Thursday, December 20, 2018

'गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या'
मला अचानक माझ्या शाळेत मी बहुधा सातवीत असतांना शिकविलेली 'गाई पाण्यावर काय म्हणून आल्या' ही 'नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' यांची कविता आठवली. अत्यंत अप्रतिमपणे शिकविलेली ही कविता माझ्या आजही लक्षात आहे.
बापाचे दारिद्य मुलांच्या उर्मी, अपेक्षा कशा मारून टाकत असतांत मात्र ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या पण खोट्या उपायाने आपल्या बापास कसे हृदय पिळवटून टाकणारे समाधान देत असतांत. वाचा ---------------
गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.
तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'
पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !
नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !
तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरि हा प्रलय महाभारी !
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
नये वदतां, अनुभवी जाणती ते !
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !
"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
(ही पोस्ट नांवासहीत ‘शेअर’ करण्यास हरकत नाही)

३०. ६. २०१८

No comments:

Post a Comment