकार) यांचे गायन ठेवले होते.
सांस्कृतिक कलामंचाचे अध्यक्ष श्री. पुष्कराज मिसर आणि मान्यवर कलाकार, अध्यक्ष यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्रीमती निर्मला भोकरीकर यांचा सत्कार श्री. प्रकाश मुजुमदार, चेअरमन, रावेर शिक्षण संवर्धक समिती, रावेर यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध गायक, श्री. धनंजय जोशी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांचे साथीदार, तबलावादक श्री. तेजस सतीष मराठे, भुसावळ आणि हार्मोनिअम वादक श्री. अक्षय गजभिये, जळगांव तसेच तानपुऱ्यावर साथ करणाऱ्या सौ. प्रांजली रस्से यांचा सत्कार करण्यात आला.
पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ श्रीमती निर्मला भोकरीकर, रावेर सारख्या छोट्या गांवात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विद्यार्थ्यांना शिकवत, त्यांनी शास्त्रीय संगीताची रूची त्या गांवात जोपासली. यांनी आपले संगीताचे शिक्षण विवाहापूर्वी सुमारे बारा वर्षे जळगांव येथील संगीतज्ञ, कै. गोविंदराव कुलकर्णी (कै. पं. कृष्णराव पंडीत, ग्वाल्हेर यांचे शिष्य) यांचेकडे घेतले. आपल्या सासरी म्हणजे रावेर येथे आल्यावर, काही वर्षांनी सन १९६४-६५ पासून त्यांनी संगीताच्या शिकवण्या घेण्यास सुरूवात केली. हे विद्यार्थी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेसाठी जळगांवी घेवून जात. साधारणपणे १९८० पावेतो, हे असे सुरू होते. सन १९८१ पासून ते साधारण सन १९९६-९७ पावेतो रावेर येथे ‘संगीत विद्यालय, रावेर’ या नांवाने त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीताच्या परिक्षेचे केंद्र चालवले. नंतर देखील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरू होते ते गेल्या चार-पाच वर्षांपावेतो ! नंतर मात्र प्रकृती साथ देईना, म्हणून जरा थंडावले. या सुमारे १९६४ ते २०१५ पावेतोच्या काळात असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडून शिकून गेले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी हा ज्ञानयज्ञ, स्वत: विद्यार्थ्यांना शिकवत तेवत ठेवला आहे. या परिसरातील कोणीही शास्त्रीय संगीत शिकलेला असेल, तर त्यांचे मूळ नक्कीच इथं सापडते.
मध्यंतरी त्यांनी, उमेदीच्या काळात, जळगांव आकाशवाणीवर ‘आकाशवाणी कलाकार’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी दोन वेळा ‘आॅडीशन’ दिली, त्यांत उत्तीर्ण झाल्यावर मात्र, नंतर दिल्लीला रेकाॅर्डिंग करून पाठविण्याच्या वेळी, त्यांना घरगुती कारणाने जाता आले नाही. ती वाटचाल तिथंच थांबली. नंतर वर्तमानपत्रात मुलाखत, आकाशवाणी जळगांव केंद्राने मुलाखत घेवून या त्यांच्या कार्याची दखल घेतली. हे सर्व त्यांच्याबद्दल सांगत, सत्कार सभेची प्रस्तावना, त्यांचे चिरंजीव आणि औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठातील वकील, श्री. माधव भोकरीकर यांनी केली.
त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेला वारसा, पुढे चालविणारे आणि त्यांचे विद्यार्थी यांचा सत्कार, श्रीमती निर्मला भोकरीकर यांचेवतीने, त्यांचे चिरंजीव ॲड. माधव भोकरीकर यांनी केला. त्यांत सौ. प्रांजली रस्से (पूर्वाश्रमीच्या मीना भोकरीकर), श्री. प्रभुदत्त मिसर, श्री. अरूण सुगंधीवाले, सौ. प्रिती विखरणकर (पूर्वाश्रमीच्या प्रिती मच्छर), डाॅ. दत्तप्रसाद दलाल, श्री. हेमेंद्र नगरिया हे होते.
