Sunday, October 20, 2019

आता नुकतीच माझ्या वाचण्यात, श्री. बिपीन राजन कुलकर्णी यांची डाॅ. काफील खान, या उत्तर प्रदेशातील डाॅक्टरच्या निर्दोषत्वाचे जे वृत्त येत आहे, त्याबद्दलची पोस्ट आली. डाॅक्टर काफील खान, यांच्या चौकशीची कोणतीही कागदपत्रे मी बघीतली नाही, अथवा त्यांच्या आजपर्यंतच्या सेवेचे रेकाॅर्ड बघीतले नाही. त्यांचे काम प्रत्यक्ष पण बघीतले नाही, त्यामुळे त्यांच्या संबंधाने काही मत व्यक्त करणे, ही कायद्याच्यादृष्टीने घाईचे ठरेल.
आज निवडणुका लढवून, लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले, आपल्या अवतीभोवती कितीतरी दिसतात. वारंवार पक्ष बदलून देखील, ते जनसेवा करायला तयारच असतात. त्यांतील अंतस्थ हेतू अगदी कोणासही समजेल इतका स्पष्ट असतो.
इथं मला, दुसरा पण महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता जनतेला लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत. याला वरदहस्त असतो, तो त्यांचे वरिष्ठ आणि सर्वोच्च म्हणजे शासन ! ही सर्व मंडळी एकमेकांच्या आधाराने समाजाला, जनतेला नागवत असते. यांच्यात पण काही अपवाद असलेली तुरळक मंडळी आहेत, त्यांना खड्यासारखे या यंत्रणेमधून वगळले जाते. त्यांना महत्वाचे काम दिले जात नाही. तरी नाईलाजाने एखादी व्यक्ती असलीच, तर त्याच्याविरूद्ध खोटीनाटी कुभांडे रचली जातात. त्याला सळो का पळो करून सोडले जाते, कालांतराने तो पण यांच्यात सामील होतो.
अशा सरळमार्गी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बऱ्याच जणांना समस्या निर्माण होतात. यांच्याविरोधात सर्व जण जातपात, धर्म, पंथ, पक्षीय भेद वगैरे सर्व विसरून एक होतात. कोणाविरूद्धही अशा कायदेशीर चौकशा लावल्या जातात. अगदी कट्टर हिंदू वाटणाऱ्यांच्याविरूद्ध पण विभागीय चौकशा लावल्या जात होत्या, लावल्या जातात आणि कदाचित असंच चालू राहिले तर पुढे पण लावल्या जातील. इथं सरकारचा संबंध कमीच असतो, संबंध असतो, तो सरकारचे नाक, कान व डोळे असलेल्या यंत्रणेचा ! तिला जो माणूस अडचणीचा ठरेल, तिच्याविरूद्ध हे शस्त्र उचलले जाते. मात्र शस्त्र उचलल्याचा उच्चार सरकारकडून होतो. सरकार बदनाम होते, किंवा प्रसिद्ध होते.
——- प्रशासन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अहवालाची पर्वा, न करता सत्य शोधून शिक्षा करणारा शासक विरळा ! माझ्याजवळ कित्येक उदाहरणे आहेत. अडचण ही, की आपल्याकडे न्यायालयांत सिद्ध झाल्यावरच, त्याला सत्य समजले जाते, तोपर्यंत ते काय असते, परमेश्वरच जाणो. मात्र त्या बिचाऱ्याचे आयुष्य जवळपास संपून जाते, त्या जिवंतपणीच्या मरणयातना भोगता भोगता !

28.9.2019


No comments:

Post a Comment