कार्यक्रमाचा सत्कार समारंभाचा भाग आटोपल्यावर, दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांचे व मुख्य गायकांचे आपल्या कलेचे सादरीकरण हा भाग सुरू झाला. श्रीमती निर्मला भोकरीकर यांची पूर्वीची विद्यार्थीनी सौ. प्रिती विखरणकर, औरंगाबाद यांनी ‘सरस्वती वंदना’ हे नृत्य अप्रतिमपणे सादर केले. नंतर श्रीमती भोकरीकर यांचे चिरंजीव आणि विद्यार्थी श्री. मुकुंद भोकरीकर यांनी हार्मोनियमवर राम नवरात्रोत्सवाचे औचित्य लक्षात घेवून, रामाचे भजन अतिशय सुंदर, लयकारी दाखवत सादर केले. त्यांना तबलासाथ श्री. तेजस मराठे यांनी केली.
नंतर समस्त रावेरवासी ज्यासाठी उत्सुक होते, तो कार्यक्रम म्हणजे सूरमणी श्री. धनंजय जोशी, नांदेड यांचे गायन सुरू झाले. सुरूवातीच्या स्वरलगावानेच सभा ताब्यात घेत, त्यांनी बिहाग राग गात असल्याचे सांगीतले. बिहाग या रागातील ‘कवना ढंग तोरा’ हा एकतालातील बडा ख्याल त्यांनी सुरू केला. अप्रतिम स्वरविस्तार करत राग डोळ्यांसमोर उभा केला. त्यानंतर तीनतालातील चीज ‘लगन तोसे लागी बलवमा’ ही सादर केली. त्यानंतर श्रोत्यांमधून फर्माईश आली, ती तरान्याची ! ‘श्रोत्यांना जलद लयीतील गीत आवडते, म्हणून कदाचित आपण तराना सांगत असाल, पण मध्य लयीत पण तराना, किती छान वाटतो, ते ऐकाच !’ म्हणत ‘रागेश्री’ या रागातील ‘तराना’ त्यांनी ऐकवला.
यानंतर ‘मानापमान’ या कै. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या नाटकातील, ‘या नवनवलनयनोत्सवा’ हे पद अप्रतिमपणे सादर केले. पदांत वेगवेगळे राग दाखवत, पुन्हा मूळ रागावर येता येते, हे ‘रागांतर’ प्रकाराने दाखवले.
‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ हे अशोकजी परांजपे यांचे गोरा कुंभार या नाटकातील गीत म्हटले. यानंतर भैरवीने सभेची सांगता केली ती ‘राम नाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी’ हे संत एकनाथ महाराजांचे प्रसिद्ध भजन गावून ! त्यांना तबल्यावर समर्थ साथ श्री. तेजस मराठे, भुसावळ आणि हार्मोनियमवर सुंदर साथ श्री. अक्षय गजभिये यांनी केली.
नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम नाईलाजाने उशीरा सुरू होणे, कार्यक्रमा दरम्यान लाईटाने थोडा वेळ करामत दाखवत अंधार करणे, तसेच सरतेशेवटी निवडणुका आणि त्याच्या आचारसंहितेचा बसलेला फटका, कार्यक्रमाची वेळ कमी होण्यात झाला. उत्तम सुरू असलेला व रंगात आलेला कार्यक्रम, निदान दोन-चार तास तरी अजून चालायला हवा होता, ही हुरहूर व्यक्त करत श्रोते घरी गेले.
14.4.2019


https://scontent-bom1-2.xx.fbcdn.net/v/t1.0-9/57070947_2291720984217304_6019417440100810752_n.jpg?_nc_cat=100&_nc_eui2=AeHiUo3CLEMturDXXh852x2qvvUuCi70Aw7I14H6_StnryMqO1ULaP_pzwX7uk-X28Q1fxxPyeY7goz8rKc_mNBm8HNcsunshS7XChE3IO0zKw&_nc_oc=AQlBtW_t7uFeG8jGUScEzfei-FT8b9okOXy0c7B6CMHczQxEDr0BJaG_EguJrjXX_9Y&_nc_ht=scontent-bom1-2.xx&oh=943d2ba832dcaf973c6fc6ad3d7b7d0d&oe=5DC4CC0E

No comments:
Post a Comment